म. टा. वृत्तसेवा, कळवण
शासनाच्या स्पेशल ऑडिट पथकाने सुरगाणा तालुक्यातील पाच कोटींचा धान्य घोटाळा उघड केला. मात्र, कळवण तालुक्यात गेल्या १५-२० वर्षांमध्ये झालेला धान्य घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शासनाने स्पेशल ऑडीट पथक नेमून धान्य घोटाळा तत्काळ उघड करावा व या प्रकरणातील दोषींना गजाआड करावे, अशी मागणी कळवण तालुक्यातून होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि पुरवठा खात्याने राज्यात स्वस्थ धान्य दुकाने सुरू करून बीपीएल, अंत्योदय, केशरी पिवळे रेशन कार्डधारकांना गहू, तांदूळ, या धान्याचा पुरवठा अल्पदरात सुरू केला आहे. कळवण हा आदिवासी तालुका असल्याने गेल्या १५ ते २० वर्षांत शेकडो टन धान्य रेशन दुकानदाराच्या नावावर दाखवले गेले. त्यापैकी कित्येक आदिवासी कुटुंबं धान्यापासून वंचित राहत असल्याच्या शेकडो तक्रारी शासनाच्या दप्तरी धूळखात पडून आहेत.
आदिवासी जनतेला घरपोच धान्य त्याच्या दारात मिळावे म्हणून तत्कालीन माकप आमदार जे. पी. गावित यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून कळवण मतदारसघांत ही योजना यशस्वी करून राज्यात घरपोच धान्य योजना यशस्वी करून त्याचे शिल्पकार म्हणून ते राज्यात गणले गेले. मात्र, मागील काही वर्षांत घरपोच धान्य योजनेला घरघर लागून कोट्यवधींचा धान्य घोटाळा एकट्या सुरगाणा तालुक्यात झाल्याचे शासनाला आढळून आले आहे. अगदी तसाच किंबहुना त्यापेक्षा जास्त धान्य घोटाळा कळवण तालुक्यात गेल्या १५ ते २० वर्षांत झालेला असल्याने व त्याला रेशन दुकानदार अधिकारी व काही राजकीय नेत्याचा छुपा आशीर्वाद लाभल्याचा संशय आहे.
आमदार गावित यांनी कळवण तालुक्यातील संशयित धान्य घोटाळा उघड करण्यासाठी स्पेशल ऑडीट पथकाची तत्काळ मागणी करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. कळवण तालुक्यातील रेशनिंग संदर्भात विविध पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी निवेदने देऊन आंदोलने केली आहेत. मात्र, जबरदस्त राजकीय पाठबळ व दडपशाही यामुळे कोणत्याही निवेदन व आंदोलनचे फलित झालेले नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट