August 23, 2015, 12:29 pm
म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प
सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीला म्हणजे येत्या २९ ऑगस्ट रोजी देशभरातून सुमारे १.२० कोटी भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता असतांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देवळाली रेल्वे स्टेशनची सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर बीडीडीएस (बॉम्ब शोधक पथक) आणि श्वान पथकाने तपासणी केली.
नागपूरच्या लोहमार्ग पोलिसांच्या वतीने बीडीडीएस पथकाकडून तपासणी करण्यात आली तर भुसावळ मंडळाच्या श्वान पथकाने सर्व रेल्वे स्टेशनची कसून तपासणी केली. यावेळी एपीआय व्ही. बी. भोये यांच्या सह पीएसआय नितीन अवधूत, के. डी. चव्हाण, 'अमर' नावाचा डॉग व त्याचे हेंडलर डी. सी. कोळी आदींसह सुमारे १० पोलिस कर्मचाऱ्यांनी देवळाली स्टेशनची तपासणी केली. देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन हे लष्करासाठी सर्वाधिक वेळा वापरले जाते. या ठिकाणी विशेष रेल्वे गाड्यांना रात्रीचा थांबा देण्यात आला असल्याने सर्वच बाबींची तपासणी करणे अनिवार्य असल्याचे बंदोबस्त प्रमुख भोये यांनी सांगितले. सुमारे १ तास त्यांनी रेल्वे स्टेशनचा परिसर तपासला. यानंतर त्यांनी नाशिकरोड, ओढा रेल्वे स्टेशनचीही तपासणी केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
August 23, 2015, 11:31 am
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
'जनसेवा हीच, ईश्वर सेवा' असं म्हणत लोकांची सेवा करण्याची बरीच माध्यमे आपल्या समोर असताना 'अंश फाउंडेशन' आणि 'एम. आय. टी कुंभथॉन' यांच्या संयुक्त विद्यमाने 'अन्नदान' या नावाने एक अनोखा उपक्रम पर्वणीच्या दिवशी चालवण्यात येणार आहे. 'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे...' या उक्तीचा प्रत्यय नाशिकमध्ये होत असलेल्या सिंहस्थातील अन्नदानाच्या निमित्ताने पहायला मिळत आहे हे निश्चित. अशा मोठ्या सोहळ्याप्रसंगी दानधर्म केल्याने अधिक पुण्य प्राप्त होते, अशी आख्यायिका असल्याने दानधर्म करण्यासाठी चढाओढच लागते. त्यातच एक आहे
कुंभमेळ्यादरम्यान होणारे अन्नदान. सिंहस्था निमित्ताने नाशिकमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविक येतात, मुक्काम करतात. या सर्वांची एकत्रितपणे जेवणाची सोय करणे प्रचंड अवघड असते. बरेच लोक उपाशी राहण्याची देखील शक्यता असते. याच उद्देशाने ही 'अन्नदान' नावाने एक सेवा पर्वणीच्या दिवसात नाशिकमध्ये चालवण्यात येणार आहे.
निराधारांसाठी नंतरही अन्नदान
सिंहस्थातील पर्वणीच्या दिवशी म्हणजेच २९ ऑगस्ट, १३ आणि १८ सप्टेंबर या दिवसात सकाळी १० ते १२ या वेळात शहरातील पार्किंग आणि थांब्याची ठिकाणे येथे या अन्नदानाची सोय करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही अन्नदानाची सेवा कुंभमेळ्यानंतरही निराधार मुले आणि अनाथ आश्रमांसाठी अशीच अविरतपणे सुरू ठेवण्यात येईल. कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या लोकांपैकी कोणीही उपाशी राहता कामा नये, असा याचा मुख्य उद्देश आहे. अन्न विकत घेऊन खाऊ न शकणाऱ्या भुकेल्यांसाठी चांगल्या दर्जाचं आणि ताजं अन्न या संस्थांमार्फत पुरवण्यात येईल. या कुंभमेळ्याच्या काळात अनेकांना अन्नदान करण्याची इच्छा असते; परंतु ते नेमकं केव्हा, कसं आणि कुठे करावं आणि ते गरजू व्यक्तींपर्यंत जाईल का याची काळजी असते म्हणूनच हे अन्न तयार करण्यासाठी नाशिकमधील महिला बचत गटांमार्फत मदत घेतली जाणार आहे की जेणेकरून त्यातील महिलांना सुद्धा रोजगार मिळू शकेल. तसेच पर्वणी काळात ज्या लोकांना अन्नदान करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा उपक्रम म्हणजे नक्कीच एक चांगलं व्यासपीठ ठरणार आहे.
अन्नदान कसे कराल?
अन्नदान करण्यासाठी इच्छूक असलेल्यांनी ९५५२१३७९४८ किंवा ९९६००१४५४४ या क्रमांकांवर संपर्क साधावा. अन्नदान उपक्रमाशी निगडीत असलेले प्रतिनिधी त्वरित आपल्याला अॅप्रोच होतील किंवा www.annadan.co.in या वेबसाइटवर देखील इच्छूकांना संपर्क साधता येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
August 23, 2015, 11:33 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड
अपिल प्रकरणातील आवश्यक माहिती, सुनावणीची तारीख सध्यस्थितीसह देण्यासाठी प्रतिसाद ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. नाशिक विभागातील पक्षकार, नागरिक, वकिल आदींनी त्याचा लाभ होणार आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्तांकडील अपिल प्रकरणातील आवश्यक माहिती, सुनावणीची तारीख यांची माहिती देण्यासाठी प्रतिसाद प्रणाली विकसित करण्यात आली आहे. पालकमंत्री महाजन व विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याहस्ते तिचे उदघाटन करण्यात आले. अमेरिकेतील जान हापकिन युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलेल्या श्रीकांत निबांळकर आणि केदार निंबाळकर यांनी ही प्रणाली तयार केली आहे. अपर विभागीय आयुक्त आर. जी. कुलकर्णी, उपायुक्त सतीश देशमुख, विवेक गायकवाड, प्रकास वाघमोडे, एस. डी. बनसोडे आदी अधिकारी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
August 23, 2015, 11:34 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घात अपघात गुन्ह्यांपासून तर आग अन् भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींसारख्या प्रसंगात मित्रासारखे मदतीस धावून येणारे अॅनॉनिमस अॅप मूळ नाशिककर असलेल्या अन् सध्या अमेरिकेत स्थित असलेल्या नितीन देशमुख या तरुणाने विकसित केले आहे. नितीन यांचे हे संशोधन ऐनवेळी उद्भवलेल्या आपत्तीशी दोन हात करणाऱ्या जगातील असंख्य नागरिकांसाठी उपकारक ठरणार आहे.
अटीतटीच्या प्रसंगात क्षणार्धात नागरिकांची मदतवाहिनी बनणारे हे अॅप गुगल प्ले वरही विनामूल्य उपलब्ध आहे. विशेष म्हणजे आपल्या भोवताली चालणाऱ्या बऱ्या घडामोडी किंवा आपत्कालीन प्रसंगांची माहिती संबंधित यंत्रणा किंवा व्यक्तीला अॅपद्वारे देताना माहिती देणाऱ्याचा तपशील मात्र गुप्तच राहतो. हे अॅप वापरताना युजर्सचा ग्रुप किंवा फ्रेण्ड सर्कल असण्याचे बंधन नाही. वापरकर्त्याच्या परिघातील इतर युजर्सनाही याव्दारे तातडीची माहिती पोहचवली जाऊ शकते. आव्हानाच्या प्रसंगांला तोंड देताना आपण उपस्थित असलेल्या जागेचा अन् समस्येचा तपशील फोटोग्राफी अन् व्हीडियोद्वारेही इतर युजर्सना पोहचविता येतो.
कुंभमेळ्यात ठरणार लाभदायी
नितीन देशमुख यांनी बनविलेले हे अॅप नाशिकच्या कुंभमेळ्यात अधिकाधिक उपकारक ठरू शकेल. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाला विविध अटीतटीच्या प्रसंगात मदत यंत्रणेशी जोडून ठेवू शकेल. या अॅप वापराच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षेच्या मुद्यावर भरीव काम करता येणे शक्य आहे. यामुळे हे तंत्रज्ञान पोलिस, अग्निशामन दल आणि रुग्णालयांसारख्या महत्त्वाच्या यंत्रणांसोबत जोडण्याच्या प्रयत्नात असल्याचे देशमुख यांच्या भगिनी मनीषा शेळके यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. नाशिकमध्ये कुंभात या अॅपचा विशेष उपयोग होण्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
आपत्कालीन प्रसंगांपासून तर सामाजिक हितासाठीचे अनेक मुद्दे नागरिकांच्या दृष्टीपथात असतात. मात्र, माहिती पुरविताना आपले नाव सामोरे न येण्याची अनेकांची इच्छा असते. या अॅपच्या माध्यमातून नागरिकांची ही इच्छा साधणे शक्य होईल. कुंभातही नागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे अॅप उपकारकच ठरेल.
- नितीन देशमुख, जॅक्सनविल, अमेरिका (मूळ नाशिककर)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
August 23, 2015, 11:38 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
दहशतवादी कारवाया रोखणे असो किंवा परराज्यांतील गुन्हेगारांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असो अशा घटनांचा समाचार घेण्यासाठी अन्य राज्यांतील पोलिस अधिकाऱ्यांची पथके नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. तिनही पर्वण्या होईपर्यंत या पोलिसांचा नाशिकमध्येच मुक्काम असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तीन पर्वण्यांना मिळून सुमारे तीन कोटी भाविक नाशिकमध्ये येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. कुंभमेळ्यावर दहशतवादी कारवयांचे सावट असून अशा घटना रोखण्यासाठी पोलिसही आतापासूनच सर्वतोपरी खबरदारी घेत आहेत. शहरात आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ काळात तब्बल २० हजार पोलिस रस्त्यावर असणार आहेत. विविध जिल्ह्यांमधून येणाऱ्या पोलिसांना त्या-त्या जिल्ह्यातील गुन्हेगारांची माहिती असते. त्यामुळे अशा पोलिस अधिकाऱ्यांचा उपयोग अशा गुन्हेगारांवर वचक ठेवण्यास होईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांकडून व्यक्त होतो आहे.
परंतु, तेच दहशतवादी असो किंवा अन्य राज्य सरकारांना हवे असलेले वॉन्टेड गुन्हेगार असोत ते या कालावधीत नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता पोलिस सुत्रांकडून व्यक्त केली जात आहे. अशा गुन्हेगारांना पकडता यावे यासाठी अन्य राज्यांतील पोलिस तसेच दहशतवादविरोधी पथकाचे ठिकठिकाणचे पोलिस नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील सर्वाधिक पोलिस असण्याची शक्यता पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी व्यक्त केली आहे. याखेरीज बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि अन्य राज्यांमधूनही पोलिस नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. तीन पर्वण्या होईपर्यंत त्यांचा नाशिकमध्येच मुक्काम असण्याची शक्यता जगन्नाथन यांनी व्यक्त केली.
अतिरिक्त दोन हजार
नाशिकमध्ये सिंहस्थ काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणखी दोन हजार पोलिसबळ द्यावे, अशी मागणी पोलिस प्रशासनाने गृह विभागाकडे केली आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाकडे सध्या २३०० पोलिसांचे मनुष्यबळ आहे. सिंहस्थासाठी आठ हजार ७२ पोलिसबळ नाशिकमध्ये दाखल झाले असून चार हजार होमगार्डचेही सहकार्य त्यांना मिळणार आहे.
बंदोबस्तासाठी दाखल
पोलिस उपायुक्त : १०
सहायक पोलिस आयुक्त : ३६
पोलिस निरीक्षक : १७०
पोलिस उपनिरीक्षक : ५३०
एसआरपीएफ : ४ तुकड्या
बीडीडीएस : १३ पथके
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
August 23, 2015, 11:40 am
म. टा. प्रतिनिधी, मनमाड
नांदगाव तालुक्यातील पानेवाडी येथील संजय किसन वाघ (वय ४०) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या केली. वाघ यांच्यावर सोसायटीचे तसेच उसनवारी करून घेतलेल्या पैशांचे कर्ज होते. त्यांनी शेतात मका पिकाची लागवड केली आहे. मात्र, पावसाने मोठी दडी मारल्याने पीक कोमेजल्याने त्यांना नैराश्य आले होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याने त्यांचे बंधू सुकदेव वाघ यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
August 23, 2015, 11:41 am
नैसर्गिक उपायांद्वारे दुर्गंधी हटविण्याचा दावा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सिंहस्थाचा माहोल जमून आला असला तरी अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या समस्येबाबत साधू-महंत, भाविक तसेच सामाजिक संस्थांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. रसायनविरहीत आणि नैसर्गिक औषधींद्वारे अल्पावधीत अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या प्रश्नावर मात करता येऊ शकते, असा दावा श्री सतपालजी महाराज प्रणित मानव उत्थान सेवा समितीशी संबंधित वैज्ञानिकांनी महापालिकेकडे केला आहे.
समितीद्वारे होणाऱ्या सदभावना संमेलनाच्या तयारीच्या निमित्ताने वैज्ञानिक क्षेत्राशी संबंधित श्री हर्ष, राहुल तिवारी आणि निखार जैन हे तिघेजण नाशिकमध्ये आले आहेत. साधुग्राम परिसरातील अस्वच्छता आणि दुर्गंधी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी समितीचे महात्मा हरिसंतोषानंदजी, महात्मा कमलेशानंदजी यांच्यासमवेत महापौर अशोक मुर्तडक यांची शनिवारी सायंकाळी भेट घेतली. दुर्गंधी आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी कोणत्याही रासायनिक द्रव्यांशिवाय बनविलेली औषधी उपयुक्त ठरेल असा दावा त्यांनी केला आहे. मानवधर्म प्रणेते श्री सतपालजी महाराज यांची प्रेरणा घेऊन हे तरूण सामाजिक क्षेत्रात कार्य करतात. अस्वच्छता आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी अल्पावधीतही प्रभावी उपाययोजना करता येऊ शकतात, असा त्यांचा दावा आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कोणतेही रासायनिक औषधी, कीटकनाशके वापरली जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आरोग्य अधिकारी, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्यासमोर हा प्रयोग करू द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक दोन दिवसात प्रयोगाची वेळ ठरवू, असे महापौरांनी त्यांना सांगितले. यावेळी समितीचे कार्यकर्ते हिरामण सूर्यवंशी, विजय भंदुरे, गौतम भंदुरे, बाळासाहेब सोनवणे, शाम काश्मिरे, चंद्रकांत थोरात आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
August 23, 2015, 11:44 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
श्री पंच दिगंबर आखाड्याने डाकोर इंदौर खालसा, १३ भाई त्यागी आणि १४ भाई महात्यागी या खालशांना बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला असून, हा वाद सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान पेटण्याची शक्यता आहे. तसेच, या वादात वर्चस्ववादाची किनार असल्याचे दिसते.
श्री अखिल भारतीय चतु:संप्रदाय खालशामध्ये शनिवारी सकाळी ध्वजारोहण झाले. या ठिकाणी लावण्यात येणारी ध्वजा श्री पंच दिगंबर आखाड्याची असणे अपेक्षित होते. मात्र, या खालशाने निर्वाणी आखाड्याचा ध्वज लावला. याचे पडसाद दिगंबर आखाड्यात उमटले. आखाड्यातर्फे आज पंचायत बोलवण्यात आली. यावेळी दिगंबर आखाड्याचे श्री महंत कृष्णदास महाराज, रामकिशोरदास शास्त्री, महामंत्री वैष्णवदास, त्यागी भक्तमालबडा आखाड्याचे महामंडलेश्वर माधवदास महाराज, अहिल्यानगर इंदूर खालशाचे महामंडलेश्वर कम्प्युटरबाबा यांच्यासह शेकडो, साधू-महंत हजर होते. झालेला प्रकार अत्यंत चुकीचा असून, डाकोर इंदौर खालशाचे महंत माधवाचार्य खालशा परिषदेचे अध्यक्ष नसताना कारभार हाकत आहेत.
कोणतीही निवडणूक झालेली नसताना ते या पदावर हक्क कसा सांगतात, असा प्रश्न माधवदास महाराजांनी उपस्थित केला. साधुग्राममध्ये आज ज्या सुविधा दिसतात, त्या उभारण्यामध्ये महंत ग्यानदास महाराजांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत असून, आखाड्याच्या वादात मात्र माझा पूर्ण पाठिंबा दिगंबर परिवाराला असेल, असे माधवदास महाराजांनी स्पष्ट केले. उपस्थित साधू-महंतांनी माधवाचार्यासहीत सिताराम महाराज आणि मनमोहनदास यांना बहिष्कृत करण्याची मागणी केली. आखाड्याने बहिष्कृत केल्यानंतर सदर खालशांना शाहीस्नानात सहभागी होता येणार नाही. उद्या, सोमवारी याबाबत माधवाचार्यांनी काही बैठक बोलवल्यास एकही खालसा तिथे जाणार नसल्याचा एकमुखी ठराव यावेळी संमत करण्यात आला. दरम्यान, या निर्णयाविरोधात माधवाचार्य बैठक घेण्याची शक्यता असून, हा वाद पेटणार की शमणार याची उत्सुकता साधुग्राममधील निवासींना लागली आहे.
दिगंबर आखाडा सर्वांत जुना आणि मोठा आखाडा असून, महंत ग्यानदासाशी निगडीत असलेला निर्वाणी आखाडा आपला पसारा वाढवतो आहे. यातून दोन आखाड्यातील वाद वेळोवेळी उफाळून येत असून, या वादाला सुध्दा हीच किनार लाभली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
August 23, 2015, 11:46 am
म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या राज्यातील विविध शाखांतर्गत घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या नगर येथे झालेल्या प्राथमिक फेरीतून नाट्यपरिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या दत्ता पाटील लिखित 'कस्टमर केअर' या एकांकिकेची मुंबईत होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली, अशी माहिती नाट्यपरिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम व कार्यवाह सुनील ढगे यांनी दिली. कस्टमर केअरने द्वितीय क्रमांकासह अभिनयाची दोन व दिग्दर्शन अशी चार पारितोषिके पटकावली.
प्राथमिक फेरीत नगर केंद्रावर काल नाशिकसह पुणे, पिंपरी चिंचवड, नगर, तळेगांव दाभाडे, बीड, बारामती येथील एकांकिका सादर झाल्या. प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येते. नगरसह मुंबई, कोकण, विदर्भ या विभागातून प्रत्येकी प्रथम दोन अशा एकूण आठ एकांकिका मुंबईतील अंतिम फेरीसाठी निवडल्या जातात. त्यात कस्टमर केअरने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे. परीक्षक म्हणून देवेंद्र यादव व पंकज चेंबुरकर यांनी काम पाहिले. नाट्यपरिषदेचे कार्यकारिणी सदस्य सतीश लोटके, सुनील ढगे, नगरमधील नगरसेविका सुवर्णा जाधव, परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य व समन्वयक शिवाजी शिंदे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
शेतकरी तरुणाचं भीषण वास्तव
एकांकिकेचा विषय हा मुळातच ग्रामीण भागातील शेतकरी तरुणाचं भीषण वास्तव दाखविणारा आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्याला पुरून उरणारी अनिश्चितता, त्यातून येणाऱ्या नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या आणि या वास्तवापासून अतिशय दूर भौतिक सुखात रमून गेलेला शहरी माणूस यांच्यातील विसंवाद या एकांकिकेतून मांडलाय. या एकांकिकेचे दिग्दर्शन बाळकृष्ण तिडके यांनी केले आहे. करष्मिा देसले व नीलेश सूर्यवंशी यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत. प्रकाश योजना रवी रहाणे, संगीत अभिषेक दांडेकर, नेपथ्य चंद्रकांत जाडकर व गुलाब पवार, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा ओवी भालेराव यांची आहे. या एकांकिकेला प्रा. रवींद्र कदम, प्रवीण काळोखे यांचे मार्गदर्शन लाभले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
August 23, 2015, 11:50 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
श्री अखिल भारतीय चतु:संप्रादाय खालशामध्ये झालेल्या ध्वजारोहण नाट्याचे पडसाद रविवारी उमटले. श्री पंच दिगंबर अनी आखाड्यातील ४०० खालशांनी मनमानी करणाऱ्या तीन खालशांना बहिष्कृत करण्याची मागणी केली. तसेच आखाड्यांनी ही मागणी मान्य न केल्यास शाही स्नानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने तीन खालसे बहिष्कृत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
श्री अखिल भारतीय चतु:संप्रादाय खालशाचे शनिवारी सकाळी ध्वजारोहण पार पडले. मात्र, चार संप्रादाय मिळून तयार झालेल्या चतुःसंप्रादाय खालशामध्ये पंच दिगंबर अनी आखाड्याचा ध्वजा असतो. तशी परंपरा असताना खालशा परिषदेचे अध्यक्ष माधवाचार्य यांनी निर्वाणी आखाड्याचा ध्वज फडकवला. ही चुकीची परंपरा असून, यामुळे सर्वात मोठ्या आखाड्याचा अवमान होत असल्याचे स्पष्ट करीत दिगंबर आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास शास्त्री यांच्यासह इतरांनी ध्वजारोहणावर बहिष्कार टाकला. आज या घटनेचे पडसाद दिगंबर आखाड्यात उमटले. यासंदर्भांत चर्चा करण्यासाठी जमा झालेले ३०० पेक्षा अधिक साधू महंत, महामंडलेश्वर आक्रमक झाले. दिगंबर अनी आखाड्याचा हा अवमान असून, या कामात सहभागी झालेल्या डाकोर इंदौर खालशाचे महंत माधवाचार्य, १४ भाई त्यागी खालशाचे सिताराम त्यागी आणि १३ भाई त्यागीचे मनमोहनदास यांना बहिष्कृत करण्याची मागणी केली. इंदौर खालशाचे महंत माधवाचार्य स्वतःला खालसा परिषदेचे अध्यक्ष म्हणवून घेतात. मात्र, आजवर अशी कोणतीही निवडणूक झाली नसून, बहिष्काराची कारवाई न केल्यास दिगंबर आखाड्याशी सलंग्न ४०० खालसे शाही स्नानावर बहिष्कार टाकतील, असा इशारा दिल्याने आखाड्याचे श्री महंत कृष्णदास महाराज यांनी आपला निर्णय जाहीर केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
August 23, 2015, 11:51 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहर पोलिसांच्या पावलांवर पाऊल ठेऊन ग्रामीण पोलिसांनी पर्वणीपूर्वीच त्र्यंबकेश्वरपासून १३ किलोमीटर अलीकडेच वाहने अडविल्याने भाविकांचे व त्र्यंबकेश्वरमार्ग पुढे जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. याचा फटका पर्यटकांनाही बसला. तर भाविकांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. येथून पुढे एसटीने जा असा सल्ला पोलिसांकडून दिला जात होता. पर्वणीपूर्वीच अशा अडवणुकीमुळे पोलिसांची कवायत होत असली तरी नागरिकांचे हाल होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाली.
संडे सेलिब्रेशनचा मुड जपणारे नाशिककर रविवारी त्र्यंबकेश्वर, पहिने परिसरात एन्जॉय करण्यासाठी जात असतात. निसर्ग अविष्काराचा आनंद लूटण्याच्या मुडमध्ये असलेल्या पर्यटकांना सकाळी नऊच्या सुमारास तळेगाव फाट्याजवळच पोलिसांचे दर्शन घडले. एक रस्ता बॅरिकेडिंगद्वारे बंद करण्यात आला होता. कार अथवा तत्सम वाहने घेऊन येणाऱ्या वाहनधारकांना या फाट्यावरच अडवून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसने त्र्यंबकेश्वरला जा अशी सुचना त्यांना केली जात होती. मात्र आम्हाला पहिनेला जायचे आहे, त्यामुळे आमची वाहने जाऊद्यात अशी विनंती करूनही पोलिसांनी वाहनधारकांना न सोडल्याने त्यांचे आपापसात वादही झाले. काही भाविकांसमवेत त्यांच्या खासगी वाहनांमध्ये वयस्कर नागरिक होते. बसप्रवास करून जाणे शक्य नसल्याचे त्यांच्याकडूनही पोलिसांना सांगितले जात होते. मात्र तुमच्या सर्वांच्या सोईसाठीच बसेसची व्यवस्था केल्याचे सांगत पोलिस अधिकाऱ्यांकडून कानावर हात ठेवले जात होते. परिणामी अनेकांना वाहने उभी करून नाईलाजास्तव बसनेच जावे लागले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
August 23, 2015, 11:43 am
नाशिक : विद्यार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास त्यांना तत्काळ वैधता प्रमाणपत्र देणार असल्याचे मत विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष संजय गौतम यांनी व्यक्त केले. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र.१, नाशिक विभाग, नाशिक यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे जनजागृती शिबिर लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात नुकतेच पार पडले. या वेळी संजय गौतम बोलत होते. या प्रसंगी उपायुक्त राजेंद्र कलाल, संशोधन अधिकारी खुशाल गायकवाड, प्राचार्य डॉ. बी. एस.जगदाळे, उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
August 23, 2015, 11:39 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मेनरोडच्या सरस्वती लेनमधील कपड्याचे दुकान फोडून चोरट्यांनी २६ लाख रुपये किमतीचा माल चोरून नेला. रविवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. दुकानमालक हितेशसिंग जीवनसिंग चौहाण (रा. रेणुकानगर, वडाळानाका) यांनी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
सरस्वती लेनमध्ये महापालिकेच्या गाळ्यात कस्तुरी साडी सेंटर हे दुकान आहे. चोरट्यांनी पहाटे या दुकानाकडे मोर्चा वळविला. हॅक्सॉब्लेड, कटर व दगडांचा वापर करून त्यांनी शटरचे कुलूप तसेच कड्या तोडल्या. दुकानात शनिवारीच आलेला माल उचलून पोबारा केला. यामध्ये साड्या तसेच ड्रेस मटेरियल्स अधिक होते. सुमारे २६ लाखांचे कपडे चोरीस गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरिक्षक मधुकर कड, श्वान पथक व गुन्हे शाखेच्या पथकाने धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी लाकडी ठोकळे, दगड, हॅक्सॉ ब्लेड, तोडलेले कुलूप आढळून आले. दरम्यान, पहाटे एका रिक्षाद्वारे हा माल द्वारका चौकात नेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. हा माल अन्यत्र घेऊन जायचा आहे, असे रिक्षाचालकाला सांगण्यात आले होते.
घरगुती गॅसच्या अवैध वाहतुकीवर छापा
जुने नाशिक : इंदिरानगर परिसरात घरगुती गॅस अवैधरित्या खासगी वाहनात भरून देणाऱ्या टोळीचा सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांच्या पथकाने पर्दाफाश केला. रविवारी सायंकाळी पोलिसांनी परिसरात अचानक छापा टाकून टोळीतील दोघांना पकडले. यावेळी अड्ड्यावरून सुमारे पंधरा भरलेले घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांकडून काळ्या बाजारात घरगुती गॅस सिलिंडर घेऊन ते खासगी वाहनात भरले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
August 23, 2015, 12:22 pm
म. टा. प्रतिनिधी, सातपूर
सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना शहर वाहतूक सेवेची बस पडकण्यासाठी रोजच कसरत करावी लागते. आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. त्यांची बस पकडतांना तर अधिकच तारांबळ उडते. राज्य परिवहन महामंडळाने आयटीआय सुटल्यावर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस उपलब्ध करून द्यावी, अशी विद्यार्थी व पालकांची मागणी आहे.
त्र्यंबक रोडवरील सातपूर एमआयडीसीमध्ये शासकीय आयटीआय आहे. तेथे शिक्षण घेण्यासाठी नाशिक परिसरातील हजारो विद्यार्थी रोजच येतात. मात्र, आयटीआय सुटल्यावर दुपारी आणि सायंकाळी वेळेवर बस सुविधा मिळत नाही. बस पकडण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी धावपळ करावी लागते. आयटीआयमधील विद्यार्थिनींना तर शहर बस पकडतांना खडतर प्रवास करावा लागतो.
विशेष म्हणजे काही वर्षांपासून आयटीआयचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. मात्र, आयटीआयकडून पाहिजे त्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहेत.
आयटीआयचे प्राचार्य किंवा प्रशासनाकडून विद्यार्थी सुविधांसाठी योग्य पद्धतीने पाठपुरावा किंवा पुढाकार घेतला जात नसल्याने विद्यार्थ्यांना घरी परतांना बसचा प्रवास जीव टांगूनच करावा लागतो. त्यामुळे आयटीआयमध्ये रोजच येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी दररोजसाठी स्वतंत्र बससेवा परिवहन मंडळाने सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी वर्गांकडून होत आहे.
वेगवेगळ्या थांब्यावर बससाठी गर्दी
त्र्यंबकडे आणि सीबीएसकडे अशा दोन्ही मार्गांवर आयटीआयच्या बस थांब्यावर एकाचवेळी शेकडो विद्यार्थ्यांची गर्दी पाहून शहर वाहतुकीचे बसचालक मागे किंवा पुढे बस उभी करतात. यातच सातपूर भागातील शिवाजीनगर, श्रमिकनगर, अशोकनगर, सातपूर कॉलनी, म्हाडा संकुल, एमआयडीसी आदी ठिकाणांहून येणाऱ्या शहर बस अगोदरच भरलेल्या असतात. यामुळे आयटीआय बस थांब्यावर एखाद-दुसरी बस थांबते. त्यामुळे विद्यार्थी पर्याय म्हणून उज्ज्वल एजन्सी, महात्मानगर किंवा आयटीआय सिग्नलवर उभे राहून जीव धोक्यात घालून बस पकडतांना दिसतात.
शासकीय आयटीआय सुटल्यावर विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी बसथांब्यावर गर्दी होते. यात शहर बस सातपूर भागातून अगोदरच भरून येतात. या बसच्या मागे धावत जाऊन विद्यार्थ्यांना बस पकडावी लागते. यासाठी एसटी महामंडळाने आयटीआय सुटल्यावर स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
- उमेश बच्छाव, विद्यार्थी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
August 24, 2015, 11:43 am
सातपूर : महापालिकेच्या राजीव गांधी भवनाच्या अगदी समोरच असलेल्या होलाराम व पंडित कॉलनीत श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. रात्री उशिरा घरी जाणारे वाहनचालक व पहाटे कामानिमित्ताने जाणाऱ्या वाहनचालकांना मोकाट श्वानांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी महापालिकेने होलाराम व पंडित कॉलनीत दबंगगिरी करणाऱ्या श्वानांवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
होलाराम व पंडित कॉलनीत वाहनचालकांना मोकाट श्वानांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे टोळक्याने फिरणाऱ्या श्वानांमुळे अनेकवेळा वाहनचालकांचा अपघात देखील झाले आहेत. काही श्वान वाहनांच्या मागे धावतात. त्यामुळे भीतीपोटी वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
August 24, 2015, 11:45 am
म. टा. प्रतिनिधी, पंचवटी
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मधील कालिका नगरातील अंतर्गत रस्ते गायब झाले असून पथदीपांची तत्काळ दुरुस्ती करण्याची गरज आहे. मात्र, महापालिका प्रशासन रहिवाशांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांनी तक्रार आहे.
कालिका नगरात सुमारे ५०० बंगले आणि काही मोठ्या इमारती आहेत. तसेच अजूनही काही नवीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. परंतु अंतर्गत रस्त्यांचे काम झाले नसल्याने रहिवाशांना अनेक वर्षांपासून खडतर मार्गावरून चालत जावे लागत आहे. या परिसरात पथदीप उभारण्याचे काम पूर्ण झाले असले तरी त्या खांबांवर दिवेच बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्री अंधाराचे साम्राज्य असते. लाइटची पुरेशी सोय नसल्याने रात्री अपरात्री ये जा करतांना नागरिकांना भीती वाटते.
रस्त्यांचे खडीकरण अनेक वर्षांपूर्वीच झाले आहे. त्यामुळे सर्व खडी मोकळी झाली असल्याने वाहन चालक आणि पादचारी यांना त्रास होत आहे. पुन्हा खडीकरण करावे आणि मगच डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या पावसाळा असल्याने किमान मुरूम टाकून तरी खड्डे बुजावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांचे काम करावे. पथदीप तत्काळ सुरू करावेत. अंधाराचे साम्राज्य वाढल्याने सर्व रहिवाशी व नागरिकांना रात्रीची खूप भीती वाटते.
- प्रमोद शिरसाठ
परिसरातील रस्त्यांची मोजणी करावी. या रस्त्यांवरून पायी चालणेही कठीण होते. ज्येष्ठ नागरिकांना तर अनेक हाल सोसत जावे लागते.
- व्ही. के. अहिरे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
August 24, 2015, 11:47 am
म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प
सिंहस्थ काळात पर्यायी प्रवासी थांबा म्हणून देवळाली रेल्वे स्टेशनास प्राधान्य देण्यात आले. मात्र, कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत. केवळ तात्पुरत्या स्वरुपाची कॅन्टीन उभारण्यात आली आहे. याबाबत नगरसेवक भगवान कटारिया यांनी सहायक प्रबंधक बागुल यांची भेट घेत तक्रार केली आहे.
देवळाली रेल्वे स्टेशनातून केवळ सिंहस्थासाठीचा वापर होत नसून देशाच्या रक्षणार्थ लढणाऱ्या जवानांचा सर्वाधिक राबता या स्टेशनवर असतो. अशा महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर अजूनही पूर्णवेळ प्रबंधक नाही, उपप्रबंधकावरच सर्व जबाबदारी आहे, रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त पोलिसांसाठी असलेली शौचालये पूर्णत: नादुरुस्त आणि अस्वच्छतेने भरलेली आहेत. शौचालयांमध्ये पाण्याची व्यवस्था नाही. नळाच्या तोट्या तुटलेल्या असल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. सेफ्टी टँक पूर्णपणे भरल्यामुळे असह्य दुर्गंधीचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे पोलिस उपनिरीक्षकांसह २४ पुरुष व ६ महिला कर्मचारी सिंहस्थानिमित्ताने तैनात करण्यात आले आहेत. प्रवासी व पोलिसांना पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या कुलरमधील पाणीही दुर्गंधीयुक्त व घाण असल्याचे आढळले. पाण्याच्या टाक्यांवर झाकणे नाहीत. पाण्यामध्ये आळ्या आढळल्या आहेत. स्टेशनवर १४ सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी त्यासाठी स्वतंत्र ऑपरेटर नाही. सिंहस्थात येणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याशी रेल्वे प्रशासन खेळत आहे. या ठिकाणी त्वरित सोयी सुविधा देण्यात याव्या, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे कटारिया यांनी केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
August 24, 2015, 11:49 am
डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड
नाशिकरोडचा रेल्वेमालधक्का चार महिने बंद राहणार असल्यामुळे माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून रेल्वेचेही कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. प्रशासनाचे कुंभमेळ्याचे चुकीचे नियोजन याला जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.
नाशिकरोडला ब्रिटीशकालीन आणि नवा असे दोन मालधक्के आहेत. नोंदणीकृत साडेसातशे, अनोंदणीकृत दोन हजार आणि वाहनचालक-सहाय्यक पंधराशे अशा सुमारे चार हजार जणांना येथे रोजगार मिळत आहे. ५८ डब्यांच्या तीन मालगाड्या दररोज येथे रिकाम्या केल्या जातात. त्यात सरकारी धान्य, सिमेंट, खते आदी माल येत असतो. दररोज ७५ लाखांचा महसूल रेल्वेला मिळतो.
कोट्यवधींचे नुकसान
गेल्या कुंभमेळ्यात प्रचंड गर्दी असूनही मालधक्का सुरू होता. यंदा चौथा फ्लॅटफार्म बांधल्याने मालधक्का बंद करण्याची गरज नव्हती. पर्वणीच्या काळात चारच दिवस मालधक्का बंद करण्याचे जाहीर झाले होते. भाविकांची विश्रांतीची सोय व सुरक्षेचे कारण देत जुना मालधक्का ३० जूनला तर सेंट्रल वेअरहाऊस मालधक्का १० ऑगस्टला रोजीच बंद करण्यात आला. २७ सप्टेंबरपर्यंत मालधक्का बंद असेल. तो पूर्ववत होण्यासाठी आणखी महिना लागेल. दिवसाला ७५ लाखाचे नुकसान होत आहे. किमान १२० दिवस मालधक्का बंद राहील. या हिशेबाने रेल्वेचे कोट्यवधीचे नुकसान होणार असल्याची माहिती आरपीआय फेडरेशनचे नेते अनिल आहेर यांनी दिली.
कामगारांची दैनावस्था
माथाडी कामगार सध्या रोजगारसाठी वणवण करत आहेत. विमा व घराचा कर्जाचे हप्ते, पोराबाळांचे शिक्षण, किराणा, दवापाणी आदींचा खर्च कसा भागवायचा? या प्रश्नांनी माथाडी कामगार हवालदिल झाले आहेत. अन्य ठिकाणी काम शोधण्यासाठी त्यांना भटकावे लागत आहे. मिळत्या त्या रोजाने ते काम करण्यासाठी कामाची भीक मागत आहेत.
रेल्वेलाईनच बुजविली
मालधक्क्यावर सुमारे आठशे मीटरची रेल्वेलाईन आहे. कुंभमेळ्यासाठी ती संपूर्णपणे माती टाकून बुजविण्यात आली आहे. सुभाषरोड पाईन्टला तर रुळ चक्क सिमेंटचे क्राँकीट टाकून बुजविण्यात आले आहेत. कुंभमेळ्यानंतर पुन्हा हे सर्व उकरण्याचे काम करावे लागणार आहे. त्यासाठी पुन्हा पैसा व वेळ खर्च करावा लागणार आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची दिल्लीत भेट घेतल्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कामगार आयुक्तांनी माथाडींना काम देण्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना पत्र दिले. परंतु, कोणीच कार्यवाही करत नाही.
- रामबाबा पठारे, अध्यक्ष, आरपीआय फेडरेशन
माथाडी कामगार कोणत्याही रोजाने व कोणतेही काम करण्यास तयार आहेत. त्यांना महिना दहा-पंधरा हजार मिळाल्यास किमान संसार तरी चालेल. मालधक्क्यावरील विकासकामात भ्रष्टाचार होत आहे. परंतु, माथाडींकडे बघायला वेळ नाही.
- अनिल आहिरे, माथाडी नेते
किमान एक मालधक्का सुरू ठेवला असता तर पोरबाळं उपाशी राहिली नसती. रेल्वे प्रशासनाने आमची रोजगाराची सोय करावी. माथाडी शंभर किलोचे वजन सहज नेतात. कुंभमेळ्यात आपत्तीच्या काळात आमची मोठी मदत होऊ शकते.
- दीपक वाघ, माथाडी कामगार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
August 24, 2015, 11:54 am
म. टा.प्रतिनिधी, पंचवटी
सिंहस्थानिमित्त नाशिकमध्ये येणाऱ्या भाविक आणि साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेल्या साधुंसाठी आधुनिक थ्री-डी मॅपची सोय करण्यात येणार आहे. तपोवनातील साधुग्राममध्ये प्रवेश केल्यानंतर मीडिया सेंटर, फायर ब्रिगेड, पोलिस स्टेशन, शॉपिंग सेंटर, रेशन दुकान, सुलभ शौचालय अशी महत्त्वाच्या ठिकाणांची योग्य दिशा आणि माहिती या थ्री-डी मॅप होर्डिंगद्वारे मिळू शकणार आहे.
साधुग्राममधील एकूण १२ सेक्टर या मॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. थ्री-डी मॅप समजण्यासाठी भाषेचा बंधन येणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. आतापर्यंतच्या टू डी मॅपचा सर्व्हे केल्यानंतर ते सर्व भाषांमधील भाविकांना समजण्यास अवघड जात असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे थ्री-डी मॅप तयार करण्याची संकल्पना ऋषभ रांभिया या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याच्या मनात आली. त्याने यश जगताप, हितेश शेवाळे, शुभांगी कछवा, साईश भालेराव या मित्रांची मदत घेत थ्री-डी मॅपची संकल्पना प्रत्यक्षात साकार केली.
विशेष म्हणजे या थ्री-डी मॅपसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या मोबाइल अॅप व स्मार्टफोनची गरज भासणार नाही. इन्फो ग्राफिक्स टूल्सचा वापर करून साधुग्राम परिसरातील तब्बल ५२ होर्डिंग थ्री-डी मॅपमध्ये लावण्यात येतील. ठळक चिन्हांच्या माध्यमातून तपोवनातील साधुग्रामचा सर्व परिसर या थ्री-डी मॅप होर्डिंगवर दिसू शकणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
August 24, 2015, 11:56 am
म. टा. प्रतिनिधी, सातपूर
दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वर रस्ता तळवाडे (खंबाळे) येथून खासगी वाहनचालकांसाठी बंद करण्यात आल्याने वाहनचालकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. विशेष या बदलाबाबत नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर प्रशासनाने सूचना फलक लावल्याचे सौजन्यही न दाखविल्याने वाहनचालकांना अधिकच मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
त्र्यंबकेश्वर रस्ता रविवारप्रमाणेच श्रावणी सोमवारनिमित्तही बंद ठेवण्यात आला. मात्र, त्यामुळे त्र्यंबकेश्वर परिसरात पर्यटनासाठी फेरफटका मारण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांचा चांगलाच हिरमोड झाला. त्र्यंबकेश्वर रस्ता तळवाडे (खंबाळे) येथून बंद केला आहे. याची माहिती देणारे सूचना फलक पपया नर्सरी किंवा समृद्धनगर येथे लावणे आवश्यक होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
पार्किंगच्या नावाखाली लूट
खंबाळे शिवारात वाहने उभी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे चारचाकी वाहनांसाठी ६ तासांसाठी ५० रुपये व त्यानंतर पुढील प्रत्येक तासासाठी ५० रुपये आकारण्यात येत आहेत. पैसे भरण्याची गरज भासू नये यासाठी वाहनचालक इतरत्र मोकळ्या जागांवर वाहने उभी करत आहेत. वाहनतळावर निवारा शेड असले तरी तेथे वीज दिवे नाहीत.
दादागिरीची भाषा
पोलिस व स्वयंसेवक भाविकांशी दादागिरीची भाषा करीत आहेत. सौजन्याने वागण्याऐवजी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याची खंत भाविकांनी व्यक्त केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧