पंचवटीतील प्रभाग क्रमांक ६ मध्ये अद्यापही पाणी पुरवठा सुरळीत झाला नसल्याने प्रभागातील अश्वमेध नगर, विठाई नगर, गजवक्र नगर, ओमनगर, पवार मळा भागातील रहिवाशी नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न केल्यास पंचवटी विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा महिला शिवसेना उपजिल्हाप्रमुख लक्ष्मी ताठे यांनी दिला आहे.
प्रभागातील विविध भागात जलवाहिनी न टाकल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नीट व वेळेत पुरेसा होत नाही. त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. दररोज अर्धा किलोमीटरवरून पाणी आणावे लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे. हॉटेल जत्रामागील श्री स्वामी समर्थ नगरात सुद्धा जलवाहिनी टाकण्यात आलेली नाही. निवडणुका आल्या की आश्वासन दिले जाते आणि नंतर बिचाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाणीप्रश्नाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीना वेळोवेळी निवेदन दिले मात्र, काही उपयोग होत नाही. उलट दिवसेंदिवस पाणीप्रश्न बिकट होत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे.
ऐन सुटीच्या काळात पाण्यासाठी फिरावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास व पाणी पुरवठा तत्काळ सुरळीत न केल्यास हंडामोर्चा काढण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. शिवसेनेचे पंचवटी विभागप्रमुख हरिभाऊ काळे, निलेश मोरे, दिलीप मोरे, मल्हारी मते, संजय थोरवे, शैलेश सूर्यवंशी, गणेश थेटे, शोभा दिवे, संतोष पेलमहाले, सचिन परदेशी यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
जलवाहिनी टाकण्याची मागणी पाठपुरावा करूनही अद्याप मान्य करण्यात आलोली नाही. सर्व कर वेळेवर भरूनही सुविधा मिळत नाही.
- रमेश अहिरे, नागरिक
पाण्यासाठी आमची वणवण अद्याप थांबलेली नाही. अनेकवेळा महपालिकेकडे निवेदनही दिले पण कायम कानाडोळा केला जातो. पाणी पुरवठा सुरळीत करावा.
- लक्ष्मी ताठे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट