भाजप-शिवसेना युतीची नाशिकमध्ये पहिलीच बैठक
...
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
कालपरवापर्यंत एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारे, उणी-दुणी काढणाऱ्यांना मनोमिलनाचा सांगावा येतो तेव्हा आम्ही सर्व एकच आहोत हा सांगण्याचा एकच आटापिटा सुरू होतो, हे चित्र शुक्रवारी भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात पहावयास मिळाले. आम्ही एकाच कुटुंबातील, आमचे मतभेद असले तरी मनभेद नाही, आमची नैसर्गिक युती आहे, अशा आणाभाका घेत लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेची पहिली मनोमिलनाची बैठक शुक्रवारी भाजप कार्यालयात झाली. यावेळी युतीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
वरिष्ठ स्तरावर युती झाली असली तरी तळागाळातील कार्यकर्त्यांमधील दुरावा दूर झालेला नाही. हा दुरावा मनोमिलनातून दूर करण्याचे दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्यात मनोमिलन बैठका व मेळावे होत आहेत. शिवसेनेने अगोदर मुंबई येथे आपल्या पदाधिकाऱ्यांची मनोमिलनाची बैठक घेतली. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही युती जाहीर झाल्यानंतर तब्बल २५ दिवसानंतर दोन्ही पक्षांतील प्रमुख पदाधिकारी भाजप कार्यालयात शुक्रवारी एकत्र आले. या बैठकीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत १७ मार्च रोजी नाशिक येथे होणाऱ्या मेळाव्याचे नियोजन ठरविण्यात आले.
या बैठकीला शिवसेनेतर्फे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, माजीमंत्री बबनराव घोलप, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, अनिल कदम, राजाभाऊ वाजे, शहरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आदी पदाधिकारी उपस्थित होते. भाजपतर्फे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार व शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, लक्ष्मण सावजी, वसंत गिते, सुनील बागूल यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धारही व्यक्त केला. यावेळी भाजप-शिवसेना युतीचा विजय असो अशा घोषणा देत दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे सांगत एकजुटीचा संदेश दिला.
...
दादा भुसेंचे समन्वय
उत्तर महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन व समन्वय ठेवण्यासाठी भाजपतर्फे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व शिवसेनेतर्फे दादा भुसे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली. त्यानंतर दादा भुसे यांनी महाजन यांच्याबरोबर चर्चा करून या बैठकीचे आयोजन केले.
...
आम्ही एकाच कुटुंबातील
आम्ही एकाच कुटुंबातील आहोत. सन १९८० पासून एकत्रितपणे आम्ही निवडणुका लढवल्या आहेत. मधल्या काळात मतभेद झाले असले तरी आता आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात आम्हाला विजय मिळेल, असा सूर या बैठकीत सर्वच नेत्यांनी व्यक्त केला.