Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रेल्वे स्टेशनला पुन्हा अतिक्रमणाचा विळखा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापलिकेच्या अतिक्रमण विभागाने नाशिकरोड रेल्वेस्टेशन बाहेरील अतिक्रमण काही दिवसांपूर्वीच काढले. मात्र, अतिक्रमण निर्मूलन पथकाची पाठ फिरताच व्यावसायिकांनी प्रशासनाच्या नाकावर टिचून पुन्हा आपले बस्तान बसवले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे स्टेशनच्या अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित होता. व्यावसायिक आणि महापालिका यांच्यात कोर्टबाजीही झाली. त्यात न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल देत अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कडेकोट बंदोबस्तात अतिक्रमण जमिनदोस्त केले. मात्र, पथकाची पाठ फिरताच येथील अतिक्रमणधारकांनी पुन्हा आपले बस्तान बांधण्यास सुरुवात केली. सध्या या भागात मोठ्या प्रमाण अतिक्रमण फैलावले आहे. पेरू विक्रेते, चिवडा विक्रेते यांनी पुन्हा तेथे आपली दुकाने थाटली आहेत. रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडणाऱ्ख्या नागरिकांना या अतिक्रमणाचा त्रास होत असून, रस्त्याने चालणे मुश्कील झाले आहे. आलाहाबाद येथे झालेल्या चेंगराचेंगरीत रेल्वे स्टेशनवरील अतिक्रमणच कारणीभूत होते. या अतिक्रमणाबाबत महापालिका प्रशासनाला कळवले असता त्यांनीही याकडे कानाडोळा केला आहे. रेल्वे प्रशासन म्हणते बाहेर पडण्याचा मार्ग व्यवस्थित असेल तर रेल्वे स्टेशनवर लोड येत नाही. मात्र, स्टेशन बाहेरच अतिक्रमण फैलावत असल्याने लोकांच्या बाहेर पडण्यासाठी अडचण येत आहे. या भागात अतिक्रमण होऊ नये म्हणून कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तेथील अतिक्रमणाची जबाबदारी निश्चित करावी.

काही दिवसांपूर्वी हा भाग मोकळा झाला होता. मात्र, पुन्हा अतिक्रमण होत आहे. आयुक्तांनी स्वतः याबाबत लक्ष घालून कार्यवाही करावी.

- धनंजय चव्हाण, प्रवासी

सकाळी गाडी पकडण्यासाठी धावपळ सुरू असते. अशा वेळेस अतिक्रमण धारक आपले दुकाने मांडून बसतात. त्यामुळे प्रवेश करण्यास व बाहेर पडण्यास अडचणी येतात.

- देविदास पंडित, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार खड्ड्यात कोळसल्याने एक ठार; पाच गंभीर जखमी

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने इंडिका विस्टा कार शंभर फुटापेक्षा अधिक खोल खड्ड्यात कोसळली. मुंढेगावजवळ जिंदाल कारखान्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये देवळाली कॅम्प येथील एक युवक जागीच ठार झाला, तर नाशिकच्या वडाळा भागातील पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींवर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाशिकहून मुंबईकडे वेगाने जाणाऱ्या इंडिका विस्टा (एमएच १५ डीएम ००८६) वरील वाहकाचे नियंत्रण सुटल्याने कार खोल खड्ड्यात कोसळली. दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात वाहनचालक रिझवान इब्राहीम शेख (वय २५, रा. देवळाली कॅम्‍प) हा युवक जागीच ठार झाला. अत्तमा इस्माईल शेख (वय २०), मुसेद अत्तार अन्सारी (वय ३८), अमर प्रभाकर ताठे (वय २७), सय्यदिन सलीम शेख (वय २६), प्रवीण सुदाम पगारे (वय २५) सर्व राहणार वडाळा, नाशिक गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुणवाहिकेचे रुग्णवाहक निवृत्ती गुंड यांनी तातडीने सर्व जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. घोटी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांडपाण्यावर प्रक्रिया मोठे आव्हानच

0
0

विनोद पाटील,नाशिक

नाशिक शहराच्या नागरिकरणाचा वेग झपाट्याने वाढत असतानाच घनकचऱ्यासोबत सांडपाण्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. शहरातील सांडपाणी थेट गोदावरीत सोडले जात असल्याने त्यावर प्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान पालिकेवर आहे. गोदावरीच्या प्रदूषणाला शहराचे सांडपाणी व मलजल सोबतच उद्योगातून तयार होणारे घातक रासायनिक पाणी कारणीभूत असल्याने या सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीत सोडण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.

सध्या शहरातील २७० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. वाढत्या लोकसंख्येचा अंदाज घेत गोदावरीच्या काठावर असलेल्या नाशिक महापालिकेने शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तीन टप्प्यात आखणी केली आहे. सन २०४१ मध्ये तयार होणाऱ्या ७०० एमएलडी पाण्यावरील प्रक्रियेसाठीचे नियोजन पूर्ण केले असून, त्याच्या अंमलबजावणीलाही सुरुवात केली आहे.

वाढीव लोकसंख्येला लागणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन पालिकेने पूर्ण केले आहे. नागरिकांना पाणीपुरवठा केल्यानंतर तयार होणारे सांडपाणीही महत्त्वाचे असून, त्याचा थेट संबंध हा शहराच्या आरोग्यावर होणारा आहे. त्यामुळे या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरायोग्य करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी महापालिकेने मलनिःसारण केंद्रांची उभारणी केली आहे. सध्या नाशिकची लोकसंख्या ही १८ लाख असून, दररोजचा पाणीपुरवठा ४०० एमएलडी एवढा आहे. या पाणीपुरवठ्यातून सद्यस्थितीत शहरात २७० एमएलडी सांडपाणी व मलजल तयार होत असून, ते प्रक्रिया करून सोडले जात असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मात्र, असे असले तरी उगमातच प्रदूषित झालेल्या गोदावरीची स्थिती पाहता पूर्ण पाण्यावर प्रक्रिया होत नसल्याचे चित्र आहे. शहरातील सांडपाण्यासोबतत औद्योगिक वापराचे घातक रसायनयुक्त पाणी थेट गोदापात्रात सोडले जात असल्याने जलप्रदूषणाची मोठी समस्याच निर्माण झाली आहे. साडंपाणी व मलजलावर प्रक्रिया होत नसल्या कारणाने थेट उच्च न्यायालयांमध्येच हा वाद पोहचला आहे. त्यामुळे या सांडपाण्याचे नियोजन महापालिकेने सद्यस्थितीत पूर्ण केले असून, त्याची तीन टप्प्यात आखणी केली आहे.

महापालिकेचे तीन टप्प्यातील नियोजन

नाशिक मनपाच्या हद्दीत गोदावरी नदीचा प्रवास हा १९ किलोमीटरचा आहे. नाशिक शहरात सद्यस्थितीत दररोज सुमारे २७० दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होतं. पुरवठा केलेल्या ४०० एमएलडीपैकी आजही आपल्याकडे सेप्टिक टँक आणि सोपपीटसारख्या पारंपरिक पद्धतींचा वापर मलनिःसारणासाठी शहरात होतो. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन २०२१, २०२६ आणि २०४१ अशा तीन टप्प्यांचे शहराच्या लोकसंख्येचे आणि पाणीवापराचे अंदाजपत्रक तयार केले आहे. २०२१ साली अनुमानित लोकसंख्येच्या आराखड्यात नाशिकची लोकसंख्या किती असेल, त्या लोकसंख्येला किती पाणीपुरवठा करावा लागेल आणि त्यातून किती सांडपाणी तयार होईल याचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यानुसार नाशिक मनपा सिमेत २०२१ मध्ये दररोज सुमारे ३९२.५ दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होईल. याचाच अर्थ तेवढं सांडपाणी शुद्धीकरणासाठी मलजल शुद्धीकरण केंद्रात येणार आहे. त्यासाठी सध्याच्या २७० एमएलडीची क्षमता वाढवून ती ३९२.०५ पर्यंत नेली जाणार आहे. हे लक्षात घेऊन सहा सेव्हरेज झोन तयार केले आहेत. यापैकी तपोवन, पंचक, चेहडी आणि अगर टाकळी हे चार झोन्स कार्यान्वित आहेत, तर गंगापूर आणि पिंपळगाव खांब या उर्वरित दोन प्रकल्पांसाठी उपाययोजना आखलेल्या असून, ७२ एमएलडी आणि ५० एमएलडीचे केंद्र कार्यान्वित होणार आहेत. सध्या मलजल शुद्धीकरण केंद्रातून शुद्ध झालेले पाणी फक्त औद्योगिक वापरासाठी किंवा शेतीसाठी उपयुक्त आहे. ते पाणी मानवी वापरासाठी योग्य नाही ही बाब खरी आहे. त्यामुळे अंघोळीसाठी हे पाणी उपलब्ध करून द्यायचं असेल तर आताच मलजल शुद्धीकरण केंद्रातील तंत्रज्ञान बदलावे लागेल. ते अधिक प्रगत करावे लागेल. शुद्धीकरण केलेले पाणी इतरत्र वळवण्याची सुविधा सध्या तरी महापालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे हे पाणी नदीपात्रातून एकलहरा औष्णिक वीजप्रकल्पासाठी सोडले जाते. एकलहऱ्याला 'बॅरेज' आहेत. तिथून पाणी थर्मल पॉवर सेंटरसाठी उचललं जातं. इतकंच नाही, तर भविष्यात सिन्नर इथे होणाऱ्या 'इंडिया बुल्स'च्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी लागणारे पाणी पाटबंधारे विभागाने आताच आरक्षित करून ठेवले आहे.

गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका अभिनव उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करीत आहे. रोज नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा विकसित केली आहे. दोन बोटी आनंदवल्ली ते होळकर पुलापर्यंत नदीपात्रातून फेऱ्या मारतात. एका बोटीत दहा-पंधरा कामगार असतात. नदीपात्रात जो काही तरंगणारा कचरा असेल, पाणवेली असतील त्या, हे कर्मचारी काढून घेतात.

महिन्यातून दोन वेळा रामकुंड तळापासून स्वच्छ करण्यासाठी वेगळी यंत्रणा आहे. रामकुंड परिसरातील नदीचे पाणी मानवी वापरासाठी अयोग्य असल्यामुळे तिथे महापालिकेने निराळे गोमुख बसवलेले आहे. ज्यातून अखंड पिण्याजोगे पाणी सोडले जाते. जेणेकरून भाविकांना, यात्रेकरूंना ते पाणी बाटलीत भरून आपल्या घरी नेता येईल, असा पालिकेचा प्रयत्न आहे. सन २०४१ मध्ये तयार होणाऱ्या ७०० एमएलडी पाण्यासाठी वाढीव जागा व केंद्राची संख्या वाढवण्यासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्ल‌िम लोकसंख्येवर कायद्याने तोडगा काढा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जातीनिहाय जनगणनेत हिंदूंची संख्या घटल्याच्या आकडेवारीची विश्व हिंदू परिषदेने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मुस्ल‌मिांच्या वाढत्या लोकसंख्येवर तोडगा काढण्यासाठी देशात एकतर समान नागरी कायदा लागू करा अन्यथा, तात्काळ लोकसंख्या नियंत्रण कायदा आणा, अशी मागणी बुधवारी नाशिक येथे करीत विश्व हिंदू परिषदेने केंद्र सरकारवर दबाव वाढविला आहे. तर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष असल्याचा दावा करणारे महंत ग्यानदास अध्यक्षच नसल्याचा दावा विहिंपने केला आहे.

नाशिकमध्ये येत्या ६ सप्टेबंरला होणाऱ्या विश्व संत संमेलनात याच विषयावर मंथन व चर्चा होणार असल्याचे विह‌िंपचे केंद्रीय संपर्कमंत्री व्यंकटेश आबदेव यांनी स्पष्ट केले आहे. तर समान नागरी कायद्याला वेळ लागत असेल, तर लोकसंख्या नियंत्रण कायदा तयार करून तो केंद्राने तात्काळ लागू करावा.' असेही त्यांनी सांगितले.

रामजन्मभूमी वाद वाटाघाटीने सुटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर गोवंश हत्या बंदी कायद्याला देशातील सर्वपक्षीय ५२५ खासदारांनी समर्थन असून, लवकरच पंतप्रधानांची भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदादर घसरला : स्वाभिमानीचे आंदोलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील नामपूर येथे कांद्याचे भाव घसरल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. दरम्यान, शासनाने कांद्याला हमीभाव द्यावा, अशीही मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी केली.

नामपूर येथील उपबाजार समितीच्या आवारात कांदा भाव घसरल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करून कामकाज बंद पाडले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. सहा हजाराचा टप्पा ओलांडणारा कांदा पाच हजाराच्या खाली आल्याने तसेच घसरण सुरूच असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

भाव वाढल्यावर दबावतंत्र वापरणारे दर घसरल्यावर शांत का, असे सवाल उपस्थित करण्यात आले. आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ अहिरे, तालुका उपाध्यक्ष प्रवीण अहिरे, राजेंद्र सावळा, पवन ठाकरे, भाऊसाहेब पगार, योगेश काकडे, संदीप कापडणीस, केदा पगार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाईडची धुरा रिक्षाचालकांकडे!

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात झाली असली तरी शहर आणि परिसराची इत्यंभूत माहिती असणाऱ्या गाईडची वानवा जाणवू लागली आहे. कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून भाविक आणि पर्यटक येत आहेत. काही ठिकाणी तर या भाविक पर्यटकांना माहिती देण्याचे काम रिक्षाचालकच करतांना दिसत आहेत.

शहरात दाखल झालेल्यांना गाईड तपोवनासह गंगाघाट, कपालेश्वर, गंगा-गोदावरी मंदिर, काळाराम मंदिर, सीतागुंफा, लक्ष्मण रेखा, साक्षी गोपाल मंदिर, कपिला संगम, लक्ष्मीनारायण मंदिर, प्राचीन वनवास स्थान, साधुग्राम, अग्निकुंड, सोमेश्वर, भक्तीधाम, मुक्तिधाम आदी ठिकाणे दाखवित आहेत. सर्व गाईड हे सर्व पॉईंट दाखविण्यासाठी १५० ते २०० रुपये घेतले जात आहेत.

देशभरातून विविध भाषा बोलणारे भाविक येत आहेत. त्यांना त्यांच्या भाषेत म्हणजे इंग्रजीसह गुजराती, कन्नड, तेलगू, राजस्थानी, हिंदी भाषेत संवाद साधत सर्व माहिती देण्याचे काम गाईड करीत आहेत. मात्र, यात संपूर्ण माहित असलेले आणि ती पर्यटक भाविकांना त्यांच्या भाषेत देऊ शकणाऱ्या गाईडची वाणवा दिसून येत आहे.

रोजगाराच्या संधी

पंचवटी पोलिस स्टेशनच्या माध्यमातून ३५ गाईडची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधितांना अधिकृत पासेस देण्यात आलेली आहेत. परिवहन विभागाकडूनही रिक्षावाल्यांना पासेस देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिक आणि रिक्षावाल्यांना रोजगार मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेंट फ्रान्सिस’ विरोधात गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राणेनगर व तिडके कॉलनीत असलेल्या सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या वाढत्या मुजोरीमुळे अखेर त्रस्त पालकांनी बुधवारी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यात आले नाही तसेच, त्यांचे गुणही पालकांना कळविले नाही म्हणून पालकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी शाळेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शाळेच्या नियमित फीशिवाय शालेय प्रशासन विद्यार्थ्यांकडून कम्प्यूटर फी, शाळेला ग्राऊंड नसताना स्पोर्ट्स फी, परीक्षेला उत्तरपत्रिका घरून आणण्यास सांगितले जात असताना स्टेशनरी फीची मागणी शाळा करीत आहे. अशा अवास्तव फी भरण्यास पालकांनी नकार दिला असता, शाळेने विद्यार्थ्यांचे तिमाही निकाल अडवून ठेवत विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केला असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. या प्रकरणाबाबत मनपा शिक्षणमंडळातील तक्रार निवारण मंचाकडूनही सुनावणी करण्यात आली असून, विद्यार्थ्यांवर कोणत्याही परिस्थितीत मानसिक परिणाम होणार नाही, याची काळजी शाळेस घेण्यास सांगण्यात आली होती. परंतु, प्रशासनाला न जुमानता विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवत त्यांच्या मानसिकतेशी खेळत असल्याचे विद्यार्थी-पालक जागृती समितीने सांगितले. याबाबत पालकांनी शाळेतील शिक्षकांना विचारले असता, 'तुमच्या मुलांचे पेपर वकिलांकडे तपासण्यास दिले आहेत, फी भरल्यानंतरच निकाल दाखविण्यात येतील', अशी उत्तरे देऊन पालकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अवास्तव फी वसुलीसाठी शाळेने घेतलेली भूमिका अतिशय चुकीची आहे. फी वाढीसंदर्भात कोणताही कायदेशीर पुरावा नसताना ते या फीची मागणी करीत आहेत.

- नंदकिशोर आहेर, अध्यक्ष, विद्यार्थी पालक जागृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्षप्रक्रिया मंडळासाठी हालचाली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळ (आयजीपीबी) केंद्र सरकारने गुंडाळल्याची बाब 'मटा'ने वृत्तमालिकेद्वारे उघडकीस आणल्यानंतर आता हे मंडळ पुनर्जिवीत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपशी संबंधित वाइन उद्योजकांनी त्यासाठी पुढाकार घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

यूपीए सरकारच्या कार्यकाळात द्राक्ष प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळाची स्थापना करण्यात आली होती. मात्र, केंद्रात सत्तांतर होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित सरकार सत्तेत आले आहे. मात्र, मोदी सरकारने मंडळ सुरू ठेवण्याबाबत फारशी इच्छा दाखवली नाही. अखेर मार्च महिन्यात या मंडळाचे पुण्यातील कार्यालयही बंद करण्यात आले आहे. या मंडळाचे अध्यक्षपद जगदीश होळकर यांच्याकडे होते. होळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संबंधित असल्यानेही मोदी सरकारने या मंडळाकडे दुर्लक्ष केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. देशांतर्गत द्राक्ष प्रक्रिया उद्योगाला आणि खासकरून वाइन उद्योगाला बळ मिळावे यासाठी मंडळाचे अस्तित्व मोलाचे आहे. ही बाब लक्षात घेऊनच द्राक्ष प्रक्रिया क्षेत्रातील भाजपशी संबंधित एका गटाने आता हे मंडळ पुनर्जिवित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. खासकरून पंतप्रधान मोदी यांच्याकडेच हा विषय नेण्याबाबत हा गट आग्रही असल्याचे समजते.

मंडळ पुनर्जिवीत झाल्यानंतर त्याच्या अध्यक्षपदी होळकर यांच्याऐवजी भाजपशी संबंधित व्यक्तीची नेमणूक करण्याचे गटाने निश्चित केले आहे. त्यानुसार येत्या काही दिवसातच पंतप्रधान तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी नाशकातून एक शिष्टमंडळ जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षिकांची मंगळागौर

0
0

नाशिक टाइम्स टीम

विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महिला वर्गाला रोजच्या धकाधकीच्या कामातून दोन आनंदाचे क्षण अनुभवायला मिळावे या उद्देशाने 'एमईटी भुजबळ नॉलेज सिटी'मध्ये श्रावणानिमित्त मंगळागौरीच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात मंगळागौरीच्या आरतीने झाली. यानंतर 'अभिरुची ग्रुप'तर्फे मंगळागौरीच्या खेळांचे सादरीकरण केले. याचबरोबर एमईटी भुजबळ नॉलेज सिटीच्या स्टाफने यात सहभाग नोंदवत वेगवेगळ्या मराठी लोकगीतांवर नृत्य सादरीकरण केले. तसेच कार्यक्रमात जुन्या चित्रफितींचे सादरीकरण ही करण्यात आले.

कालेजच्या स्टाफमधील कल्पना मैत्रे व प्रज्ञा राऊत या दोघींनी या वर्षी आपल्या कक्षा ओलांडत केलेल्या विशेष कामगिरीसाठी‍ त्यांचा गौरव करण्यात आला. एमईटी भुजबळ नॉलेज सिटीच्या शेफाली भुजबळ यांच्यातर्फे त्यांचा सत्कार झाला. मराठी लोकगीतांवर झालेल्या रॅम्प वॉकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर भोजनाने मोठ्या जल्लोषात कार्यक्रमाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणात रोज नवी रांगोळी

0
0

नाशिक टाइम्स टीम

रांगोळीचे विविध प्रकार भुरळ पाडतात. पण रोज विविध प्रकारची रांगोळी दारापुढे काढता यावी यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' व 'ऋतुरंग परिवार' प्रस्तुत 'रोज काढावी नवीन' रांगोळी या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (३१ ऑगस्ट) दुपारी तीन ते पाच यावेळेत हा कार्यक्रम होणार आहे. 'ऋतूरंग भवन' या कार्यक्रमाचे व्हेन्यू पार्टनर आहे.

नंदन रहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्कशॉप होणार आहे. रहाणे गेल्या अनेक वर्षांपापूसन रांगोळीमध्ये विविध प्रकार सादर करतात. याविषयावरील त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. आपल्या अंगणाचे सौंदर्य वाढविणाऱ्या नवनवीन रंगोळी शिकण्यासाठी या वर्कशॉपचा नक्कीच फायदा होणार आहे.

यासाठी कल्चर क्लब सदस्यांना १०० व इतरांना १५० रुपये प्रवेश फी आहे. या वर्कशॉपमध्ये ठिपक्यांची रांगोळी काढण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच मुक्तहस्त रांगोळी कशी काढावी याचेही मार्गदर्शन केले जाईल. ठिपक्यांची व मुक्त हस्त रांगोळी यातील वेगवेगळे डिझाइन्स तसेच कमी जागेत रांगोळी कशी काढावी याचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यासाठी ठिपक्यांचा कागद पुरवला जाणार असून सहभागींनी येताना पेन, पेन्सिल, रबर व रायटिंग पॅड सोबत घेऊन यायचे आहे. वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. यासाठी आजच सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळेत ०२५३-६६३७९३९ या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्वेता-हरिषचे अनोखे रक्षाबंधन सेलिब्रेशन

0
0

नाशिक टाइम्स टीम

'महाराष्ट्र टाइम्स' आपल्या वाचकांना नेहमीच नवनवीन उपक्रमांची मेजवानी देत असतो. अशीच एक संधी 'कल्चर क्लब' सदस्य असलेल्या श्वेता मदाणेला मिळाली 'मटा'च्या 'फॅन नंबर वन' या उपक्रमाच्या माध्यमातून. आपला आवडता अभिनेता हरिष दुधाडेला भेटत तिने त्याच्याशी गप्पा मारल्या.

त्रिमूर्ती चौकातील ज्ञानेश्वर माऊली हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात श्वेताने यावेळी हरिषसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. हरिष आणि तिची भेट झाल्यावर सर्वप्रथम श्वेताने त्याला फुलांचा बुके देऊन त्याचे स्वागत केले. त्याच्याशी ओळख झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या गप्पांना सुरुवात झाली. रक्षाबंधनाच्या सेलिब्रेशनवर चर्चा करताना 'मालिकेमध्ये तू साकारत असलेल्या प्रेमळ भावाची भूमिका बघून मलाही तुझी बहिण बनायला आवडेल', अशी भावना श्वेताने व्यक्त केली. भावा-बहिणीच्या नात्याचे प्रतिक म्हणून तिने हरिषला यावेळी राखी बांधली.

‍हरिष होस्ट करत असलेल्या एका शो सारखाच दुसरा शो अनेक वर्षांपासून महिलांमध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे आपल्या शोच्या लोकप्रियतेविषयी कधी चिंता वाटली का? या श्वेताच्या प्रश्नाला उत्तर देताना 'दुसऱ्यांसोबत तुलना करण्याऐवजी आपला शो यशस्वी करण्यावर मी लक्ष केंद्रित करतो', असे तो म्हणाला. शूटिंगदरम्यान आरोग्याची काळजी कशी घेता? यावर हरिष म्हणाला, 'शोच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात फिरावे लागते. त्यामुळे जिथे असेन तिथे पौष्टिक आहार घेणे, व्यायाम करणे या बाबी जितक्या जास्त शक्य होतील तितक्या करण्याचा प्रयत्न मी करत असतो.' या गप्पांदरम्यान हरिषने त्याला आलेले अनुभव, विनोदी किस्से श्वेतासोबत शेअर केले. आवडत्या अभिनेत्याला भेटण्याची संधी मिळाल्याने श्वेताने 'मटा'चे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांच्या सेवेसाठी ‘मेडिट्रॅकर’

0
0

नाशिक टाइम्स टीम

'मेडिट्रॅकर' हे एक अँड्रॉईड बेस असलेले ऑफलाईन अॅप्लिकेशन आहे. याद्वारे नाशिक शहरातील मुख्य हॉस्पिटल्स, मेडिकल स्टोअर्स, कुंभ हॉस्पिटल्स आणि सरकारी हॉस्पिटल्स या सगळ्यांची माहिती, पत्ते व फोन नंबर्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये ७ भाविक मार्ग हे त्या मार्गांवर असलेल्या हॉस्पिटलप्रमाणे वेगवेगळ्या रंगानी कोडिंग केले आहेत. या अॅपचे वैशिट्य म्हणजे यामध्ये मुख्यतः कॉलिंग, लोकेट हॉस्पिटल आणि फर्स्ट-एड या तीन सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

याचबरोबर यामध्ये हिट मॅपची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे हे अॅप नेमकं कोण कुठून, कोणत्या कारणासाठी वापरत आहे तसेच कोणत्या हॉस्पिटलला कॉल करत आहे हेसुध्दा समजणार आहे. गेल्या वर्षभरापासून आशिष म्हालनकर, प्रणाली जाधव, यश निकम, प्रियंका दवंडे, प्रदित स्वामी आणि रिषभ भारद्वाज या विद्यार्थ्यांनी हे अॅप डेव्हलप करण्याचे काम केले आहे.

कसे वापरणार अॅप?

१. प्ले - स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर या अॅपवर लॉग इन केल्यास सर्व प्रथम युजरचा नंबर द्यावा लागतो.

२. त्यानंतर मुख्य मेनूमध्ये तुमचे लोकेशन डिटेक्ट करून तुमच्या जवळपास असणाऱ्या सर्व मुख्य हॉस्पिटल्सची यादी पाहायला मिळते.

३. त्याचबरोबर इमर्जन्सी सार्व्हिसच्या ऑप्शनवर क्लिक केल्यास अॅम्ब्युलन्सचे नंबरदेखील पुरवण्यात येतील.

४. हॉस्पिटल लोकेटर व मेडी लोकेटरद्वारे शहरात कुठे कुठे हॉस्पिटल व मेडिकल स्टोअर्स उपलब्ध आहे त्याची माहिती मिळेल.

५. यामध्ये फर्स्ट-एडची सुविधा हिंदी, मराठी आणि इंग्लिश या तीन भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये साप चावल्यास, करंट लागल्यास, कुत्रा चावल्यास आणि डोळ्यांचा संसर्ग यावरील प्रथमोपचार सांगितले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षेसाठी फोर्स वन दाखल

0
0

दीड हजार पोलिसांचा खडा बंदोबस्त तैनात

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्टेशन आणि नाशिकरोडची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अतिरेक्यांचा बिमोड करणारे फोर्स वन व पथक हे प्रथमच नाशिकमध्ये दाखल झाले आहे. दरम्यान, पर्वणीच्या आदल्या दिवशी शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी चारपर्यंत नोकरदार वर्ग नाशिकहून अपडाऊन करू शकतो, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावेळी केंद्राच्या विशेष पथकाने ताज हॉटेलमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांना कंठस्नान घालून नागरिकांची सुटका करण्यात आली होती. तसेच राज्याचे फोर्स वन पथक स्थापन करण्यात आले आहे. कुंभमेळ्यात अतिरेकी घुसल्यास त्यांचा तातडीने बिमोड करण्यासाठी नाशिकरोड, साधुग्रामसह आठ ठिकाणी फोर्स वन सज्ज राहील. नाशिकरोडला पोलिस उपायुक्त श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा सहाय्यक आयुक्त, पोलिस निरीक्षकांसह साठ अधिकारी, सातशे पोलिस, चारशे होमगार्डस, तीनशे स्वयंसेवक तैनात आहेत. त्यांच्या मदतीला फोर्स वन, बॉम्बशोधक, श्वानपथक, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या आहेत. चिंचोली पार्किंग, सिन्नरफाटा, बिटको चौक, दसक घाट आदी मोक्याच्या ठिकाणी हे सर्व मनुष्यबळ सज्ज राहील, अशी माहिती नाशिकरोडचे पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी दिली. बिटको, दसकसह महत्त्वाच्या चौकात लाकडी व लोखंडी बॅरिकेडस उभारण्यात आले आहेत.

रेल्वे स्टेशन सज्ज

नाशिकरोड रेल्वे स्टेशनात रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिस यांचे हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. नागपूर, भुसावळ, मुंबई आदी भागातून जवान आले आहेत. प्रवेशद्वारावर रायफलधारी जवान, स्टेशनमध्ये मशीनगनधारी पोलिस, बॉम्बशोधक पथक, श्वान पथक तैनात करण्यात आले आहेत. सिन्नरफाटा, चौथा फ्लॅटफार्म, सुभाषरोड, मालधक्का, बुकींग कार्यालय आदी ठिकाणी जवानांनी पोझिशन घेतली आहे. स्टेशनमध्ये २० मेटल डिटेक्टर, स्कॅनर कार्यरत आहेत. जोडीला सीसीटीव्ही कक्ष २४ तास सुरू आहे. सव्वाशे तिकीट तपासनीस आले आले आहेत. देवळाली कॅम्प आणि ओढा येथेही जवान तैनात आहेत. स्टेशन परिसरात आतापर्यंत दोन रंगीत तालीम घेण्यात आल्या.

सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे यांनी नाशिकरोड स्टेशनमधील सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर भाबल, बी. डी. इप्पर, नारायण न्याहाळदे व अन्य अधिकारी उपस्थित होते. भाविकांचा बाहेर पडण्याचा मार्ग, बसमार्ग आदींची पाहणी करण्यात आली. रेल्वे स्टेशनमधील सीसीटिव्ही कक्षात समन्वयासाठी शहर पोलिसांचाही अधिकारी असेल, अशी माहिती झेंडे यांनी 'मटा'ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कम्प्युटर बाबांचे टेकऑफ रखडलेच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मध्य प्रदेशातील इंदूर येथे प्रस्थ असलेले नामदेवदास त्यागी उर्फ कम्प्यूटर बाबा यांनी शाही मिरवणुकी दरम्यान हेलिकॉप्टर वापरण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे. बाबांच्या अर्जावर प्रशासनाने अद्याप कोणताही विचार केला नसून कम्प्युटर बाबांच्या हेलिकॉप्टरचे टेकऑफ होण्याची कोणतीही चिन्हे यामुळे दिसत नाहीत.

मध्य प्रदेश राज्यात बोलबाला असलेले महामंडलेश्वर कम्प्युटर बाबा काही दिवसांपूर्वी साधूग्राममध्ये डेरेदाखल झाले आहेत. यज्ञ कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करणारे कम्प्युटर बाबा कोट्यवधी रुपये खर्चाचे यज्ञ कार्यक्रम आयोजित करतात. दिगंबर आखाड्याशी निगडीत असलेल्या कम्प्युटर बाबांचा अहिल्यानगर इंदूर खालसामध्ये मुक्काम असून शाही मिरवणुकी दरम्यान हेलिकॉप्टर वापरण्याची मुभा देण्याची विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. साधूग्राम आणि रामकुंड परिसरात हेलिपॅडची कोणतीही सुविधा उपलब्ध नसून सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने बाबांच्या अर्जावर कोणताही विचार केलेला नाही. किंबहुना अशी कोणतीही मंजूरी प्रशासनाकडून दिली जाणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर हा स्टंट असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.

मंजुरी समजावी का?

दरम्यान, प्रशासनाने आपल्या अर्जावर कोणताही अभिप्राय दिला नसून अधिकाऱ्यांची चुप्पी हेच आपल्या अर्जाचे समर्थन समजावे काय? असा प्रश्न कम्प्युटर बाबांनी उपस्थित केला. प्रशासनाला मंजुरी नाकारायची असल्यास त्यांनी ती सबळ कारणे देऊन नाकारावी किंवा अर्जाला मंजुरी तरी द्यावी, असे बाबांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७०० क्युसेसचा पाण्याचा विसर्ग

0
0

शाहीस्नानासाठी गोदामाता सज्ज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तब्बल १२ वर्षे प्रतीक्षा असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिले शाहीस्नान उद्या, शनिवारी सकाळी पार पडेल. या स्नानाच्या तयारीसाठी गोदाघाट सज्ज झाला असून, यासाठी प्रशासन ७०० क्युसेस वेगाने गंगापूर धरणातून पाण्याचा विर्सग करणार आहे. सुमारे २०० दशलक्ष घनफूट पाणी एका पर्वणीसाठी वापरण्यात येणार असून, पावसाने उघडीप दिल्याने नियोजनाच्या दृष्टीने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिले शाहीस्नान शनिवारी सकाळी पार पडेल. गोदापात्रात यासाठी सुरुवातीस ७०० क्युसेस वेगाने आणि नंतर ५०० क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले, की काही दिवसांपासून नदीपात्रात पाणी सोडण्यात आलेले नव्हते. त्यामुळे सुरूवातीस नदीपात्रात वेगाने पाणी सोडण्यात येईल. यानंतर हळूहळू पाण्याचा प्रवाह कमी करून तो ५०० क्युसेस इतका करण्यात येईल. एका पर्वणीसाठी सुमारे १८० ते २०० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. तीन पर्वण्या मिळून ५६० ते ६०० दशलक्ष घनफूट पाण्याचा उपयोग केला जाईल. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने एक हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा गंगापूर धरणात आरक्षित केलेला आहे.

सरासरी ५८ टक्के पाणीसाठा

गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस झालेला नाही. आजमितीस, गंगापूर, काश्यपी आणि गौतमी गोदावरी धरण समुहात ५ हजार ४६१ दशलक्ष घनफूट म्हणजेच ५८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याचदरम्यान वरील धरणांमध्ये ७ हजार २२२ म्हणजेच ७७ टक्के पाणीसाठा होता. सध्या गंगापूरमध्ये ३ हजार ८५६ दशलक्ष घनफूट, काश्यपीमध्ये ९४५ आणि गौतमी गोदावरी धरणात ७८५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. पर्वणीच्या मुहूर्तावर पाऊस नसल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडलेला दिसतो. मात्र, पावसाने अशीच उघडीप दिली तर कुंभमेळ्यानंतर दुष्काळाची परिस्थिती भयाण रूप धारण करू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अश्व, उंटांना कसे आवरणार?

0
0

भुलीसाठी ट्रँक्युलायझर गन अन् प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचे उघड

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्याच शाही मिरवणुकीत तब्बल तीन लाख साधूमहंत आणि सोबतच शेकडो घोडे, उंट असे प्राणीही असण्याची चिन्हे आहेत. नागरिकांच्या गर्दी नियोजनासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या घोडे आणि उंटावर 'लक्ष' ठेवण्यासाठी ट्रँक्युलायझर गनसह विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मात्र, पशु वैद्यकीय विभागाकडे अशी सुविधाच उपलब्ध नसून वनविभागाने देखील हात वर केले आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही मिरवणूक सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरतात. या मिरवणुकीत सहभागी होणारे साधूमहंत वेगवेगळ्या वेशभूषा करतात. तसेच त्यांच्याकडील हत्ती, घोडे, उंट असे प्राणी मिरवणुकीत सहभागी होतात. यंदाच्या मिरवणुकीत हत्ती सहभागी होऊच नये, यासाठी पोलिसांसह जिल्हा प्रशासनाने सुरूवातीपासून प्रयत्न केलेत. त्यानुसार, साधू महंतांनी हत्तींना दूर सारण्याचा निर्णय घेतला. मात्र, घोडे आणि उंट मिरवणुकीत सहभागी होतील. रामकुंडाकडे येणारे सर्वच प्रमुख रस्ते अरूंद असून त्यास शाही मार्ग सुध्दा अपवाद नाही. या

मार्गावर पाळीव गटात मोडले जाणारे घोडे आणि उंट बेताल झाल्यास दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

विभागांची टोलवाटोलवी

शाही मिरवणुकीच्या मार्गावर प्राण्यांना बेशुध्द करण्यासाठी वापरण्यात येणारी ट्रँक्युलायझर गन घेऊन काही प्रशिक्षित कर्मचारी तैनात करण्याची विनंती पोलिस विभागाने जिल्हा प्रशासनाला केली. ती पुढे वन विभागाकडे पाठवण्यात आली. मात्र, वनविभागाने या विनंतीला फेटाळून लावत आमच्याकडे गर्दीत ट्रँक्युलायझेशन वापरण्याचे कौशल्य असलेले कर्मचारीच नसल्याचे स्पष्ट केले. घोडे, हत्ती हे पाळीव गटात मोडतात. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाने त्यावर कारवाई करणे उचित ठरेल, असे वन विभागाने स्पष्ट केले. ​पशुवैद्यकीय विभागाकडे अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. हे काम वन विभागानेच करावे, असा सूर जिल्हा पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लावला. औषधोपचारासाठी त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये पथके

नियुक्त करण्यात आली असून प्राण्यांना काबूत आणण्याची जबाबदारी वनविभागाने पेलावी, असे या अधिकाऱ्याने सांगितले. संबंधित विभाग एकमेकांवर कुरघोडी करीत असून पोलिस विभागाच्या चिंतेत मात्र भर पडते आहे.

आमच्याकडे पाच ट्रँक्युलायझर गन असून त्या जंगली प्राण्यांसाठीच विशेषतः बिबट्यांसाठीच वापरल्या जातात. मोठ्या गर्दीत तेही पाळीव प्राण्यांवर ट्रँक्युलायझर गन वापरण्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाही. याबाबत पोलिस विभागाला कळविण्यात आले आहे. ही जबाबदारी पशु वैद्यकीय विभागाने पार पाडावी. - अरविंद पाटील, मुख्य वन संरक्षक

आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने ट्रँक्युलायझर गन सोबत असलेले कर्मचारी शाही मिरवणूक मार्गावर तैनात करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. त्यावर काही तरी मार्ग निघेल. - पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’सह कुंभ ‘कनेक्ट’

0
0

पर्वणी काळात 'क्यूआर कोड'वर मिळणार माहिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संपूर्ण नाशिककर आणि राज्याचे लक्ष वेधलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिली शाहीपर्वणी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. कुंभमेळ्यातील नेमके नियोजन आणि या काळात घडणाऱ्या घडामोडी जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना असणार आहे. याकाळात भाविकांची, नाशिककरांची गैरसोय होऊ नये तसेच दिवसभरातील घडामोडी जाणून घेता याव्यात यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'नाशिक सिटी कुंभ कनेक्ट' अॅपची मदत होणार आहे.

पर्वणी काळात रस्त्यांचे नियोजन, साधुग्राममधील उपक्रम आणि या कालावधीत असणाऱ्या सोयीसुविधांसोबतच ताज्या बातम्याही या क्यूआर कोडच्या माध्यमातून वाचायला मिळणार आहेत. या क्यूआर कोडच्या माध्यातून कुंभमेळ्यासोबत कनेक्ट राहता येणार आहे.

यासाठी छोटीशी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'नाशिक सिटी कुंभ अप'च्या माध्यमातून नाशिककर आणि बाहेरून येणाऱ्या

भाविकांना या तीन दिवसात कामाचे नियोजन कसे करावे यासाठीदेखील मदत होणार आहे. सर्व पर्वण्यांमध्ये या क्यूआर कोडचा उपयोग करता येईल.

अशी आहे प्रक्रिया

क्यूआर कोड स्कॅनर डाऊनलोड करा

स्कॅनर अॅप्लिकेशन ओपन केल्यावर त्या स्क्रीनसमोर हा फोटो स्कॅन होऊन ही वरील लिंक ओपन होऊन त्यावरून लगेच लिंक ओपन होईल. लिं

कवर क्लिक केल्यावर हवा तो ऑप्शन तुम्हाला निवडता येणार आहे.

असा आहे क्यूआर कोड

क्यूआर कोड स्कॅनरवरून आम्ही सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा. ज्यांच्याकडे क्यूआर कोड स्कॅनर नाही ते गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकतात. हा कोड स्कॅन झाल्यावर http:/cityconnectapps.com/nashik_utility/kumbh/indexMT.html ही लिंक ओपन होईल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर कुंभमेळ्यातील मटा ऑनलाईनवरील अपडेट बातम्या, शाहीस्नानाची वेळ, रस्त्यांचे नियोजन, साधुग्राममधील कार्यक्रम याविषयी हवी ती माहिती उपलब्ध होणार आहे. ज्यांच्याकडे सिटी कनेक्ट अॅप किंवा महाराष्ट्र टाइम्सचे अॅप नाही त्यांनाही या क्यूआर कोडचा फायदा घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता हवा विकासाचा ‘स्मार्ट प्लॅन’

0
0

नाशिक : केंद्र शासन पुरस्कृत स्मार्टसिटी अभियानासाठी राज्यातील नाशिकसह दहा शहरांच्या यादीवर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे नाशिकचा स्मार्टसिटी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता केंद्राच्या तीन टप्प्यापैकी पहिल्या टप्प्यात नाशिकची निवड होते की नंतर याकडे लक्ष लागले आहे. पुढील सहा महिन्यांत नाशिकच्या विकासाचा स्मार्टसिटी प्लॅन तयार करून तो केंद्र सरकारपुढे सादर केला जाणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त सीताराम कुंटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेला पाच वर्षांत एक हजार कोटी रुपये मिळणार असल्याने शहराच्या विकासाला गती मिळणार आहे.

राज्य सरकारने केंद्राच्या स्मार्टसिटी अभियानासाठी राज्यातून नाशिकसह दहा शहरांची शिफारस केली होती. केंद्र सरकारने राज्य सरकारने स्मार्टसिटीसाठी केलेल्या शहरांची शिफारस मान्य केली आहे. गुरूवारी देशभरातील स्मार्टसिटी योजनेत निवड केलेल्या ९८ शहरांची यादी जाहिर केली आहे.

त्यात नाशिकचाही समावेश असल्याने आता स्मार्टसिटी योजनेत नाशिकचा समावेश आता पक्का झाला आहे. त्यामुळे नाशिक शहरात पायाभूत विकासाचे अनेक प्रकल्प राबविले जाणार असून, दरवर्षी २०० कोटींचा निधी केंद्राकडून मिळणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध निकष लावण्यात येऊन गुणात्मक पद्धतीने ही निवड झाली आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषात नाशिकने ८२.५० टक्के गुणांकन मिळवले. त्यामुळे नाशिक राज्यातील यादीत दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.

नाशिकचा विकास हा हवामान, पर्यटन, शेती आणि उद्योगाभोवती केंद्रित आहे. त्यामुळे स्मार्टसिटीत आपला समावेश झाल्याने आता उद्योगांना चालना देण्यासह पुढील पाच वर्षांत रोजगार निर्मिती आणि

आयटी इंडस्ट्र‌ीज प्रोजेक्टना या उपक्रमातून चालना मिळणार आहे. पॅनसिटी प्रोजेक्ट अंतर्गत पूर्ण शहराला फायदा पोहचेल असे प्रकल्प राबविले जाणार आहेत. नवीन छोटे शहरच विकसीत होणार आहे. स्मार्टमध्ये समावेश झाल्याने पाणीपुरवठा, मलजलशुध्दीकरण प्रकल्प, सार्वजनिक परिवहन व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांचे नेटवर्क या विषयांवर शहरात नवीन प्रोजेक्ट राबविले जाणार आहेत. तसेच विभागनिहाय प्रकल्पांमध्ये सर्व सोयींनी सुसज्ज अशा छोट्या शहराची निर्मिती नव्याने नाशिकमध्ये होणे शक्य होणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे उत्पन्न वाढीचे नवे स्रोत तयार करण्यासह मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची दरवाढही नाशिककरांना सहन करावी लागणार आहे. मालमत्ता करातील त्रुटी दूर करणे, वॉटर टॅक्सचे ऑडिट, इमारतींना परवानग्या देतानाचा महसूल गृहीत धरण्यात येणार आहे. रोजगार निर्मितीसह धार्मिक, वाईन, नैसर्गिक हवामान, साहसी पर्यटनाला चालना मिळणार असल्याने नाशिकच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे.

या गोष्टींवर भर....

> समाधानकारक पाणीपुरवठा व्यवस्था > आश्वासक विद्युत पुरवठा > स्वच्छताविषयक व्यवस्था > प्रभावी नागरी दळणवळण व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था > नागरी गरिबांना परवडणाऱ्या घरांची उपलब्धता > सक्षम माहिती तंत्रज्ञान व डिजिटलायझेशन यंत्रणा > सुप्रशासन-ई गव्हर्नन्‍स व नागरी सहभाग > शाश्वत पर्यावरण व्यवस्था > महिला व बालकांची सुरक्षितता > आरोग्य व शिक्षण व पायाभूत सुविधा

उत्पन्नाचे स्त्रोत टिकवण्याचे आव्हान

पुढील सहा महिन्यांत आता नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडे स्मार्टसिटी प्लॅन सादर करायचा आहे. यासाठी केंद्र सरकारकडून आता दोन कोटी निधी मिळणार आहे. या निधीतून स्मार्टसिटी प्लॅन तयार केला जाणार आहे. क्रिसीलमार्फत हा प्लॅन तयार केला जाणार असून, त्यासाठी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त सीताराम कुंटे यांची नियुक्ती केली आहे. हा प्लॅन तयार झाल्यानंतर तो जानेवारीत केंद्राकडे सादर होणार आहे. त्यानंतर ३१ मार्चला स्मार्टसिटी शहरांच्या पहिल्या टप्प्यातील यादीची घोषणा केंद्रातर्फे होणार आहे. यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा एकत्रित निधी जमा करून तो शहर विकासावर खर्च होणार आहे. शहरातील उत्पन्नाचे स्रोत शंभर टक्के पूर्ण कसे राहतील, याची दक्षता प्रशासनाला घ्यावी लागणार असून, नागरिकांना या स्मार्टसिटीच्या अटीशर्तींचे पालन करावे लागणार आहे.

स्मार्टसिटी योजनेत नाशिकचा समावेश केल्याबद्दल आम्ही केंद्राचे आभारी आहोत. आता पहिल्या यादीत समावेश होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी आम्ही सल्लागाराची नियुक्ती करणार असून, चांगलात चांगला प्लॅन तयार करणार आहोत. - डॉ. प्रवीण गेडाम, पालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विद्यार्थ्यांचा भोजनभत्ता थेट बँकेत

0
0

नाशिक : आदिवासी समाजावर विविध प्रयोग करण्याचे आघाडी सरकारचे धोरण युती सरकारनेही कायम ठेवले आहे. आदिवासी वसत‌िगृहांमधील विद्यार्थ्यांना ठेकेदारी पद्धतीतुन मिळणारे भोजन, नाश्त्याच्या व्यवस्था बंद करण्याचा प्रस्ताव आयुक्तालयाने तयार केला आहे. राज्यातील ४९१ वसतीगृहामध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या ६० हजार आदिवासी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट भोजनभत्ता देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविण्यात आला आहे.

आदिवासींच्या विकासाबाबतीत जखम मांडीला आणि मलम शेंडीला लावण्याचे धोरण नेहमीच आखले जाते. आदिवासी वसत‌िगृहांध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, नाश्ता व व्यवस्थेसंदर्भात अनेक अडचणी येत असल्याने आणि या ठेकेदारीत होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी भोजन अनुदान देण्याचा प्रस्ताव आदिवासी आयुक्तालयातर्फे तयार करण्यात आला आहे.

या योजनेतच आता बदल करण्याचा प्रस्ताव आदिवासी आयुक्तालयाने तयार केला आहे. केंद्र सरकारच्या थेट बँक अनुदान योजनेच्या धर्तीवर ही योजना राबविली जाणार असून, त्यासाठीची रक्कमही निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर प्रतिविद्यार्थी दरमहा ३२०० रुपये प्रतिमाह तर, विभागस्तरावर प्रतिविद्यार्थी ३५०० रुपये भोजन अनुदान दिले जाणार आहे. हा पैसा दरमहा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असून, विद्यार्थ्यांने तो आपल्या परिने खर्च करतील. हा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

विद्यार्थी, लोकप्रतिनिधींचा विरोध

थेट अनुदान योजनेला विद्यार्थ्यांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींचा विरोध केला आहे. तर आदिवासी विभागाच्या या प्रस्तावाला विद्यार्थी व आदिवासी लोकप्रतिनिधींचा तीव्र विरोध आहे. एवढेच नव्हे तर काही अधिकाऱ्यांचाही त्याला विरोध आहे. मात्र आदिवासी सचिव राजगोपाल देवरा आणि आयुक्त सोनाली पोंक्षे वायंगणकर यांनी ही योजना रेटली आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसा गेल्यास ते त्याचा गैरवापरच विद्यार्थी अधिक करण्याची शक्यता आहे.

हा प्रस्ताव म्हणजे जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न आहे. आदिवासी मुले भिकेला लागतील. मुलांच्या हातात थेट पैसा पडला तर, ते त्याचा गैरवापरच अधिक करतील. - मधुकर पिचड, माजी आदिवासी मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीसाठी नाशिकनगरी सजली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाच्या निमित्ताने येणाऱ्या लाखो भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी प्रशासनासह नाशिक नगरी सज्ज झाली आहे. साधूमहंताचे पुण्य फलदायी आशिर्वाद मिळावेत अन् हा भक्तीचा महासोहळा अनुभवण्यासाठी देशविदेशातील कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या भाविकांनी नाशिककरांचे आदरातिथ्य स्मरणात ठेवावे यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या रंगीत तालमी करून झाल्या आहेत. ठिकठिकाणी रंगरंगोटी करून प्रशासनाने शहराला नववधूसारखे नटविले आहे. चौकाचौकांमध्ये लावलेल्या ध्वनीक्षेपकांद्वारे भाविकांनी काय करावे आणि काय टाळावे याची साद घातली जात आहे. तब्बल १५ हजार पोलिस आणि पाच हजार होमगार्ड राज्याच्या कानाकोपऱ्यातून नाशिक नगरीत दाखल झाल्याने खाकीमय झाले आहे. साधुग्राम आणि रामकुंडाला भगव्या रंगाचा साज तर ठिकठिकाणी सदरक्षणाय खलनिग्रहणायची ग्वाही देणारे उत्साही पोलिस यांमुळे शहराचा नुरच बदलून गेला आहे.

पहिल्या पर्वणीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच उद्या (दि. २८) सायंकाळपासून शहरात खासगी वाहनांना मज्जाव केला जाईल. शहराला जोडणाऱ्या सातही मार्गांवर केवळ एसटी बसेस धावू लागतील. पोलिस आणि प्रशासनाने केलेल्या या सर्व बदलांकडे नाशिक शहरवासी कुतुहलाने पाहू लागले आहेत. आपण रामकुंडावर आणि शहरातील अन्य भागांत कसे पोहोचणार अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ शहरवासियांकडून उठविले असले तरी क्रॉस ओव्हर पॉईंटचा अवलंब करा असा सहज सोपा पर्याय पोलिसांकडून सांगितला जात आहे. हॉटेल्स रात्री दोनपर्यंत सुरू राहणार आहेत.

त्र्यंबकमध्ये एकेरी मार्ग

त्र्यंबकेश्वर : आखाड्यांच्या शाहीस्नानासाठी सर्वोतपरी तयारी झाली असून, शहरात बहुतांश मार्ग एकेरी करण्यात आले आहेत. शुक्रवार मध्यरात्रीपासून स्नानासाठी आखाड्यांमधून साधू सज्ज होतील. यंदा पंचदशनाम जुना आखाड्याचे साधू पिंपळद येथील रमता पंच छावणी येथून येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images