म. टा. प्रतिनिधी, नाशिक
येवला आणि नांदगाव तालुक्याच्या मध्यावर असलेल्या सायगाव येथे कृत्रिम पाऊस पाडण्याचे निश्चित झाले असून, शनिवारी किंवा रविवारी हा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आशिया खंडात पहिल्यांदा अशा प्रयोगासाठी इंधन म्हणून साखरेचा वापर केला जाणार आहे.
पावसाने ओढ दिल्याने राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली गतिमान केल्या होत्या. गेल्या आठवड्यात तज्ज्ञांच्या पथकाने जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी देखील सुरू केली होती. येवला आणि नांदगाव तालुक्यातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर आता जिल्हा प्रशासन आणि इंटरनॅनल स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज (आयएसपीएस) ने रॉकेट फायरिंगद्वारे सायगाव येथे कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी (१ ऑगस्ट) किंवा रविवारी (२ ऑगस्ट) हा प्रयोग होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांनी सांगितले.
येवला आणि नांदगाव तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या सायगावची या प्रयोगासाठी निवड करण्यात आली आहे. नांदगाव तालुक्यात केवळ सात टक्के पाऊस पडला आहे. अंदरसूल अंतर्गत हे गाव येत असून, तेथे ५३ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून येथे ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस न पाडताच ढग वाहून जातात. ढगांमध्ये पुरेशी आद्रता असल्यानेच या प्रयोगासाठी सायगावची निवड केल्याचे सांगण्यात आले.
असा पाडणार पाऊस
बाष्पाच्या ढगांवर रॉकेटद्वारे सिल्व्हर आयोडाईड सोडले जाणार असल्याचे आयएसपीएसचे ट्रस्टी अब्दुल रेहमान वान्नु यांनी सांगितले. प्रयोगासाठीची सर्व सामग्री शुक्रवारी येवल्यात आणण्यात येईल. त्यानंतर वातावरणाचा अंदाज घेऊन प्रयोग केला जाणार आहे. रॉकेट ढगांवर आदळण्यास काही सेकंद लागतील परंतु, त्यानंतर ५० मिनिटांनंतर पाऊस पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट