म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आचार्य महामंडलेश्वर स्वामी विद्यानंद सरस्वती यांचे नाशिक नगरीत आगमन होत असून, येथील श्री हरी बोल नगर, चिंतामणी मंगल कार्यालय, पंपिंग स्टेशन जवळ, गंगापूर रोड येथे १९ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर या कालावधीत त्यांचे वास्तव्य आहे. या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात देशभरातील साधू महंत, संत, आदिवासी व शिष्यगण सहभागी होत आहे. यानिमित्ताने नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच वाल्मिक रामायणाचा पाठ होणार आहे
प्रत्येक कुंभ पर्वणीमध्ये स्वामी विद्यानंद सरस्वती श्री हरिबोल नगराची स्थापना करतात व तेथून सर्व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. त्याच पार्श्वभूमीवर १९ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर पर्यंतच्या वास्तव्यात विश्वकल्याणासाठी अनेक धार्मिक विधी व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. १९ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर या कालावधीत सकाळी सहा ते दुपारी बारा व रात्री आठ ते दहा या वेळेत दररोज १०८ वैदिक ब्राह्मण अकरा लाख पंचवीस हजार श्री हनुमान चालिसा पारायण पूर्ण करतील. २१ ते २७ ऑगस्ट या कालावधीत प्रयागराज चे भागवताचार्य श्री ऋषिराज तिवारी महाराज दररोज दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत श्रीमद भागवत कथेचे निरूपण करतील. ३० ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत अहमदाबाद चे नंदकिशोर शास्त्री सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत संगीतमय रामचरित्र मानसचे पारायण करतील.
३० ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ग्वालीयरचे ब्रह्मचारी विष्णु चैतन्य महाराज दुपारी तीन ते सायंकाळी सात यावेळेत श्रीरामकथेचे प्रवचन करतील. ९ ते १६ सप्टेंबर या कालावधीत शक्करगड राजस्थान चे स्वामी जगदीश पुरी महाराज दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत श्रीमदभागवत ज्ञानयज्ञ करतील. १७ ते २५ सप्टेंबर या कालावधीत शरयू तट, अयोध्देच्या डॉ. सुनिता शास्त्री दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत रामायण आख्यान सांगतील.
१७ ते २७ सप्टेंबर या कालावधीत रोज सकाळी आठ वाजता अथर्वशीर्षाच्या मंत्रघोषात गणपती अभिषेक केला जाईल. या आयोजनात सदगुरूदेव स्वामी अखंडानंद मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्ट, बरूमल श्री भीड भजन महादेव संन्यास आश्रम, बलसाड श्री हरी सत्संग समिती, मुंबई श्री नाशिक सेवा समिती व श्री अखंड विद्या आरण्याक शिष्य भक्त मंडळ बरूमल या संस्था सहभागी होत आहेत. स्वामी विद्यानंद सरस्वती यांनी २० वर्षांपासून कैलास मठ व आवादन अखंडाचे पीठाधिश्वर व आचार्य पद गौरविले आहे; त्यानंतर ते महामंडलेश्वर झाले. परंतु त्यांनी आदिवासींच्या सेवेकरीता पदांचा त्याग केला. आता ते गुजरातेतील धरमपूर तालुक्यातील बरूमाल येथे हिंदु धर्माच्या व विश्वाच्या कल्याणासाठी अष्टधातूनिर्मित एकादश मुखी शिवलिंग व सनातन धर्माच्या सर्व देवीदेवतांची स्थापना करून जवळपास पाचशे आदिवासी गावात अन्न, शिक्षण, आरोग्य, संस्कार व राष्ट्रभक्तीभाव आदिंबद्दल जागृती व धर्मांतर थांबविण्यासाठी प्रकल्प सुरू केले.
या आदिवासींचे जीवनच त्यांनी बदलून टाकले आहे. आजमितीस आश्रमात १ हजाराहून अधिक आदिवासी मुली उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण व निवास सेवेचे लाभ घेत आहेत. नाशिकमध्ये बऱ्याच कालावधीनंतर ही आध्यात्मिक मेजवानी मिळणार असून, भाविकांनी व श्रोतृवर्गाने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट