म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सफाई कामगारांची भरती कायम तत्वावरच करा. कंत्राटी कामगारांना कायम करण्यास प्राधान्य देऊन जिल्ह्यात ही भरती प्रक्रिया राबवावी, अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य विजयकुमार यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून हीन वागणूक दिली जात असल्याचे तसेच, त्यांना हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विजयकुमार यांनी महापालिकेसह अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. सूचनांवर कार्यवाही करून अहवाल सादर न केल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला. तीन तास चाललेल्या या बैठकीत विजयकुमार यांनी सूचनांचा पाऊस पाडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला असून, सफाई कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा तसेच, कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी विजयकुमार शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस उपायुक्त निसार तांबोळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव
बनकर, उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव, माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया यासह समाज कल्याण, आरोग्य, शिक्षण अशा विविध विभागांचे अधिकारी, सफाई कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांबाबत असलेली वास्तव परिस्थिती प्रामाणिकपणे मांडा अशी सूचना प्रारंभीच करण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांना गमबुट, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज् व तत्सम सुरक्षेची साधने पुरवली जात असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, गेल्या दहा वर्षांत अशी साधनेच मिळत नसल्याची तक्रार बैठकीतच सफाई कामगारांनी केल्यानंतर विजयकुमार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. चुकीची माहिती देऊन आयोगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा कठोर कारवाई करावी लागेल असा इशारा दिला. कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळले जात असल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, तसेच त्यांना कारागृहात पाठविले जाईल असा इशारा देण्यात आला. २०१३ पासून सफाई कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेने आरोग्य तपासणी मोहीमच राबवली नसल्याची गंभीर दखल घेण्यात आली. प्रत्येक तीन महिन्यांनी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करा. त्याची सुरुवात रविवारी (दि. २९) पासून व्हायलाच हवी अशी सूचना करण्यात आली.
शहरात हवे ३,७५० सफाई कर्मचारी
एक लाख लोकसंख्येमागे २५० सफाई कर्मचारी असावेत असा निकष आहे. नाशिक शहरात २० लाख लोकसंख्येमागे केवळ १९९६ सफाई कर्मचारी आहेत. सिंहस्थात नाशिकमध्ये सुमारे १ कोटी लोक येणार
आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्य बळावर साफसफाईचा मोठा ताण येणार असल्याचे काही कार्यकर्त्यांनी विजयकुमार यांच्या निदर्शनास आणून दिले. सरकारच्या निकषानुसार २० लाख लोकसंख्येसाठी किमान
३ हजार ७५० सफाई कर्मचारी हवे. या व्यतीरिक्त कुंभमेळ्यातही मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. सिंहस्थात नाशिक शहरात साडेचार हजार, तर त्र्यंबकेश्वरसाठी ५०० सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे लोक कायम तत्वावर घेण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
हे स्वास्थ्य रक्षक
देशाच्या सीमांवर पहारा देऊन सैनिक जसे देशबांधवांचे रक्षण करतो तसे देशभर स्वच्छता ठेऊन सफाई कर्मचारी देशवासीयांच्या आरोग्याचे रक्षण करतात. म्हणूनच त्यांना स्वास्थरक्षक असे संबोधले जावे असा प्रस्ताव आपण राष्ट्रपती तसेच पंतप्रधान, सर्व मुख्यमंत्री यांना देणार आहोत अशी माहिती विजयकुमार यांनी दिली.
विजयकुमार यांनी केलेल्या सूचना
> आरोग्य तपासणी शिबिरात कर्मचाऱ्यांना मोफत औषधे द्या. कोठे किती कॅम्प घेतले याचा अहवाल सादर करा.
> सफाई कर्मचारी जेथे काम करतात त्या परिसरात महिला आणि पुरूष कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम तयार करा. तेथे स्वच्छ पाणी, साबण असावा. चेंजिंग रूम बनविण्यापूर्वी त्याचे मॉडेल आयोगाकडे पाठवा.
> सफाई कर्मचाऱ्यांच्या कॉलनीमध्ये सामाजिक सभागृह, शाळा, व्यायामशाळा, शिलाई सेंटर सुरू करा.
> आंबेडकर निवास योजनेंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना शहराच्या मध्यवस्तीत घरे द्या.
> दरवर्षी १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला निवडक सफाई कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करा.
> दरमहा किंवा दर तीन महिन्यांनी त्यांच्याशी वार्तालाप करा.
> सफाईची कामे खासगीकरणाच्या माध्यमातून न करता कायम तत्वावर देण्यास प्राधान्य द्या.
> सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या शिक्षणानुसार पदोन्नती द्या. तसेच, त्यांच्या वारसांना सेवेत घेताना शिक्षणानुसारच पद द्या.
> सफाई कर्मचाऱ्यांना कंत्राटी पध्दतीने न राबविता सेवेत कायम करा. सफाईच्या कामांचा ठेका देतानाही वाल्मिकी, मेहतर आणि तत्सम समाजाच्या लोकांनाच तो प्राधान्याने दिला गेला पाहिजे.
> सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेने व्यवसायासाठी बाजारपेठांच्या मध्यवर्ती भागात गाळे देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे.
> सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट