म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
दहा कोटीच्या थकीत पाणीपट्टीवरून महापालिका आणि पाटबंधारे विभागातील वादात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला असून पाणीकपात होणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. दोन्ही विभागांशी चर्चा करून हा वाद सोडविला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. सोबतच महापालिकेला नोटीस पाठविणाऱ्या व हा वाद उकरून काढणाऱ्या पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना महाजन यांनी फटकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे थकबाकीवरून नाशिककरांचे पाणीकपातीचे संकट तूर्तास तरी टळल्याचे चित्र आहे.
नाशिकच्या गंगापूर धरणात असलेल्या महापालिकेच्या पाणीसाठ्याच्या आरक्षणापोटी महापालिकेचे ९ कोटी ८५ कोटी रुपये थकीत होते. ही रक्कम तात्काळ न भरल्यास शहरात २० टक्के पाणी कपात करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला होता. यानंतर महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट करत, पाटबंधारे विभागाने चुकीचे बिलं लावण्याचा आरोप केला होता. तसंच सुधारित आरक्षण आणि थकबाकीबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करू असं सांगितलं होते. यांसदर्भात नाशिक दौऱ्यावर आलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना महापालिकेन पुन्हा साकडे घातले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून, दोन्ही विभागांशी चर्चा करून हा विषय कायमचा मिटवणार असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं.
थकबाकीवरून गोंधळ उडाला असतान देखील पाटबंधारे विभागाने महापालिकेला नोटीस पाठवल्याने पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलच फैलावर घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. पाणी पुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर महापालिकेला नोटीस पाठवणे योग्य नसल्याचे मत महाजन यांनी व्यक्त केले आहे. गंगापूर धरणात यंदा पाण्याचा साठा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला होता. मात्र, पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांचं थकबाकीवरून सूर असलेलं भांडण नाशिककराभर उन्हात ताहानलेलं ठेवतं का ही भिती नाशिककरांन होती. मात्र, पालकमंत्र्यांच्या मध्यस्तीनं नाशिककरांवरचं पाणीकपातीचं संकट दूर होइल असं निदान आजतरी चित्र आहे.
कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा
नाशिक शहरातील गुन्ह्याचे प्रमाण कागदावर कमी दिसत असली तरी, शहरातील कायदा सुव्यवस्था गंभीर असल्याचे स्पष्टीकरण महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना दिले आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून योग्य तो तोडगा काढला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. नाशिकच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा झाली आहे. पोलिसांच्याही खूप तक्रारी आहेत. गृहमंत्रालय मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मार्गी काढला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट