हल्ली वर्तमानपत्रे उघडले की कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये युवकाचा खून, युवाप्रेमींनी घेतला गळफास , रॅगिंगमुळे शालेय मुलाची आत्महत्या, नेटवरून विवाह जमवलेल्या कॉलेज युवतीची फसवणूक, शिक्षकांना मारहाण अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. पूर्वीपेक्षा हे प्रमाण खूप वाढले आहे, ही चिंतेची बाब आहे.
शिक्षक, संस्थाचालक हे शिस्त व जबाबदारीची जाणीव करून देतात. काही प्रमाणात पोलिस व प्रशासनही जबाबदारी स्वीकारतात. मात्र, आता वेळ पालकांनी निक्षून सांगण्याची आली आहे. शामने छोटा गुन्हा केल्यावर त्याच्या आईने त्याला चोप देऊन चांगल्या मार्गावर कसे आणले हे शामच्या आई चित्रपटात फार छान पद्धतीने दाखवले आहे. पालकांची जबाबदारी केवळ प्रवेश घेऊन देणे, फी भरणे, मोबाइल, गाड्या देण्यापुरतीच राहिलेली नाही. मुलगा-मुलगी घराबाहेर कधी बाहेर जातात, कधी येतात, काय करतात, त्यांचे फ्रेंड सर्कल कोणते आहे, त्यात काय डिस्कशन चालते याचाही कानोसा वेळोवेळी घेणे गरजेचे आहे. पाश्चिमात्य संस्कृती फोफावण्याचे काम जाहिरीतींच्या माध्यमातून जोरात सुरू आहे. दुसरीकडे, भारतीय संस्कृतीच्या आदर्शाचे धडे अमेरिका, पाश्चिमात्य देशात गिरवले जात आहेत. अमेरिकी शाळेत योगा तसेच बाराखडी सक्तीची करण्यात आली आहे. तेथे व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनाचे धडे शिकवत आहेत. अमेरिका, जर्मनीत संस्कृत संशोधन केंद्र आहेत. पिझ्झा, बर्गलर यापासून दूर राहण्याचा सल्ला तेथील आहार तज्ञ देत आहेत. आपल्याकडे वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत आहे, व्यायामशाळा ओस पडत आहेत. शिक्षकांएेवजी गाईड, शार्पवर विश्वास वाढला आहे. अशा परिस्थितीत पालकांनी जबाबदारी स्वीकारण्याची गरज वाढली आहे. १९९० च्या दशकात नाशिक हे थंड हवेबरोबरच माणुसकीचे केंद्र म्हणून ओळखले जात होते. २०११ च्या जणगणनेनुसार नाशिकची लोकसंख्या सोळा लाखांवर गेली आहे. ग्रामीण पालक पाल्याला आकलन क्षमता, व्हीजन वाढविण्यासाठी शहरात पाठवत आहेत. शहरी भागात काट बेसीसवर किंवा होस्टेलमध्ये ही मुले राहतात. त्यामुळे त्यांच्यावरही शहरी संस्कार होत आहेत. शहरालगतच्या भागांमध्ये जमिनींना सोन्याचे भाव आल्याने सायकलीएेवजी मुलांना बाईक घेऊन दिल्या जात आहेत. पाल्याचे मोबाइल, पाकेटमनीचे हट्ट पुरवले जात आहेत. बाय टू गेट वनच्या जमान्यात आपणही भरकटत चाललो आहोत. १९९० च्या दशकातील चित्र आठवले तर ग्रामीण पालक आपल्या कोपरीत न्याहारी बांधून येत असे. आता तो चारचाकीने येऊन कामाचा आव आणून सकाळीच मिसळ, चायनीजकडे आकर्षला जात आहे. सायंकाळी घरी तो कोणत्या अवस्थेत जातो ते सांगायला नको. शहरी भागात मरावे परी प्लॅटरुपी उरावे असे चित्र आहे. मुलाबाळांसाठी इस्टेट करता करताच पालकांचे आयुष्य संपून जाते. गृहिणी घरकाम संपल्यावर टीव्ही मालिकांमध्ये गुंग होतात. मुलांवर संस्कार करायला, तो काय करतो याकडे बघायला त्यांच्याकडे फुरसतच उरत नाही. जाईंट फॅमिलीची जागा त्रिकोणी कुटुंबाने घेतल्याने छोटे नवाब बिघडत आहेत. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी शिक्षकांनी छडी उचलली तर लगेच राजकीय संघटना आंदोलने करतात. मग मुलांवर संस्कार करायचे कोणी, त्यांना चांगल्या मार्गाला लावायचे कोणी हा प्रश्न उभा राहतो. शाळा- महाविद्यालयीन वय हे मुलांना घडवायचे असते, कोणीतरी त्यासाठी वाईटपणा घेणे गरजेचे असते, हेच सर्वजण विसरतात आणि मग ड्रग्ज, खून, गुन्हेगारीच्या विळख्यात पाल्य अडकून करिअर बरबाद झाल्यावर पालक छाती पिटून दुसऱ्यांना दोष देत बसतात. आपल्या चुका लक्षातच घेत नाहीत. पैसा झाला मोठा, माणूस झाला छोटा याप्रमाणे महाविद्यालयात कॅन्टीन फुल्ल तर तास गुल. सायंकाळी ट्यूशनच्या नावाने चौक, कार्नर, कॅफेत मुलांचा राबता वाढला आहे. मोबाइलवर सेल्फी काढून, फेसबुकवर स्वतःची छबी टाकून आणि व्टिटवर प्रेमाचे व्टिट करून घेण्यातच विद्यार्थी धन्य मानत आहेत. टेक्नोसॅव्ही नसलेले पालकही हे कौतुकाने बघत असतात. मात्र, मुलांच्या बिघडण्याची ही सुरुवात आहे हे त्यांना कळत नाही. कळले तरी त्यांना समजले तरी अति लाडामुळे त्यांना अडविण्याची हिम्मतच राहिलेली नाही. या सर्वांचे परिणाम मुलांचे शिक्षण, त्याचे कुटुंब याबरोबरच समाज आणि देशावरही होत आहेत. एकदा अकबर दरबारातील मंत्र्यांना मांजर हाती देऊन महिनाभर पोसण्याची जबाबदारी सोपवतो. बिरबल सोडून मंत्रीगण बादशाहाच्या आदेशाप्रमाणे मांजराला लाडाने खाऊ पिऊ घालून गुबगुबीत करतात. बिरबल मात्र मांजराला कोनड्यातच राहू देतो. महिन्यानंतर पुन्हा दरबार भरतो. बादशाह अकबर काही उंदीर दरबारात सोडतो. मंत्र्यांनी लाड केलेली मांजरे लठ्ठपणामुळे पळू शकत नाहीत. बिरबलचे भुकेलेले मांजर टपा टपा एक एक उंदीर फस्त करतो. या कथेचा बोध हाच की, प्रतिकूल परिस्थिती, सुसुंगती, संस्काराने मुले घडत असतात. वाचन, चिंतन, मनन, थोरांचे विचार एकल्याने प्रगल्भ होतात. ही प्रक्रियाच खंडित झाली आहे. सध्या भारतात जगातील सर्वात जास्त तरूण आहेत. देशाला सुपर पाॅवर करण्याची स्वप्ने युवकांच्या बळावर पाहिली जात आहेत. २०२० मध्ये भारतातील तरुणांचे सरासरी वय २८ ते ३० दरम्यान असेल. जागतिक लोकसंख्येच्या ७० टक्के युवक भारतात असतील. अर्थमंत्री अरुण जेटलींनी बजेटमध्ये पालकांना जागे होण्याची संधी दिली आहे. पूर्वी उत्पन्नावर इन्कम टॅक्स होता आता खर्चावर सेवाकर दीडटक्क्यांनी वाढविला आहे. यामुळे पाल्याच्या चंगळवादाचा फटका बसून पालक शहाणे होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. परदेशात मुले-मुली सोळा वर्षाची झाली की, पालकांपासून विभक्त होतात, स्वबळावर शिक्षण घेऊन करिअरचे स्वप्न साकारतात. आपल्याकडे पाल्याचे लग्न लाऊन त्याचा संसार उभा करून देण्यापर्यंतची जबाबदारी पालकच वाहत असतात. मुलांचे करिअर घडविण्याची जबाबदारी मुलांची नसून ती आपलीच आहे असा पालकांचा आजही गैरसमज आहे. तो लवकर दूर होईल, तो सुदिन म्हटला पाहिजे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट