Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मयूर मोरे राज्यात पहिला

$
0
0


नाशिक : काही दिवसांपूर्वी शिल्पकलेत महाराष्ट्र शासनाचे सुवर्ण पदक मिळविणारा नाशिकचा मयूर शांताराम मोरे या विद्यार्थ्याने सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून जी. डी. आर्टसच्या पदवी अभ्यासक्रमात राज्यातून पहिला क्रमांक मिळविला आहे. सिडको परिसरातील गणेश मूर्तीकार शांताराम मोरे यांचा तो मुलगा आहे. मागील पिढ्यांकडून मिळालेला मूर्तीकलेचा वारसा जोपासत मयूर याने प्रयत्नपूर्वक सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळविला होता. या अभ्यासक्रमासाठी राज्यात नऊ विभागांमधून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा होती. जी. डी. आर्ट (स्कल्प्चर) या अभ्यासक्रमात 'ह्युमन बॉडी स्टडीज अँड अनाटॉमी' या विषयात मयूर याने यश मिळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामसडकसाठी १२९ कोटी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे मजबूत करणाऱ्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या थकीत बिलांपोटी केंद्र सरकारने अखेर पहिल्या टप्प्यात १२९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मजूर आणि ठेकेदारांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी कामे बंद ठेवण्याच्या निर्णयावर ठेकेदार ठाम आहेत.

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे व्यापक स्वरुपात विणण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजना उपयुक्त आहे. त्यांतर्गत ग्रामीण भागात रस्ते बनवून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो. या योजनेंतर्गत राज्यभरात हाती घेतलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी तीन हजार चार कोटी रूपयांचा निधी पाच वर्षांसाठी केंद्र सरकारने मंजूर केला आहे.

पहिल्या टप्प्यात त्यापैकी एक हजार ४३१ कोटींचा तर दुसऱ्या टप्प्यात एक हजार ५७२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र दुसऱ्या टप्प्याचा निधीच राज्याला वितरीत केला गेला नाही. गेल्यावर्षी राज्याला ३३६ कोटी रूपयांचा निधी तर यंदा मजूर आणि ठेकेदारांच्या बिलांपोटी केवळ २९८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बिहार व तत्सम राज्यांना काही हजार कोटींमध्ये निधी मंजूर केला जात असताना केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याची बाब 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'ग्रामसडकची वाट बिकट' या वृत्तमालिकेद्वारे पुढे आणली होती. या मालिकेनंतर राज्याचे ग्रामविकास मंत्रालय खडबडून जागे झाले.

जानेवारीपासूनची बिले थकीत असतानाही ठेकेदारांनी स्वत:जवळील पैसे खर्च करून ही कामे सुरू ठेवली होती. परंतू केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी नाशिक भेटीत निधी देण्याबाबत हात आखडता घेतल्याने ठेकेदारही धास्तावले आहेत. या योजनेंतर्गत सुरू असलेली ९५ टक्क्यांहून अधिक कामे कामे बंद पडली असून, ग्रामीण जनजीवनावर त्याचा परिणाम झाला आहे. अन्य जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील सातशेहून अधिक ठेकेदार कर्जबाजारी झाले असून, हजारो मजुर रोजगाराला मुकल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याची वस्तुस्थिती या वृत्तमालिकेद्वारे राज्यसरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

याची दखल घेत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची दिल्लीतील अर्थमंत्रालयात १ जून रोजी भेट घेतली. ग्रामसडक योजनेसाठी राज्याला तीन हजार चार कोटी रूपयांचा निधी पाच वर्षांसाठी मंजूर असताना या योजनेंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदार आणि मजूरांची देणी देण्यासाठी केंद्रसरकारने तातडीने ‌निधी द्यावा अशी मागणी केली आहे. योजनेच्या मार्गदर्शक सुचीतील तरतुदीप्रमाणे केंद्र शासनाने एकूण मंजूर प्रकल्पाच्या ५० टक्के निधी अग्रीम स्वरुपात राज्यांना देणे आवश्यक असल्याने एक हजार पाचशे कोटी रूपयांची मागणी करण्यात आली. मात्र केंद्रसरकारने १२९ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून नाशिकच्या वाट्याला आठ कोटी २५ लाख रुपयांचा निधी आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१,३९२ वाहनांवर शहरात कारवाई

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ३० मे ते ५ जून या कालावधीत शहर पोलिसांनी ५ वेळा नाकाबंदी केली. तसेच, फुलेनगर व लेखानगर झोपडपट्टीत कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या दरम्यान पोलिसांनी १ हजार ३९२ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत १ लाख ४१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.

ऐन सिंहस्थाच्या तोंडावर शहरातील गुन्हेगारी काही प्रमाणात वाढली. एकप्रकारे गुन्हेगार पोलिसांना थेट आव्हानच देऊ लागले. सिंहस्थापर्यंत ही परिस्थिती कायम राहिली तर पोलिसांना कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे अवघड बनले असते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नाकाबंदी, कोम्बिंग आणि प्रतिबंधक कारवाया सुरू केल्या आहेत. मागील पाच दिवसात पोलिसांनी ७४७ टवाळखोरांविरोधात मुंबई पोलिस अॅक्टनुसार कारवाई केली. कोम्बिंगदरम्यान ७३ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. याच दरम्यान पोलिसांनी घरफोडीचे सात गुन्हे उघडकीस आणून आरोपींकडून २३० ग्रॅम सोने, १२० किलो तांबे, ९ दुचाकी आणि दोन एलसीडी जप्त केले. मागील काही महिन्यापासून पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईचे प्रमाण कमी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरातच द्या; लॉजिंगची सुविधा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'बेड आणि ब्रेकफास्ट' या योजनेच्या धर्तीवर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांकरिता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) 'यात्री निवास योजना २०१५-१६' पुढे आणली आहे. अगदी कमीत-कमी कागदपत्रांच्या मदतीने शहरातील कोणताही घरमालक या योजनेत सहभागी होऊन घरातच भाविकांसाठी हॉटेलच्या सुविधा पुरवू शकतो.

कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखो भाविकांना राहण्याची उत्तम सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आखण्यात आली. त्यामुळे या योजनेत सहभागी होणाऱ्या घरमालकास घरातच लॉजिंग सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविक शहरात दाखल होणार आहेत. प्रत्येक पर्वणीसाठी किमान ६० ते ८० लाखापर्यंत भाविक शहरात येण्याची शक्यता व्यक्त आहे. आजमितीस शहरात फारतर १६८ हॉटेल्स तसेच लॉजेस कार्यरत आहेत. प्रशासनातर्फे भाविकग्राम साकारले जाणार आहे. शहरातील नागरिकांकडे येणाऱ्या नातेवाईकांची संख्याही मोठी असेल. तरीही लाखो भाविकांच्या राहण्याचा प्रश्न प्रशासनापुढे आहे. ऐन पावसाळ्यात उघड्यावर भाविकांना राहावे लागले तर रोगराई वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे यात्री निवासी योजना महत्वाची ठरते. साधारणतः हॉटेल किंवा लॉज सुरू करण्याकरिता काही विशेष नियमांचे पालन केले जाते. त्यानुसार, घरातच लॉजिंगची सुविधा सुरू करणे शक्य नसते. या योजनेत मात्र, याच नियमाला बगल देण्यात आली आहे. एमटीडीसीने यापूर्वी बेड अॅण्ड ब्रेकफास्ट योजना राबवली. त्यास नाशिकसह परिसरातील घरमालकांनी चांगला प्रतिसाद दिला. सध्या ८० घरांमध्ये बेड अॅण्ड ब्रेकफास्ट योजनेची अंमलबजावणी होते. यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या बेडच्या संख्येनुसार काम चालते. सिंहस्थासाठी आखण्यात आलेल्या निवास योजनेमध्ये बेडचे बंधन काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे अगदी रिकाम्या हॉलचा वापर सुध्दा केला जाऊ शकतो. स्वच्छता व आदरातिथ्य या दोन सूत्रांवर स्थानिकांनी योजनेत सहभाग घेतला तर रोजगार कमविण्याची ही चांगली संधी असल्याचे एमटीडीसीच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बढे-मिसाळ यांनी सांगितले.

या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या घरमालकांनी शासकीय विश्रामगृहाजवळील एमटीडीसीच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. सातबारा, पोलिसांचे कॅरेक्टर सट्रीफिकेट, सातबारा, लाईट बिल अशी कागदपत्रे यासाठी आवश्यक असून, त्यांची पडताळणी केल्यानंतर घरमालकांच्या नावाची नोंद केली जाणार आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत असून, यानंतर एक वर्षभरासाठी घरमालकास लॉजिंगचा व्यवसाय करता येणार आहे.

......

बाहुली धरणाचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. या ठिकाणाची तुलना लोणवळा व खंडाळा या भागाशी होऊ शकते. सध्या लोणवळा व परिसरात सिमेंटचे जंगल तयार होते आहे. बॉलीवूडचे अनेक दिग्दर्शक यामुळे वैतागले आहेत. यापार्श्वभूमीवर बाहुली परिसर शुटींगसाठी चांगले डेस्टिनेशन होऊ शकते. सध्या या ठिकाणी १८ बंगल्यांमध्ये बेड अॅण्ड ब्रेकफास्ट योजना कार्यन्वित आहे. पर्यटनाच्या दृष्टीने इतरही कामे पूर्ण होत असल्याचे प्रज्ञा बढे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिराचे रंगकाम थांबवा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रामकुंड परिसरात सध्या मंदिरांच्या रंगरंगोटीची कामे सुरू असून या रंगकामामुळे काही हेरिटेज वास्तूंना धोका पोहचण्याची भीती आहे. त्यामुळेच हे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टने पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रामकुंड परिसरात प्राचीन व अतिप्राचीन वास्तू आहेत. त्यात प्रामुख्याने मंदिरांचा समावेश आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने मंदिरांच्या साफसफाई, डागडूजी आणि रंगरंगोटीचे काम सध्या करण्यात येत आहे. मात्र, अशास्त्रीय पद्धतीने हे रंगरंगोटीचे काम सुरू असणे हे हेरिटेज मूल्य असलेल्या वास्तूंसाठी धोकादायक आहे. अयोग्य पद्धतीने रंगरंगोटी करण्यातून प्राचीन मंदिरांच्या वैभवाला गालबोट लागण्याची शक्यता आहे. यातील काही रंग कायमस्वरुपी राहणारे आहेत. दगडी मंदिर आणि वास्तूंना रंग देणे योग्य नाही. नैसर्गिक आणि प्राचीन ठेव्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने लाखो भाविक, पर्यटक येणार आहेत. त्यांच्यासाठी आपण गालबोट लागलेली वास्तू किंवा मंदिर ठेवणार असून तर ही बाब नाशिकच्याही हितावह नाही. त्यामुळे याप्रकरणी पालकमंत्री म्हणून आपण जातीने लक्ष घालावे आणि रंगरंगोटीचे हे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णालयाचा मार्ग मोकळा

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या आरोग्य विभागाने नाशिकमध्ये महिलांसाठी मंजूर केलेल्या महिलांच्या शंभर खाटांच्या रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याने आता वडाळा शिवारातील महापालिकेच्या आरक्षित जागेपैकी ३७०० चौरस फूट जागेवर रुग्णालय उभे राहण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या वतीने जागेला मान्यता देण्यासाठी येत्या महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात आला असून, हा मंजूर झाल्यास महिला रुग्णालयाचा मार्ग मोकळा होणार आहे.

नाशिक महापालिका हद्दीत महिलांसाठी शंभर खांटाचे स्वतंत्र रुग्णालय मंजूर झाले आहे. मात्र, जागेअभावी हे रुग्णालय दोन वर्षापासून रखडले आहे. सुरुवातीला संदर्भ सेवा रुग्णालयात जागा देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, संदर्भ सेवा रुग्णालयाच्या आवारात जागा उपलब्ध नसल्याच्या कारणासह रुग्णालयात अत्यंत दुर्धर आजारांचे रुग्ण येत असल्यामुळे त्यांचा संसर्ग रुग्णालयात येणाऱ्या महिलांना होण्याची भीती आहे. त्यामुळे ही जागा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार प्रा. देवयानी फरांदे, माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिकेच्या जागेत रुग्णालय उभारण्यासाठी पत्र महापालिकेला दिले आहे. वडाळा भागातील स.न. २१/१ मधील दवाखानाचे आरक्षण असलेली मनपाच्या ताब्यातील जागा देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

महापालिकेने या मागणीला हिरवा कंदील दिला असून, ही आरक्षणाची ३७०० चौरस फूट जागा संपादित करण्याचा प्रस्ताव आता महासभेच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. महापालिकेला या जागेच्या बदल्यात मोफत रुग्णसेवा मिळणार आहे. सोबतच शासनाबरोबर संयुक्त करारनामा करून येथे काही व्यावसायिक कामासाठी जागा उपलब्ध झाली, तर त्यातून महसूल मिळवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. येथे काही गाळे बांधून ते मनपाकडे घेऊन त्यातून मनपाला महसूल मिळेल. येत्या मंगळवारच्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या सभेत ही जागा देण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास महिला रुग्णालयाचा मार्ग मोकळा होणार आहे. सोबतच शहरातील महिलांना मोफत उपचार मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आव्हाने स्वीकारा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सद्यस्थितीत जागतिक शैक्षणिक वर्तुळात दूरस्थ शिक्षण पध्दतीचा ट्रेण्ड सुरू आहे. वेगवान जगाशी जुळवून घेताना शिक्षण प्रवाहात टिकण्यासाठी आणि कौशल्यवर्धनासाठी दूरस्थ शिक्षण पध्दती उपकारक आहे. विद्यार्थ्यांनी या पध्दतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑडिओ व्हीज्युअल सेंटर आणि प्रिंट प्रॉडक्शन सेंटर या इमारतींचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या वेब रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्यपालांच्या सोबत पालकमंत्री गिरीष महाजन, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मनपा आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कुलगुरू डॉ. अरुण जामकर, कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, दृक श्राव्य केंद्राचे संचालक डॉ. राजेंद्र वडनेरे आदी उपस्थित होते.

राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, भारत महासत्ता म्हणून पुढे येत आहे. भारताकडे बघण्याच्या जगाच्या दृष्टिकोनात बदल झाला आहे. युवकांचा देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे. सन २०२० पर्यंत भारतीयांचे सरासरी वय २९ वर्षे असणार आहे. हे वय अमेरिका आणि चीन या बलाढ्य राष्ट्रांच्या तुलनेत नऊ वर्षांनी कमी असेल. या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या क्षमतेत वाढ होणे गरजेचे असेल. 'मेक इन महाराष्ट्र' या माध्यमातून राज्यात अनेक देशातून गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. मोठ्या उद्योगांसोबतच पूरक उद्योगांनाही वाव मिळत असल्याने त्यासोबत असलेली रोजगाराची संधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आणि व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले. उद्यमशील बना आणि नवी आव्हाने स्वीकारण्यासाठी चांगली तयारी करा, असा संदेश त्यांनी दिला. स्वच्छतेच्या उपक्रमातही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनदेखील राज्यपाल राव यांनी केले. सुरुवातीला त्यांनी दृक श्राव्य केंद्रातील स्टुडिओला भेट दिली. पुणे विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशीही त्यांनी वेब कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यांनी विद्यापीठाच्या वित्त विभागामार्फत करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रणालीची माहिती घेतली.

स्वच्छता मोहिमेचे कौतुक

राज्यपालांनी पालकमंत्री महाजन आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या गोदावरी स्वच्छता अभियानाचे कौतुक केले. ते म्हणाले, कुंभमेळा काळात आणि त्यानंतरही या अभियानात सातत्य ठेवण्यात यावे. गोदावरी नदी उगमापासून बारमाही कशी करता येईल याबाबत विचार करण्यात यावा. कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेल्या आरोग्य आणि स्वच्छता सुविधेचीदेखील त्यांनी माहिती घेतली. आंतरराष्ट्रीय धावपटू व विद्यापीठाची विद्यार्थीनी कविता राऊत आणि तिच्या जीवनावर बालभारतीच्या पुस्तकासाठी धडा लिहिणारे संतोष साबळे यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यपाल वेटिंगवर

पूर्व नियोजित वेळेनुसार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे मुक्त विद्यापीठात आगमन झाले. विद्यापीठाच्या ऑडिओ व्हीज्युअल्स इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी ते उद्घाटनस्थळी पोहचले. मात्र पालकमत्र्यांची वाट बघत त्यांनी उद्घाटनाची फीत कापणे काही मिनिटांसाठी लांबविले. काही मिनिटांनंतर पालकमंत्री नियोजित स्थळी पोहचले अन् खोळंबलेला कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. राज्यपालांच्या अगोदर पालकमंत्री गिरीष महाजन यांनी नियोजित स्थळी उपस्थित राहणे अपेक्षित होते. या विषयाचीही चर्चा शनिवारी मुक्त विद्यापीठात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासे हत्या, चौघांना कोठडी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किरकोळ कारणातून साठे चौकातील किटकॅट वाईन शॉपसमोर ३१ मे रोजी झालेल्या खून प्रकरणात भद्रकाली पोलिसांनी चौघा जणांना अटक केली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मासे विक्री करणाऱ्या शैलेसे सासे (वय २६) याचा तिघा संशयितांनी ३१ मेच्या रात्री भरचौकात खून केला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांना संशयितांची ओळख पटली. मात्र, खून प्रकरणानंतर ते फरार झाले होते. संशयितांविरोधात यापूर्वी चेन स्नॅचिंग, खूनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. संतोष कोतेवाड (काठे गल्ली), अक्षय युवराज पाटील (सातपूर) आणि फ्रान्सिस म्यनुअल (इगतपुरी) असे मुख्य संशयितांची नावे आहेत. २० ते २४ वयोगटातील तिघा आरोपींना मुंबई नाका येथून संध्याकाळच्या सुमारास अटक करण्यात आली. शैलेशचा खून झाल्यानंतर हे तिघे संशयित पुणे आणि नंतर नांदेड येथे गेले होते. गुरुवारी पोलिसांना सूत्रांनी माहिती दिली की, सासे खून प्रकरणातील आरोपी शहरात येणार आहेत. त्यानुसार क्राईम ब्रँचसह स्थानिक पोलिसांनी मुंबई नाका येथे सापळा रचून कारमधून प्रवास करणाऱ्या तिघांना अटक केली.

सिनीअर इन्सपेक्टर मधुकर कड यांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. जुनेद चौधरी असे त्यांचे नाव आहे. खून प्रकरणानंतर चारचाकी वाहन उपलब्ध करून संशयितांना पळून जाण्यात जुनेदने मदत केली. घटनास्थळावरून पळून जाताना वापरलेली मोटरसायकल आणि पुणे येथे जाण्यासाठी वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली. ३१ मे रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास मयत शैलेश आणि कोतेवाड, पाटील आणि म्यनुअल या तिघांची किरकोळ कारणावरून झडप उडाली होती. यानंतर संशयितांनी भर चौकात सासेवर चाकू हल्ला करून पळ काढला होता. अटक करण्यात आलेल्या संशयितावर यापूर्वीच गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंडित कातडचा जामीन फेटाळला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एक कोटी रुपयांची खंडणी मागीतल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पंडित रंगनाथ कातड यांचा जामीन अर्ज शनिवारी कोर्टाने फेटाळला. यामुळे कातड यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. दरम्यान, अन्य दोन संशयितांचा अटकपूर्व जामीन मात्र कोर्टाने मंजूर केला आहे.

मातोरी शिवारात १८७ एकर जमीन खरेदीचे पैसे दिल्यानंतरही त्या जमिनीचे अधिक पैसे मिळावेत यासाठी मोर्चावर दबाव आणून एक कोटी रुपयांची खंडणी मागीतल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी पंडित रंगनाथ कातड, रामदास वाळू पिंगळे, मोतीराम ढेरिंगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अर्जून रामचंद्र खेतवानी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पंडित कातड यांनी स्वतंत्र तसेच ढेरिंगे आणि पिंगळे यांनी संयुक्तपणे असे दोन अर्ज केले होते. त्यापैकी ढेरिंगे आणि पिंगळे यांचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ब्रम्हे यांनी मंजूर केल्याची माहिती अॅड. हर्षल केंगे यांनी दिली. कातड पाटील यांच्यावर गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तीवाद यावेळी करण्यात आला. कातड यांच्यावर यापूर्वी १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून ते राजकीय पार्श्वभूमीचा फायदा घेऊन फिर्यादीवर दबावतंत्राचा वापर करू शकतात, असा युक्तिवाद मूळ फिर्यादी खेतवानी यांचे वकील अॅड. केंगे यांनी केला. कोर्टाने तो ग्राह्य मानून कातड यांचा जामीन अर्ज फेटाळला. संशयितातर्फे अॅड. मंदार भानोसे यांनी तर सरकारपक्षातर्फे अॅड. राजेंद्र घुमरे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाभोलकर पुत्र CBI तपासावर नाराज

$
0
0


म.टा.प्रतिनिधी, नाशिक

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या तपासावर असमाधान व्यक्त करीत, या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची भूमिका नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव हमीद यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. सातपूरच्या सीटू भवनमध्ये अंनिसच्या वतीने शनिवारी बैठक पार पडली. यानंतर सायंकाळी आयएमए हॉल येथे पर्यावरणप्रेमी व अंनिस कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या घटनेला दीड वर्ष लोटूनही मारेकरी सापडलेले नाही. या पार्श्वभूमीवर हमीद दाभोलकर यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्रात घडणाऱ्या या घटना राज्याला उलट दिशेने नेणाऱ्या आहेत. स्वैर वृत्तीच्या समाजविघातक वृत्तींवर वचक बसविण्यासाठी डॉ. दाभोलकरांचे मारेकरी सापडणे आणि त्यांना कायद्यानुसार शासन होणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. या दृष्टीने तपास करण्यात पोलिसांना अपयश आल्याने हा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. मात्र, त्यात अद्यापही प्रगती नाही. यामुळे मारेकरे आजही मोकाट आहेत. यामुळे समाज विघातक कृती वाढत चालल्या आहेत. त्यांना वेळीच आळा घातला पाहिजे. या तपासाला गती मिळण्यासाठी न्यायालयाकडे विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली सीबीआय अधिक गतीने तपासकार्य पूर्ण करू शकेल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. दाभोलकरांच्या पश्चात अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्याची वाटचालही त्यांनी यावेळी मांडली. ते म्हणाले, संकुचित वृत्ती बाळगणाऱ्या समाज विघातक शक्ती स्वैर झाल्या आहेत. विवेकवादाला वैचारीक पाठबळावर सामोरे जाण्याची त्यांची ताकद नाही. यामुळे पळपुट्या मार्गांचा आधार घेऊन या समाज विघातक वृत्ती हल्ले अन् हत्यांचे मार्ग जवळ करीत आहेत. डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे ही व्यक्तिमत्व आपल्यात विचार रूपाने अस्तित्वात आहेत. त्यांच्याच विचारांपासून प्रेरणा घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांच्या पश्चात अंधश्रध्दा निर्मूलनाच्या चळवळीत बळ भरले आहे. जादूटोणा कायद्यांतर्गत अत्यल्प कालावधीत दाखल झालेले दीडशे गुन्हे हे ही कार्यकर्त्यांच्या कामाची दिशा दाखविणारे प्रतिबिंबच असल्याचे त्यांनी सांगितले. या चवळवळीत बळ भरण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीला हवे ५ कोटीचे डिझेल

$
0
0


अरविंद जाधव, नाशिक

बाह्य पार्किंग ते अंतर्गत पार्किंग या दरम्यान प्रवाशांची ने-आण करण्यासाठी तैनात करण्यात येणाऱ्या तीन हजार एसटी बसेससाठी तब्बल आठ लाख लिटर्स डिझेलची आवश्यकता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर इंधनाची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पहिल्याच पर्वणी दरम्यान डिझेलपोटीच महामंडळाचे ४ कोटी ८० लाख रुपये खर्ची पडणार आहेत.

पर्वणीसाठी येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांना खासगी वाहनांद्वारे बाह्य पार्किंगपर्यंत येता येणार आहे. ही बाह्य पार्किंगची ठिकाणे अंतर्गत पार्किंगपासून किमान ४ ते ८ किलोमीटरच्या अंतरावर आहेत. नाशिक-पुणेरोडवर चिचोंली फाटा परिसरात बाह्य पार्किंग असून, सिन्नर फाटा परिसरात अंतर्गत पार्किंगचे ठिकाण आहे. बाह्य ते अतंर्गत पार्किंग या दरम्यान इतर वाहनांना प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे बाह्य पार्किंग येथे उतरलेल्या प्रवाशांना अतंर्गत पार्किंगपर्यंत आणण्याची जबाबदारी एसटी महामंडळावर आहे. पर्वणीसाठी किमान ८० लाख भाविक येणे अपेक्षित असून, त्यातील बहुतांश प्रवाशांचा भार एसटी महामंडळाला वाहावा लागू शकतो. याच दृष्टिकोनातून महामंडळाने तब्बल तीन हजार बसेस नियुक्त केल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बसेस येणार असल्याने त्यांच्या इंधनाची देखील तरतूद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्र्यंबकेश्वर, राहू हॉटेल ते शरदचंद्र मार्केट अशा रस्त्यांचा अपवाद वगळता इतर रस्त्यांवर पेट्रोलपंप आहेत. सध्या, ६१ रुपये २९ पैसे लिटर्स असा डिझेलचा भाव आहे. संबंधित पेट्रोलपंप मालक किती सूट देतात, यानुसार त्या ठिकाणी डिझेल भरावे की नाही, याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका बसच्या इंधन टाकीमध्ये साधारणतः २४० लिटर्स डिझेल बसते. पर्वणीसाठी तैनात असलेल्या प्रत्येक बसच्या टाकीमध्ये एवढे डिझेल असावे, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. म्हणजेच एसटी महामंडळाला किमान ७ लाख ७५ हजार लिटर्स डिझेलची आवश्यकता आहे. याशिवाय आपत्तकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अतिरिक्त इंधनाची व्यवस्था केली जाणार आहे. आजमितीस ८ लाख लिटर्स डिझेलची आवश्यकता असल्याचे यावरून स्पष्ट होते. डिझेलची टाकी पूर्ण भरल्यानंतर ती बस एक हजार ते १ हजार १०० किलोमीटर धावू शकते. तिन्ही पर्वणीच्या काळात एसटी महामंडळाला एवढ्याच मोठ्या प्रमाणात इंधनाची आवश्यकता भासणार आहे. पर्वणीच्या तिसऱ्या दिवशी अमरावती व नागपूर विभागाच्या बसेस वगळता इतर माघारी जाणार असून, या दोन विभागाच्या बसेस नाशिकमध्येच मुक्काम करणार आहेत.

बसेससाठी पार्किंगची सुविधा - पेठ रोडवरील वर्कशॉप परिसरातील १२ ते १५ एकर जागा, महामार्ग बस स्टॉप अंतर्गत पार्किंगजवळील काही ठिकाणे

इंधन साठवणुकीची सोय - बसेससाठी आठ लाख लिटर्स डिझेलची मागणी, डेपो क्रमांक एक व दोन आणि तीन क्रमाकांच्या डेपोमध्ये इंधन साठवण्याची सोय करण्याचा प्रयत्न. या व्यतिरिक्त डिझेल मोबाइल व्हॅन

परजिल्ह्यातून येणाऱ्या बसेस - मुंबई, ठाणे, नाशिक विभागातील सर्व जिल्हे, अमरावती, नागपूर इत्यादी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिमोफिलियावर होमिओपॅथीचा उतारा!

$
0
0

नाशिकच्या डॉक्टरसह पथकाचे यशस्वी संशोधन

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

जखम झाल्यानंतर रक्तस्त्रावाला अटकाव होत राहणाऱ्या हिमोफिलिया या आजारावर होमिओपॅथीचा गुणकारी उतारा सापडला आहे. नाशिकचे डॉ. तपास कुंदू यांच्यासह एका पथकाने यशस्वी संशोधन करून होमिओपॅथीच्या औषधांद्वारे हिमोफिलियाच्या रुग्णांना दिलासा दिला आहे. भारतात आणि परदेशातही आजवर एकूण ८५० रुग्णांवर डॉ. कुंदू यांच्या पथकाने मोफत उपचार केले आहेत.

हिमोफिलिया हा दुर्मीळ आजार असून, तो ०.०१ टक्के लोकांमध्ये आढळून येतो. या रुग्णांच्या शरीरात रक्ताची गुठळी (क्लॉटिंग) तयार होत नाही. यामुळे जखम झाल्यानंतर तेथून सातत्याने रक्तस्त्राव होत राहतो. उपचार करूनही हा रक्तस्त्राव थांबत नाही. अखेर शरीरातील रक्ताचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याने त्या रुग्णाचा मृत्यू ओढावतो. जगभरात आज जे काही मोजके आजार आहेत ज्यावर उपचार सापडलेला नाही त्यात हिमोफिलियाचा समावेश होतो. याच आजारावर नाशिकचे डॉ. तापस कुंदू यांच्यासह भारतातील विविध त्यांचे साथीदार डॉ. के घोष, डॉ. अपरोज शेख, डॉ. प्रियंका सिंग, डॉ. हिराल शाह, डॉ. ओमकार कुमट, डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. रंजना कुलकर्णी, डॉ. अपर्णा नलावडे, डॉ. आफिया शेख यांच्या पथकाने हिमोओपॅथीच्या औषधांद्वारे हिमोफिलियाच्या रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. या उपचारांमुळे हिमोफिलियाचे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, त्यांचे जीवनमान वाढण्यातही मदत झाली आहे.

गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनाला आता यश आले असून, यासंदर्भातील त्यांचे रिसर्च पेपर आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांमध्येही प्रसिद्ध झाले आहेत. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. कुंदू यांच्या संशोधनाचा विशेष गौरव करण्यात आला. आणखी एक रिसर्च पेपर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होणार असल्याचे डॉ. कुंदू यांनी सांगितले. हिमोफिलिया हा आजार अनुवंशिक असल्याने त्या रुग्णांसह आम्ही त्यांच्या आई-वडिलांवरही मोफत उपचार करीत आहोत.

होमिओपॅथीमुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्टस होत नाहीत. या उपचार पद्धतीतून अधिकाधिक हिमोफिलियाच्या रुग्णांना दिलासा देण्याचा आमचा मानस असल्याचे डॉ. कुंदू यांचे म्हणणे आहे. या संशोधनाची माहिती सरकारी पातळीवरही पोहचली असून, येत्या काळात सरकारकडूनही या उपचार पद्धतीचा अवलंब होण्याची खात्री डॉ. कुंदू यांना आहे.

हिमोलिफियाच्या रुग्णांवर आम्ही मोफत उपचार करतो. आमच्या संशोधन आणि उपचारा-संबंधीची विस्तृत माहिती http://homoeo pathyinhaemophilia.com/ या वेबसाईटवर मिळू शकते. - डॉ. तापस कुंदू, होमिओपॅथी संशोधक

हिमोफिलियाच्या रुग्णांना पूर्णपणे बरे करणारे उपचार आजही नाहीत. मात्र, होमिओपॅथी उपचार रुग्णांना दिलासा मिळत असेल तर हे चांगले आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरच मान्यताप्राप्त ठरायला हवे. - डॉ. प्रीतेश जुनागडे, रक्तविकार तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने साधुग्रामला ‘धुतले’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याभरात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी शहरात पावसाचे प्रमाण रविवारी कमीच होते. मात्र वादळाची तीव्रता मोठी असलल्याने त्यांचा फटका साधुग्राममधील कामांना बसला आहे. यात दोन नंबरच्या सबसेक्टरचे मोठे नुकसान झाले असून, अनेक पत्रे उडून गेले. तर काही कामे कोलमडून पडली. या वाताहतीमुळे साधुग्रामचे काम लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

साधुग्राममध्ये वास्तव्यास येणाऱ्या लाखो साधु-महंतांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम महापालिका प्रशासनातर्फे सुरू आहे. सुमारे ३५० हेक्टर जमिनीवर पत्र्यांचे शेडस उभारले जात आहेत. साधुग्रामच्या नियोजनाच्या दृष्टीने दोन मुख्य आणि त्याचे १० उपविभाग पाडण्यात आले आहेत. पहिल्या सेक्टरमध्ये ४ तर दुसऱ्या सेक्टरमध्ये सहा उपविभागांचा समावेश आहे. आजच्या पावसाने दुसऱ्या सेक्टरमधील दोन नंबरच्या उपविभागातील कामाचे नुकसान झाल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. हे काम दोन ते तीन दिवसापूर्वी सुरू करण्यात आले होते. पावसासोबत वाऱ्याचे प्रमाण मोठे असल्याने या उपविभागातील काही पत्रे उडून गेलेत तर काही खाली कोसळले. यामुळे कामांच्या दर्जाचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. मागील आठवड्यात राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी आढावा बैठक घेऊन हे काम १५ जूनपर्यंत संपवण्याचे आदेश दिले होते. याउलट ३० जून शिवाय साधुग्राममधील कामे पूर्ण होणारच नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले होते. आजच्या नुकसानीमुळे जुलैच्या सुरूवातीपर्यंत साधुग्राममधील कामे पूर्ण होण्याबाबतही चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. शहरात दिवसभरात १४. ८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, येत्या ४८ तासांत नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी पडतील अशी शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

व‌ीज पडून चार जखमी

जिल्ह्यात कळवण आणि दिंडोरी तालुक्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. कळवणमधील कुमसाडी येथे व‌ीज अंगावर पडून मिनाबाई विष्णू वाघमारे, अनिल विष्णू वाघमारे आणि वसंत विष्णू वाघमारे हे एकाच कुटुंबातील तिघेजण तर त्र्यंबकेश्वर येथेही एक महिला जखमी झाली. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे वीज अंगावर पडून दोन गायींचा तर शेणई येथे एका बैलाचा मृत्यू झाला. याखेरीज दोन गायी जखमी झाल्या आहेत. ढकांबे टोल नाक्यावर रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

जिल्ह्यातही हजेरी

मान्सुनपूर्व पावसाने रविवारी शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. सिन्नर, कळवण, बागलाण, नांदगाव, चांदवड, इगतपूरी या तालुक्यांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. मनमाडसह नांदगांव आणि चांदवड परिसरातही पावसाने हजेरी लावली असून उन्हाच्या काहिलीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांना प्रतीक्षा दुभाजकांची

$
0
0

बारदान फाटा, शिवाजीनगर, समृद्धनगर परिसरात वाढला अपघातांचा धोका नामदेव पवार

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

शहरात रुंदीकरणानंतर रस्त्यांनी कात टाकली. मात्र, डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर दुभाजक नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. सातपूर परिसरातील बारदान फाटा, शिवाजीनगर ते समृद्धनगरचा रस्ता दुभाजक टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यांवरून वाहनचालकांना अपघाताची भीती सतावू लागली आहे. याप्रश्नी महाप‌ालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

शहरातील रस्त्यांची दोन वर्षांपूर्वी दयनीय अवस्था झाली होती. यामुळे सर्वच प्रसार माध्यमांनी सत्ताधारी मनसेवर रस्त्यांच्या खड्डेमय परिस्थितीमुळे धारेवर धरले होते. यात दोन वर्षांपूर्वी मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन थाटात पार पडले. मात्र, आता उशिरा का होईना रस्त्यांच्या कामांना मुहूर्त मिळाला. डांबरीकरणापूर्वी अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. काही ठिकाणी रुंदीकरणात जुन्या आणि मोठ्या वृक्षांचा अडथळाही निर्माण झाला. असे असतांनाही महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिलेल्या आदेशानंतर रस्ते रुंदीकरण आणि डांबरीकरणाची कामे पूर्णत्वाला आली आहेत.

त्र्यंबक रस्त्यावरही दुभाजक नाही

बारदान फाटा, शिवाजीनगर ते समृद्धनगर त्र्यंबकेश्वररोड पर्यंतचा रस्ता तर संपूर्ण दुभाजकांविनाच आहे. तर त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या पपया नर्सरी जाधव संकुल कार्नर ते पिंपळगाव बहुला स्वागत कमानीपर्यंतच्या रस्त्यावरदेखील दुभाजक टाकण्यात आलेले नाहीत. अंबडलिंकरोड रस्त्यांच्या रुंदीकरणात संपूर्ण रस्त्यावर दुभाजक टाकले आहेत, केवळ नासार्डी नदीच्या पुलापासून तर इस्सार पेट्रोल पंपपर्यंतचा रस्ता दुभाजकांपासून वगळला आहे.

मार्गात झाडांचा अडथळा

बारा वर्षांनंतर होऊ घालतलेल्या ‌सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर सातपूर भागातील रिंगरोडची कामे करण्यात आली. मा, पाहिजे त्या प्रमाणात रस्त्यांची कामे न झाल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत आहेत. यामध्ये गंगापूररोड रस्त्यावर दुभाजकांसाठी जागा सोडली खरी, परंतु वृक्षांच्या अडथळ्यांमुळे ठेकेदाराला दुभाजकच टाकता आलेले नाहीत. तसेच गंगापूररोडला जेहान सर्कल ते बेंडकुळे मळ्यापर्यंतच दुभाजक ठेवण्यात आले आहेत. पुढील गंगापूर गावापर्यंतचा रस्ता दुभाजक बसविण्यापासून वगळ्यात आला आहे.

डांबरीकरण झालेल्या मात्र, दुभाजक नसलेल्या रस्त्यांवर भविष्यात अपघात होण्याची शक्यता होणार असल्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. रस्त्यांवरून गाड्या चालविणेही कठीण झाले आहे. यासाठी महापालिका आयुक्तांनी रस्ते कामांची पहाणी करीत रस्ते रुंदीकरणात दुभाजक टाकण्याचे आदेश देण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

महापालिकेने बहुतांश रस्त्यांचे कामे पूर्ण केली. मात्र, यात वाहनचालकांना सध्या वृक्षांचा मोठा अडथळा सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यांमध्ये दुभाजक टाकण्यात आलेले नाहीत. यामुळे वेगाने येणारी वाहने थेट अंगावर येतात. वेगावर नियंत्रण रहात नाही. वाहने चालवितांना अपघातांचा धोका अधिक वाढला आहे. - किशोर गांगुर्डे, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जात पडताळणीवर मार्ग काढणार

$
0
0

धनंजय मुंडे यांचे राजपूत समाजाच्या उपोषणकर्त्यांना आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

राजपूत समाजाच्या जात पडताळणी संदर्भात येणाऱ्या प्रशासकीय अडचणींवरील मार्ग काढण्यासाठी राजपूत समाजातील राज्यभरातील नेते व मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. या आश्वासनानंतर देखील क्रांती दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले आहे.

येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात बागलाण तालुका अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांतीदलाच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणस्थळी मुंडे यांनी भेट घेऊन आंदोलकांशी चर्चा केली. राजपूत समाज हा वि.जे.अ.(एन.टी) या प्रवर्गात मोडतो. पंरतु, त्यासाठी राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र या प्रवर्गतील आरक्षणसाठी गरजेचे ठरते. शासनस्तरावर राजपूत भामटा जात व वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी शासनाने १९६१ च्या आधाचे गुन्हेगारी पुरावे व अशा अनेक जाचक अटी लावल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे व सर्वसामान्य समाजबांधवाचे नुकसान होत आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याने क्रांती दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. रविवारी उपोषणस्थळी विरोधीपक्षनेते मुंडे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. समाज कल्याण विभागाचे पडताळणी समितीचे अधिकारी जाधव यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.राजपूत समाजाच्या प्रश्नाबाबत संपूर्ण राज्यातील समाजातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यासमवेत बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन मुंडे यांनी दिले. याप्रंसगी माजी आमदार संजय चव्हाण, प्रांतधिकारी संजय बागडे, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, पंचायत समिती उपसभापती वंसत भामरे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, संजय पवार, कृबाचे संचालक संजय वाघ, क्रांतीदलाचे अध्यक्ष संतोष पवार आदी उपस्स्थित होते.

उपोषणास राज्य कार्याध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी, प्रभाकर पवार, राजेंद्र जगताप, लखन पवार, भाऊसिंग पवार, गोकूळ पवार, तात्याभाऊ सोंळूखे, नथुसिंग ठोके, संग्रामसिंग सोळंखे, महेंद्र गिरासे, दगा मोरकर यांच्यासह कार्यकर्ते बसले असून मुंडे यांच्या भेटीनंतरही त्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शाळा प्रवेशोत्सवा’ने प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा प्रारंभ चैतन्य आणि उत्साहाने झाल्यास शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळेल, या विश्वासाने या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी 'शाळा प्रवेशोत्सव' हा उपक्रम राबविला जाणार आहे. शहरातही या उपक्रमाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले असून विविध शाळा विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस स्पेशल बनविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

राज्यातील बऱ्याच शाळा १५ जूनपासून तर उर्वरित काही शाळा येत्या २६ जूनपासून सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वागत केले जाणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षाचं ओझं न वाटता आनंदाने विद्यार्थ्यांनी त्याचा स्वीकार करावा व हसतखेळत शालेय शिक्षण पूर्ण करावे, यासाठी 'शाळा प्रवेशोत्सवाची' संकल्पना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मांडली आहे. शाळेविषयी कोणतीही बीती न बाळगता शाळेशी त्यांचे आपुलकीचे नाते तयार होण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे. शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने शाळेसाठी विविध उपक्रम राबविणे. शाळेत नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देणे, शाळा परिसरात पदयात्रा काढणे, शाळा परिसर स्वच्छ व सुशोभित करणे अशा उपक्रमांचा समावेश असणार आहे. याचबरोबर शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांसाठी प्रभात फेरी काढणे, विद्यार्थ्यांना फुले देऊन स्वागत करणे, मोफत पुस्तक वितरण करणे आदी उपक्रमांचा समावेश या संकल्पनेत केला गेला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी माध्यान्न भोजनातही गोड पदार्थांचा समावेश विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणार आहे.

शाळेच्या पहिला दिवसाची आठवण संस्मरणात रहावी यासाठी आम्ही प्री-प्रायमरीच्या मुलांचे व त्यांच्या पालकांसमवेत फोटो काढून देणार आहोत. शाळेसाठी विद्यार्थी महत्त्वाचा आहे, याची जाणीव त्यांना देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. - सचिन जोशी, संचालक, इस्पॅलियर स्कूल

विद्यार्थ्यांची पटनोंदणी अनिवार्य

वय वर्षे ६ ते १४ मधील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यासाठी प्रत्येक पाल्याचे नाव पटावर नोंदविले जाणे आवश्यक आहे. पटावर नोंदविलेले विद्यार्थी नियमित शाळेत यावेत यासाठी राज्यभर विविध पातळ्यांवर नवीन उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर 'शाळा प्रवेशोत्सव' उपक्रम राबविला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनतेचा गुंडगिरीविरोधात संकल्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

उपनगर परिसरात गुंडगिरी तसेच असामाजिक तत्वांचा उपद्रव वाढत चालला आहे. त्याविरोधात जनजागृती करण्यासाठी झुलेलाल मंदिरात बैठक झाली. गुंडगिरीला हद्दपार करण्याचा संकल्प नागरिकांनी केला.

माजी नगरसेवक विजय ओहोळ, उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला शरद शिंपी, केशव दरियानी, प्रभाकर नागरे, रवींद्र पाटील, ललित ओहोळ आदींसह व्यापारी व सामान्य नागरिक उपस्थित होते.

उपनगरला काही दिवसांपूर्वी सात आठ वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. भरचौकात मद्यपान, हाणामारीचे तसेच महिलांच्या छेडछाडीचे प्रकारही वाढल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. गुंडगिरीची बिमोड करण्याची मागणी नागरिकांनी केली. उपनगर येथे पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी विजय ओहोळ यांनी केली. पोलिस निरीक्षक भगत म्हणाले, की गुंडगिरीविरोधात नागरिकांनी एकजुट करावी. पोलिसांना कळवल्यास तातडीने कारवाई केली जाईल. तक्रार करणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंनिसची अंतराळ साक्षरता

$
0
0

रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना देणार फिरते प्लॅनेटोरियम

जितेंद्र तरटे, नाशिक

राज्याच्या तळागाळातील विद्यार्थ्यांमध्ये अवकाश विज्ञानाची गोडी रुजावी यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या (अंनिस) वतीने आता लवकरच माबाइल थ्रीडी डिजीटल प्लॅनेटोरियम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. जुलै महिन्यात या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यापर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून खगोलविज्ञानाच्या संकल्पना पोहचवू, असा विश्वास 'अंनिस'चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी 'मटा'शी बोलतांना व्यक्त केला.

अडीच दशकांपासून पुरोगामी विचारधारेच्या प्रचारासाठी 'अंनिस' प्रयत्नशील आहे. आता रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संघटनेच्या कार्यकक्षा आणखी विस्तारण्याच्या निर्णयाचे फलित नाशिकमध्ये आयोजित राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीतून पदरात पडले आहे.

नव्या धोरणातून काही महत्त्वपूर्ण निर्णय 'अंनिस'च्या वतीने घेण्यात आले. यातूनच थ्रीडी प्लॅनेटोरियम बाबतचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षण व्यवस्थेतील शैक्षणिक साधनांच्या अभावाने निर्माण होणारी दरी यासारख्या उपक्रमांमुळे कमी होऊ शकेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला. याशिवाय विद्यार्थ्यांच्या रुपाने नवी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांच्याच वैज्ञानिक जाणिवा अधिक प्रगल्भ करण्यासाठी 'अंनिस' राज्यभरातील शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचाही निर्णय राज्यस्तरीय कार्यकारीणीच्या बैठकीत घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला वाव देण्यासाठी स्वयं अध्ययनाची प्रश्नावली राज्यातील २५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वप्रयत्नाने चर्चात्मक, संदर्भशोध, संवाद आदी माध्यमातून या प्रश्नावलीची उत्तरे शोधावित अन् वैज्ञानिक व विवेकवादी संकल्पना आपल्या आपणच पक्क्या कराव्यात असाही अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संघटनेच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

प्रबोधनावर भर

विद्यार्थ्यांशिवाय सरकारशी निगडीत घटकांपर्यंत 'अंनिस'चा प्रबोधन उपक्रम पोहचणार आहे. जादूटोणा विरोधी कायद्याबाबत महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रबोधन अन् जातपंचायत मुठमाती अभियानाचे बळकटीकरण असे या उपक्रमांचे स्वरूप असणार आहे. ऑगस्टमध्ये 'अंनिस' रौप्यमहोत्सव साजरा करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीचा आज ऑनलाइन निकाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि.८) जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल ऑनलाइन पध्दतीने जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना १५ जूनपासून गुणपत्रकांचे वितरण करण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना हा निकाल मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. याशिवाय निकाल माहित करून घेण्यासाठी मोबाईलव्दारे एसएमएस सुविधेचा पर्यायी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मे महिन्याच्या अखेरीपासून विद्यार्थ्यांना या निकालाची प्रतीक्षा होती. निकालाच्या अफवाही यापूर्वी पसरल्याने तारखेबाबत विद्यार्थी अन् पालकांमध्ये संभ्रमम होता. मात्र, शनिवारी मंडळाच्या वतीने निकालाची अधिकृत तारीख जाहीर केल्यानंतर विद्यार्थी व पालकांचा जीव भांड्यात पडला.

दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपीसाठी विद्यार्थी २९ जूनपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या परीक्षेसाठी राज्याभरातून सुमारे १८ लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. 'एसएमएस'च्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध होणार आहे. बीएसएनएल मोबाईल धारकांनी ५७७६६ या क्रमांकावर MHSSC < (स्पेस) परीक्षा क्रमांक > अशा पध्दतीने एसएमएस पाठवावा. तर रिलायन्स, एअरसेल, वोडाफोन, आयडिया, युनिनॉर या कंपन्यांच्या मोबाईलवरून MH10 (स्पेस) परीक्षा क्रमांक असा एसएमएस ५८८८१११ या क्रमांकावर पाठवावा. एअरटेल कार्डधारकांनी निकाल बघण्यासाठी MH10 (स्पेस) परीक्षा क्रमांक असा एसएमएस ५२७०११ या क्रमांकावर पाठवावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आई रिटायर होतेय’ने अंतर्मुख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आई म्हणजे घराचा आत्मा असतो. जोपर्यंत ती कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी घेत आहे, तोपर्यंत सर्व काही सुरळित चालते. मात्र घरातील मुलं, सुना जेव्हा केवळ आपल्या स्वार्थाचा विचार करून वेगवेगळ्या कारणांनी आईशीच खोटे वागू-बोलू लागतात. तेव्हा आईच्या मनःस्थितीवर परिणाम होऊन ती कुटुंबाला शिक्षा म्हणून आईने आपल्या जबाबदाऱ्यांपासून रिटायर होण्याचा निर्णय घेतला तर घराची काय अवस्था होऊ शकते, याचं उत्तम चित्रण म्हणजे 'आई रिटायर होतेय' हे नाटक. महाराष्ट्र टाइम्स प्रस्तुत या नाटकाने सामाजिक व कौटुंबिक प्रश्नावर प्रकाशझोत टाकला.

महाराष्ट्र टाइम्सच्या वर्धापनदिनानिमित्त या नाटकाचे विशेष आयोजन कालिदास कलामंदिर येथे करण्यात आले होते. 'कलाकार' संस्थेच्या वतीने या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकात एकत्र कुटुंबपद्धतीच चित्रण करण्यात आलं. आई, वडील, दोन भाऊ व दोन सुना. आईची भूमिका वीणा फडके या अभिनेत्रीने उत्तम वठवली. या कुटुंबात तीनही मुलांची लग्न झालेली आहेत. दोन्ही मुले आईजवळच एकत्र कुटुंबात राहत आहेत तर, धाकटी मुलगी बेबीने पळून जाऊन लग्न केले आहे. मुलं नोकरी आणि बिझनेसमध्ये स्थिर झाल्यावर त्यांच्या बायकांना विभक्त राहण्याची ओढ लागली आहे. त्यामुळे एक भाऊ उच्चभ्रू इमारतीत फ्लॅट बुक करतो. तर, दुसरा बायकोच्या आग्रहाखातर आईने कष्टाने बांधलेल्या आश्रमाचीच जागा विकत घेऊन तिथे बंगला बांधण्याची तयारी करीत असतो.

जेव्हा या दोन्ही गोष्टी त्यांच्या आई (वीणा फडके)ला समजतात. तेव्हा ती मानसिकरित्या खचते. 'तुम्ही इतक्याशा गोष्टीचा त्रागा करत आहात', असे सुनावून त्यांच्या कुटुंबाकडून त्यांना रिटायर होण्याचा सल्ला दिला जातो. ती आईदेखील रिटायर होण्याचा

निश्चय करते. त्यानंतर त्या कुटुंबामध्ये काय बदल होतात, त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव कशी होते, याचे उत्तम चित्रण या नाटकात करण्यात आले आहे.

रवी सांभारे यांचे दिग्दर्शन व अशोक पाटोळे यांच्या लेखनानी समृद्ध झालेल्या या नाटकाने प्रेक्षकांना अंतर्मुख केले. उपेंद्र दाते, वीणा फडके यांच्यासह मंगेश दिवाणजी, रेणुका भिडे, मनोज डाळिंबकर, सुशील भोसले, रूपाली पाथरे, रुचा यांच्या भूमिका या नाटकात होत्या.

या नाटकाने खरोखरीच आईविषयी विचार करण्यास भाग पाडले. प्रत्येक स्त्रीने या नाटकातील आईच्या पात्राप्रमाणे विचार करायलाच हवा. - रसिका भानोसे

आईविषयी विचार करण्याची दिशा या नाटकामुळे मिळाली. आईची बाजू जाणून घेणे कसे महत्त्वाचे आहे, याचे छान चित्र या नाटकामुळे समोर उभे राहिले. 'मटा'मुळे ही उत्तम नाट्यकृती बघण्याची संधी मिळाली. - प्रथमेश गायकवाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images