म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
'आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावाल, तर नाशिकमध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला अपशकून करू' अशी धमकी राष्ट्रवादीचे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी सरकारला दिली आहे. सोबतच आदिवासींच्या नादी न लागण्याचा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला असून, 'आदिवासी पेटला तर, तो आदिवासी भागातून जाणाऱ्या रेल्वे अडवून तुम्हाला धडा शिकवू' असा इशाराही त्यांनी दिला आहे. 'आदिवासी हे जंगलाचे वाघ असून, आमची भाजी भाकरी हिसकावण्याचा प्रयत्न केला, तर मोदींसह तुमची पोटं टराटरा फाडू' असा सज्जड दम त्यांनी राज्य सरकारला भरला आहे.
धनगर समाजाला आदिवासी समाजात आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांविरोधात आदिवासी आरक्षण बचाव समितीतर्फे गुरूवारी नाशिकमध्ये राज्यातील विविध संघटनांचा मोर्चा काढण्यात आला होता. आदिवासी आयुक्तालयासह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आदिवासी नेते मधुकर पिचड यांच्यासह माजी मंत्री अॅड. पदमाकर वळवी, राजेंद्र गावीत यांच्यासह महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मोर्चात भाषण करताना पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आगपाखड केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींना संरक्षण दिले आहे. मात्र, हे संरक्षण हटवण्याचा प्रयत्न युतीचे सरकार करत आहे. 'आदिवासींच्या नादी लागू नका' असे सांगून 'सिंहस्थ कुंभमेळ्याला अपशकुन नको असेल, तर आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. आदिवासींचा इतिहास हा लढायांचा आहे. आरक्षणासाठी आमच्या सरकारमध्ये आम्ही मंत्रिपदाचेही राजीनामे दिले होते. त्यामुळे आता काहीही करू शकतो.'
मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा
आदिवासी आरक्षण बचाव समितीतर्फे गुरूवारपासून राज्यात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. नाशिकमधला हा पहिलाच मोर्चा असून, शेवटचा मोर्चा हा मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागरपूरच्या निवासस्थानी काढण्यात येणार असल्याची माहिती मधुकर पिचड यांनी दिली आहे. वेळ पडल्यास आदिवासींचा स्वतंत्र पक्ष काढू, पण आरक्षणासाठी लढू !' असा इशारा देत पिचड यांनी स्वतःच्या पक्षाला घरचा आहेर दिला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट