सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापलिकेच्या अतिक्रमण विभागाने नाशिकरोड रेल्वेस्टेशन बाहेरील अतिक्रमण काही दिवसांपूर्वीच काढले. मात्र, अतिक्रमण निर्मूलन पथकाची पाठ फिरताच व्यावसायिकांनी प्रशासनाच्या नाकावर टिचून पुन्हा आपले बस्तान बसवले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे स्टेशनच्या अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित होता. व्यावसायिक आणि महापालिका यांच्यात कोर्टबाजीही झाली. त्यात न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल देत अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कडेकोट बंदोबस्तात अतिक्रमण जमिनदोस्त केले. मात्र, पथकाची पाठ फिरताच येथील अतिक्रमणधारकांनी पुन्हा आपले बस्तान बांधण्यास सुरुवात केली. सध्या या भागात मोठ्या प्रमाण अतिक्रमण फैलावले आहे. पेरू विक्रेते, चिवडा विक्रेते यांनी पुन्हा तेथे आपली दुकाने थाटली आहेत. रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडणाऱ्ख्या नागरिकांना या अतिक्रमणाचा त्रास होत असून, रस्त्याने चालणे मुश्कील झाले आहे. आलाहाबाद येथे झालेल्या चेंगराचेंगरीत रेल्वे स्टेशनवरील अतिक्रमणच कारणीभूत होते. या अतिक्रमणाबाबत महापालिका प्रशासनाला कळवले असता त्यांनीही याकडे कानाडोळा केला आहे. रेल्वे प्रशासन म्हणते बाहेर पडण्याचा मार्ग व्यवस्थित असेल तर रेल्वे स्टेशनवर लोड येत नाही. मात्र, स्टेशन बाहेरच अतिक्रमण फैलावत असल्याने लोकांच्या बाहेर पडण्यासाठी अडचण येत आहे. या भागात अतिक्रमण होऊ नये म्हणून कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तेथील अतिक्रमणाची जबाबदारी निश्चित करावी.
काही दिवसांपूर्वी हा भाग मोकळा झाला होता. मात्र, पुन्हा अतिक्रमण होत आहे. आयुक्तांनी स्वतः याबाबत लक्ष घालून कार्यवाही करावी.
- धनंजय चव्हाण, प्रवासी
सकाळी गाडी पकडण्यासाठी धावपळ सुरू असते. अशा वेळेस अतिक्रमण धारक आपले दुकाने मांडून बसतात. त्यामुळे प्रवेश करण्यास व बाहेर पडण्यास अडचणी येतात.
- देविदास पंडित, प्रवासी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट