गौण खनिजांची अवैध वाहतूक टाळण्याची हमी देणाऱ्या वाहतूकदारांनी संप मागे घेतला असला तरी अजूनही अवैध वाहतूक पूर्णत: बंद झालेली नाही. ११ जुलै ते २३ जुलै या कालावधीत गौण खनिज विभागाने अवैध वाहतूक करणाऱ्या ८४ गाड्या पकडल्या असून, त्यांच्याकडून ११ लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे गुरुवारी एकाच दिवसात पाच वाहनांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडून अन्यायकारक कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत ४ जुलैपासून वाहतूक बंदचे हत्यार उपसले होते. ऐन सिंहस्थ काळात पुकारण्यात आलेला हा बंद बेकायदेशीर असल्याचा दावा करीत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर वाहतूकदारांनी बंदची तलवार म्यान केली. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळत असल्याचा दावा वाहतूकदार संघटनांनी केला होता. मात्र, या काळात केवळ वाळूची वाहतूक बंद होती. मुरूम, खडी, दगड यासारख्या गौण खनिजांची वाहतूक सुरूच होती, असे गौण खनिज विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.
११ ते २३ जुलै या कालावधीत गौण खनिज विभागाने अवैध वाहतूक करणारी ८४ वाहने पकडली. त्यांच्याकडून ११ लाख ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अर्थात यामध्ये वाळूची वाहतूक करणाऱ्यांची संख्या कमी असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी एम. पी बऱ्हाणपूरकर यांनी दिली.
गुरुवारी गौण खनिज विभागाच्या पथकाने बेकायदा वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक, एक ट्रॅक्टर याखेरीज एक ट्रक्टर मुरूमाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यापैकी दोन वाहने निफाड येथे तर एक वाहन वडाळीभोई येथे पकडण्यात आले.
बनावट पावतीद्वारे धुळफेक
राहाता येथील वाळूचा लिलाव झाला नसतानाही तेथून नाशिक जिल्ह्यात वाळू आणल्याचा प्रकार काल पथकाने केलेल्या तपासणीत पुढे आला. विशेष म्हणजे हे वाहन पकडल्यानंतर वाहनचालकाने वाहतुकीचा परवानाही दाखविला. मात्र राहाता येथील वाळूचा लिलावच न झाल्याने पावतीबाबत पथकाला संशय आला. त्यांनी तेथील संबंधित तहसीलदारांकडून माहिती घेतली असता लिलाव झाला नसल्याचे सांगितले. बनावट पावत्या वापरून त्याद्वारेही वाळूची एका जिल्ह्यातून वाहतूक होत असल्याचा प्रकार अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे पुढे आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट