समाजसेवक एन. एम. आव्हाड यांच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त आज, बुधवारी 'अमृत एनेम' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एनेम लिखित 'पसायदान' वरील 'चेतना चिंतामणीचा ठाव' या निरूपणरुपी पुस्तकाचे प्रकाशन संत तुकाराम अध्यासन पुणे विद्यापीठाचे प्रमुख ह.भ.प. डॉ. रामकृष्ण लहवितकर यांच्या हस्ते होणार आहे. हा सोहळा 'शगुन' मते नर्सरी, सावरकर नगर, नाशिक येथे आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील एक लेखांश...
पसायदानात ज्ञानदेवांनी पहिल्या सहा ओव्यांत आत्मोन्नतीची वाटचाल, प्रगतीचा आलेख दिला आहे. सामाजिक शांतता, एकता, आत्मियता यांचा एकप्रकारे नकाशाच दिला आहे. परंतु, सातव्या ओवीचा पहिलाच किंबहुना सर्व विचारमालिका सोडून, बदलून पुढे आडवा येऊन वाचकापुढे उभा राहतो. यापूर्वी जे काही सर्व कथन केले, सांगितले, त्यानंतर हा मकिंबहुनाम शब्द योजून त्यांनी विचारप्रणाली बदलली आहे. वेगळी वाट धरली आहे. वेगळा मार्ग दर्शविला आहे, असे वाटते.
किंबहुना म्हणजे वेगळ्या रितीने, वेगळ्या पद्धतीने, किंवा दुसरा विचार केला तर, किंवा तसे पहायचे तर असाही अर्थ घेता येतो. किंबहुना हा शब्द साधकास वेगळ्या वाटेने, वेगळ्या मार्गाने घेऊन जाण्यास जसा पाहुणा येतो. त्यांची विचारप्रणाली समजते व किंबहुना या शब्दाची उचित पेरणी आपल्या लक्षात येते. या शब्दाने वेगळी पद्धत अगदी थोडक्यात व्यक्त केली असली तरी ती एक वाट दाखविलेली दिसते. केवळ वेगळी वाटच नाही, पण आत्मोन्नतीची जवळची वाट (शॉर्टकट) दाखविलेली दिसते. हा मार्ग जवळचा, खात्रीचा, भरवशाचा व स्वातंत्र्याचा भासतो. तो इतका जवळचा आहे की, दो दिनोमें साक्षात्कार वाटावा किंवा दोन क्षणात आत्मोन्नती मिळवावी.
हा झाला पहिला आत्मोन्नतीचा सामाजिक सुराज्याचा, रामराज्याचा महामार्ग. या वाटेने जो कोणी जाईल तो उन्नत होईल. त्यास मोक्ष लाभेलच. परंतु, सामाजिक शांतता, सुबत्ता इतकी मजबूत असेल की, कोणी दुष्ट राहणार नाही. कोणी वंचित, पददलित राहणार नाही. स्वधर्म सूर्याच्या प्रकाशाने समाजजीवन उजळून निघेल. परंतु मकिंबहुनाम हे शक्य झाले नाही. त्यामार्गाने जाणे शक्य नाही. ज्ञानी, पंडितांचा, महंत महात्म्यांचा संपर्क शक्य नाही. त्यांच्याकडून सकारात्मक सहकार्य लाभले नाही तर खेळ संपला का? आत्मोन्नतीचा विषय संपला का? उत्तर आहे की तसे नाही. तसे शक्य नसले तर किंबहुना दुसरा मार्ग आहे.
ज्ञानदेवांचा सारा अट्टाहास ज्ञानातून व्यक्तिगत व सामाजिक उन्नती, प्रगती व्हावी हा आहे. तो मार्ग गुरूमार्गाने अनुसरून पहावा. किंबहुना ते शक्य नसेल तर दुसरा मार्ग ते पुढे मांडतात. त्यांचे उन्नतीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय त्यांना शांतता लाभणार नाही. मुक्ती मिळणार नाही. तोपर्यंत त्यांना पसायदान मागण्याचा हक्क व अधिकार राहणार नाही. एकदा सर्व काही सुखमय झाले की ते पसायदान घेऊन जाण्यास मोकळे होतील ही अपेक्षा आहे. तसे झाले तरच ज्ञानिया सुखी होणार आहे. ही शर्त आहेच.
हा दुसरा मार्ग व्यक्तिगत निष्ठेचा आहे. आपल्या आपण अनुसरावयाचा मार्ग आहे. ज्ञानमार्गापेक्षा कर्मयज्ञातून साधण्याचा मार्ग आहे. कोणी कितीही मोठा असेल, त्यापुढे हात न पसरता, त्यांचे लांगुलचालन न करता कर्म मार्गानेसुद्धा आत्मोन्नती करता येते. श्रीमद्भगवतगीतेची, तसेच ग्रंथ ज्ञानेश्वरीची हीच अपेक्षा आहे. दूध तापविल्यावर वर साय यावी तसे ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या निर्मिती प्रपंचातून पसायदान आपोआप वरती आले आहे. ते सर्वसुखी, समाधानीही असतात. जसे त्या कर्मवीर सर्वसुखी माणसासारखे. या ज्ञानमहर्षींना कोणतीही उणीव नसते. उच्च शिक्षापात्र हा ग्रंथकार, पुस्तकलेखक, नाटकलेखक सदाही प्रसन्न असून सुखी समाधानी असतो. हा बुद्धिजीवी व तो सर्वसुखी कर्मयोगी यांची जोड सुख, समाधान मापदंडात घातली गेली आहे. आत्मउन्नतीच्या प्रवासात उच्च पातळीवर पोहोचलेले कर्मवीर व ज्ञानयोगी यांची दृष्टादृष्ट व्हावी व त्यातून विजयाचा व जिंकल्याचा इशारा व्यक्त व्हावा. तो एकप्रकारे शकून असेल. ती पूर्णत्वाची खूण असेल. तिसऱ्या माणसाला समजून घेण्यास सोपे असेल अशी ती दृष्टादृष्ट विजयाच्या सूचनेसह व्यक्त होण्याची अपेक्षा आहे.
त्या दोन महानुभवाची दृष्टादृष्ट समजून घ्यावी लागेल. एकमेकाकडे पाहून त्यांनी केलेला इशारा पुरेसा आहे. पूर्णत्वाचा आहे. कार्य पूर्णत्वाचा आहे व पुढे बाजूला होण्यास, मोकळे होण्यास स्वातंत्र्य देणारा आहे. तसेच तो जिंकल्याचा इशारा आहे. विजयाचा इशारा आहे. निवडणुकीत मतमोजणी संपत आलेली असताना दोन कार्यकर्ते प्रवेशद्वारी व्ही आकाराची दोन बोटे उंचावून इशारा करतात. ती दृष्टादृष्ट पटते. पूर्णत्वाची साक्ष मिळते. क्रिकेटच्या खेळात गोलंदाजाकडून जेव्हा फलंदाज बाद होतो. त्याचा त्रिफळा उडतो किंवा झेल जातो, तेव्हा गोलंदाज व क्षेत्ररक्षक हात उंचावून टाळी देतात. ती दृष्टादृष्ट विजयी समजावी. झालं काम झालं. साध्य झालं. लाभलं मिळाल्याची ती खूण, 'दृष्टादृष्ट विजये' हा इशारा ज्ञानेशांना समयसूचक वाटतो. कार्यपूर्तीचा वाटतो. निरोप घेणेस योग्य मुहूर्त वाटतो. म्हणून समाजाच्या विविध घटकांत 'दृष्ट विजये' हा इशारा आपसांत मिळावा. ऑल इज वेल हे सर्वांनी गुणगुणावे. सर्वेपि सुखिना सन्तु, सर्वे सन्तु निरामय: यासाठी सामुदायिक समाधान ही औचित्याची खूण आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास शेतकरी व कृषी उत्पन्न व्यापारी व कृषी उत्पन्नाचे उपभोक्ते यांचे देता येईल. शेतकऱ्यांना योग्य किफायतशीर भाव मिळाला. व्यापाऱ्यास त्यांचा योग्य लाभ झाला व शेवटी उपभोक्त्यास किफायतशीर, समाधान मर्यादेपर्यंत खर्च झाला तर सर्वांची दृष्टादृष्ट विजये होईल. कृषी उत्पन्नाचा रथ संथगतीने अखंड पण समाधानाने चालू राहील. परंतु असे होत नाही.
सर्वेपि सुखिना ही अवस्था कठीण आहे. म्हणून ज्ञानदेवांनी सामाजिक 'दृष्टादृष्ट विजये' ही शर्त ठेवली आहे. सर्वसाधारण शिक्षित वा अशिक्षित सुखी संसारी माणूस आपले आध्यात्मिक व्रत पाळीत अखंड भगवंताचे नामस्मरण करतो. तो घटक व बुद्धिजीवी ज्ञानी, बुद्धिवंत माणूस त्यास ग्रंथ संपदेतून चांगला मान, महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्ञानकोशात त्याला अंतर्गत पूर्ण समाधान लाभले आहे. तो घटक यांचे अंतिम उद्दिष्ट एकच आहे. त्यांची दृष्टादृष्ट विजये व्हावी. समाधानाचा श्वास एकत्र घ्यावा. आनंदाचा क्षण एकत्र अनुभवावा याची गरज आहे. पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी एकमेकाकडे पाहतात. गावचे धरण भरून सांडवा वाहायला लागला. खोल विहिरींची पाणीपातळी वर आली की एकप्रकारे आनंदाची गावभर लहर येते. तो एक सामुदायिक आनंदसोहळा साजरा होतो. सुखस्वप्ने पाहण्याचा तो काळ असतो. भविष्याची चिंता कमी करण्याची ती वेळ असते. तिला 'दृष्टादृष्ट विजये' वेळ म्हणता येईल. समाधान संतोषाची आम लाट म्हणजे विजयी दृष्टादृष्ट.
पसायदानाचे अवलोकन केल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न शिल्लक रहायला नको. कारण ज्ञानेश्वरी समजल्यानंतर पुढे काय? याचे उत्तर म्हणजेच पसायदान आहे. ज्ञानेश्वरीचे पारायण करून कोणत्या मार्गाला लागावे ही वाट पसायदानाने दाखवली आहे. पसायदानानंतर ज्ञानदेवांना स्वत:ला वेगळी वाट धरायची आहे. त्यांच्या मते त्यांचे अवतारकार्य संपत आले आहे. संगतीला आता सात दिवस घालवायचे आहेत. माणसांत रमावयाचे आहे. सर्वदा सुखी झालेला समाज एकदा डोळे भरून पहावयाचा आहे. इश्वरनिष्ठांशी विजयी दृष्टादृष्ट व्हायची आहे. भावंडांत आवडीने रहावयाचे आहे. संत नामदेवासोबत काही काळ घालवायचा आहे. म्हणून त्यांना पसायदानानंतर निरोप घ्यायचा आहे. सर्वेपि सुखी समाज पाहून संतोष पावायचे आहे. तेव्हाच निरोप समारंभ घडवायचा आहे.
आपल्या तिन्ही संसारी भगवंतांचे निरंतर मनन, चिंतन करणारा, फार प्रसिद्ध नसलेला सर्वसामान्य माणूस आपल्या कर्मयोगाने मोक्षाप्रती सहज, सुलभतेने पोहोचतो. तसेच ग्रंथनिर्माते विद्वान, जगप्रसिद्ध बुद्धिजीवी, महापंडित आपल्या ज्ञानमार्गातील एकाग्रतेमुळे व असीम निष्ठेतून मोक्षाला पात्र ठरतो. त्यालाही मोक्ष मिळण्याचा अधिकार पोहोचतो. तो सर्वसाधारण माणूस ते जगप्रसिद्ध बुद्धिवंत शेवटच्या क्षणी एकच अवस्थेत येतात. दोघे भलेही दोन वेगवेगळ्या वाटेने आले तरी शेवटी भगवंताच्या दारी एकत्र येतात. त्यांची दोघांची दृष्टादृष्ट किंवा भेट ही सार्वजनिक सुखाची, समाधानाची लहर असते. ती समाजोन्नती आहे. हे विश्व सहवासाला योग्य ठरते. यापुढे त्यांना जास्त काही सांगण्या शिकविण्याचे काम नाही. म्हणून पसायदान मागावयाचे आहे. निरोप समाधानाने घ्यावयाचा आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट