म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक
नाशिक शहरातील विशेषत: सातपूर व नवीन नाशिक परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून कर भरणाऱ्या नागरिकांना सत्ताधारी आवश्यक दैनंदिन पाणीपुरवठा करू शकत नसल्याचे दुदैवी चित्र आहे. नागरिकांनाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यास सत्ताधारी अपयशी ठरल्याने महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी माजी महापौर दशरथ पाटील यांनी केली आहे.
शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना दैनंदिन पाणीही मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचा पाढा वाचला. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठी असूनही सध्या विविध भागात पाण्याची टंचाई आहे. सिडको, सातपूर इंदिरानगर, पाथर्डी या भागात पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. पाणी पुरवठ्याची यंत्रणा नव्या पाईपलाईन टाकण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे.
पाणीपुरवठ्याचा सर्व भार हा जुन्याच यंत्रणावर आहे. नवीन यंत्रणा उभारण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. नाशिककर नियमित कर भरूनही त्यांना पाणीपुरवठा करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजाही पूर्ण करण्यास सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने महापालिकाच बरखास्त करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
आजही कमी दाबाने पाणीपुरवठा
महापालिकेने गुरुवारी कमी दाबाने पाणी, तर शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहील अशी सूचना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी पिण्याच्या पाणी मिळविण्यासाठी महिलांची धावपळ दिसून आली. नवीन नाशिकसह कामटवाडा, खुटवडनगर, डीजीपीनगर, कृष्णनगरसह सातपूर परिसरात पाण्याचा एकही थेंब मिळू शकला नाही. त्यामुळे सकाळी सकाळी महिलांची चिडचिड झाली. अनेकांनी कमी दाबाने पाणी होत असलेल्या मोजक्या ठिकाणी पाणी मिळविण्यासाठी गर्दी केली. तसेच काही सोसायटींमध्ये रहिवाशांनी एकत्रितपणे पाण्याचे टँकर मागवून घेतले. दरम्यान, शनिवारी सातपूर तसेच सिडको परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची सूचना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट