गंगाम्हाळुंगी येथील भाऊराव शंकर पालवे (५०) या शेतकऱ्याने पत्नीचे मंगळसूत्र विकूनही खतासाठी पैसे कमी पडत असल्याच्या नैराश्येतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. याप्रकरणी आवश्यक ती सरकारी मदत देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह गावी नेत त्यावर अंत्यसंस्कार केले.
पालवे यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाम्हाळुंगी येथे भाऊराव पालवे यांची शेतजमीन आहे. शेतातील पिकांसाठी त्यांना युरिया, सुफला या खतांची आवश्यकता होती. मात्र, त्यांच्याकडे केवळ पाचशे रुपये असल्याने त्यांनी आपल्या पत्नीचे मंगळसूत्र विकण्यासाठी सोनाराकडे नेले; परंतु सोन्याला भाव कमी झाल्याने खतांसाठी आवश्यक असलेल्या रकमेची पूर्तता होत नव्हती. यामुळे नैराश्य आलेल्या पालवे यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी विषारी औषध प्राशन केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मुलांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. रात्री त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण, गुरुवारी सकाळच्या सुमारास भाऊराव पालवे यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर पालवे कुटुंबियांनी मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. सरकारच्यावतीने मदत मिळावी, असे आर्जव त्यांनी केले. प्रांत रमेश मिसाळ आणि तहसीलदार गणेश राठोड यांनी त्यांच्याशी संवाद साधला. शेतकरी आत्महत्या प्रकरणात सरकारतर्फे दिली जाणारी मदत देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दहा हजारांची मदत
पालवे कुटुंबियांची परिस्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्यापरीने आर्थिक मदत गोळा केली. त्यानुसार दहा हजार रुपयांची आर्थिक मदत पालवे कुटुंबीयांकडे तातडीने सुपूर्द केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट