म्हाडाने सातपूर कॉलनीत उभारलेल्या घरांना काही ठिकाणी असलेल्या चौकात जाण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही. आठ हजार स्कीमच्या रहिवाशांच्या अतिक्रमणाने चौकात कोपऱ्यात राहणारे रहिवाशी त्रस्त झाली आहेत. यातच बहुतांश घरमालकांनी घर भाड्याने देऊन दुसरीकडे भाडे तत्वाने रहावे लागत आहे. यासाठी महापालिकेने याकडे लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
सातपूर भागात एमआयडीसीची स्थापना झाल्यानंतर म्हाडाने कामगारांसाठी स्वतःत घरे असावित म्हणून म्हाडाची स्कीम सातपूर भागात राबविली. यात सर्वसामान्य कामगारांना परवडणार अशा दरात कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यात आली. यात सातपूर हौसिंग कॉलनीत सर्वात मोठी स्कीम म्हाडाने कामगारांसाठी निर्माण केली. यात आठ हजार घरांची स्कीम देखील अगदी कमी पगार असणाऱ्या कामगारांसाठी बांधण्यात आली. परंतु, गेल्या काही वर्षांपासून आठ हजार स्कीममध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी त्यांना हवी तशी अतिक्रमणे करीत घरांची बांधकामे केली. यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमाणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात बहुतांश रहिवाशांनी घरांचे बांधकाम करतांना चौकात कोपऱ्यात राहणाऱ्या रहिवाशांना रस्ताच सोडला नसल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत चौकात राहणाऱ्या रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक व महापालिकेकडे तक्रारी करून देखील न्याय मिळत नसल्याचे सांगतात. विशेष म्हणजे एकेकाळी गुण्यागोविंदाने राहणारे रहिवाशीच चौकातील रहिवाशांचे घरच अतिक्रमणात गायब करत असल्याने रोजच छोटीमोठी भांडणे होतांना दिसत आहेत.
कुणाकुणावर करावी कारवाई?
अनधिकृत बांधकामाबाबत अनेक तक्रारी देखील महापालिकेकडे आल्याने नेमकी कारवाई करावी तरी कोणावर असा प्रश्न निर्माण होत असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगतात. त्यातच दोन किंवा चार रहिवाशांनी अतिक्रमण केले असल्यास कारवाई करता आली असती. परंतु, शेकडो घरांचे अतिक्रमण असल्याने कारवाई करावी कशी? असा प्रश्न महापालिका अधिकाऱ्यांना पडला आहे. परंतु, आठ हजार स्किममधील चौकात राहणाऱ्या रहिवाशांचे मात्र अतिक्रमाणात मोठे हाल होत असल्याने त्यांना घरसोडून दुसरीकडे भाडे तत्वाने राहण्याची वेळ आली आहे.
सातपूरमध्ये कामाच्या शोधासाठी आलेल्या कामगारांसाठी म्हाडाने घरे उभारली. परंतु, दिवसेंदिवस रहिवाशांनी घरांच्या मागे पुढे अतिक्रमणे करीत बांधकामे केली. यामुळे चौकातील रहिवाशांना तर रस्त्याच सोडलेला नाही. महापालिकेने या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची गरज आहे.
- दिनेश आवारे
आठ हजार स्किममध्ये चौकातील घरात आम्ही राहत होते. परंतु, गेल्या वर्षी शेजारी राहणाऱ्या दोघा रहिवाशांनी बेसुमार अतिक्रमण केल्यामुळे आमचे घर दिसेनासे झाले आहे. त्यामुळे स्वतःचे घर सोडून भाडेतत्वाने दुसरीकडे राहण्याची वेळ आली आहे.
- स्वप्निल वडनेरे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट