म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड
सर आम्हाला तुमचा अभिमान आहे, सर तब्यतेची काळजी घ्या, नाशिककरांना न्याय नक्कीच मिळेल, सर मी आमदारांना फोन केला होता, ते नितीन गडकरींशी बोलणार आहेत.... फक्त शुभेच्या मिळत आहे, यश नाही. दिल्लीत कोणी आपल्या आंदोलनाची दखल घेतच नाही, अशी खंत आडगाव शिवारातील शिक्षक सचिन आहेर यांनी महाराष्ट्र टाइम्सशी दिल्लीहून बोलताना व्यक्त केली.
के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजपासून जत्रा हॉटेलपर्यंत उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी आहेर दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसले आहेत. व्हॉटसअपवर त्यांना नाशिककरांचे प्रचंड पाठबळ लाभत आहे. मात्र, दिल्लीत कोणीच दखल घेत नसल्याचा अनुभव त्यांच्या वाट्याला आला आहे.
के. के. वाघ, अमृतधाम, बळी महाराज मंदिर आणि जत्रा हॉटेल दरम्यान गेल्या २० वर्षात तब्बल २२०० अपघात झाले. त्यामध्ये आतापर्यंत सुमारे १४३१ बळी गेल्याची माहिती आहेर यांनी माहितीच्या अधिकारात पाच पोलिस ठाण्यांकडून मिळवली. या भागात उड्डाणपूल बांधल्यास अपघात कमी होऊन निष्पापांचे बळी जाण्याचे प्रमाण कमी होईल, असे त्यांना मनस्वी वाटते. त्यामुळेच त्यांनी जनजागृती केली, सभा घेतल्या, पत्रके वाटली. हा प्रश्न दिल्ली दरबारी मांडावा यासाठी त्यांनी निश्चिय केला. यात दिल्लीला जाण्यासाठी लोकांनी त्यांना वर्गणी दिली. नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर भावपूर्ण निरोप देत जिंकूनच या, अशा शुभेच्छा दिल्या.
दिल्लीतील मीडियाचे दुर्लक्ष
दिल्लीत गेल्यावर त्यांनी मीडियाचे दरवाजे ठोठावले. दिल्लीपासून ८० किलोमीटर दूर असलेल्या नॅशनल हायवेच्या कार्यालयात गेले. तेथे दोन तास थांबूनही उपयोग झाला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कागदपत्रे दिली. त्या आधी पंतप्रधानांना पत्र दिले. हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र, निकाल हताश करणारा आहे. दिल्लीत आल्यावर त्यांनी महात्मा गांधीजींची समाधीस्थळ असलेल्या राजघाटाचे दर्शन घेऊन मंगळवारी (दि. ३०) बेमुदत उपोषण सुरू केले. आता आहेर यांची तब्येत खालावली आहे. सोबत असलेले वडिल शिवाजी आहेर, सतीश गुंजाळ, राहुल रोकडे त्यांची काळजी घेत आहेत.
लोकांचे बळी घेणाऱ्या मुंबई-आग्रा हायवेवर उड्डाणपूल व्हावा एवढीच माझी मागणी आहे. आणखी दोन-चार दिवस वाट बघेन. कोणीच दखल घेतली नाही तर सरळ नाशिकला येऊन रास्तारोको आंदोलन करेन. - सचिन आहेर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट