येवला-नांदगाव राज्यमार्गावर मांडले ठाण म. टा. वृत्तसेवा, येवला यंदाच्या भीषण दुष्काळातील तीव्र पाणीटंचाई बघता वनविभागाच्या वडपाटी बंधाऱ्यानजीक विहीर घेऊन त्याद्वारे गावासाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी परवानगी मिळावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी येवला तालुक्यातील राजापूर ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले. त्यातच बुधवारी गावातील महिलांनी रिकाम्या हंड्यानिशी येवला-नांदगाव राज्य मार्गावर या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. अगदी मोठ्या संख्येने या रास्ता रोको आंदोलन आंदोलनांतर्गत गावातील माता-भगिनींनी रस्त्यावर ठाण मांडल्याने या मार्गावरील वाहतूक बराच वेळ खंडित झाली होती. येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व पट्ट्यातील कायमच दुष्काळग्रस्त असलेल्या राजापूर गावातील ग्रामस्थांनी यंदाच्या दुष्काळी दाहकतेच्या मोठ्या तडाख्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला आहे. गावानजीक असलेल्या वनविभागाच्या हद्दीतील वडपाटी साठवण बंधाऱ्यानजीक विहीर घेऊन त्याद्वारे गावासाठी पाणीयोजना राबविण्यासाठी वनविभागाने परवानगी देण्याची मागणी राजापूरकरांनी लावून धरली आहे. सातत्याने मागणी करूनही वनविभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप राजापूरकर यांनी केला आहे. या निषेधार्थ ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून गावात बेमुदत उपोषणाचा पवित्रा घेतला होता. सुरू झालेले बेमुदत उपोषण बघता वनविभागाकडून कुठलेही ठोस आश्वासन मिळत नसल्याने बुधवारी दुपारी गावातील महिलांनी येवला-नांदगाव राज्यमार्गाकडे मोठ्या संख्येने मोर्चा नेला. रिकाम्या हंड्यांसह रस्त्यावर ठाण मांडले. जोरदार घोषणाबाजी करीत यावेळी महिलांनी या मार्गावर बराचवेळा रास्ता रोको केला. विधान परिषदेतील आमदार नरेंद्र दराडे यांनी आचारसंहिता संपल्यानंतर याबाबतीत नियमानुसार योग्य ती पुढील कार्यवाही करण्याबाबतचे आश्वासन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने गावात सुरू असलेले बेमुदत उपोषण, तसेच राज्यमार्गावरील दोन तासांपेक्षा अधिक वेळ चाललेले 'रास्तारोको' आंदोलन मागे घेण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट