नाशिकची खरी ओळख ही दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीमुळेच. 'गोदावरीला पौराणिक असा वारसा होता जो रामाच्या वनवासामुळे अधोरेखित झाला. कुठल्याही नदीची पहिली व शेवटची ओळख ही जीवनदायी अशीच असते व तशीच ओळख नाशिकच्या गोदाईची. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या केटीएचएम महाविद्यालयाने ह्या गोदाईची वेगळी ओळख क्रीडेच्या माध्यमातून नाशिककरांना करून दिली ती १९९० च्या उत्तरार्धात. क्रीडाप्रेमी खासदार अशी प्रतिमा ज्यांची होती, त्या स्व. डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रेरणेतून महाविद्यालय बोटक्लबची स्थापना गोदाकाठी करण्यात आली. त्यानंतर केटीएचएम महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंनी आंतर विद्यापीठ व राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या या प्रयत्नामुळेच नाशिक महानगराला एक नव्या साहसी खेळाची ओळख झाली.
यानंतर २००५ साली माजी महापौर प्रकाश मते व विद्यमान नगरसेवक विक्रांत मते यांनी हेमंत पाटील व अनिल काकड यांच्या मदतीने वॉटर्स एज क्लब या संस्थेची स्थापना केली ती प्रामुख्याने रोर्इंग म्हणजे नौकायन व कॅनो-कायकींग ह्या साहसी खेळासाठी. रूड अर्थाने ह्याचे साहित्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी व इतर साधनसामुग्री विकत घेण्यासाठी प्रकाश मते यांनी आर्थिक पाठबळ या संस्थेच्या मागे उभे केले. यातून उभी राहिली ती आगळी वेगळी साहसी क्रीडासंस्कृती. आपण ज्या गोदेच्या काठावर राहतो, त्या ठिकाणी त्यांनी ह्या संस्थेच्या कार्याचा श्री गणेशा केला आणि बघता बघता हा खेळ व ही संस्था नाशिककरांच्या अभिमानाचा विषय ठरली. नुसता खेळ नव्हे, तर सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून ह्या संस्थेने पूर असतांना स्वत:चा जीव धोक्यात घालून केलेले मदतकार्य हे नाशिककर कधी विसरणार नाही. हे करीत असताना त्यात कुठलाही बडेजाव नाही. कुठे प्रसिद्धीची हौस नाही. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजऋणातून उतराई होण्याचा एक प्रयत्न म्हणून संस्थाचालक त्याच्याकडे बघतात. तसेच वॉटर्स एज क्लबची दुसरी आणि महत्वाची ओळख म्हणजे गोदावरीच्या अंगाखांद्यावर ज्या पानवेली नाशिककरांमुळे वाढतात व गोदेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. याची जाणीव लक्षात ठेवून पानवेली मुक्त गोदा यासाठी ते सातत्याने कृतीशील आहेत. त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना प्रदूषण मुक्त गोदा आपल्याला दिसते. तसेच, या साहसी खेळाला लोकाश्रय मिळावा म्हणुन गेल्या शुक्रवारपासून रविवारपर्यंत ४० वी पुरूष/महिला राज्य रोर्इंग अजिंक्यपद स्पर्धेचे नाशिक येथे आयोजन करण्यात आले. तसेच या स्पर्धेला जोड दिली ती कुमार गटाच्या व किशोर गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेने. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या ६ जिल्ह्यातील ९ संघांचे अंदाजे २५० खेळाडू सहभागी झाले. सर्व स्पर्धकांची विनामूल्य निवास व भोजन व्यवस्था ही आयोजकांतर्फे करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी आवश्यकता असते ती मुबलक पाण्याची. त्यामुळे गंगापूर धरणातून रोटेशनने जेव्हा पाणी सोडले जाते त्याची माहिती घेऊन या कालावधीत स्पर्धा आयोजन केले गेले. या साठी ५० मिटर, ७०० मिटर सरळ अशा पाण्याच्या प्रवाहाची आवश्यकता असते. इतर वेळेस ५० मिटर, ५०० मिटरचा परिसर सरावासाठी पुरेसा असतो. हा खेळ महाराष्ट्रात खेळला जातो तो पुणे/नाशिक/सांगली/कोल्हापुर ह्या जिल्ह्यात. यजमान नाशिकने ह्या स्पर्धेत स्वप्नवत कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपद मिळविले ते १३ सुवर्ण, ९ रजत व ८ कांस्य पदकांच्या मदतीने. हे सर्व शक्य झाले ते अंबादास तांबे यांच्या अथक प्रयत्नामुळे. १९९३-९४ रोजी खेळाडू म्हणुन सराव करणारा अंबादास तांबे हा लवकरच राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू ठरला. व त्यानंतर ह्या खेळाचे जतन करणे व त्याची लोकप्रियता वाढविणे ह्यासाठी तो सातत्याने प्रयत्नशिल आहे. त्याचे फलस्वरूप वॉटर्स एज बोट क्लबच्या माध्यमातून साधारण १०० पेक्षा जास्त खेळाडूंनी विविध स्तरावर महाराष्ट्रातर्फे खेळतांना पदके पटकविली. यातली एक म्हणजे सौ. वैशाली तांबे-खैरे ही 'शिवछत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू, ही एका सामान्य शेतकरी कुटुंबामधुन पुढे आली. आपले काका म्हणजे अंबादास तांबे यांच्या मार्गदर्शनामुळे नाशिकमधील या खेळातील ती पहिली शिवछत्रपती पुरस्कार विजेती ठरली. तिच्या पावलांवर अजून काही खेळाडूंची पाऊले मात्र नक्कीच पडणार आहेत, याबद्दल तीळमात्र शंका नाही. वॉटर्स एज क्लब मध्ये अंदाजे रोज ५० खेळाडू सकाळ-सायंकाळ या सत्रात सराव करतात. त्यांना अविनाश देशमुख व पुजा जाधव हे राष्ट्रीय पदक विजेते वरिष्ठ खेळाडू मार्गदर्शन करतात. आपल्या कार्याने अबोल असलेल्या अंबादास तांबेला बोलके केले त्या या खेळाडूंच्या कामगिरीने. आता तो स्वप्न पाहतो ते अर्जुन पुरस्काराचे. अर्जुन पुरस्कार विजेत्या कविता राऊतनंतर नाशिककरांना ही अनोळखी भेट देण्याचे. सदर स्पर्धेचे उदघाटन आपल्याच खेळातल्या अर्जुन पुरस्कार विजेत्या कॅप्टन कासमखान यांच्या हस्ते व्हावा हीच वेगळी ओळख या स्पर्धेची व त्यांच्या संस्थाचालकाची म्हणजे प्रकाश मते यांची. गेले काही दिवस संथ वाहणाऱ्या गोदाईच्या अंगावर तरंग उमटले ते नौकायनाच्या ह्या स्पर्धेमुळे. त्या काळात गोदेचा काठ भरला होता, तो त्या भावी खेळाडूंनी व त्यांच्या स्वप्नांनी.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट