म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर येथील षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या आश्रमात दहाही आखाड्यांचे प्रतिनिधींसोबत जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन शाहीस्नानाच्या क्रम आणि वेळेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली.
षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज, महामंत्री हरिगिरी महाराज आणि सर्व दहा आखाड्यांचे प्रतिनिधी, साधू-महंत यांच्या समवेत जिल्हा प्रशासनाने बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, मेळाधिकारी गावडे, महेश पाटील, उदय किसवे, प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे तसेच मुख्याधिकारी निवृत्ती नागरे आणि अन्य प्रशासकीय अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
प्रथम शाही पर्वणी (२९ ऑगस्ट) आणि तिसरी शाही पर्वणी (२५ सप्टेंबर २०१५) यावेळी पहिली मिरवणूक श्री पंचदशनाम जुना आखाडा, श्री पंचदशनाम आवाहन आखाडा, श्री पंचदशनाम आवाहन आखाडा अशी असेल. दुसरी मिरवणूक तपोनिधी श्री निरंजनी आखाडा व श्री आनंद आखाडा अशी असेल. तिसरी मिरवणूक श्री शंभू पंचायती अटल आखाडा व श्री शंभू पंचायती महानिर्वाणी आखाडा अशी असेल. या मिरवणुका कुशावर्तावर स्नान करून गेल्यानंतर वैष्णव आखाड्यांसाठी दोन तास राखीव असतात. त्यानंतर चौथी मिरवणूक श्री पंचायती बडा उदासीन आखाडा, पाचवी मिरवणूक श्री पंचायती नया उदासीन आखाडा, सहावी मिरवणूक श्री पंचायती निर्मल आखाडा असा क्रम असेल. हा क्रम गत सिंहस्थातात निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये दुसरी शाहीपर्वणी मुख्य शाही स्नान या दिवशी पहिली मिरवणूक तपोनिधी श्री निरंजनी व तपोनिधी आखाडा श्री आनंद आखाडा यांची असेल आणि दुसरी मिरवणुक श्री पंचदशनाम जुना आखाडा,श्री पंचदशनाम आवाहन आखाडा,श्री पंचदशनाम आवाहन आखाडा अशी असेल व त्यानंतर निघणारी तिसरी मिरवणूक व पुढील सर्व सहाव्या मिरवणुकांपर्यंत सर्व मिरवणुकांचा क्रम वरील प्रमाणे असेल.
साधरणत: पहाटे चार वाजता पहिल्या मिरवणुकीतील साधू आखाड्यांतून निघतील व ठरलेल्या ठिकाणी जमा होतील आणि कुशावर्तावर ठरलेल्या वेळेत पोहचतील. स्नानकरून ते मंदिरात दर्शनासाठी जातील व पुन्हा आखाड्यात परत जातील. सर्वांत शेवटची मिरवणूक १२ वाजे पर्यंत आखाड्यात पोहचली म्हणजे भाविकांना स्नानासाठी वेळ देता येईल, अशी आपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
गॅजेटमध्ये नोंद
२००३ पूर्वी पहिली मिरवणूक पाच आखाड्यांची व दुसरी मिरवणूक दोन आखाड्यांची अशी होती. मात्र, वाढती गर्दी आणि सुनियोजनासाठी तीन, दोन आणि दोन अशी योजना करण्यात आली. त्यामध्ये तीन आखाड्यांना दोन शाहीस्नानात पहिला सन्मान देण्यात आला व दोन आखाड्यांना मधल्या म्हणजे दुसऱ्या शाहीस्नानात त्या दोन आखाड्यांना पहिला सन्मान दिला आहे. सर्वानुमते हे निश्चित करण्यात आले व शासन गॅजेट नोंद झाली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट