Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रिकाम्या हंड्यांसह महिलांचा रास्तारोको

$
0
0

येवला-नांदगाव राज्यमार्गावर मांडले ठाण

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या भीषण दुष्काळातील तीव्र पाणीटंचाई बघता वनविभागाच्या वडपाटी बंधाऱ्यानजीक विहीर घेऊन त्याद्वारे गावासाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी परवानगी मिळावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी येवला तालुक्यातील राजापूर ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले. त्यातच बुधवारी गावातील महिलांनी रिकाम्या हंड्यानिशी येवला-नांदगाव राज्य मार्गावर या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. अगदी मोठ्या संख्येने या रास्ता रोको आंदोलन आंदोलनांतर्गत गावातील माता-भगिनींनी रस्त्यावर ठाण मांडल्याने या मार्गावरील वाहतूक बराच वेळ खंडित झाली होती.

येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व पट्ट्यातील कायमच दुष्काळग्रस्त असलेल्या राजापूर गावातील ग्रामस्थांनी यंदाच्या दुष्काळी दाहकतेच्या मोठ्या तडाख्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला आहे. गावानजीक असलेल्या वनविभागाच्या हद्दीतील वडपाटी साठवण बंधाऱ्यानजीक विहीर घेऊन त्याद्वारे गावासाठी पाणीयोजना राबविण्यासाठी वनविभागाने परवानगी देण्याची मागणी राजापूरकरांनी लावून धरली आहे. सातत्याने मागणी करूनही वनविभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप राजापूरकर यांनी केला आहे. या निषेधार्थ ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून गावात बेमुदत उपोषणाचा पवित्रा घेतला होता. सुरू झालेले बेमुदत उपोषण बघता वनविभागाकडून कुठलेही ठोस आश्वासन मिळत नसल्याने बुधवारी दुपारी गावातील महिलांनी येवला-नांदगाव राज्यमार्गाकडे मोठ्या संख्येने मोर्चा नेला. रिकाम्या हंड्यांसह रस्त्यावर ठाण मांडले. जोरदार घोषणाबाजी करीत यावेळी महिलांनी या मार्गावर बराचवेळा रास्ता रोको केला. विधान परिषदेतील आमदार नरेंद्र दराडे यांनी आचारसंहिता संपल्यानंतर याबाबतीत नियमानुसार योग्य ती पुढील कार्यवाही करण्याबाबतचे आश्वासन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने गावात सुरू असलेले बेमुदत उपोषण, तसेच राज्यमार्गावरील दोन तासांपेक्षा अधिक वेळ चाललेले 'रास्तारोको' आंदोलन मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीटंचाईला नगराध्यक्षच जबाबदार

$
0
0

सटाण्यातील नगरसेवकांचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातून दररोज शेकडो पाण्याचे टँकर शेतीसिंचनासाठी विक्री होत आहे. त्यामुळे संबंधित विहिरी पालिका प्रशासनाने अधिग्रहीत केल्यास शहरातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार असतानाही प्रशासकिय अधिकारी आणि नगराध्यक्ष याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

शहरातील विहिरी अधिग्रहीत करण्याच्या मागणीचा प्रस्ताव आपल्याकडे आलेला नसून, हे सर्वच अधिकार मुख्याधिकारी यांनाच असल्याचा खुलासा तहसीलदार इंगळे यांनी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला केल्याने शहरातील पाणीटंचाईला नगराध्यक्ष सुनील मोरे व मुख्याधिकारी हेमलता डगळे हेच जबाबदार असल्याचा सूर नगरसेवकांनी आळविला आहे.

सटाणा शहरातील पिण्याच्या पाण्याची दाहकता वाढली आहे. तब्बल १९ दिवस झाले तरीही शहरात नळांना पाणी न आल्यामुळे पालिका प्रशासनाने पर्यायी टँकरची व्यवस्था न केल्याने शहरवासियामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी सटाणा नगर परिषदेचे काँग्रेसचे गटनेते दिनकर सोनवणे, नगसेवक राहुल पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते काकाजी सोनवणे, भाजप नगरसेवक मुन्ना शेख, महिला नगरसेविका निर्मला भदाणे, भारती सूर्यवंशी, पुष्पलाता सूर्यवंशी यांनी तहसीलदार यांची भेट घेतली.

खासगी विहिरी अधिग्रहीत करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविल्याचे नगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले होते. मात्र नगरसेवकांनी तहसीलदारांची भेट घेतली असता असा कोणताही प्रस्ताव पालिका प्रशासनाने पाठविला नसल्याचा खुलासा तहसीलदार इंगळे यांनी केला. त्यामुळे नगराध्यक्ष मोरे यांचा खोटेपणा सिद्ध झाला आहे. आणि शहरातील पाणीटंचाईला मोरे हेच जबाबदार आहेत.

- दिनकर सोनवणे, काँग्रेस गटनेते

सटाणा शहरातील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता चणकापूरचे आवर्तन सोडण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र आवर्तन सोडण्यास तांत्रिक अडचणी आहेत. बुधवारपासून शहरातील दहाही प्रभागात २० पाण्याचे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने गतीमान पाऊले उचलली आहेत.

- सुनील मोरे, नगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षाशुल्क परत देण्याची मागणी

$
0
0

मनमाड : शासनाने नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर केला असल्याने विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क महाविद्यालयाने परत द्यावे, अशी मागणी बुधवारी रिपब्लिकन पक्ष आठवले गट युवा शाखेतर्फे मनमाड महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे करण्यात आली. गुरू निकाळे यांच्या नेतृत्वाखाली युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्राचार्य बी. एस. जगदाळे यांना मागण्यांचे निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुदानावर आता समितीची मात्रा

$
0
0

वसंत व्याख्यानमाला अनुदानाचा वाद

...

- अनुदानाबाबात धोरण आखण्याच्या हालचाली

- समिती घेणार अनुदानाचा अंतिम निर्णय

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांना देण्यात येणाऱ्या आर्थिक अनुदानाबाबत अलिकडे वाद निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता अनुदानाबाबत धोरण आखण्याची तयारी सुरू केली आहे. वसंत व्याख्यानमालेबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अनुदानासंदर्भात निर्णय घेण्यासाठी पालिकेत अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोणत्याही संस्थेला अनुदान देण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आर्थिक स्थिती अगोदरच डामाडोल असताना महापालिकेकडून शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक सस्थांवर अनुदानाची उधळपट्टी केली जाते. परंतु, तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंनी या अनुदानाला ब्रेक लावला होता. वसंत व्याख्यानमालेला देण्यात आलेल्या तीन लाखांच्या अनुदानाचा वाद सध्या शहरात गाजतोय. या संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदानाचा योग्य वापर होतो, की नाही याची पडताळणी मात्र केली जात नाही. काही संस्था आपल्या भोवती असलेल्या वलयाचा वापर करून तसेच, राजकीय व प्रशासकीय दबाव निर्माण करून अनुदान लाटत असल्याचेही चित्र होते. अशातच वसंत व्याख्यानमालेच्या अनुदानाचा वाजवल्यानंतर आता महापालिकेने ताकही फुंकून पिण्याची भूमिका घेतली आहे. यापुढे कोणत्याही संस्थेने अनुदानाच्या मागणीचा अर्ज केल्यानंतर महापालिका सक्षम अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार असून, त्यांनी काटेकोरपणे तपासणी केल्यानंतरच अनुदान देण्याचा निर्णय होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांडवगणे कुटुंबाला धनंजय मुंडेंकडून मदत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वीरपुत्र निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबीयांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडून १ लाख २ हजारांची आर्थिक मदत बुधवारी देण्यात आली. नाशिकचे माजी आमदार जयवंत जाधव यांची कन्या सुप्रिया जाधव व तिच्या शालेय मैत्रिणींच्या हस्ते वीरपुत्र निनाद यांची कन्या वेदिता मांडवगणे यांच्याकडे मदतीचा धनादेश देण्यात आला. या वेळी जाधव यांच्या पत्नी जान्हवी जाधव यांनी मांडवगणे कुटुंबीयांची भेट घेतली. निनाद यांचे वडील अनिल मांडवगणे, आई सुषमा मांडवगणे उपस्थित होते.

वीरपुत्र निनाद मांडवगणे कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नुकतीच सांत्वनपर भेट घेतली होती. त्यानंतर त्याच दिवशी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाकडून आदर्श आमदार पुरस्कार देऊन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना गौरविण्यात आले होते. या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे होते. त्या वेळी शरद पवार व छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी यामध्ये ५१ हजार रुपयांची भर घालत १ लाख २ हजार रुपयांची मदत मांडवगणे कुटुंबाला जाहीर केली. त्यानंतर मुंडे यांनी माजी आमदार जयवंत जाधव यांच्याकडे आर्थिक रकमेचा धनादेश पाठविला होता. आमदार जाधव यांची कन्या सुप्रिया जाधव हिने बुधवारी आपल्या शालेय मैत्रिणींसोबत मांडवगणे कुटुंबीयांची भेट घेऊन धनादेश त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. यावेळी सुप्रिया यांनी निनाद यांच्या मुलीसाठी लिहिलेले पत्रदेखील त्यांना दिले. या वेळी सुप्रिया आणि तिच्यासोबतच्या भावना सुंदररमण आणि कशिश बेन्स या मैत्रिणींनीही शालेय टेनिस स्पर्धेत व विज्ञान प्रदर्शनात मिळविलेल्या बक्षिसांची रक्कम मांडवगणे कुटुंबीयाकडे सुपूर्द केली. या वेळी आमदार जाधव यांच्या पत्नी जान्हवी जाधव यांच्यासह विद्यार्थिनी कशिश बेन्स, भावना सुंदररमण, सृष्टी भालेराव, सृष्टी होडे, शिवानी जाधव, तेजस्विनी देवरे आदी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मतदार ओळखपत्रांचे तात्काळ वाटप करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नवमतदारांच्या ओळखपत्रांचे तात्काळ वाटप करा, अशा सूचना उपजिल्हाधिकारी तथा मालेगाव बाह्य मतदार नोंदणी अधिकारी गणेश मिसाळ यांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) बैठकीत दिल्या.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीत नवीन नोंदणी झालेल्या १२ हजार ७७८ मतदारांचे मतदान ओळखपत्र प्राप्त बुधवारी प्राप्त झाले. नव्याने प्राप्त झालेले हे मतदान ओळखपत्र लगेचच 'बीएलओ' यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यांनी प्राधान्याने या ओळखपत्रांचे वाटप करावे, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या.

संबंधित नवमतदारांनी यासाठी आपली नावे असलेल्या यादी भागांच्या बीएलओ यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा. तसेच जे नवमतदार हे एक जानेवारी २०१९ या तारखेला १८ वर्षे पूर्ण करत आहेत आणि मतदार यादीत अजूनही त्यांचे नाव नोंदले गेलेले नाही, अशा मतदारांनी ऑनलाइन पोर्टलवर मतदार यादीत आपले नाव तातडीने नोंदवावे, असे आवाहन या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी बैठकीस सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार नरेश बहिरम व निवडणूक नायब तहसीलदार रमेश वळवी हे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅडव्हेंचर स्पोर्टस् अन् ग्रेप पार्कला मुहूर्त

$
0
0

एमटीडीसी 'डीबीएफओटी' तत्त्वावर चालवायला देणार

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आचारसंहिता लागू होण्याअगोदर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गंगापूर धरणाजवळील अॅडव्हेंचर स्पोर्टस् व ग्रेप पार्क रिसॉर्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 'डीबीएफओटी' तत्त्वावर क्लब व रिसॉर्ट चालवले जाणार असून, त्यासाठी नोटीस प्रसिध्द केली आहे. डीबीएफओटी तत्त्वाच्या या नोटीसमध्ये खासगी कंपनी किंवा संस्थांना डेव्हलपमेंट, ऑपरेशन, मेन्टेनन्स करून यातून उत्पन्न मिळवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना १३ कोटी ५० लाख मोजावे लागणार आहेत.

गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे त्याला मुहूर्त कधी लागतो असे प्रश्न वारंवार उपस्थित केले जात असताना हे टेंडर काढण्यात आले आहे. गंगापूर धरणावरील अॅडव्हेंचर स्पोर्टस् कॉम्प्लेक्स तयार आहे. त्याचप्रमाणे येथील ग्रेप पार्क रिसॉर्टही पूर्ण झाले आहे. त्यामुळे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिसॉर्टमध्ये चार ट्रिन्व व्हिला बंगल्यात १२ लक्झरी सूट, तर दुसऱ्या इमारतीत २८ लक्झरी सूट आहेत. त्याचबरोबर स्विमिंग पूल व रेस्टॉरेंटसह येथे बिझनेस सेंटर, कॉफी शॉप आदी सुविधा आहे. याच ठिकाणी बोट क्लबही आहे. त्यात ४७ बोटी ८ कोटी ४७ लाख रुपये खर्च करून विकत घेण्यात आल्या. पण, यातील काही बोटी पळविण्यात आल्या, तर काही बोटी नादुरुस्त आहेत.

छगन भुजबळ हे पर्यटनमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पासाठी भरीव निधी दिला. त्यातील अॅडव्हेंचर स्पोर्टचे कामही पूर्ण झाले. पण, ते सुरू झाले नाही. आता सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ एप्रिलला त्यासाठी निविदा अंतिम केली जाणार आहे. त्यानंतर हे कंपनी किंवा संस्थेला दिली जाणार आहे.

...

पर्यटनात पडणार भर

नाशिकच्या पर्यटनात भर पडावी, असे हे काम आहे. त्यातून अॅडव्हेंचर स्पोर्टमुळे पर्यटकांचे पाय धरणाकडे वळतील. धरण पर्यटनाला यातून चालना मिळेल. त्याचप्रमाणे ग्रेप सिटी रिसॉर्टही धरणालगत असल्यामुळे त्यातून फायदा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होर्डिंगमुक्तीचा धडाका

$
0
0

महापालिकेची कारवाई; दोन हजारांवर बॅनर्स हटविले

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच, जिल्हा प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. महापालिकेनेही आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून तीन दिवसात अतिक्रमण निर्मूलन विभागाने राजकीय पक्षाशी संबधित दोन हजार ३६ होर्डिंग्ज, बॅनर्स, झेंडे हटविले आहेत. तसेच यापुढे अनधिकृतपणे होर्डिंग्ज, बॅनर्स लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी (दि. १०) लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होताक्षणी या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता देखील देशभरात लागू झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. ११) जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय संस्थांमधील अधिकाऱ्यांची बैठक घेत आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. आचारसंहिता काळात मतदारांवर प्रभाव पडू शकतील असे राजकीय पक्षांचे झेंडे, होर्डींग्ज, बॅनर्स विनापरवाना उभारण्यास बंदी असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील सहाही विभागात कारवाई करत महापालिकेच्या तसेच शासकीय जागांवर उभारण्यात आलेले होर्डिंग्ज, बॅनर्स, विविध राजकीय पक्षांचे झेंडे हटविण्यास सुरुवात केली आहे.

महापालिकेच्या वतीने पहिल्या दिवशी जवळपास शहरात २५१ बॅनर्स,२८ होर्डिग्ज आणि ३२८ झेंडे आणि अन्य साहित्य असे एकूण ६०७ बॅनर्स, होर्डिंग्ज आणि झेंडे हटवले होते. तर मंगळवारी ४२२ बॅनर्स, १५ होर्डिंग्ज, ३६१ झेंडे असे एकूण ९३३ बॅनर्स, होर्डिंग्ज, झेंडे आणि अन्य साहित्य हटवले आहे. तर बुधवारी २४५ बॅनर्स, ५३ होर्डिंग्ज, ३०८ झेंडे हटविले आहेत. त्यामुळे तीन दिवसात महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून दोन हजार ३६ बॅनर्स, होर्डिंग्ज आणि झेंडे हटवून राजकीय पक्षांना मोठा दणका दिला आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम यांनी यासंदर्भातील अहवाल जिल्हा निवडणूक कार्यालयास सादर केला आहे.

अशी केली कारवाई

वार....बॅनर्स..होर्डिंग्ज....झेंडे

सोमवार....२५१....२८....३२८

मंगळवारी....४२२....१५....३६१

बुधवारी....२४५....५३....३०८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलेसह मुलाचे अपहरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विवाहित महिलेसह मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. अंबड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. याप्रकरणी कर्नाटकातील प्रियकरासह त्याच्या तीन नातेवाइकांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.

गंगाराम मंजळकर, रमेश मंजळकर, नगमा धोत्रे (रा. गुलबर्गा कर्नाटक) व रमेश देवकर (रा. विक्रमगड, पालघर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. मूळचे कोपरगाव (जत. अहमदनगर) येथील श्रावण मुक्ताजी सदगीर (वय २८, हल्ली रा. जाधव संकुल) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. ते कामानिमित्त १७ जानेवारी रोजी घराबाहेर पडले. त्यानंतर पत्नी अर्चना व मुलगा जीवा बेपत्ता झाले. सर्वत्र शोधूनही ते सापडले नाही. त्यामुळे अंबड पोलिसांनी प्रारंभी बेपत्ताची तक्रार दाखल केली. मात्र, पती देवकर यांनी पत्नीवर प्रेम प्रकरणाचा आरोप केला असून संशयितांनी त्यांना पळविल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.

वेगवाग कारमुळे

पाचदाऱ्याचा मृत्यू

नाशिक : भरधाव कारने धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दिंडोरी रोडवरील आंबेडकरनगर भागात हा अपघात झाला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

भागवत हिरे (रा. आंबेडकरनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दिंडोरी रोडने ५५ वर्षीय अनोळखी व्यक्ती मंगळवारी (दि. १२) पायी जात असताना आंबेडकरनगर भागात त्यांना भरधाव कारने धडक दिली. या अपघातात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक वाहनासह फरार झाला.

तरुणाचा मोबाइल

सिडकोत हिसकावला

नाशिक : मोबाइलवर बोलत जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाइल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेला. सिडकोतील तोरणानगर भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

संकेत सुनील चव्हाण (वय १८, रा. राका कॉलनी, शरणपूररोड) या तरुणाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संकेत चव्हाण मंगळवारी सिडकोत गेला होता. तोरणानगर येथील उर्दू हायस्कूलच्या बोळीतून तो मोबाइलवर बोलत पायी जात होता. मागून ट्रिपलसिट आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्याच्या हातातील सुमारे दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खडके करीत आहेत.

मोरे मळ्यात जुगारी गजाआड

नाशिक : जेलरोड भागातील मोरेमळा परिसरात एका बंगल्यामागे उघड्यावर जुगार खेळणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोरे मळ्यातील प्रकाश बोराडे यांच्या बंगल्यामागे जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकला. श्रीकृष्णनगर येथील राजू कुमावत आणि त्याचे दोन साथीदार जुगार खेळतांना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून ७१० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिस शिपाई अविनाश जुंद्रे यांनी फिर्याद दिली आहे.

क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनिता विकास शाळेत कवितांचे सादरीकरण

$
0
0

शिकरोड : जेलरोडवरील वनिता विकास मंडळ प्रशालेत इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना महिला दिनाची माहिती देण्यात आली. तसेच कविता सादर करण्यात आल्या. उपशिक्षिका सरिता पाचपांडे यांनी कवितांचे सादरीकरण केले. उपशिक्षक चेतन पाठक यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सहकार्यवाह कविता देशपांडे, प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल नागरे, सुप्रिया बनसोड उपस्थित होत्या. यावेळी प्रशालेतील सर्व महिला कर्मचाऱ्यांचे औक्षण करून भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मनोज अवचिते, जगदीश मंडलिक, तुषार बोरसे व चेतन पाठक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारी ‘व्हाय सो गंभीर’ नाटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या वतीने रविवारी (दि. १७) 'व्हाय सो गंभीर' या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी साडेपाच वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात हा नाट्य प्रयोग होईल.

अथर्व थिएटर्स निर्मित या नाटकात आरोह वेलणकर आणि पल्लवी पाटील यांच्या प्रमुख भूमिकांसह अन्वित फलटणकर, शुभा गोखले, प्रदीप जोशी, रसिका वाखरकार, आशिष दातीर यांच्या भूमिका आहेत. गिरीश दातार यांनी नाटकाचे लेखन केले असून, दिग्दर्शन अमोल भोर आणि गिरीश दातार यांचे आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सभासदांना ४०० रुपयांच्या एका तिकिटावर एक तिकीट मोफत मिळणार आहे.

सवलतीच्या तिकिटांसाठी सभासदांनी ९४२२५१३५६९ या क्रमांकावर दुपारी एक ते पाच यावेळेत संपर्क साधून महाराष्ट्र टाइम्सच्या डीसुझा कॉलनीतील कार्यालयातून तिकिटे संकलित करावीत.

..

चौकट

२९९ रुपयांत व्हा 'मटा कल्चर क्लब' चे सदस्य

ऑनलाईन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com

..

चौकट

नाटक - व्हाय सो गंभीर

कधी : १७ मार्च २०१९

किती वाजता - संध्याकाळी ५.३० वाजता

कुठे : महाकवी कालिदास कलामंदिर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अद्वय हिरे समर्थकांची शुक्रवारी होणार सभा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगावच्या राजकारणात दबदबा असलेल्या हिरे कुटुंबातील माजी मंत्री डॉ. प्रशांत हिरे व माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, डॉ. अद्वय हिरे यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर न केल्याने त्याच्याविषयी उत्सुकता कायम आहे. धुळे व दिंडोरी लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि. १५) येथील सोयोग मंगल कार्यालयात दुपारी दोन वाजता हिरे समर्थकांची सभा होणार आहे. यावेळी डॉ. अद्वय हिरे आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

डॉ. अद्वय हिरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सभेची माहिती दिली. लोकसभा निवडणुकींचा बिगुल वाजल्यापासून धुळे व दिंडोरी मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, बैठका घेऊन वातावरण निर्मिती सुरू केली आहे. मात्र, डॉ. अद्वय हिरे यांनी अजून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यापैकी कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासंबधी कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच त्यांच्या स्वत:च्या उमेदवारीबाबतही वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय प्रलंबित आहे. या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी हिरे समर्थक कार्यकर्ते, विविध सहकारी संस्थाचे पदाधिकारी, सरपंच व ग्राम पंचायत सदस्य, विकास कार्यकारी सोसाय़टी चेअरमन, संचालक आदींसह सर्व युवा कार्यकर्त्यांनी सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन हिरे यांनी केले आहे.

भामरे व पाटील यांना विरोध?

हिरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात 'हिरे समर्थकांच्या बैठकीत धुळे व दिंडोरी लोकसभा निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल तोपर्यंत आपल्या कुणीही समर्थक कार्यकर्त्यांने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री रोहीदास पाटील यांच्यासह इतर कोणत्याही उमेदवारांच्या कोणत्याही प्रचाराच्या बैठकांना अथवा भेटींगाठींना उपस्थित राहू नये असेही नमूद केले आहे. डॉ. हिरे यांचा भामरे व पाटील यांना विरोध असल्याची चर्चा रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट

गावितांच्या एंट्रीने बदलणार समीकरण

$
0
0

राष्ट्रवादीला सर्वाधिक धोका; माकपसमोर दिंडोरीऐवजी पालघरचा पर्याय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीने स्थापन केलेल्या महाआघाडीने राज्यात लोकसभेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकप) पालघरची जागा देऊ केली आहे. परंतु, माकपने दिंडोरीचा हट्ट धरत तेथून माकपचे आमदार जे. पी. गावित यांना रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. माकपच्या जिल्हा समितीने दिंडोरीतून गावित यांना उमेदवारी देण्याचा ठराव पास केला आहे. गावितांची एंट्री झाल्यास भाजपला दिलासा मिळून राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे ठाकणार आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा युतीच्या जागावाटपानुसार भाजपच्या ताब्यात असून महाआघाडीने तो राष्ट्रवादीसाठी सोडला आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असली तरी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत घोळ अद्याप सुरू आहे. राष्ट्रवादीकडून डॉ. भारती पवार यांच्यासह शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेले धनराज महाले हे देखील इच्छुक आहेत. तर भाजपकडून विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्यात चुरस आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यातील छोट्या पक्षांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या पट्ट्यात ताकद असलेला माकपही महाआघाडीत सामील झाली. जे. पी. गावित हे कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार आहेत. पेठ, सुरगाणा, दिंडोरी या आदिवासीबहुल पट्ट्यात माकपची चांगली ताकद आहे. यापूर्वी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माकपतर्फे डॉ. हेमंत वाघेरे यांनी तिसऱ्या क्रमांकाची ७२ हजार ५९९ मते घेतली होती. गेल्या वेळी मोदीलाटेचा त्यांच्या मतांचा फारसा फरक पडला नसला तरी, यंदा मात्र दिंडोरीतील लढत अटीतटीची होणार असल्याचे मानले जात आहे.

परंतु, माकपने दिंडोरीवर दावा ठोकल्याने राष्ट्रवादीची कोंडी ‌वाढली आहे. माकपला आघाडीकडून पालघरची जागा देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे दिंडोरीच्या उमेदवारीबाबत अद्याप घोळ सुरूच आहे. गावित यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्यास त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला पुन्हा बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात माकपची जवळपास दोन लाख हक्काची मते आहेत. त्यामुळे गावितांनी एंट्री केल्यास त्याचा थेट परिणाम राष्ट्रवादीच्या मतांवर होऊ शकतो. म्हणूनच राष्ट्रवादीकडून माकपची मनधरणी सुरू असल्याचे समजते.

भाजप-राष्ट्रवादीतही नाराजी

गेल्या वेळी 'राष्ट्रवादी'कडून माजी मत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा डॉ. भारती पवार यांनी मोदी लाटेतही चांगली लढत दिली होती. यंदाही डॉ. पवारच उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू असतांनाच, शिवसेनेचे दिंडोरीमधील माजी आमदार धनराज महाले यांनी निवडणुकांच्या तोंडावर लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे डॉ. भारती पवार या नाराज असल्याचे समजते. दुसरीकडे भाजपमध्येही अशीच स्थिती आहे. हरिश्चंद्र चव्हाण सलग तीनवेळा निवडून आले असले तरी यंदा त्यांच्यासाठी निवडणूक जिंकणे कठीण आहे. त्यामुळे भाजपने पर्याय म्हणून शोध सुरू केला असून नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी उमेदवारीवर दावा ठोकला आहे. त्यामुळे चव्हाण नाराज असल्याची चर्चा आहे. दोन्ही पक्षांमधील इच्छुकांमध्ये नाराजी असताना माकपच्या एंट्रीने राजकीय गणित बदलले आहे.

..

२०१४ चे बलाबल

पक्ष उमेदवार मिळालेली मते

भाजप हरिश्चंद्र चव्हाण ५,४२,७८४

राष्ट्रवादी डॉ.भारती पवार २,९५,३१५

माकप डॉ. हेमंत वाघेरे ७२,५९९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ती’ मुले आता बालगृहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराज अनाथ बालकाश्रमातील सचिवांना लाच घेताना पकडण्यात आल्यानंतर बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सात बालकांना उंटवाडी येथील निरीक्षण व बालगृहात दाखल केले आले आहे. आश्रमाला १३ बालकांची मान्यता असली तरी २० मुले या आश्रमात राहत असल्याचे समितीला आढळून आले. या सात मुलांना बालगृहात हलविण्यात आले आहे.

त्र्यंबकराज अनाथ बालकाश्रमाच्या सचिवांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी पकडले. सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारे हे बालकाश्रम यामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. नियमानुसार काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने १३ बालकांना या आश्रमात राहू दिले जाऊ शकते. त्यापेक्षा जास्त संख्येने बालकांना वास्तव्यास राहू देणे अनधिकृत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या सात जणांपैकी तीन ते चार मुले ही नाशिक जिल्ह्याबाहेरील असल्याने बालकाश्रमाने नियमाचे उल्लंघन केले असल्याचेही समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वर्धापनदिन उत्साहात

$
0
0

सीआयएसएफचा

वर्धापनदिन उत्साहात

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचा (सीआयएसएफ) सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन नेहरूनगर येथे उत्साहात झाला. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा झाल्या.

नाशिकरोडच्या आयएसपी आणि सीएनपी या दोन्ही प्रेसची सुरक्षा पोलिसांएवजी काही वर्षांपासून सीआयएसएफकडे आली आहे. या दलाच्या सुमारे सहाशे जवानांसाठी नेहरुनगरमध्ये प्रेस कर्मचाऱ्यांच्या इमारतींमध्येच निवासाची सोय करण्यात आली आहे. दलाच्या युनीट लाईनमध्ये सुवर्ण महोत्सवी वर्धापदिन साजरा करण्यात आला. आयएसपीचे मुख्य व्यवस्थापक सुधीर साहू, सीएनपीचे मुख्य व्यवस्थापक वर्मा, उपमहाव्यवस्थापक व्ही. एम. ढाके, सीआयएसफचे डेप्युटी कमांडट आर. के. राय, आर. एस. सिंग, निरीक्षक एम. के. वेणुगोपाल, नंदीलाल चित्ते, व्ही. आर. बिरादर, प्रेस मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सुरवातीला जवानांनी संचालन करून मानवंदना दिली. नंतर स्वसंरक्षण आणि शस्त्रास्त्रे यांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. जवानांच्या कुटुंबीयांसाठी धावणे, चमचा लिंबू, रस्सीखेच आदी स्पर्धा झाल्या. सायंकाळी नृत्य, गायन सांस्कृतिक कार्यक्रम झाले. विजेत्यांना पारितोषिक वितरीत करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णींना ‘झेनिथ एशिया’ जाहीर

$
0
0

आज कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये होणार प्रदान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कुसुमाग्रज फिल्म सोसायटी आणि आशय फिल्म क्लबतर्फे पहिल्या आशियाई चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्त देण्यात येणारा झेनिथ एशिया सन्मान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना जाहीर झाला असून, हा पुरस्कार गुरुवारी (१४ मार्च) सकाळी ११ वाजता कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे विनायकदादा पाटील यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड येथे चित्रपट महोत्सव सुरू आहे. हा महोत्सव पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, राज्य सरकार यांच्या सहयोगाने, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया, एशियन फिल्म फाउंडेशन, मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे.

पुरस्कार वितरणानंतर सोनाली कुलकर्णी यांच्याशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानंतर 'गुलाबजाम' हा मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढे दिवसभर 'अनुमती' (मराठी), 'द हिडन कॉर्नर' (आसामी), 'टर्टल कॅन फ्लाय' (इराणी), 'पुष्पक विमान' (मराठी) असे गाजलेले विविध भाषांतील जागतिक फिल्म्स दाखवण्यात येणार आहेत. महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता. १५) 'अंडरपँट थीफ' (श्रीलंका), 'द कप' (भूतान), 'बेन्स बायोग्राफी' (इस्रायल), 'चिल्ड्रन ऑफ हेवन' (इराण) या जगातील विविध देशातील चित्रपट दाखवण्यात येतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. चित्रपट महोत्सवात बुधवारी 'व्हेअर इज द फ्रेंड्स होम', 'द फादर', 'ओग्टोनामा', 'लेडी ऑफ द लेक', 'तलन', 'पुढचे पाऊल' हे चित्रपट दाखवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजीव खांडेकरांना सावानाचा पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा स्व. बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १७ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृहात प्रेस क्लब ऑफ इंडियाचे ब्यूरो चीफ अनंत बागाईतकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. खांडेकर यांची निवड 'सकाळ'चे संपादक श्रीमंत माने, 'झी चोवीस तास'चे प्रतिनिधी योगेश खरे, 'दिव्य मराठी'चे सहाय्यक निवासी संपादक अभिजित कुलकर्णी यांच्या समितीने केली आहे. यापूर्वी या पुरस्काराने अतुल देऊळगावकर, प्रकाश अकोलकर, वि. वि. करमरकर, मोरेश्वर बडगे, देवेंद्र गावंडे, सुरेश भटेवरा, जय देशमुख, अभिजित घोरपडे, अपर्णा वेलणकर, संतोष आंधळे, सुनील चावके यांना गौरविण्यात आले आहे.
राजीव खांडेकर एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे संपादक असून, त्यांचा मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये धडाडीने काम करणाऱ्या मोजक्या पत्रकारांमध्ये समावेश होतो. मार्मिक राजकीय विश्लेषणाबरोबरच संयत मांडणीची पद्धत, परखडपणासाठी खांडेकर ओळखले जातात. गेल्या २५ वर्षांपासून ते पत्रकारितेत कार्यरत आहेत. महाराष्ट्र संपादक परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार, सासवडच्या आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा मानाचा पुरस्कार, एकमत पुरस्कार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, महर्षी नारद पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवांची ताकद उभी करा

$
0
0

फोटो - सतीश काळे

\B

युवांची ताकद उभी करा\B

युवासेना सचिव सरदेसाईंचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'आपल्या विरोधकांची ताकद आपल्यापेक्षा निश्चितच कमी आहे. पण, लोकसभेच्या रणधुमाळीत कार्यकर्त्यांनी अधिक आत्मविश्वासात जाऊ नये. आपली ताकद कित्येक पटीने अधिक असली तरी, आपल्या उमेदवाराला जिंकविण्यासाठी कठोर परिश्रम करा. जिल्ह्यातीलच नव्हे; तर राज्यातील सर्व युवांची ताकद आपल्या सर्व उमेदवारांसाठी उभी करा', असे आवाहन शिवसेना युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी कार्यकर्त्यांना केले. 'निर्धार मेळाव्यात' युवा सैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील युवासेनेचा पदाधिकारी व युवा सैनिकांचा निर्धार मेळावा बुधवारी परशुराम सायखेडकर सभागृहात घेण्यात आला. त्यावेळी युवासेना सचिव वरुण सरदेसाई, सरचिटणीस अमोल कीर्तिकर, कार्यकारिणी सदस्य प्रवीण पाटकर, उपसचिव जय सरपोतदार, ग्रामीण विस्तारक समीर बोडके, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे यांसह पक्षाचे इतर नेते व्यासपीठावर होते.

युवा कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना जिल्हाप्रमुख करंजकर म्हणाले, 'तुमच्यातले नेतृत्व गुण विकसित करत सेनेचे बळ वाढविण्यासाठी पुढे या. स्वत:चं कर्तृत्व विकसित करतानाच समाजहिताचं कार्य करा. हेच कार्य राजकारणातील तुमच्या यशाची किल्ली असेल.'

खासदार गोडसे म्हणाले,'शिवसेनेची ताकद युवांमध्ये असून, निवडणुकांच्या रिंगणातच नव्हे; तर प्रत्येक कार्यात युवा कार्यकर्त्यांची फौज उभी राहिली पाहिजे. आपल्या युवा ताकदीला पाहूनच विरोधकांना घाम फुटतो. हेच हेरत युवांचा आवाज अधिक बुलंद करा. त्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते तुमच्या सोबत कायम असतील.'

निर्धार म्हणजे नेमकं काय आणि लोकसभेच्या निवडणुकांत युवा कार्यकर्त्यांनी कोणते निर्धार करावेत, याबाबत सरचिटणीस कीर्तिकर म्हणाले,'सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण केलेली कामे तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवा. पथनाट्यातून देखील थेट माहिती जनमाणसांत पोहोचवता येईल. आपल्या प्रत्येक उमेदवारामागे आपली संपूर्ण ताकद उभी करण्याचा निर्धार करा.'

सचिव सरदेसाई म्हणाले,'जिल्ह्यातील उमेदवाराला अडीच लाख मताधिक्य मिळाले पाहिजे. त्यासाठी तुमच्यातील नेतृत्वाच्या संकल्पना स्पष्ट करा. साथीदारांचे कल्याण पाहणारा नेता खरा युवा असतो. हेच युवासेनेला अपेक्षित आहे. त्यामुळे आपली पूर्ण ताकद कायम उमेदवाराच्या पाठीमागे असू द्या.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारदर्शक कामावर भर

$
0
0

- सेवा हमी हा गेम चेंजर कायदा प्रवाभीपणे राबविणार

- डिजिटायजेशनवर भर देणार

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केवळ विविध यंत्रणांकडील माहिती संकलनासाठी कार्यालयात बैठक घेण्याची माझी कार्यपध्दती नाही. डिजिटायजेशनद्वारेच अशी माहिती उपलब्ध व्हावी, अशी माझी आग्रही भूमिका आहे. यंत्रणेला अशा स्वरूपाच्या बैठकांमध्ये गुंतवून द्राविडी प्राणायाम करण्यास भाग पाडण्यात स्वारस्य नसल्याचे नूतन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. पारदर्शक कामकाजावर आपला भर असून, सहकाऱ्यांकडूनही अशाच कामाची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मावळते जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर मांढरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आदी उपस्थित होते. सन १९९४ पासून सरकारी सेवेत कामाला सुरुवात केली असून, गेल्या २५ वर्षांत राज्यातील १५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याची माहिती मांढरे यांनी दिली. अमरावती, अकोलासह अनेक जिल्ह्यांमध्ये महसूल विभागात विविध पदांवर काम केल्यामुळे महसूलमधील कामाचा अनुभव असल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले. सेवा हमी हा गेम चेंजर कायदा असून, त्याचा अधिकाधिक प्रभावीपणे वापर करण्यावर माझा भर राहिला आहे. पुण्यात जिल्हा परिषदेत काम करताना २५७ प्रकारच्या सेवांचा लाभ नागरिकांना देऊ केला. आढावा बैठकांतून माहितीचे संकलन होते. परंतु, अशा बैठकांमध्ये सरकारी यंत्रणा अडकून पडते. यामुळे नागरिकांना सेवा देण्यासही विलंब होत असल्याचे निरीक्षण मांढरे यांनी नोंदविले. यंत्रणांकडून हवी असलेली माहिती डिजिटायजेशनच्या माध्यमातून मिळविण्याची व्यवस्था उभी केल्यास यंत्रणांना द्राविडी प्राणायाम घालण्याची गरज भासणार नाही, असे मांढरे म्हणाले. सक्ती आणि प्रभावापेक्षा शाश्वत सिस्टीममध्ये काम होणे आपणास अभिप्रेत असून, यापूर्वी कोणी काय केले याच्याशी आपणास घेणे देणे नसल्याची रोखठोक भूमिका मांढरे यांनी मांडली. निवडणुकीशी संबंधित कामकाजासह दुष्काळी परिस्थितीची माहिती मांढरे यांनी घेतली.

..

निवडणुकीशी संबंध नसतानाही महसूलमधील अनेक विभागांचे अधिकारी, कर्मचारी आचारसंहितेच्या नावाखाली नागरिकांची कामे टाळत असल्याची बाब माध्यम प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. कामचुकारपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे मांढरे यांनी स्पष्ट केले. एका कामाकरिता अभ्यागतांना वारंवार यावे लागू नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

..

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करू

शेतकरी आत्महत्या हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास करू. आत्महत्यांची कारणे समजू शकली तर त्यावर उपाययोजना आखण्यावर भर देणे अधिक सोपे होईल. शेतकऱ्यांना उत्पन्नाची साधने उपलब्ध करून देणे, सीएसआर निधी, जिल्हा परिषदेची मदत या माध्यमातून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाययोजना करणे शक्य असले तरी त्यासाठी काही कालावधी जाऊ द्यावा लागेल असे मांढरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images