महापौर रंजना भानसी यांचे प्रतिपादन ... म. टा. प्रतिनिधी, नाशिक 'अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्याविरोधात सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे असून, या मुद्याचे राजकारण होता कामा नये. धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी ट्रस्ट व विश्वस्तांनी पुढाकार घ्यावा. जाहीर झालेल्या यादीविरोधात वैयक्तिक स्तरावर हरकती नोंदवाव्यात. सर्व आमदार, नगरसेवक व धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांसोबत लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न करते. पण, त्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवली, तरच हा लढा लढता येईल', असे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले. महापालिकेने प्रसिध्द केलेल्या अनधिकृती धार्मिक स्थळांच्या यादीविरोधात सर्व धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची बैठक घेण्यात आली. बैठकीत अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शहरातील धार्मिक स्थळांच्या फेरसर्वेक्षणानंतर महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी जाहीर केली. पण, या यादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याने धार्मिक स्थळांचा वाद पुन्हा पेटायला सुरुवात झाली आहे. या यादीविरोधात उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करण्यासाठी धार्मिक स्थळ बचाव समितीचे समन्वयक तथा सभागृहनेते दिनकर पाटील यांनी विश्वस्तांची बैठक बोलावली होती. बुधवारी सकाळी ११ वाजता गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात ही बैठक घेण्यात आली. त्यावेळी महापौर रंजना भानसी, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेते दिनकर पाटील, नगरसेवक विलास शिंदे व्यासपीठावर होते. दिनकर पाटील म्हणाले, की धार्मिक स्थळांचा बचाव करणे आपले कर्तव्य आहे. याबाबतीत राजकारण आणू नये. सर्व पक्षांनी धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी लढा उभारावा. बाजू मांडण्यासाठी आपल्याकडे एक महिना असून, त्या काळात सर्व विश्वस्तांनी वैयक्तिक हरकती दाखल कराव्यात. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढू. नगरसेवक विलास शिंदे यांनी उपस्थित विश्वस्तांना एकत्रित येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की धार्मिक स्थळांचा बचाव हा प्रत्येकाच्या मनातील ज्वलंत मुद्दा आहे. असे असले तरी या बैठकीस काही कारणास्तव सर्व धार्मिक स्थळांचे विश्वस्त उपस्थित राहू शकले नाहीत, याची खंत वाटते. प्रत्येकाने शहरातील धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी या लढ्यात उतरायला हवे. बैठकीत विश्वस्तांनी आपले मते मांडली. वैयक्तिकरित्या यादीविरोधात हरकती नोंदवू, पण लोकप्रतिनिधींनी धार्मिक स्थळे वाचविण्याच्या लढ्यात शेवटपर्यंत साथ द्यावी, अशी अपेक्षा विश्वस्तांनी व्यक्त केली. ... \Bहे षडयंत्र! \B'तीन दिवसांत आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुद्दाम अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. आचारसंहितेत लोकप्रतिनिधींना जनतेच्या हितासाठी एल्गार पुकारता येणार नाही. नागरिक आणि लोकप्रतिनिधींची गळचेपी व्हावी, त्या हेतूने हे षडयंत्र रचले आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतूनही यावर तोडगा निघाला नाही, तर शहरात जे काही होईल, त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल', अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी मांडली. .... \Bआमदारांसह विश्वस्तांची पाठ\B या बैठकीला शहरातील तीनही आमदारांनी पाठ फिरवली. नगरसेवकही या बैठकीस उपस्थित नव्हते. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांच्या फेरसर्वेक्षणात तब्बल ६४७ धार्मिक स्थळे अनधिकृत ठरविण्यात आली आहेत. मात्र, सभागृहात अवघे शंभरच्या आसपास विश्वस्त उपस्थित होते. त्यामुळे धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी एल्गार पुकारायचा असेल, तर सर्वांनी एकत्रित येऊन लढा द्यावा, असा सूर त्या बैठकीत व्यक्त झाला. त्यामुळे मंदिर विश्वस्तांच्या वतीने गुरुवारी आमदार बाळासाहेब सानप यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट