September 3, 2015, 11:59 am
Vinod.patil @timesgroup.com
नाशिक : कुंभमेळ्यात नागरिकांना रामकुंडापासून लांब ठेवणाऱ्या पोलिसांनी काही मल्टिनॅशनल कंपन्यांना रामकुंडासह शहरातील मुख्य रस्त्यांवर जाहिरात करण्याची थेट परवानगीच देऊन टाकली आहे. यानिमित्ताने पहिल्या पर्वणीत सुरक्षेचा अतिरेक करणाऱ्या पोलिसांनी चक्क महापालिकेच्या अधिकारावरच अतिक्रमण केले. सोबतच लाखो रुपयांच्या उत्पन्नावर घाला घातला आहे. पोलिसांच्या वर्तनाने महापालिका आयुक्त संतापले असून, त्यांनी थेट पोलिस आयुक्तांनाच पत्र लिहून पोलिसांच्या अधिकारांची जाणीव करून दिली आहे. दिलेल्या परवानग्या रद्द करण्यासाठी दबाव वाढवल्याने महापालिका आणि पोलिसांतच जुंपणार आहे.
शहरात कोणतीही जाहिरात लावायची असेल तर त्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते. कोणत्याही शासकीय कार्यालयालाही जाहिरात करावयाची असेल तर, त्यासाठी पालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. स्थायी समिती आणि महासभेच्या परवानगीनंतरच पुढील सोपस्कार पार पडतात. महापालिकांना आर्थिक उत्पन्न मिळावे असा या मागचा शासनाचा उद्देश आहे. पालिकेने सिंहस्थानिमित्त शहरात जाहिरातींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळवायचे ठरवले आहे. त्यासाठी अनधिकृत जाहिरात करणाऱ्या कंपन्या व व्यक्तींवर कारवाई करीत आहे.
आर्थिक उत्पन्नाची पर्वणी साधण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत असतांना दुसरीकडे पोलिसांनी पालिकेच्या या अधिकारावरच गदा आणली आहे. कुंभमेळ्यादरम्यान जाहिराती लावण्यासाठी कंपन्याना परवानगी देण्याचा कोणताही अधिकार नसतांना, पोलिसांनी व्होडाफोन, एअरटेल, केशकिंग, इंटेक्स, नवरत्न, माझा या बड्या कंपन्यांना जाहिरातीसाठी परस्पर परवानगी दिली आहे. रामकुंडासह शहरातील मुख्य रस्त्यांवरही या कंपन्यांना पोलिसांच्या परवानगीचे कारण देत, जाहिराती लावल्याने पालिकेचे नुकसान झाले आहे. पोलिसांच्या या अतिरेकीपणाची पालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. पालिकेच्या अधिकारात अतिक्रमण केल्यावरून थेट पोलिस आयुक्तांनच विचारणा केली आहे. आयुक्तांनी आपल्या अधिकारावर अतिक्रमण झाल्याचे सांगून खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.
आर्थिक व्यवहाराची चर्चा?
पोलिस उपायुक्त विजय पाटील यांच्या सहीने थेट कंपन्यांना फलक उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. भाविकांवर वक्रदृष्टी टाकणारे पोलिस या कंपन्यावर कसे काय मेहरबान झाले, यात आर्थिक व्यवहार घडल्याचीही चर्चा सुरू आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 4, 2015, 1:13 am
मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक
राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत असलेल्या राज्य सरकारवर आणि दुष्काळाच्या मुद्द्यावरून आंदोलनं करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज टीकास्त्र सोडलं आहे. १५ वर्षांत एकही सिंचन प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या राष्ट्रवादीला दुष्काळावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असा सणसणीत टोला त्यांनी हाणला.
कुंभमेळ्यानिमित्त राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी त्र्यंबकेश्वरला धावती भेट देऊन साधू-महंतांशी संवाद साधला होता. त्यानंतर आज नाशकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारचे कान उपटले आणि राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा अजूनही जम बसलेला दिसत नाही. ते मांड ठोकून काम करताना दिसत नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी भागाचे दौरे करण्यापेक्षा तिथल्या जनतेला मदत पुरवावी, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. मात्र त्याचवेळी, राज्य सरकारच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीचाही त्यांनी समाचार घेतला.
दुष्काळप्रश्नी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अलीकडेच रस्त्यावर उतरले होते. गेल्या महिन्यात उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीनं पवारांच्याच नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला होता. त्यानंतर आता १४ सप्टेंबरपासून मराठवाड्यात जेल भरो आंदोलनाचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यांच्या या भूमिकेवर राज यांनी सडकून टीका केली. १५ वर्षं सत्तेत असताना राष्ट्रवादीनं सिंचन प्रकल्प पूर्ण केले असले तर आज ही वेळ आलीच नसती. राज्यातील या दुष्काळी परिस्थितीला राष्ट्रवादीच जबाबदार आहे. त्यामुळे त्यांना दुष्काळावर बोलण्याचा आणि सरकारविरोधात आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही, असं त्यांनी सुनावलं. त्यामुळे आता पवार विरुद्ध राज यांच्यात शाब्दिक चकमक उडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शाही स्नानाच्या दिवशी नागरिकांना अडवणाऱ्या पोलिसांचं राज यांनी समर्थन केलं. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी ही खबरदारी घेतली होती, त्यात त्यांची काही चूक नाही, असं ते म्हणाले. नाशिकचं, कुंभमेळ्यांचं ब्रॅण्डिंग करण्याचा मनोदयही राज यांनी व्यक्त केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 4, 2015, 12:16 pm
pravin.bidve@timesgroup.com
नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून नागरिकांची लूटमार होत असल्याच्या घटना एव्हाना नाशिककरांसाठी सवयीच्या झाल्या आहेत. चोरटे पोलिस असल्याची बतावणी करतात की पोलिसही अशा घटनांमध्ये सामील असू शकतात हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. मात्र, बतावणी करणारे फारच कमी संशयित आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागू शकले आहेत. चोरटे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरतात याचाच अर्थ ते पोलिसांच्या तपास पद्ध्तीच्या एक पाऊल पुढे असल्याचे स्पष्ट होते.
सिंहस्थ काळात येणारे भाविक ही चोरट्यांसाठी मोठी पर्वणी ठरली आहे. म्हणूनच रस्त्यांवर पोलिसांचा वावर वाढला असताना, साधुग्राम सारख्या परिसरात साधुंच्या वेषात पोलिस गस्त घालीत असताना आणि शहरातील कोअर एरिया सीसीटीव्हींनी कव्हर केला असतानाही चोरटे चोऱ्या, जबरी चोऱ्या करण्याचे धाडस करतात, याचाच अर्थ चोरांना पोलिसांचे आणि कायद्याचे भय वाटत नाही, हे स्पष्ट होते. अर्थात नाही म्हटले तरी पोलिस गुन्हे रोखण्यासाठी सक्रीय झाले असून चोरट्यांना पकडण्यात त्यांना बऱ्यापैकी यशही येऊ लागले आहे. मात्र, या पोलिसांपुढे आता नवीनच आव्हान उभे ठाकले आहे. ते म्हणजे स्वयंसेवकांमधील चोरट्या प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना ओळखून त्यांना अद्दल घडविण्याचे.
पोलिसांनी सिंहस्थामध्ये बंदोबस्ताला मदत व्हावी यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. त्याला प्रतिसादही भरपूर मिळाला. काही हजार स्वयंसेवकांना पोलिसांनी मदतीसाठी घेऊन त्यांना विशेष पास प्रदान केले. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी त्यांची मदत व्हावी हा त्यामागील मुख्य उद्देश होता. बहुतांश स्वयंसेवकांचा पोलिसांना फायदा झाला असला तरी अनेक स्वयंसेवकांनी भाविकांवर काठ्या उगारण्याचे प्रकार घडल्याच्या तक्रारी आता पोलिसांना प्राप्त होऊ लागल्या आहेत. ऑर्डरशिवाय पोलिस जेथे काठ्या उगारण्याची हिमंत दाखवित नाहीत तेथे स्वयंसेवकांकडून दिलेल्या अधिकाराचा गैरवापर होणे प्रशासनाने गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळेच स्वयंसेवकांची संख्या कमी करण्याचा विचार पोलिस करू लागले आहेत.
भाविकांच्या लुटमारीतही काही स्वयंसेवकांनी हात धुऊन घेतल्याची पोलिसांची खात्री पटली आहे. सात ते आठ स्वयंसेवकांनी भाविकांजवळील वस्तू हातोहात लांबविल्याच्या घटना पहिल्या पर्वणीवेळी घडल्या असून पोलिसांनी त्याचीही गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पर्वणीत शिरकाव करणाऱ्या अशा विघ्नसंतोषी घटकांचा बंदोबस्त करणे पोलिसांपुढील आव्हान असणार आहे.
परकीय चलनावरही डल्ला
पंचवटी परिसरातून ८०० इस्त्रायली डॉलर, चेकबुक तसेच लॅपटॉप व तत्सम मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार इस्त्रायलमधून नाशिकमध्ये आलेल्या एका तरुणाने दिली आहे. परदेशी नागरिकांचा ऐवजही हातोहात लांबविला जाऊ लागल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांची नाचक्की होत आहे. ती टाळण्यासाठी पोलिसांनाच विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 4, 2015, 12:17 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सिडकोतील कामटवाडे शिवारात सध्या पाणीप्रश्न बिकट बनत चालला असून पाण्याअभावी रहिवाशांचे अत्यंत हाल होत आहे. वाटेल तेव्हा पाणीकपात होऊनही या भागात कमी दाबाने पाणी येत असल्याने रोजचे पिण्याचे पाणीदेखील मिळू शकत नसल्याची तक्रार परिसरातून करण्यात येत आहे.
शहराला वर्षभर पाणी पुरवठा व्हावा यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणकपातीचा निर्णय मध्यंतरी घेण्यात आला होता. त्यानुसार सिडकोतील आनंदनगर, वृंदावननगर, विठ्ठलनगर परिसरात पाणीकपात करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी ही पाणीकपात पूर्ववत करण्यात आली. परंतु, या भागात मात्र पूर्वीपासूनच कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवाशांचे हाल होत आहे. नोकरदार वर्ग तर मेटाकुटीला आला आहे कारण पाण्यासाठी दाबच नसतो. त्यामुळे दोन-दोन दिवस पाण्याविनाच जात असल्याचे चित्र आहे. या भागात मोटरने पाणी खेचणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पाणी आल्यानंतर अनेकांकडून मोटर सुरू करण्यात येते.
त्यामुळे शेजारच्या दोन ते चार घरांना पाणीच मिळत नाही. कमी दाबाने पाणी असल्याने मोटारीने पाणी ओढत असल्याचे उत्तर देऊन इतरांच्या वाट्याचेही पाणी पळवले जात आहे. त्यातच या भागात सर्वाधिक बांधकामे सुरू आहे. त्यामुळे इमारतींवर पाण्याचे लोट सोडले जातात. पिण्यासाठी पाणी नाही तर बांधकामांना पाणी मिळतेच कसे? असा संतप्त सवाल परिसरातून केला जात आहे.
मोटारीने पाणीउपसा
काही ठिकाणी पाणी भरून झाल्यानंतरही मोटारी सुरूच असतात. या प्रकारामुळे पाणी भरताना नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडते. प्रशासनाने या प्रश्नी गांभिर्याने लक्ष घालून पाण्याचा दाब वाढवावा, अशी मागणी सिडको भागातून केली जात आहे.
सिडकोतील पाणीस्त्रोतही आटले
परिसरात पूर्वी हापसा व बोअर सुरू असायचे त्यामुळे तेथून वापरासाठी पाणी मिळवणे शक्य होत असे. परंतु, आता हे पाण्याचे इतर स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे इतर ठिकाणांहून पाणी मिळत नाहीत व कमी दाबामुळे घरातही पाणी यात नाही, अशा द्विधा अवस्थेत महिलावर्ग सापडला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 4, 2015, 12:18 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानात गेल्या चौदा दिवसांत ९ हजार ५०० रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. येथे सुरू असलेल्या आरोग्यसेवा उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून, संस्थानतर्फे समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज रुग्णालय व फिरता दवाखाना २४ तास कार्यरत आहे.
गेल्या १९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत येथील ओपीडीत ४३०८ रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. डॉ. अरुण भगत येथे उपचार करीत आहेत. शिवाय येथे आरोग्य शिबिर घेऊन तिथे एक तज्ज्ञ डॉक्टर येऊन गंभीर आजारावर उपचार केले जात आहेत. अशा तज्ज्ञ डॉक्टरांकडून आत्तापर्यंत ९७९ रुग्ण तपासून उपचार करण्यात आले. येथे हृदयरोग, फिजीओथेरपी, वंध्यत्व व टेस्टट्यूब, नेत्ररोग तपासणी यासंदर्भातील रुग्णांवर उपचार करण्यात आले.
या दवाखान्यात आत्तापर्यंत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत राणे (मुंबई), फिजीओथेरपीस्ट तज्ज्ञ डॉ. सौरभ फडकुले, डॉ. मृणाल कांबळे, वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. चंदशेखर साकोलीकर, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मगर, आदींनी तपासणी व उपचार केले. संस्थानने साधुग्राममध्ये एक फिरता दवाखाना सुरू केला आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तो जिथे जिथे थांबतो तिथे रांगा लागतात. यामध्ये डॉ. राम पांचाळ, त्यांचे दोन सहकारी डॉक्टर, दोन नर्स उपचार करीत आहेत. अशा तऱ्हेने या आरोग्यसेवेतून एकूण ९५०० रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.
संस्थानचा हा सेवाभावी उपक्रम कुंभमेळ्यात चर्चेचा विषय झाला आहे. साधुग्राममधील सर्व साधू-संत, येथे येणारे भाविक यांची यामुळे चांगली सोय झाली आहे. येथे उपचार घेतलेल्या रुग्णांच्या संख्येवरूनच या उपक्रमास मिळालेला प्रतिसाद लक्षात येतो. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, कृषी प्रदर्शन, अन्नछत्र, आरोग्य शिबिरे, धर्मजागृती, कीर्तन असे अनेक सेवाभावी उपक्रम राबविले जात आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 4, 2015, 12:19 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
साध्वी प्रज्ञासिंग यांची कायमस्वरूपी सुटका होणे अपेक्षित असून, संजय दत्तला एक न्याय आणि साध्वी प्रज्ञासिंगला दुसरा न्याय, असे दुहेरी धोरण निश्चितच खेदजनक असल्याची टीका षडदर्शन साधू मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत गरीबदास महाराजांनी केली.
लष्कर तसेच स्थानिक पोलिसांनी पकडलेल्या खऱ्या दहशतवाद्यांच्या माफींचा विचार होतो. मात्र, साध्वी प्रज्ञासिंग यांची अवहेलना केली जाते. गेल्या काही वर्षांपासून सरकारचे लक्ष मंदिर आणि मठांच्या उत्पन्नावर पडले आहे. दिसेल त्या मंदिरावर सरकार कब्जा करीत असून, मंदिरांची देखभाल करणे सुध्दा मुश्किल होत असल्याचे गरीबदास महाराजांनी सांगितले. यावेळी षडदर्शन साधू मंडळाचे मध्य प्रदेश राज्याचे अध्यक्ष कम्प्युटर बाब, महंत लक्ष्मण दास, महंत नृसिंह महाराज आदी उपस्थित होते. लाखो भाविक स्नान करीत असल्याने नदीपात्र तसेच पाणी तातडीने स्वच्छ करणे गरजेचे आहे. अन्यथा रोगराईला सामोरे जावे लागेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. कम्प्युटर बाबांनीही प्रशासनाच्या धरसोड वृत्तीवर सडकून टीका केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 4, 2015, 12:21 pm
म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर
शंकराचार्यांना कुशावर्तावर स्नानासाठी जात असताना त्यांच्या वाहनाचा लाल दिवा काढून अडवणूक करणे हे षडयंत्र असल्याचे स्वतः शारदा व ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थानिमित्त ते मुक्कामी असून, कैलासराज नगर येथील निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिल्या शाहीस्नानादरम्यान शासन यंत्रणांचा अनुभव अनाकलनीय ठरला असून, यामागे हिंदुचे सर्वोच्च पीठ असलेल्या शंकराचार्यांना महाराष्ट्रात अशी वागणूक मिळणे खेदजनक असल्याचे नमूद केले. केरळ, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये गेलो असता तेथे राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो. राजशिष्टाचारासह लाल दिव्याची गाडी व सुरक्षा व्यवस्था असते. येथे मात्र मला अत्यंत चुकीची वागणूक मिळत आहे. शाही पर्वणीच्या पूर्वसंधेला आपल्या वाहनाचा लाल दिवा काढून घेतला जातो व वाहन जप्त करण्यासाठी पोलिस येतात हे शासनाला शोभनीय नाही. आपल्याला मिळालेल्या पोलिसी वागणुकीचा छडा लागलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या जप्त केलेल्या लाल दिव्याबाबत शासनाने काय निर्णय घेतला अद्याप समजलेले नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 4, 2015, 12:22 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
साधुग्राममध्ये मोठ्या संख्येने सफाई कामगार नियुक्त केल्याने कमालीची स्वच्छता असल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरल्याचे दिसून येत आहे. साधुुग्राममध्ये ठिकठिकाणी कचरा दिसून येत असल्याने तेथे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत.
सिंहस्थानिमित्त साकारलेल्या साधुग्राममध्ये साधू, महंतांसह भाविकांचा निवास आहे. येथे दररोज भाविक व पर्यटकांची मोठी रेलचेल असते. त्याशिवाय अन्नदानाचे मोठे कार्यही तेथे सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर साधुग्राममध्ये स्वच्छता असणे आवश्यक आहे. पण, सफाई कामगार नियुक्त असतानाही ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग पहायला मिळत आहेत. या सर्व प्रकरणाची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने त्वरित सफाई तसेच कचरा गोळा करण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी साधू, महंतांनी केली आहे.
प्लास्टिक कचरा अधिक
साधुग्राममध्ये प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिकचे ग्लास, पत्रावळी, प्लास्टिक बाटल्या यांचे प्रमाण मोठे असून, यामुळे कचऱ्याच्या विघटनाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने योग्य ते नियोजन करून प्लास्टिकच्या वापरावर अंकुश आणावा, असे मत भाविकांकडून व्यक्त होत आहे.
अनेक कामगार बसून
साधुग्राममध्ये नियुक्त अनेक सफाई कामगार ठिकठिकाणी निवांत बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच साधुग्राममध्ये स्वच्छता पूर्णपणे होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 4, 2015, 12:23 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
साधुग्राममध्ये स्वाईन फ्लूपाठोपाठ अतिसाराचेही रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी (दि.४) एका साधूचा अतिसारामुळे मृत्यू झाला. गुलचंद सरजून मुखिया (वय ७०, रा. नेपाळ, सध्या रा. तपोवन) असे त्या साधूचे नाव आहे. साधुग्राममधील इतरही १५ साधू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तपोवनातील जानकी बाग आखाड्यात राहणाऱ्या मुखिया यांना गुरुवारी (दि.३) जुलाब, उलट्या होऊ लागल्या. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांची गर्दी
नाशिक : रामकुंड, साधुग्राम, पोलिस आयुक्तालय, डोंगरे वसतिगृह आदी प्रमुख ठिकाणांवर पोलिसांची सातत्याने गर्दी झालेली दिसते. शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास वरील ठिकाणी हजारो पोलिसांना नवीन बदलांबाबत माहिती देण्याचे काम सुरू होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 4, 2015, 12:24 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पहिल्या पर्वणीत कुशावर्त चौकाजवळ निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती टाळता यावी, यासाठी प्रशासनाने नियोजनात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्र्यंबकेश्वरमधील तेली गल्लीच्या कॉर्नरवरच मिरवणुकीतील वाहने अडवून तेथून साधू-महंतांना वेगळ्या मार्गाने तर त्यांच्या समवेत येणाऱ्या भाविकांना स्वतंत्र मार्गाने सोडण्यात येणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथील पहिल्या पर्वणीत पहाटे साडेचारच्या सुमारास जुना आखाड्याची मिरवणूक तेली गल्लीपर्यंत आल्यानंतर तेथे साधू आणि भाविकांची एकच गर्दी झाली. या गर्दीला पांगवितांना एकच गोंधळ उडाला. सुदैवाने यावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र, पुढील दोन पर्वण्यांमध्ये असे प्रकार घडू नयेत यासाठी तेली गल्लीच्या कॉर्नरवरच मिरवणुकीतील वाहने थांबवून त्यांना दुसऱ्या मार्गाने बाजूला करण्यात येणार आहे. तसेच साधू-महंतांनी तेथे उतरून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुशावर्ताकडे पायी जावे, अशी विनंती त्यांना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यासाठी लवकरच साधू-महंतांची आम्ही भेट घेणार आहोत, असे या अधिकाऱ्याने सांगितले. साधू-महंतांसमवेत होणारी भाविकांची गर्दी रोखण्यासाठी या उपाययोजनेची मदत होईल, असा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.
दुसऱ्या पर्वणीसाठी केलेल्या नियेाजनाची माहिती विभागप्रमुखांनी यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांना द्यावी आणि त्यानुसार व्यवस्थेत आवश्यक बदल करावेत, असे आदेश डवले यांनी यावेळी दिले. बैठकीस जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदी उपस्थित होते.
डवले म्हणाले, लक्ष्मीनारायण घाट परिसरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता तेथील जीवरक्षकांची संख्या वाढविण्यात यावी. त्या भागात आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात. नियोजनातील बदलानुसार स्वच्छता सुविधा, पाणीपुरवठा, रुग्णवाहिका आदींबाबतही आवश्यक नियोजन त्वरित करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
ईदगाह मैदानाचा वापर मोटरसायकली, तसेच एसटी बसेसच्या पार्किंगसाठी करण्याचा तसेच, नव्या बदलानुसार विविध मार्गांवर आवश्यक सूचनाफलक लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. बैठकीत मार्गातील बदल, अंतर्गत वाहतूक सुविधा, भाविकांसाठी बसेसची सुविधा आदींबाबत चर्चा करण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 4, 2015, 12:25 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शैव आणि वैष्णव असा वाद निर्माण झाल्याने इंद्रदेव महाराजांना 'श्री श्री १००८ यज्ञपीठाधीश्वर धर्मसम्राट विद्यावाचस्पती' ही पदवी घेण्यासाठी थेट त्र्यंबकेश्वर गाठावे लागले. नाशिकमधील कार्यक्रम रद्द झाल्यानंतर साधुग्राममधील मुक्कामच हलवण्याची तयारी त्यांनी चालवली आहे.
इंद्रदेव महाराज यांना श्रीपंचायती आनंद आखाड्याचे महंत सागरानंद सरस्वती यांच्याकडून दोन-तीन दिवसांपूर्वी गुरुमंत्र घेतला. त्यानंतर लगेचच त्यांना धर्मसम्राट विद्यावाचस्पती पदवी बहाल केली जाणार होती. त्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता साधुग्राममध्ये जगद्गुरू जनमेजय शरण यांच्या कॅम्पमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास सागरानंद सरस्वती यांच्यासह शैव पंथीय आखाड्यांचे इतरही साधू-महंत हजर राहणार होते. दरम्यान, या कार्यक्रमाची माहिती वैष्णव आखाड्यांना समजल्यानंतर आखाडा परिषदेसह साधू-महंत आक्रमक झाले. हीच पदवी आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही सागरानंद सरस्वतींचा नाद सोडा, असा दमच वैष्णव आखाड्यातील महंतांनी इंद्रदेव महाराजांना दिला. संध्याकाळी रात्री उशिरा झालेल्या राड्यानंतर इंद्रदेव महाराजांनी हा कार्यक्रम रद्द करणार असल्याचे सांगितले. रात्री उशिरा झालेल्या घडामोडींची माहिती इंद्रदेव महाराजांच्या अनुयांनांना नव्हती. त्यामुळे त्यांची गर्दी झाली. वादापेक्षा लोभ बरा, असे सांगत इंद्रदेव महाराजांनी त्र्यंबकेश्वर गाठले. तिथे सागरानंद सरस्वतींच्या हस्ते पदवी स्वीकारली. दरम्यान, आखाडा परिषदेसह प्रमुख अनी आखाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने हा वाद पुन्हा उद्भवू शकतो. त्यामुळे इंद्रदेव महाराज आपला मुक्काम हलवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 4, 2015, 12:27 pm
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर येथे श्री इंद्रदेवजी महाराज यांना आनंद आखाड्याच्या वतीने श्री श्री १००८, श्री विद्यावाचस्पती धर्मसम्राट पदवीदान आणि आखाड्याच्या परंपरेत सामावून घेत त्यांना श्री १००८ मंहत स्वामी इंद्रदेवेश्वरानंद महाराज असे नामाभिदान करण्यात आले. नाशिक येथे हा सोहळा पार न पडल्यामुळे त्र्यंबकनगरीत झाला. या पदवीदान सोहळ्यालाही शैव-वैष्णव वादाची किनार लागली.
मथुरा येथील इंद्रदेव महाराज हे प्रसिध्द असे भागवत कथाकार आहेत. पदवीदान समारंभात शैव-वैष्णव वाद निर्माण होण्याची शक्यता झाल्याने सर्व तयारी करून देखील नाशिक येथील कार्यक्रम रद्द झाला. सर्वांच्या इच्छेखातर त्र्यंबक येथे दुपारी हा कार्यक्रम झाला. आखाडा परिषदेचे अध्यक्ष, निरंजनी आखाड्याचे श्रीमहंत नरेंद्रगिरी महाराज आणि आनंद आखाड्याचे स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदवीदान सोहळा झाला.
या प्रसंगी त्र्यंबकेश्वर येथील आनंद आणि निरंजनी अशा दोन्ही आखाड्यांचे रमता पंच उपस्थित होते. तसेच, सर्व शैव आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्वामी शंकरानंद सरस्वती, गणेशानंद महाराज, साध्वी शिवानी दुर्गा, रवींद्रपुरी महाराज, डॉ. बिंदू महाराज आदींसह साधू-महंत उपस्थित होते. ह. भ. प. माधव महाराज राठी यांनी सूत्रसंचालन केले. समीर पाटणकर आणि सहकाऱ्यांनी पौरोहित्य केले. येथील स्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी भजन भक्तीगीतांनी सर्वांना मोहून टाकले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 4, 2015, 12:28 pm
म. टा. वृत्तसेवा, सटाणा
शहरातील मंगलनगरसह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पालिकेच्या वतीने होणारा नळपाणीपुरवठा होऊ न शकल्याने पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त महिलांनी सटाणा नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. पालिकेने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.
गत पंधरवड्यापासून शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. सात दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे आश्वासित करूनही तब्बल पंधर दिवस उलटून देखील नळांना पाणी न आल्याने शुक्रवारी मंगलनगर परिसरातील संतप्त महिलांनी रौंद्ररूप धारण करीत ११ वाजेच्या सुमारास सटाणा नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना यामुळे पालिकेत प्रवेश करणे गैरसोयीचे होत होते. पिण्याच्या पाण्यासोबतच या भागात दोन महिन्यापासून आरोग्य विभागाने जंतूनाशक फवारणी व गटारीची साफसफाई न केल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आंदोलकांचे रौद्ररूप बघता नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण यांना तत्काळ पाचारण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुलोचना चव्हाण यांनी गिरणा व आरम नदी कोरड्याठाक झाल्याने विहिरीमधून चोवीस तासात केवळ दोन लक्ष लिटर पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे केळझर येथून टँकरद्वारे पाणीपुरवठा करून जलशुध्दीकरण केंद्रात टाकून शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलगतीने काम सुरू असल्याचे सांगितले. यानंतर संतप्त महिलांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी प्रभागाचे नगरसेवक अनिल कुवर, शिवसेनेचे उपशहरप्रमुख नंदू सोनवणे, गोंविद पवार, सुरेश खलाले, नाना बोरसे, चंदू सोनवणे, आशाबाई खलाले, जिजाबाई शेवाळे, लताबाई सोनवणे, रूखलाना मन्सुरी, अंजनाबाई खैरनार, सुरेखा बोरसे, आनंदाबाई अहिरे, तसलिमा मन्सुरी, शाहिन शेख, शमा मन्सुरी, राधा गायकवाड, गंगुबाई गांगुर्डे आदींसह महिला उपस्थित होत्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 4, 2015, 11:31 am
नाशिकरोड : जमिनीच्या वादातून जेलरोडच्या मधुकर आढाव या शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी विशाल पवार, हेमंत केदारे, आबासाहेब चौधरी, किरण रसाळ, रणजित तालखे, शुभम आदमने, यश गरुड, देवीदास तोरणे यांना अटक केली. नाशिकरोड न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली. उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेसमधून निवृत्त झालेले शेतकरी मधुकर शिवराम आढाव यांचा मौजे दसक येथे प्लॉट आहे. ते मुलगा कैलास व श्रीकांतसह शेती करतात. त्यांच्या प्लॉटचा वाद कोर्टात प्रलंबित आहे. आढाव ३ सप्टेंबरला कोर्टातून घरी परतले. सायंकाळी संशयित वाहनांमधून फ्लाटवर आले आणि आढाव यांच्या नावाची पाटी काढून फेकून दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 4, 2015, 11:32 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड
बिटको हॉस्पिटलमध्ये खोकला आणि उलटीच्या त्रासामुळे दाखल झालेल्या गर्भवतीचा डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करूनही शुक्रवारी मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात हैदोस घातला. कर्मचाऱ्यांना मारहाण करून डाॅक्टरांना कोंडले. सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहळदे आदींनी नातेवाईकांची समजूत घालत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
बिटकोचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंती फुलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मंगेश मोरे यांच्यासह सुमारे १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस व बिटकोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणी संदीप लाखे ही २२ वर्षाची महिला तीन महिन्यांपूर्वी मनेगाव (जि. जालना) येथून जेलरोडच्या कॅनलरोडवरील इंदिरा गांधी झोपडपट्टीत माहेरी आली होती. प्रकृती खालावल्यामुळे आई लताबाई खोबरडे हिने तिला गुरुवारी (दि. ३) रात्री बिटकोमध्ये दाखल केले. मध्यरात्री तिची प्रकृती खालवली. शुक्रवारी सकाळी साडेआठला राणीचे निधन झाले. नातेवाईकांच्या मते लाखेकडे डॉक्टरांनी लक्ष दिले नाही. स्ट्रेचरवरून पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला.
कर्मचाऱ्यांना मारहाण
नातेवाईकांनी अतिदक्षता विभाग, लॅब व अपघात कक्षात प्रचंड तोडफोड केली. हल्लेखोरांना रोखणाऱ्या नजमा पठाण या सुरक्षारक्षकाच्या पाठ, हात आणि पायावर लोखंडी सळईने वार केले. रुक्साना कुरेशी, शिवाजी रघुनाथ ठुबे, सागर भोळे हे कर्मचारी हल्ल्यात जखमी झाले. अपघात विभागातील ट्रेनी डॉक्टर शिल्पा सिंग आणि डॉ. अफशा खान यांना शिवीगाळ करून शेजारील कक्षात कोंडले. कर्मचारी सविता यशवंते यांचे पाचशे रुपये लुटण्यात आले.
प्रशासन पाठीशी
आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम महापालिकेतील विभागप्रमुखांसह बिटकोत दाखल झाले. जखमी कमचाऱ्यांची विचारपूस करत डॉक्टरांना धीर दिला. हल्लेखोरांकडून तोडफोडीने झालेला खर्च वसूल केला जाईल, असे सांगितले. प्रशासन बिटकोतील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. घडलेल्या प्रकाराची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. येथे सुरक्षारक्षकांची संख्या वाढवून सीसीटीव्ही बसविण्यात येतील. प्रसंगी बॉक्सरही नेमले जातील. येथील ओपीडीमध्ये दररोज ८०० रुग्ण येतात. २२ कर्मचारी जादा काम करून त्यांना सेवा देतात. तरीही त्यांच्यावर हल्ले होतात ही खेदजनक बाब आहे, असेही ते म्हणाले.
हृदयविकाराच्या त्रासामुळे मृत्यू
बिटकोचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी लाखे ही बाळंतपणासाठी नाही तर खोकला व उलट्याचा त्रास होत असल्याने दाखल झाली होती. हृदयविकाराचा आजार असल्याने तिने गरोदरपणाचा धोका पत्करू नये, असा सल्ला डाक्टरांनी अगोदरच दिला होता. जूनमध्येही हृदयविकाराचा त्रास झाल्याने तिला दाखल करण्यात आले होते. तेव्हा तिला शालीमारच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. गुरुवारी रात्री साडेबाराला राणी लाखेला दाखल करण्यात आले. डॉ. रिना काळदाते यांनी तिच्यावर उपचार केले. पहाटे पाचला लाखेला श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यावर डॉ. काळदाते आणि डॉ. सीताराम गावित यांनी तिला इंजेक्शन दिले. तिच्या थुंकीतून रक्त आल्यावर आईला कळवून अतिदक्षता विभागात हलविले. शुक्रवारी सकाळी आठला तिची प्रकृती खालावल्यानंतर तातडीने उपचार करण्यात आले. पावणे नऊला राणी लाखेचे निधन झाले.
मातेसह बाळांचे वाचविले प्राण
पोलिओ ट्रिपल डोस देण्याचा वार असल्याने शुक्रवारी बिटकोचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून जुन्या ओपीडीचेचे प्रवेशद्वार उघडे ठेवण्यात आले होते. हल्लेखोरांमुळे दहशतवादी आले, बॉम्बस्फोट झाला अशी अफवा पसरली. बाळाला पोलिओ ट्रिपल डोस देण्यासाठी आलेल्या माता व रुग्णांमध्ये दहशत पसरली. शंभर दीडशे लोकांनी एकाच गेटमध्ये गर्दी केली. तेथे चेंगराचेंगरी झाली. एका महिलेचे तीन महिन्याचे बाळ पडून जखमी झाली. काही गर्भवतीही खाली पडल्या. एका हल्लेखोराने काच घेऊन कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मनीषा रमेश धुने या कर्मचाऱ्याने ओपीडीमध्ये आणि रिटा गायकवाड या कर्मचाऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून गरोदर महिलांना स्त्रीरोग विभागात घेऊन त्यांचे जीव वाचवले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 4, 2015, 11:34 am
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
गोदापार्क प्रमाणेच बॉटनिकल गार्डनचा विकास होणार असून अन्य कंपन्याही नाशिकच्या विकासाला मदत करणार आहेत. त्यामुळे नाशिक शहर आपण राज्यात रोलमॉडेल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. स्मार्ट सिटी कशी असेल हेच आपण लोकांना दाखवणार आहेत. तसेच समाजाचे देणं लागत असल्यानेच टाटा फाऊंडेशनने या प्रकल्पासाठी मदत केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
पांडवलेणी शेजारील नेहरू वन उद्यानात नाशिक महापालिका व टाटा फाऊंडेशनच्या वतीने विकसित करण्यात येत असलेल्या बॉटनिकल गार्डनच्या कामाचे भूमीपूजन राज ठाकरेंच्या उपस्थित शुक्रवारी झाले. यावेळी टाटा फाऊंडेशनचे कार्यकारी विश्वस्त आर. रामानूज, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमीत बग्गा, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकरेंनी सांगितले, की बॉटनिकल गार्डन विकसित करण्याची आपली आठ ते नऊ वर्षांपूर्वीची इच्छा होती. मात्र, आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांची भेट घेतल्यानंतर, असे कुठे झाले नसल्याचे सांगत अप्रत्यक्ष नकार दर्शवला होता. मात्र, विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकल्पाला मदत केल्याने ते साकारू शकले. टाटांना कल्पना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत, काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या प्रकल्पाची देखभाल महापालिका करणार आहे. टाटा फाऊंडेशन व महापालिकेच्या वतीने हे गार्डन अतिशय सुंदर व पर्यटकांसाठी आकर्षित करणारे ठरेल.
अन्य गार्डनही पूर्ण करणार
शहरातील अन्य प्रकल्प व गार्डनसुद्धा खाजगी कंपन्यांच्या वतीने पूर्ण केले जाणार आहेत. भविष्यात नाशिक हे रोलमॉडेल राहणार असून स्मार्ट सिटी कशी असते ते मी लोकांना दाखवणार अहे, असे ठाकरे यांनी सांगितले. शहरातील उद्यानांच्या देखभालीत काही त्रुटी राहिल्या असून त्या दूर केल्या जातील, असेही ते म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 4, 2015, 11:39 am
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
वडाळागाव व शिवाजी येथील घरकुल योजनेच्या अपूर्ण कामांवरून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वात शुक्रवारी या भागातील झोपडपट्टीधारकांनी महापालिकेवर दस्तक दिली. घरकुल योजनेत २८४ घरांची सोडत होऊनही घरांचे वाटप झाले नसून, १३०० घरांच्या प्रतीक्षेत झोपडपट्टीधारक आहेत. त्यामुळे या झोपडपट्टीधारकांना तत्काळ घरे देण्यासाठी पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
महापालिकेने शहरातील झोपडपट्टीधारकांसाठी घरकुल योजना राबवली असून, १६ हजार घरांची योजना आठ हजारांवर आली आहे. परंतु, घरांची संख्या कमी होऊनही योजना पूर्ण करण्यात पालिकेला यश आलेले नाही. वडाळागाव व शिवाजीवाडी येथील दोन हजार घरांची योजना १३०० घरांवर आणली आहे. परंतु, ती घरेही पूर्ण झालेली नाहीत. गेल्या पाच सहा वर्षांपासून झोपडपट्टीधारक घरांची वाट बघत आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही लोकांना घरे दिली नाहीत. त्यामुळे या भोंगळ कारभाराविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले. त्यांनी शुक्रवारी शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली या झोपडपट्टीधारकांनी महापालिकेवर धडक देत घरकुल मिळण्याची मागणी केली. तयार केलेल्या इमारतींची तत्काळ डागडूजी करून ती हस्तांतरीत करण्यात यावी, अशी मागणी केली. अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. घरकुल लवकर ताब्यात दिले नाही तर, आंदोलन करण्याचा इशारा झोपडपट्टीधारकांनी दिला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 4, 2015, 11:44 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जम्मू व काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री व काँग्रेस नेते ताराचंद यांनी गोवर्धन पीठाधिपती शंकराचार्य स्वामी अधोक्षाजानंद देवतीर्थ महाराज यांची भेट घेऊन तेथील राजकीय घडामोडींवर चर्चा केली. स्वामी अधोक्षाजानंद हे काँग्रेस पक्षाचे निकटवर्तीय मानले जातात. जम्मू व काश्मिरमध्ये सत्ताधारी पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष व भारतीय जनता पक्षात कुरबुरी सुरू आहेत. हे सरकार केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अधोक्षाजानंद व ताराचंद यांच्यादरम्यान महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते.
जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे. त्याचा फटका बसून हे सरकार कोसळेल. लागलीच काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होईल, अशी शक्यता चर्चिली जात आहे. त्यादृष्टीने काँग्रेस नेते तयारीत गुंतले आहेत. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री ताराचंद यांनी अधोक्षाजानंद महाराजांशी बंद खोलीत दोन तास चर्चा केली. ताराचंद गुरुवारी साधुग्राममध्ये मुक्कामी होते. पीडीपी आणि भाजपाचे बिघडलेले संबंध, काँग्रेसचे भवितव्य, हुरियत कॉन्फरन्सशी केंद्र सरकारशी झालेले वाद आदी विषयावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. झेड प्लस सुरक्षा असलेल्या ताराचंद यांच्या दौऱ्याची कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. ते अचानक साधुग्राममध्ये दाखल झाले. यानंतर आज, शुक्रवारी सकाळी त्यांनी कपिला संगम येथे स्नान केले. यानंतर विश्वशांती यज्ञात सहभाग नोंदवला. स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा यांना दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आले. शुक्रवारी सकाळी ते नाशिकमधून रवाना झाले. अधोक्षाजानंद महाराज देशभरातील वेगवेगळ्या बंडखोर संस्था आणि सरकारमध्ये दुव्याचे काम करतात.
धर्माच्या मार्गदर्शनाखाली अनेक समस्यांवर मार्ग निघतात. नक्षलवाद, बंडखोरी यावर सुध्दा धर्म हाच एकमेव पर्याय दिसतो. राजकीय नेता त्यातील एक माध्यम असून, त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा सातत्याने होत असते.
अधोक्षाजानंद, शंकराचार्य
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 4, 2015, 11:38 am
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिका हद्दीतील ३० वर्षांहून अधिक कालावधी झालेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी काढले आहेत. शहरातील सर्व संस्था, मालक व भोगवटादार यांना त्यांच्या इमारतीचे सुस्थितीचे प्रमाणपत्र विभागीय कार्यालयात सादर करणे बंधनकारक केले आहे. स्ट्रक्चरल ऑडिट न करणाऱ्या भोगवटादार व मालकांना २५ हजाराचा दंड आकारण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी तीन सल्लागार संस्थांची नियुक्ती केली आहे.
शहरातील जुन्या इमारतींचा धोका लक्षात घेत आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी संस्था, मालक व भोगवटादार यांच्यासाठी सदर नोटीस जारी केली आहे. नोटीसनुसार इमारतीला महापालिकेने कम्प्लिशन सर्टिफिकेट दिल्याच्या दिनांकापासून किंवा इमारतीचा भोगवटा करण्यास परवानगी दिल्याच्या दिनांकापासून ३० वर्षांचा कालावधी संपला असेल, अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणे सक्तीचे केले आहे.
इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे व त्याबाबतचे तपासणी प्रमाणपत्र देण्याच्या कामासाठी तीन सल्लागार संस्थांची नियुक्ती केली आहे. भोगवटदार किंवा इमारतीचे मालक यांनी संबंधित संस्था किंवा महापालिकेकडे नोंदणी असलेल्या बांधकाम अभियंत्यांकडून आपले स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊन बांधकाम तपासणीचे सर्टिफिकेट महापालिकेकडे जमा करणे बंधनकारक केले आहे. स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर संबंधित अभियंत्याने शिफारस केलेली दुरुस्तीची कामे इमारत मालकांनी तातडीने करून घेऊन त्याबाबतचे काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर करणेही बंधनकारक आहे.
यासाठी येणारा खर्च हा संबंधित इमारत मालक व भोगवटादार यांनी संबंधित नियुक्त सल्लागार संस्थांनी स्वखर्चाने करावे, असे म्हटले आहेत. त्यासाठी परीक्षण शुल्क प्रति चौ. मी. २३ रुपये किंवा किमान पाच हजार रुपये अधिक सेवा कर याप्रमाणे आकारले जाणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालकांना किंवा भोगवटादार यांना २५ हजार रुपये किंवा संबंधित इमारतीच्या मालमत्ता कराएवढी रक्कम दंड म्हणून आकारली जाणार आहे.
स्ट्रक्चरल ऑडिटसाठी संस्था
सिव्हिल टेक, कान्हेरेवाडी
मविप्रचे कर्मवीर अॅड. बाबूराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग.
संदीप पॉलिटेक्निक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 4, 2015, 11:36 am
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
दुष्काळी प्रश्नावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील युती सरकारसह राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्र सोडले आहे. सरकारचे कामकाज असमाधानकारक असून ते अजूनही मांड ठोकून काम करत नसल्याची टीका ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी दुष्काळाचे दौरे करण्यापेक्षा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. दुसरीकडे, 'राष्ट्रवादी'चे दुष्काळी दौरे म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. राज्यातील दुष्काळाला 'राष्ट्रवादी'च जबाबदार आहे. त्यामुळे त्यांना दुष्काळावर बोलण्याचाही अधिकार नसल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.
पाडंवलेण्याजवळील बॉटनिकल गार्डनच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना ठाकरे यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य सरकारसह 'राष्ट्रवादी'वर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री व मंत्र्यांचे दुष्काळाचे दौरे कशाला हवेत? दौरे करण्याऐवजी प्रत्यक्षात लोकांना हवे ते पुरवा, दौरे करून काहीच होणार नाही, त्यापेक्षा चारा,पानी दिले तर तेवढाच दिलासा मिळेल. दुष्काळाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील युती सरकारची कामगिरी समाधानकारक नाही. सरकार अजूनही मांड ठोकून काम करत नसल्याने परिस्थिती सुधारत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्यातील दुष्काळाला राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार आहे. पंधरा वर्षात राज्यातील एकही जलसिंचन प्रकल्प पूर्ण होवू शकला नाही. प्रकल्प पूर्ण झाले असते तर आजची ही परिस्थिती उदभवली नसती. त्यामुळे आजचा दुष्काळ हा 'राष्ट्रवादी'मुळेच निर्माण झाला आहे. 'राष्ट्रवादी'चे दुष्काळावर दौरे म्हणजे मगरीचे अश्रू असल्याची टीका त्यांनी केली आहे.
सुरक्षेवरून पोलिसांची पाठराखण
पहिल्या पर्वणीत शहराला युद्धभुमीचे स्वरूप देणाऱ्या पोलिसांच्या कृतीचे राज ठाकरे यांनी समर्थन केले आहे. पोलिसांनी अशी परिस्थिती काही जाणून बूजून उभी केली नाही. सुरक्षेच्या काळजीपोटी हा अतिरेक झाला आहे. मुंबईहून यायला मलाही भिती वाटत होती. त्यामुळे आपणही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, असे सांगून त्यांनी पोलिसांची उघड पाठराखण केली आहे. कुंभमेळ्याचे कामाचे श्रेय कोणा एकाला नसून त्यात महापालिका आणि राज्य सरकाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
हा तर शुद्ध मूर्खपणा
राज्यातील लोकप्रतिनिधींवर टीका केल्यास देशद्रोह ठरेल असे परिपत्रक काढणाऱ्या राज्याच्या गृह विभागावरही ठाकरेंनी टीका केली. लोकप्रतिनिधींविरूद्ध का नाही बोलायचे असा सवाल करत, आधी लोकप्रतिनिधींना जबाबदारीने वागायला शिकवा असा सल्ला त्यांनी दिला आहे. सरकारने असा आदेश काढला असेल तर हा शुद्ध मूर्खपणा आहे. हा अभिव्यक्ती स्वांतत्र्यावरही घाला असल्याची टीका त्यांनी केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧