म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत
हंगामाच्या शेवटच्या सत्रात द्राक्षांचे भाव प्रचंड कडाडले असून, स्थानिक बाजारपेठेत शेतकऱ्यांना ६० ते ७५ रुपये दर मिळत आहे. मात्र, द्राक्षांना वजन मिळत नसल्याने दर वाढूनही शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे मोबदला मिळत नसल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
ऐन द्राक्ष हंगामात अवकाळी पाऊस व गारपिटीने प्रचंड नुकसान झाल्यानंतर निर्यातक्षम द्राक्षही यंदा दहा ते वीस रुपये किलो दराने विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली. बहुसंख्य शेतकऱ्यांना वाईन उत्पादक व बेदाण उत्पादकांना मातीमोल भावात द्राक्ष विकावे लागले होते. मात्र, आता हंगामाच्या अखेरच्या सत्रात द्राक्षांना ६० ते ७५ रुपये दर मिळत आहेत. द्राक्ष संपत आल्याने स्थानिक बाजारपेठेबरोबरच द्राक्षांची निर्यातही मंदावली आहे. शिल्लक द्राक्षांपैकी केवळ दहा टक्के द्राक्ष निर्यात होत असून, ९० ते १०० रुपये किलोने विकली जात आहेत.
यंदा प्रत्येक महिन्यात पावसाचा व वेळोवेळी गारपिटीचा सामना करावा लागला आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल ५० टक्के निर्यात घटली आहे. गतवर्षी नाशिक विभागातून युरोप, लंडन, रशिया, अरब राष्ट्र, बांगलादेश आदी देशात साडेसहा हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा केवळ तीन हजार दोनशे कंटेनेर द्राक्षांची निर्यात झाली आहे. मुळात गत वर्षाच्या तुलनेत द्राक्ष उत्पादनात तब्बल ४० टक्के घट झाली आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीने नाशिक विभागातील दोन लाख एकर द्राक्ष क्षेत्राचे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एकंदरीत संपूर्ण द्राक्ष हंगामात अस्मानी संकटांना तोंड द्यावे लागल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विविध कार्यकारी सोसायट्या, सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँकांची वसुली ठप्प झाली आहे. शेतकरी यंदा कर्जफेड करूच शकत नसल्याने नुकसानभरपाईपेक्षा सरसकट कर्जमाफी मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट