Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तिघा दरोडेखोरांना सात दिवसांची कोठडी

0
0

दोघांच्या शोधासाठी पथके रवाना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या तिघा संशयित दरोडेखोरांना कोर्टाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उर्वरित दोघा आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली असून, लवकरच त्यांनाही अटक होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राजेश गोलासिंग टाक (२५, रा. संजयनगर, नगर, हल्ली भीमवाडी, गंजमाळ), सुनीलसिंग जुनी आणि हरदिपसिंग बबलू टाक (दोघे रा. संजयनगर, काटून खंडोबा, नगर) अशी कोर्टाने कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांचे दोन साथिदार अमनसिंग टाक आणि सुनीलसिंगचा मित्र लखन हे दोघे फरार आहेत. या संशयित दरोडेखोरांनी बुधवारी इंदिरानगर येथून एक कार चोरून आडगाव शिवारातील वृदांवननगर येथील शिवकृपा स्वीटदुकानासमोरील साकार व्ह्यु येथील आर. के. ज्वेलर्स हे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला होता.

यावेळी त्यांनी संदेश रक्ताटे या तरुणास कोयत्याचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. सुदैवाने हा प्रकार पोलिसांना समजला. यानंतर पोलिस पथक आणि पळून जाणाऱ्या सराईत गुन्हेगारांमध्ये गोळीबार सुद्धा झाला. यातील राजेशसिंग यास पोलिसांनी पकडले तर उर्वरीत दोघांना मनमाड येथून अटक करण्यात आली. त्यांना पोलिसांनी कोर्टात हजर केले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने संशयितांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या घटनेतील दोघे संशयित फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे दोन ते तीन पथके रवाना झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे संशयित पुणे येथे असल्याची शक्यता असून, त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारनियमनाचे विघ्न टळले

0
0

एकलहरेतील दुसरा वीज संच कार्यान्वित; तिसरा संचही उपलब्ध

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

एकलहरे औष्णिक वीज केंद्रातील विजेचा २१० मेगावॅटचा संच क्रमांक पाच पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. त्यामुळे भारनियमन किंवा वीज टंचाईचे संकट टळले आहे. तिसरा संचही पूर्णपणे तयार आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात विजेची मागणी प्रचंड वाढते. तेव्हा तिसरा संचही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

एकलहरेतील २१० मेगावॅटचा संच क्रमांक पाच बुधवारी (दत. २८) सकाळी संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला. एकलहरेत वीज केंद्रात स्थायी साडेआठशे तर कंत्राटी पंधराशे कर्मचारी आहेत. येथे २१० मेगावॅटचे तीन संच आहेत. त्यातील फक्त संच क्रमांक चार सुरू होता. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने पाचवा संचही कार्यान्वित करण्यात आला. एकलहरेतून तयार होणारी वीज ही नागपूरचे अंबाझरी आणि ठाण्यातील कळवा येथील पॉवर ग्रीडमध्ये सोडली जाते. तेथून तिचे राज्यभर वितरण होते. ज्या लाईनला जास्त मागणी असेल तेथे ती पुरवली जाते. राज्याची विजेची मागणी २२ हजार मेगावॅट असते. औष्णिक, जलविद्युत, सौर आदी सर्व स्त्रोतांतून सुमारे १४ हजार मेगावॅट वीजनिर्मिती होते. जो तुटवटा राहतो, तो केंद्र सरकारचे नॅशनल पॉवर ग्रीड आणि अन्य माध्यमातून मधून भरून काढला जातो.

तिसरा संच तयार

नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातील एकच संच १० जानेवारीपासून कार्यान्वित होता. तो सुद्धा कमी विजेच्या मागणीमुळे संपूर्ण क्षमतेने चालवता येत नव्हता. शिवाय इतर संच उपलब्ध असून सुद्धा सुरू करता येत नव्हते. नाशिककरांनी या वर्षी थंडीचा कडाका अनुभवला. आता मार्चमध्येच सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. शेती, उद्योग तसेच सामान्य ग्राहकांकडूनही वीजेची मागणी वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा २१० मेगावॅट क्षमतेचा दुसरा संच क्रमांक पाच सुरू करण्यात आला. अनेक दिवसांपासून मेरिट ऑर्डर डिस्पॅचमुळे (एमओडी) नाशिक औष्णिक विद्युत केंद्रावर सातत्याने दोन संच बंद ठेवण्याचे सावट होते. परंतु, आता संच क्रमांक चार व पाच हे दोन्हीही सुरू आहेत. तिसरा संचदेखील उपलब्ध आहे. ज्या क्षणी गरज असेल त्या क्षणी तिसरा संच कार्यान्वित करण्यात येणार आहे. दोन संच सुरू झाल्याने सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार आणि कंत्राटी कामगार यांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन प्रकल्प केव्हा?

एकलहरेतील टप्पा क्रमांक एकमधील १४० मेगावॅटचे दोन संच जून २०११ मध्ये बंद करण्यात आले. त्या बदल्यात ६६० मेगावॅटचा बदली संच सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली होती. भुसावळ येथे ६६० मेगावॅट प्रकल्पाचे काम गेल्या महिन्यात सुरू झाले. परंतु, नाशिकला गरज असतानाही अजून त्याचे काम सुरू झालेले नाही. खासगी वीज उद्योगाचे वारे वाहू लागल्याने एकलहरेतील ६६० मेगावॅटचा प्रकल्प रखडलेला आहे. एकलहरेत जागा, पाणी, लेबर, रेल्वेमार्ग, राख साठवणुकीचा बंधार आदी पायाभूत सुविधा उपलब्ध असतानाही ६६० मेगावॅटचा संच सुरू झालेला नाही. तो सुरू झाल्यास विजेची टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊन नाशिकच्या औद्योगीक विकासाला चालना मिळेल. रोजगार निर्मितीही होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगाव-भूमिका ठरविण्यासाठी सोमवारी शिवसेनेची बैठक

0
0

भूमिका ठरविण्यासाठी

सोमवारी शिवसेनेची बैठक

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी शिवसेनेची जिल्हा बैठक सोमवारी (दि .१) दुपारी २ वाजता सरदार वल्लभभाई पटेल आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शिवसेनेची भूमिका ठरविली जाणार आहे.

बैठकीस शिवसेना उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, विलास पारकर मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख अतिथि म्हणुन आमदार किशोर पाटील, चंन्द्रकांत सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, ज्ञानेश्वर जळकेकर महाराज उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीला शिवसेना, युवासेना, महिला आघाड़ी, एस. टी. कामगार सेना, शिक्षक सेना, ग्राहक स्वसंरक्षण कक्ष यांचे जिल्हाप्रमुख, उप जिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, त्या-त्या गावचे बूथप्रमुख, ग्रामपंचायत सरपंच यांनी उपस्थित राहवे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व चंद्रकांत पाटील, महानंदा पाटील, शरद तायडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

च ट क म ट क

0
0

हाताची चव

स्नेहा शिंपी, नाशिक

मसाला स्टफड बाटी

डाळ बाटी हल्ली सगळ्यांचीच आवडती डीश आहे. घरोघरी ही डीश अगदी सहज बनवता येते. विशेष म्हणजे त्यासाठी लागणारे सर्व साहित्य देखील घराच्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध होतात. आता सुट्याही लागणार आहेत. तेव्हा या सुटील मसाला स्टफड् बाटी बनवायला हरकत नाही.

साहित्य : दोन कप कणीक, १ कप शिजवलेली चणाडाळ, पाव कप कोथिंबीर, १ लहान चमचा आमचूर पावडर, पाव लहान चमचा धणेपूड, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ बारीक चिरलेला कांदा, १ टोमॅटो, ३ मोठे चमचे तेल तळण्यासाठी, चवीनुसार मीठ, २ मोठे चमचे तेल.

कृती : प्रथम कणीक आणि मीठ चाळून घ्या. कणीक मळून त्याचे रोल करा. एका भांड्यात पाणी गरम करून हे रोल टाका व २० ते २५ मिनिटे उकडून घ्या. यानंतर हे रोल्स पाण्यातून बाहेर काढून पुन्हा कुस्करून हे कणकेसारखे मळून घ्या व त्याचे लहान लहान गोळे बनवा. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा परता. मग त्यामध्ये टोमॅटो, मीठ, आमचूर पावडर, धणेपुड, हिरवी मिरची टाकून परता. नंतर यात भिजवलेली चणाडाळ घालून परतून घ्या. हे मिश्रण कोरडे झाल्यावर गॅसवरून खाली उतरून थंड करा. आता हे मिश्रण कणकेच्या गोळीची खोलगट पारी वळून त्यामध्ये भरा व पारी वरून बंद करा. अशा प्रकारे सर्व गोळ्यांच्या पारी वळून मिश्रण भरा. तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. मसाला स्टफ बाटी तयार आहे. हे सॉस किंवा चटणीसह सर्व्ह करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस अधीक्षकांनीघेतला केंद्रांचा आढावा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक आरती सिंग यांनी शुक्रवारी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालेगावी भेट दिली. यावेळी हिम्मत नगर पोलिस वसाहत येथील दक्षता वाचनालयाचे उदघाटन सिंग यांच्या हस्ते संपन्न झाले.

या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल, पोलिस उपअधीक्षक अजित हगवणे, रत्नाकर नवले, कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर परदेशी, कुलदीप माने आदी उपस्थित होते. यावेळी आरती सिंग यांनी दक्षता वाचनालयाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. वाचन संस्कृती टिकावी यासाठी हे वाचनालय सुरू करण्याचा निर्णय स्तुत्य असून परिसरातील वाचकांसाठी हे वाचनालय उपयुक्त ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर हा दौरा होता. उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना सिंग यांनी मालेगाव बाह्य, मध्य मतदार संघातील संवेदनशील मतदार संघांना भेटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणेचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षातील चमच्यांमुळे मला डावलले!

0
0

खासदार चव्हाण यांची मनातली खदखद अखेर व्यक्त

चव्हाण म्हणाले...

- लोकांची खरी नाराजी पालकमंत्र्यांवर

- आता उमेदवारी मिळाली तरी घेणार नाही

- दोन-तीन दिवसांत घेणार निर्णय

म. टा. वृत्तसेवा, कळवण

पक्षातील काही चमच्यांच्या टोळक्याने वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली आहे. लोकांची खरी नाराजी पालकमंत्र्यांवर असून, आता उमेदवारी मिळाली तरी घेणार नाही, असा उद्वेग व्यक्त करीत भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अखेर संतापाला वाट करून दिली. कळवण येथील मोतीबागमध्ये शुक्रवारी झालेल्या समर्थकांच्या मेळाव्यात खासदार चव्हाण यांनी मनातली खदखद प्रथमच बोलून दाखवली. आता नक्की काय भूमिका घ्यायची, याबाबत आपण येत्या दोन- तीन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचे खासदार चव्हाण यांनी या वेळी स्पष्ट केले.

खासदार चव्हाण यांची उमेदवारी डावलून ती राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवार यांना बहाल केली. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तब्बल तीन वेळा निवडून आलेले भाजपचे खासदार चव्हाण दुखावले होते. समर्थकांमध्येही प्रचंड नाराजी होती. त्या पार्श्वभूमीवर मोतीबागमध्ये शुक्रवारी समर्थकांचा मेळावा घेण्यात आला. त्या वेळी चव्हाण बोलत होते.

चव्हाण म्हणाले, की गेल्या निवडणुकीत डॉ. पवार मोदींना शिव्या देत होत्या आणि त्यांनाच उमेदवारी दिली. महापौर भानसी यांना किंवा पक्षातीलच अन्य कुणालाही उमेदवारी दिली असती तरी मी काहीही म्हंटले नसते. पक्षात काही जणांचे टोळके आहे. तेच चुकीची माहिती देतात. विरोधात मतदान करावे, यासाठी करोडो रुपये मिळत होते. मात्र, मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. त्या वेळी वाजपेयी म्हणाले होते, की पार्टी तुमची आठवण ठेवेल. मात्र, पार्टीने आठवण ठेवली नाही. माझे चरित्र खराब आहे काय? आदिवासींच्या बाजूने उभा राहिलो. जे योग्य नाही त्याला विरोध केला. तीन वेळा निवडूनदेखील मंत्रिपद मिळाले नाही. तरीही मी कधीच नाराज नव्हतो. पक्षाशी निष्ठाच ठेवली. तुम्ही आग्रह करतात; पण मी कोरड्या विहिरीत उडी मारायची का? लोकसभा ही लहान नाही; मोठी निवडणूक आहे. १९९५ मध्ये सायकलवर प्रचार करून लोकांच्या आशीर्वादाने निवडून आलो होतो. राजकारणात काहीही अशक्य नाही. चाळीस वर्षांपासून दोन खोल्यांतच राहत आहे.

दोन-तीन दिवस थांबा; काही जणांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे चव्हाण यांनी मेळाव्यात स्पष्ट केले. त्यामुळे चव्हाण अपक्ष राहतात, कुणाला पाठिंबा देणार की तटस्थ राहतात, याची उत्सुकता कायम आहे.

एकत्र आलो तर एजंटही उरणार नाही : इंद्रजित गावित

माकपचे उपसभापती इंद्रजित गावित यांनी सांगितले, की मी येथे पक्षाच्या वतीने नव्हे, तर एक आदिवासी म्हणून आलो आहे. तुम्ही आम्हाला किंवा आम्ही तुम्हाला मदत करू, असे म्हणणार नाही. मात्र, खासदार चव्हाण व आमदार गावित हे यावर चर्चा करू शकतात. यावर चव्हाण यांनी दोघे एकत्र आलो तर एकही एजंट राहणार नाही, असे मिश्कीलपणे सांगितले. यावर एकच हशा पिकला. पोपटराव अहिरे, योगेश बरडे, पोपटराव गवळी, नाना ठाकरे, नरेंद्र जाधव, रघुनाथआप्पा, जगदीश होळकर यांच्यासह इंद्रजित गावित, मोहन पिंगळे, कलावती चव्हाण, रमेश थोरात, विजय कानडे, सचिन महाले आदी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी मनोगतातून पालकमंत्री गिरीश महाजनांवर टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारांना रिक्षा द्याल तर गोत्यात याल!

0
0

मालकांना इशारा; स्क्रॅप गाड्याही पोलिसांच्या रडारवर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या रिक्षा व्यवसायात सराईत गुन्हेगार पुनर्वसन करीत आहे. शहरातील एकूण सराईत गुन्हेगारांपैकी तब्बल ३५ टक्के सराईत गुन्हेगार रिक्षाचालक म्हणून कार्यरत आहेत. यामुळे कष्ट करणारे रिक्षाचालक अडचणीत आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मालकांनी ऑटो रिक्षा चालविण्यासाठी दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतला आहे. शहरातील स्क्रॅप रिक्षाही वाहतूक पोलिसांनी रडारवर घेतल्या असून, त्याचेही नियोजन सुरू आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. गुन्हेगारांच्या आदान प्रदान योजनेत गुन्हेगारांची कुंडलीच पोलिसांनी तयार केली. त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले बहुतांश गुन्हेगार अ‍ॅटोरिक्षा भाडेतत्त्वावर घेऊन उदरनिर्वाहाचा बनाव करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. पोलिस आयुक्तांनी यापूर्वी त्याबाबत एक इशाराही दिला होता. मूळ रिक्षा मालक दुय्यम व्यवसाय निवडून रिक्षा भाडेतत्वावर देतात. त्या बदल्यात मालकास रोजानुसार पैसा मिळतो. त्यामुळे एक रिक्षा दिवस आणि रात्र सुरूच असते. मात्र, आपल्या मालकीचे वाहन दुसऱ्याच्या ताब्यात देतांना मालक चालकाची शहानिशा करीत नाही. त्यामुळे गुन्हेगार अशा वाहनांचा वापर गंभीर गुह्यांसाठी करतात. प्रवाशांची लूटमार, छेडछाड असे गुन्हे घडतात. अन्य जिह्यातील गुन्हेगारही रोजगारीच्या नावाखाली त्याचा फायदा उचलतात, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.

पोलिस ठाणेनिहाय शोध

सराईत गुन्हेगारांची संख्या अधिक असल्याने रिक्षा व्यवसायात बेशिस्ती वाढत आहे. वाहतूक कारवाईत वारंवार याचा प्रत्यय पोलिस घेतात. रिक्षाचालकांची आरेरावी, अवाजवी भाडे या गोष्टींना प्रवाशांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता मूळ रिक्षामालकांना रडारवर घेतले आहे. पोलिस ठाणे निहाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चालकांचा शोध घेतला जाणार असून, त्यानंतर मूळ मालकांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच खासगी ट्रॅव्हल्सचालकांचाही शोध सुरू होणार आहे.

आरटीओचीही मदत

चालकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास ट्रॅव्हल्स मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी शहरातील स्क्रॅप रिक्षांकडे आपले लक्ष वळविले आहे. शहरात स्क्रॅप रिक्षांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभाग (आयटीओ) आणि वाहतूक शाखा एकत्रितपणे ही मोहीम लवकरच सुरू करणार आहे. शहरातून स्क्रॅप रिक्षा हद्दपार करण्यासाठी ही मोहीम असून, त्याचे नियोजन चोख असणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगाराचा मृत्यू

0
0

नाशिक : रंगकाम करीत असताना इमारतीवरून पडल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना सिडकोतील उपेंद्रनगर भागात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रशीद आलम अली कमर (वय ३०, रा. विजयनगर, सिडको, मूळ उत्तर प्रदेश) असे या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे. रशीद शुक्रवारी (ता. २९) दुपारी अंबड लिंक रोडवरील उपेंद्रनगरमधील मोरे मळा भागातील इमारतीवर रंगकाम करीत असताना ही घटना घडली. पहिल्या मजल्यावर अन्य सहकाऱ्यासमवेत झुल्यावर बसून तो इमारतीस रंग देत असताना अचानक झुला तुटला. उंचावरून पडल्याने रशीद गंभीर जखमी झाला. ठेकेदार ओमप्रकाश जयस्वाल यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मार्च एण्डला सूर्य तापला

0
0

मालेगाव पोहोचले ४२.८ अंशावर

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात रोजच्या रोज उन्हाचा पारा वाढतो आहे. शुक्रवारीदेखील कमाल तापमान ४२.८ अंश से इतके नोंदवले गेले. कमाल तापमान बरोबर किमान तापमान देखील वाढले असून २२.६ अंशापर्यंत पारा वर गेला आहे. रविवारपासून तापमानात तब्बल ३ अंशांची वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे मालेगावकर चांगलेच घामाघूम झाले असून, वाढलेल्या तापमानामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे.

मार्चच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत शहरात पारा जेमतेम ३५ ते ३९ अंश से दरम्यान होता. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली असली तरी उन्हाची दाहकता कमी होती. मार्चचा शेवटचा आठवडा सुरू झाला आणि तापमान चाळीशीपार गेल्याने उन्हाची दाहकता वाढली आहे. शुक्रवारी तर तापमान थेट ४२ अंशापार गेल्याने उन्हाच्या काहिलीने शहरवासीय हैराण झाले होते. उन वाढू लागल्याने त्याचा परिणाम रस्त्यावर जाणवू लागला आहे. नागरिक सकाळी ११ पर्यंत आपली कामे आटोपून दुपारनंतर बाहेर पडण्याचे टाळत आहेत.

उन्हाचा ज्वर वाढल्याने टोपी, रुमाल याच्या विक्रीत देखील वाढ झाली आहे. नागरिक घराबाहेर पडताना उन्हाच्या काहिलीपासून स्वतःचे संरक्षण व्हावे यासाठी काळजी घेत आहेत. शहरात ठिकठिकाणी रसवंती, शीतपेय, आईस्क्रीम यांची दुकाने सुरू झाली असून, कडाक्याच्या ऊन्हातपासून काहीसा दिलासा मिळावा म्हणून नागरिक या दुकानात गर्दी करीत आहेत. येत्या काही दिवसात पारा अजून वाढण्याची शक्यता आहे.

येवला @४१

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दिवसागणिक तापमानाचा पारा वर सरकत आहे. शुक्रवारी तालुक्यात ४१ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तालुक्‍यात ३८ डिग्री सेल्सिअस तापमान होते. पुढे दिवसभरात तासागणिक तापमानाचा पारा उंचावत गेला. तालुक्यात दुपारी दोन वाजेच्या सुमारास ३९ डिग्री सेल्सियस, त्यानंतर दुपारी तीन ते चार वाजेदरम्यान ४०, तर चारनंतर ४१ डिग्री सेल्सियस इतके तापमान होते. दिवसभरच्या कडक उन्हामुळे सर्वांच्याच अंगाची लाहीलाही होताना आपादमस्तकी घामाच्या धारा वाहत होत्या. तालुक्यात शुक्रवारी किमान २४, तर कमाल ४१ डिग्री सेल्सियस तापमान नोंदविले गेले. पुढील येत्या काही दिवसात हे तापमान अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतींना भेटून आढावा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता लागू झाल्यानंतर काही अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतलेले आहेत. तर काही अधिकाऱ्यांनी प्रलंबित कामे मार्गी लावणे सुरू आहे. पण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी या काळात ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या कामाचा आढावा घेण्याची मोहीम सुरू केली आहे.

डॉ. गिते यांनी शुक्रवारी बागलाण तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन कामांचा आढावा घेतला. दप्तरांची तपासणी करून ग्रामसेवकांची झाडाझडती घेतली. बागलाण तालुक्यातील लोहोणेर, ठेंगोडा, ताहाराबाद, औंदोणे आदी ग्रामपंचायतींमध्ये त्यांनी या भेटी दिल्या. पंचायत समिती कार्यालयात जाऊन विविध कामांचा आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामांची पाहणी केली तसेच स्वच्छतेविषयक सूचना केल्या. सरकार ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात थेट निधी देते. त्यामुळे येथील कामांची वारंवार तपासणी करणे व आढावा घेणे इतर दिवसात अवघड असते. डॉ. गिते यांनी आचारसंहितेच्या काळात पहाणी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ जोडप्याला तीन दिवसांची कोठडी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मद्यधुंद अवस्थेत इंदिरानगर अंडरपास येथे वाहतूक पोलिसास दमबाजी करणाऱ्या 'त्या' जोडप्याला कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी अटक केलेले जोडपे थेट कुख्यात टिप्पर गँगशी संबंधित असून, महिलेवर दरोडा तर तिच्या साथिदारावर सुद्धा काही गंभीर गुन्हे दाखल आहेत.

स्वप्नील संजय पाटोळे (२४, रा. अभियंतानगर, कामटवाडे) आणि भावना तुकाराम बोरसे (३०, रा. साईसमृद्धी रो हाऊस, वावरेनगर, कामटवाडे) अशी या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल झनकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरानगर अंडरपास येथे गुरुवारी (दि. २८) सायंकाळी पाऊणेपाच वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. पोलिस कर्मचारी झनकर आपले कर्तव्य बजावत असताना एक कार विनाकारण हॉर्न वाजवत होती. झनकर यांनी तसे न करण्याची सूचना चालकास केली. मात्र, दोन्ही संशयित हातात मद्याची बॉटल घेऊनच कारमधून बाहेर पडले. यानंतर त्यांनी झनकर यांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. आम्ही टिप्पर गँगचे असून, तुला बघून घेईन, असा दम स्वप्नील पाटोळेने दिला. तर, तुला छेडछाडीच्या खोट्या गुन्ह्यात अडकाविल, अशी धमकी भावना बोरसेने दिली. झनकर यांनी या घटनेची माहिती मुंबई नाका पोलिसांना लागलीच दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाणे गाठले. मात्र, तोपर्यंत येथील वाहतूक जवळपास एक तास विस्कळीत झाली. पोलिस ठाण्यातही संशयितांची बडबड कमी झाली नव्हती.

झनकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयिताविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ, मारहाण तसेच मोटार वाहन अधिनियमातील विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांना जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले. युक्तिवादानंतर कोर्टाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यातील भावना बोरसे ही टिप्पर गँगचा सदस्य प्रणव बोरसे याची बहीण आहे. विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक केलेला बोरसे सध्या नागपूर सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. भावनाविरुद्ध सुद्धा दरोड्याचा गुन्हा यापूर्वी दाखल असून, या सर्व घडामोडीकडे पोलिसांनी गांर्भीयाने बघितले असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोलबारेजवळ उलटला तेलाचा टँकर

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

विंचुर-शहादा-प्रकाशा महामार्गावरील ढोलबारे गावानजीक असलेल्या तीव्र वळणावर सोयाबीन तेल घेवून जाणारा ट्रँकर उलटल्याने हजारो लिटर सोयाबीन तेल नाल्यात वाहून गेले. टँकरचा चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी असून त्यांच्यावर सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी (दि.२९) रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गुजरातमधील गांधीनगर येथून आंध्र प्रदेशकडे सुमारे ३४ हजार लिटर सोयाबीन तेल घेवून जाणारा टँकर (एनएल ०१० क्यू ३५४३) हा ट्रँकर ढोलबारे शिवाराजवळ आला असता म्हसोबा मंदिराजवळील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने सदरहू टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांमध्ये उलटला. त्यामुळे टँकरमधील हजारो लिटर तेल नाल्यात वाहून गेले. अपघाताची माहिती मिळताच या परिसरातील अपघातग्रस्तांना नेहमीच मदत करणारे केवळ देवरे यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून जखमी चालक व क्लिनरला सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुकीवर नियंत्रण मिळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवणकरांशी उद्या मोदींचा थेट संवाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ते अन् नागरीकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (दि. ३१) थेट संवाद साधणार आहेत. यात कळवणमधील छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयातील डॉ. दौलतराव आहेर सभागृहात सायंकाळी ५ वाजता हा संवाद कार्यक्रम होणार आहे.

महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, प्रभारी डॉ. राहुल आहेर, अनिल कदम, भाजप जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही पक्षातील विविध पक्षांचे पदाधिकारी ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता 'मै भी चौकीदार' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना नागरिकांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमास नागरिक व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेते एकीची नांदी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे अखेर खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारात सहभागी झाले असून, शिवसेनेतील नाराजांची फळी आता प्रचाराच्या कामाला लागली आहे. शिवसेनेतील एकीच्या नांदीने गोडसेंना काहीसा दिलासा मिळाला आहे.

लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी भाजप-शिवसेनेच्या प्रचारात समन्वय राहावा यासाठी विजय करंजकर आणि भाजपचे लक्ष्मण सावजी यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात युतीचा संयुक्त मेळावा घेतला जाणार आहे, तर ८ एप्रिल रोजी गोडसे शक्तिप्रदर्शनाद्वारे अर्ज दाखल करणार आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात एकीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी प्रचाराचा जोर लावला असतानाच शिवसेनेत मात्र नाराजीनाट्य सुरू होते. उमेदवारीच्या स्पर्धेत असलेले जिल्हाप्रमुख विजय करंजकर उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले होते. करंजकरांसह मोठा गट या उमेदवारीवर नाराज झाला होता. परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराज झालेल्या करंजकरांची समजूत काढली असून, अन्य नेत्यांनाही कामाला लागण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अखेरीस शिवसेनेतील नाराज गट आता गोडसेंच्या प्रचारात सक्रिय झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या युतीच्या समन्वय बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या नियोजनासाठी करंजकर आणि सावजी यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानुसार करंजकर प्रचारात सक्रिय झाले असून, त्यांनी हेमंत गोडसेंच्या प्रचाराचे नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार ग्रामीण आणि शहरी भागात विभागवार मेळावे आयोजित केले जात आहेत. त्यामुळे गोडसेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

---

८ एप्रिलला दाखल करणार अर्ज

शिवसेना आणि भाजपच्या वतीने खासदार गोडसे यांच्या प्रचार मोहिमेंतर्गत शहरात शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना आणि भाजपचा संयुक्त मेळावा आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन करण्याचा शिवसेनेचा इरादा असून, त्यासाठी मोठ्या नेत्यांना आमंत्रित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे गोडसे ८ एप्रिल रोजी शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नेते अर्ज दाखल करण्यासह संयुक्त मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकीचे बळ, मिळते फळ!

0
0

प्रवीण बिडवे

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

'ऐसे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचि फळ' या उक्तीचा प्रत्यय दिंडोरी तालुक्यातील अवनखेड गावात येतो. ग्रामस्थांचा दृढनिश्चयी बाणा अन् एकात्मतेमुळे या गावाने विकासाचे आयाम बदलले आहेत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छतेचे अत्यंत प्रतिष्ठेचे नाशिक विभागाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक या गावाने अलीकडेच पटकावले. राज्यस्तरावरील पहिल्या पारितोषिकावर आपलीच मोहोर उमटविण्यासाठी हे गाव सिद्ध झाले आहे.

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड हे अवघ्या ४५० उंबऱ्यांचे गाव. विकासासाठीचे झपाटलेपण येथे पहावयास मिळते. विकास हा एकट्याने ओढावयाचा गाडा नाही. ती अंगणवाडीत जाणाऱ्या बालकापासून जख्खड आजोबांपर्यंत सर्वांचीच जबाबदारी आहे. गावातील सर्वच्या सर्व २,८५० ग्रामस्थ ही जबाबदारी पार पाडतात. म्हणूनच उत्तर महाराष्ट्रातील ६ हजार ६९६ गावांमधून अवनखेड या गावाला गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे पहिले १० लाखांचे पारितोषिक मिळाले. आता राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी १२ गावांमध्ये अवनखेडनेही दंड थोपटले असून, राज्याचे पहिले पारितोषिक मिळविण्याचा संकल्प सोडला आहे.

ग्राम स्वच्छता अभियान कशासाठी

ग्रामीण जनतेचे आरोग्यमान व पर्यायाने जीवनस्तर उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग वाढावा, ग्रामीण जनतेला स्वच्छतेची सवय लागावी त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेतली जाते.

नाशिक विभागातील जिल्हानिहाय गावे

जिल्हा गावांची संख्या

नाशिक १९६०

जळगाव १५१३

अहमदनगर १६०२

नंदुरबार ९४३

धुळे ६७८

एकूण ६६९६

जिल्हास्तरावर प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायती विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र असतात. त्यानुसार नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत एकूण १० ग्रामपंचायती विभागस्तरावर स्पर्धेसाठी पात्र होत्या.

जिल्हा ग्रामपंचायतीचे नाव तालुका

नाशिक अवनखेड दिंडोरी

नाशिक राजदेरवाडी चांदवड

धुळे अजंदे बु शिरपूर

धुळे परसामळ शिंदखेडा

नंदुरबार वाटवी नवापूर

नंदुरबार राजविहीर तळोदा

जळगाव मेहेरगाव अमळनेर

जळगाव सुसरी भुसावळ

अहमदनगर लोणी बु राहाता

अहमदनगर वडनेर बु पारनेर

अशी होती १०० गुणांची परीक्षा

विषय गुण

शौचालय व्यवस्थापन ४०

पाणीगुणवत्ता २०

सांडपाणी व्यवस्थापन १०

लोकसहभाग १०

घनकचरा व्यवस्थापन ०५

घर/गाव परिसर स्वच्छता ०५

वैयक्तिक स्वच्छता ०५

स्मार्ट व्हीलेज संकल्पनेनुसार उपलब्धी ०५

एकूण १००

स्वच्छतेसाठी नेमणूक

जबाबदारी सोपविली की, कामे व्यवस्थित होतात, असा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा अनुभव आहे. गावातील त्या-त्या वस्तीवर स्वच्छता राखण्याची जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. त्या-त्या भागातील ग्रामपंचायत सदस्यांनी परिसरात आठ ते दहा जणांची समिती स्थापन केली आहे. आठवड्यात दोन दिवस निश्चित करण्यात आले असून, त्या दिवशी न सांगता प्रत्येकजण आपआपली जबाबदारी पार पाडतो.

शिवारही स्वच्छ

गावाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला आठ किलोमीटपर्यंत शिवार पसरले आहे. गावाचा केवळ दर्शनी भाग स्वच्छ ठेऊन उपयोग नाही. ग्रामस्थ गावापासून दूर मळ्यामध्ये राहात असतील तर तेथेही स्वच्छता नांदली पाहिजे याची कटाक्षाने काळजी घेतली जाते. गावातील शेतकरी बांधव प्राधान्याने द्राक्ष आणि उसाचे पिक घेतात. त्यांच्या शिवारापर्यंत वायफाय सुविधा पुरविण्यात आली आहे.

पंतप्रधानांकडूनही अवनखेडचे कौतुक

गाव हागणदारीमुक्त, तंटामुक्त आहे. येथील कचराही नैसर्गिक साधनसंपत्ती मानून त्याचा गांडूळखत निर्मितीसाठी उपयोग केला जातो. त्याकरिता तसे युनिट गावात साकारण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून जख्खड आजोबांपर्यंत सारेच स्वच्छतेचे पुजारी आहेत. गावात वायफाय सुविधा, अत्याधुनिक स्वरूपाचे टॉयलेट्स, शालेय विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन आणि डिस्पोजल मशीन्स, शुद्ध पाण्यासाठी आरो यंत्रणा बसविण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या भाषणातून अवनखेडचा उल्लेख करून या ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.

आयएसओ मानांकन

आधारकार्ड ही अनिवार्य बाब झाल्याने गावातील सर्व ग्रामस्थांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. अंगणवाडी, प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीचे दिवे सौरउर्जेवर चालतात. गावात स्वामी पदमानंद सरस्वती महाराज सभागृहाचे नूतनीकरण सुरू आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गावात तंटे नाहीत अन् अतिक्रमणही नाही. सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी शोष खड्डे, परसबाग, बंदिस्त गटारे यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने मदत घेतली जाते.

स्वच्छता राहिली तर रोगराई पसरत नाही. त्यामुळे ग्रामस्थ स्वच्छतेला महत्त्व देतात. सर्वजण एकोप्याने राहतात म्हणूनच गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. गवत वाढू न देणे, रस्ते व त्यालगतचा परिसर स्वच्छ ठेवणे हे काम प्रत्येकजण आपली जबाबदारी समजून करतो. स्वच्छतेवर नजर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर समितीही काम करते.

- भिका शिंदे, ग्रामस्थ

अंगणवाडीत ४० बालके येतात. ते स्वच्छ व नीट नेटकी असावीत याकडे आमचा कटाक्ष असतो. कपडे अस्वच्छ असतील तर पालकांना बोलावून समजावून सांगितले जाते. साबणाने हात स्वच्छ धुणे, केस अधिक वाढू न देणे आणि डब्यामध्ये खाद्यपदार्थ देतानाही योग्य काळजी घेण्याबाबत बालके आणि पालकांनाही मार्गदर्शन केले जाते. बालकांची नखे वाढली असतील तर ती अंगणवाडीतही काढली जातात.

- जयश्री पिंगळ (अंगणवाडी सेविका)

चॉकलेटचे रॅपर देखील डस्टबीनमध्ये टाकण्याची सवय शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये बाणविली आहे. शाळेतील वर्गांमध्ये नेलकटर ठेवले आहेत. पसायदानानंतर वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांची नखे तपासतात. ती वाढली असतील तर कमी करण्याबाबत सूचना देतात. गुरूवारी शाळेतच नखे काढली जातात. केस वाढलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी वर्गामध्ये उभे केले जाते. केस कमी करून येण्याच्या सूचना त्यांना दिल्या जातात.

- बाळूकाका शेवाळे, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय, अवनखेड

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार मिळणे हे अवनखेड ग्रामस्थांचे यश आहे. कोणत्याही चांगल्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामस्थांनी प्रत्येक वेळी हिरीरीने हा सहभाग दिला. राज्य स्तरावरील स्पर्धेत अवनखेडसह १२ गावांचा समावेश आहे. राज्य स्तरावरील समितीने अलीकडेच गावाची पाहणी केली असून, ग्राम स्वच्छतेचे राज्य स्तरावरील पहिले पारितोषिकही अवनखेडलाच मिळेल हा विश्वास आहे.

- नरेंद्र जाधव, सरपंच अवनखेड

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभागस्तरीय समिती

राजाराम माने, विभागीय आयुक्त - अध्यक्ष

सुदर्शन कालिंके, मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण - सदस्य

शिवाजी दहीते, अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे - सदस्य

डॉ. किरण मोघे - उपसंचालक माहिती व जनसंपर्क - सदस्य

प्रतिभा संगमनेरे - उपायुक्त विकास - सदस्य सचिव

स्वागत अन् बँडबाजाला नकार

गावाची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या सरकारी समितीचे ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत केले जाते. या स्वागताआड समितीला खूश करण्याचा प्रयत्न अधिक असतो हे नव्याने सांगायला नको. परंतु, विभागीय स्तरावर गावांची पाहणी करणाऱ्या समितीने स्वागत आणि बँडबाजाला स्पष्ट शब्दांत नकार दिला. सर्व औपचारिकतांना फाटा देऊन गावाच्या पाहणीला महत्त्व दिले. समितीमधील काही सदस्यांनी गावाचे डॉक्युमेंटशन तपासले तर काहींनी थेट ग्रामस्थांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. खरोखरच लोकसहभाग आहे का हे तपासण्यासाठी ग्रामस्थांना अनपेक्षित प्रश्न विचारण्यात आले. स्पर्धेत सहभागी काही गावांमध्ये समितीला शौचालयांचा वापर चारा साठवणुकीसाठी होत असल्याचे आढळले, तर काही गावांचा दर्शनी भाग लख्ख असला तरी सांडपाणी दूर कोठे शोष खड्ड्यात न सोडता जलाशयात सोडल्याचे आढळून आले. अशी गावे स्पर्धेतून बाद झाली. घनकचऱ्याचे काय करता? असे प्रश्न महिलांना तर नखे कोणत्या दिवशी कापतात असा प्रश्न कोणत्याही विद्यार्थ्याला विचारले गेले. केवल डॉक्युमेंटेशनवर विश्वास ठेऊन गुण न देता प्रत्यक्ष पाहणी, संवाद आणि क्रॉस व्हेरिफिकेशनला महत्त्व देण्यात आले.

गावाने काय केले?

घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खत प्रकल्प निर्मिती

बंदिस्त गटारांची निर्मिती

सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी शोषखड्डे

परसबाग निर्मिती

प्रत्येक घरी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी शौचालये

नदीकाठालगत कचरा टाकू नये याकरिता जॉगिंग ट्रॅक निर्मिती

जनावरांच्या मलमूत्राचेही व्यवस्थापन

विद्यार्थ्यांची नखे व केस कापण्याबाबत पाठपुरावा

जलजन्य आजार पसरू नयेत याकरिता टीसीएलचा वापर

शाळेत बसविले सॅनिटरी नॅपकीन व डिस्पोजल मशिन

वैयक्तिक स्वच्छता आणि घर स्वच्छतेलाही प्राधान्य

गावात १०० टक्के आधारकार्डधारक

गावकरी देतात श्रमदानाला महत्त्व

स्मशानभूमी परिसरात हिरवाई

सौर उर्जेवर चालतात सार्वजनिक दिवे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्कायडायव्हिंगचा विक्रम शहिदांना समर्पित

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कारगिलच्या युद्धात एक पाय गमवावा लागल्यानंतरही तब्बल नऊ हजार फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करण्याचा पराक्रम मेजर डी. पी. सिंह यांनी केला आहे. देशात अशा प्रकारे युद्धातील जखमी सैनिकाने स्कायडायव्हिंग केल्याची घटना प्रथमच घडली आहे.

हा विक्रम नाशिकमध्ये झाला असून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावरच हे शक्य झाले असून, हा पराक्रम देशासाठी शहीद झालेल्या जवानांना आणि त्यांच्या पश्चात अनेक बाबींना तोंड देणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना समर्पित करीत असल्याची भावना सिंह यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केली.

पाकिस्तानविरोधातील कारगिलच्या रणसंग्रामात एक पाय गमावलेले मेजर डी. पी. सिंह यांनी अजूनही आपला जोश कायम असल्याचे दाखवून दिले आहे. कारगिल युद्धात पाकिस्तानविरुद्ध लढताना सिंह यांनी पाय गमावला. त्यानंतर त्यांना लोखंडी पाय बसवावा लागला. मात्र, त्यानंतरही काहीतरी वेगळे करावे आणि आपल्या सैन्याचे नाव उंचवावे या उद्देशाने सिंह यांनी स्कायडायव्हिंगचे खडतर उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. गेल्या चार वर्षांच्या अथक मेहनतीनंतर सिंह यांनी गुरुवारी (दि. २८ मार्च) नाशिकमधून स्कायडायव्हिंग करीत नवा पराक्रम नोंदवला. युद्धातील जखमी सैनिकाचे हे देशातील पहिलेच स्कायडायव्हिंग ठरले आहे. सिंह यांनी नाशिकमधील कॉम्बॅट एव्हिएशन ट्रेनिंग येथे प्रशिक्षण घेतले. ध्रुव हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्यांनी समुद्रसपाटीपासून नऊ हजार फूट उंचावरून उडी मारली. ही घटना ऐतिहासिक ठरली आहे.

मेजर डी. पी. सिंह यांना भारतीय लष्कराच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्कायडायव्हिंगचे प्रशिक्षण दिले. युद्ध किंवा लष्करी कामात जखमी झालेल्या किंवा अपंगत्व आलेल्या जवानांना प्रेरणा देण्यासाठी सिंह यांनी हा उपक्रम राबविला. सिंह यांनी नाशिकमध्ये १८ मार्च पासून आर्मीच्या साहसी प्रशिक्षणाला प्रारंभ केला आहे. त्यानंतर गुरुवारी प्रत्यक्ष स्कायडायव्हिंग करीत त्यांनी इतिहास रचला. या मोहिमेबाबत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले, तसेच सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे आपण हा पराक्रम करू शकलो, असे सिंह यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. लष्करासह वायू दलाचेही सहकार्य त्यांना मिळाले आणि स्कायडायव्हिंगची परवानगी मिळाली. कर्तव्यावर असताना अपंग झालेल्या जवानांप्रति विशेष वार्षिक कार्यक्रम लष्कराकडून राबविला जात आहे. ही मोहीम त्याचाच एक भाग असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. या पराक्रमामुळे इतरही दिव्यांग जवानांना प्रेरणा मिळेल, नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा मंत्रालयाने व्यक्त केली आहे.


वेगळी ओळख

मेजर डी. पी. सिंह यांची ओळख 'इंडियन ब्लेड रनर' अशीही आहे. १९९९ च्या कारगिल युद्धात तोफगोळा लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. प्राथमिक माहितीच्या आधारे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. पण, सुदैवाने ते जीवित असल्याचे दिसून आले. गंभीर जखमेमुळे त्यांना गँगरिन झाले. त्यामुळे त्यांचा एक पाय गुडघ्यापासून कापावा लागला. वयाच्या पंचविसाव्या वर्षी असा प्रसंग आला, तरी त्यास त्यांनी धैर्याने तोंड दिले. हिंमत न हारता त्यांनी आपली वाटचाल कायम ठेवली. त्यांनी १८ पेक्षा जास्त मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्या पूर्णही केल्या आहेत.

काही तरी वेगळे करण्याची माझी इच्छा होती. चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर अखेर मी स्कायडायव्हिंग करू शकलो. लष्कराचे अधिकारी, माझे प्रशिक्षक यांनी मला मोठे मार्गदर्शन आणि सहकार्य केले. शहिदांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मी हा पराक्रम समर्पित करीत आहे. काही ठरविले तर आपण निश्चितच ते करू शकतो, हे सिद्ध झाले आहे.

-डी. पी. सिंह, मेजर (निवृत्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तब्बल २४ कोटींची वसुली!

0
0

जिल्हा प्रशासनाची मार्च एण्डला कामगिरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा प्रशासनाने शनिवारी (दि. ३०) एकाच दिवसात २४ कोटी रुपयांचा महसूल वसुल केला. यामुळे प्रशासनाच्या तिजोरीत १६१ कोटी रुपये जमा झाले असून मार्च एण्डमुळे रविवारी (दि. ३१) प्रशासनाचे कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारने प्रशासनाला १६५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे.

मार्चच्या अखेरच्या आठवड्यात ६४ कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल वसुलीसाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे पहावयास मिळत होते. शनिवारी एकाच दिवसात प्रशासनाच्या तिजोरीत २४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. यामध्ये समृद्धी महामार्गासाठीच्या भू-संपादनाचे एक कोटी ४७ लाख रुपये, एमआयडीसीच्या सिन्नर येथील भूसंपादनासाठीच्या तीन कोटी ७० लाख रुपयांचा समावेश आहे. याशिवाय भाम धरणाच्या रॉयल्टीतूनही चार कोटी आणि विविध विभागांकडील थकीत ११ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. रविवारी देखील मार्च एण्डमुळे प्रशासनाचे कामकाज सुरू राहणार आहे. आत्तापर्यंत १६१ कोटी रुपयांची वसुली झाली असून वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्‍वास निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी व्यक्त केला आहे.

अशी झाली वसुली

समृद्धी भू-संपादन : एक कोटी ४७ लाख

सिन्नर एमआयडीसी भूसंपादन : तीन कोटी ७० लाख

भाम धरण रॉयल्टी : चार कोटी

विविध विभागांकडील थकीत : ११ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये महायुतीत फूट?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महायुतीत समावेश असूनही स्थानिक पातळीवरील नेत्यांना शिवसेना भाजपकडून विचारले जात नसल्याने नाशिकमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या(रिपाइं) आठवले गटाने नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक जिल्हा समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार देण्याचा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली. महायुतीच्या बैठकांना बोलविले जात नाही तसेच रिपाइं नेत्यांचे फोटोही लावले जात नसल्याने कार्यकर्ते संतप्त आहेत. जिल्ह्यातील स्थितीबाबतचा अहवाल गुरुवारी, चार ४ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना सुपूर्द केला जाणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले.

आरपीआय (आठवले गट) केंद्रात आणि राज्यात महायुतीत सहभागी आहे. परंतु, नाशिक जिल्ह्यात आरपीआयच्या आठवले गटाला विश्वासात घेतले जात नसल्याचा दावा करत, जिल्हाध्यक्ष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक प्रक्रियेत 'रिपाइं'ला डावलले जात असल्याचा आरोप बहुसंख्य कार्यकर्त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात झालेल्या मनोमिलन बैठकीत 'रिपाइं'च्या नेत्यांना बोलविण्यात आले नाही. दोन दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये झालेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही रिपाइंच्या नेत्यांना विश्वासात घेतले गेले नाही. युतीच्या मेळाव्यांमध्ये 'रिपाइं' अध्यक्ष रामदास आठवले यांचा फोटा लावला गेला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत 'रिपाइं'ला डावलले जात असल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे 'रिपाइं'ने नाशिक आणि दिंडोरीसाठी स्वतंत्र उमेदवार द्यावा, असा एकमुखी ठराव बैठकीत संमत करण्यात आला. या बैठकीचा अहवाल येत्या ४ एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत सादर केला जाणार आहे. यावेळी रामदास आठवले जो आदेश देतील त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती प्रकाश लोंढें यानी दिली.

'मराठा उमेदवार द्यावा'

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 'रिपाइं'ची मोठी ताकद आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र उमेदवार द्यावा तसेच नाशिकमधून मराठा समाजाला उमेदवारी द्यावी, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. त्यासाठीच्या नावाची शिफारसही रामदास आठवले यांच्याकडे करण्यात येणार आहे, असे प्रकाश लोंढे यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

परीक्षेत मदत करतो असे सांगत विद्यार्थिनीशी जवळीक साधण्याच्या प्रयत्न करणाऱ्या प्राध्यापकाविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात लैंगिक अपराध केल्याबद्दल विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रा. डॉ. संतोष वाघ असे या प्राध्यापकाचे नाव आहे.

येथील एसव्हीकेटी महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने प्रा. वाघ याच्याविरोधात देवळाली कॅम्प पोलिसात आपल्या आई व मामा यांना सोबत नेत तक्रार नोंदविली. पोलिस संबंधित प्राध्यापकाचा शोध घेत आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ मार्चपूर्वी १० दिवस आधी व त्यानंतर २७ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास प्रा. वाघ हा वर्गात परीक्षा देत असतांना तिची इच्छा नसतांना तिच्या जवळ गेला. भावनिक जवळीक साधून परीक्षेत मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच तिच्या सोबत वाईट वर्तवणूक केली. याशिवाय पीडितेशी फोनद्वारे संपर्क साधला आणि पाठलाग केला. पीडितेने तिच्या कुटुंबीयांना याबद्दल सांगितले. यानंतर त्यांनी देवळाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’ची लॉटरी राज्यस्तरावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे यंदा 'आरटीई'ची लॉटरी प्रक्रिया राज्यस्तरावरून पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी ही माहिती दिली.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागास घटकांतील बालकांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी यंदा पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील ४५७ शाळांमधील ५ हजार ३७५ जागांसाठी तब्बल १४ हजार ६२९ अर्ज शनिवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाले आहेत. आता पालकांचे लक्ष लॉटरी प्रक्रियेकडे लागले आहे. बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार आरटीई (राइट टू एज्युकेशन) प्रक्रिया राबविण्यात येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने ही प्रक्रिया राबविण्यात येते. यंदा, शाळा नोंदणीमुळे प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला होता. ५ मार्चपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. पहिल्या चोवीस तासांतच नाशिक जिल्ह्यात १ हजार ५४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर दिवसागणिक या अर्जांची संख्या वाढतच जात उपलब्ध जागांच्या तिपटीपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. शनिवारी (दि. ३०) या प्रक्रियेत अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. या दिवशी सायंकाळपर्यंत १४ हजार ६२९ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जांची संख्या जागांच्या तुलनेत जास्त असल्याने पालकांचे लक्ष लॉटरी प्रक्रियेकडे लागले आहे. दर वर्षी जिल्ह्यांनुसारच लॉटरी काढण्यात येते. यंदा मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे राज्यस्तरावरूनच लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अद्याप लॉटरीच्या तारखा, वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसल्याचे शिक्षणाधिकारी झनकर यांनी सांगितले.

- -

\Bउत्तर महाराष्ट्रातील अर्जसंख्या

--

\Bजिल्हा शाळांची संख्या प्राप्त अर्जांची संख्या

--

नाशिक ४५७ १४ हजार ६२९

धुळे ९७ २ हजार ३२५

जळगाव २७४ ६ हजार ७८७

नंदुरबार ४७ ५६२

- -

\Bराज्यात नाशिक चौथे

--

\Bजिल्हा शाळांची संख्या प्राप्त अर्जांची संख्या

--

पुणे ९६३ ५३ हजार ५८६

नागपूर ६७५ २५ हजार ९२२

ठाणे ६५२ १५ हजार ९३६

नाशिक ४५७ १४ हजार ६२९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images