म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प
देवळालीच्या संजय गांधी नगर हा भाग गेल्या अनेक वर्षांपासून नागरी सुविधांपासून वंचित आहे. येथे कॅन्टोन्मेन्ट बोर्ड प्रशासनाच्या वतीने कोणतीही नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. सुविधांच्या पूर्ततेसाठी खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडण्याचा स्थानिकांनी काही संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न केले. मात्र, अद्याप कोणतिही कार्यवाही होऊ शकलेली नाही.
संजय गांधी नगर येथे सर्वसाधारण १००० लोकवस्ती असून त्यांचा मतदानयादीमध्ये समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून तेथील नागरिकांचा वापर केवळ मतदानापुरताच केला जात आहे; मात्र त्यांना कोणत्याही प्राथमिक सुविधा देण्यात आल्या नाही. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सहा चाळ येथील पिण्याच्या पाण्याच्या नळावरून पाणी भरावे लागते. पथदीप नसल्यामुळे रात्री घराकडे परततांना अंधारात चाचपडत पावले टाकावी लागतात. घरघरांमध्ये अजुनही वीज पोहचू शकलेली नाही. त्यामुळे रात्री या भागातील बहुतांश विद्यार्थी रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागत आहे.
परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. महिलांसाठी अद्याप शौचालयाची उभारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे बहुतांश महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. येथे ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्यामधून कचरा देखील नियमितपणे उचलला जात नाही. गटारींची बांधणीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील इतस्तत: सांडपाणी वाहून जाते. रहिवाशांना असह्य दुर्गंधी सहन करावी लागत असून परिसराचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे. गटारांची नियमित स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे देवळाली कॅम्प परिसरातील संजय गांधी नगर हा नक्की शहराचाच भाग आहे की नाही? असा प्रश्न बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना पडतो.
नागरी सुविधांची मागणी करीत स्थानिकांनी कॅन्टोन्मेन्ट बोर्ड प्रशासनाकडे अनेकवेळा निवेदने दिली, आंदोलने केली, मोर्चे काढले. परंतु, प्रशासनाकडून नेहमीच उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असा स्थानिकांचा आरोप आहे. काही अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी हा भाग लष्कराच्या जागेवर असून तो अनधिकृतरित्या वसलेला आहे. त्यामुळे तेथे नागरी सुविधा देता येणार नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले. याबाबत स्थानिकांनी संजयगांधी नगर अनधिकृत असल्याचे खंडन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण तेथील रहिवाशी असून कॅन्टोन्मेन्ट बोर्डसह विधानसभा, लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या यादीमध्ये रहिवाशांची नावे कशी काय समाविष्ट कशी करण्यात आली? आणि नावे समाविष्ट असतील तर आम्हाला नागरी सुविधा पुरविण्याबाबत का चालढकल केली जाते, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. कॅन्टोन्मेन्ट प्रशासनाने नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते आहे. प्रशासनाने किमान फिरत्या शौचालयाची तरी व्यवस्था करून द्यावी. - मीराबाई घारू
चारणवाडीच्या पर्यायी जागेला विरोध आहे. प्रशासनाने आम्हाला येथेच नागरी सुविधा द्याव्यात अशी विनंती आहे. - राजेश पवार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट