prashant.desale@gmail.com
नाशिकः संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने सिंहस्थ कुंभमेळ्याला येणारा गर्दीचा ओघ बराचसा ओसरला आहे. परतीचा पाऊस तरी येता का, की तो ही पाठ दाखवून जातो, या भीतीमुळे किमान महाराष्ट्रातील तरी भाविक आणि पर्यटक धास्तावले आहेत. मात्र काही पर्यटक असेही आहेत की जे शेकडो किलोमिटरचा प्रवास करून नाशिकनगरीत येत आहेत. यादरम्यान त्यांना असे अनेक नाशिककर भेटत आहेत की ज्यांच्यामुळे या पाहुण्यांना अतिथी देवो भवःचे महत्त्व पटत आहे. ओडिशाहून आलेल्या दाम्पत्याला असा काही अनुभव आला की नाशिकने त्यांच्या मनात घर केलं.
संतोष देव आणि नलिनी देव हे तरुण दाम्पत्य आपल्या साडे तीन वर्षाच्या मुलाला घेवून सिंहस्थ् कुंभमेळ्यासाठी नाशिकला आलं. ओडीशातील अंगुल येथील जिंदाल प्लॅंटमध्ये संतोष देव मोठ्या पदावर आहेत. ओडिशात नोकरी लागण्याआधी त्यांना नागपूरच्या एका कंपनीत नोकरीची संधी आली होती. मात्र, आपला प्रांत सोडून इतक्या दूर कसे जायचे, तेथील कल्चर आपल्याला सूट होईल का, तिथली माणसं कशी असतील, त्यात भाषेची अडचण या सगळ्या समस्यांमुळे त्यांनी ती ऑफर झुगारली आणि ओडीशातच स्थायिक झाले. मात्र, कुंभमेळ्यानिमित्त नाशिकला आल्यावर त्यांना आपल्या 'त्या' निर्णयावर पश्चाताप झाल्याचे ते सांगतात. 'यहाँ लोक बडे को-ऑपरेटिव्ह है, बाहर से आये है, फिर भी एैसा नही लगता की यह दुसरा प्रांत है', असं संतोष देव सहज बोलून गेले.
नाशिकबाबत, इथल्या प्रवासाबाबत त्यांनी खूप काही सांगितले, खासकरून दिलीप जाधव यांच्याबाबत. दिलीप जाधव हे नाशिकच्या हजारो रिक्षाचालकांपैकीच एक. कुंभमेळ्याच्या काळात रिक्षावाल्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असली, तरी परप्रांतातून येणाऱ्या पर्यटकांना शहरात फिरविणे तितकेसं सोपं नाही. त्यांची भाषा, हा रिक्षावाला आपल्याला फसविणार तर नाही ना? ही प्रवाशांच्या मनातील भावना या सगळ्या गोष्टी दिसतात तितक्या सोप्या नाहीत. विशेष म्हणजे रिक्षावाले पर्यटकांना जी काही वागणूक देतात, त्यावरूनच बऱ्यापैकी पर्यटक हे इथल्या लोकांच्या स्वभावाबाबत अंदाज बांधतात. संतोष आणि नीलिमा देव यांना नाशिक नवीन. मात्र, जाधव यांनी त्यांच्याकडून कुठलाही दर न ठरवता, त्यांना संपूर्ण रामकुंड परिसरात तसेच शहरात इतर ठिकाणी फिरविले. इतकेच नव्हे तर रामकुंडावर कुठे जायचे, काय पहायचे, मंदिरांबाबत माहिती, आमुक मंदिर कुणाचे, विविध चौकांची नावे याबाबत इंत्यभूत माहिती दिली. याबाबत नीलिमा देव म्हणाल्या, 'वैसे तो दिलीपभाई को हम जाणते भी नही, लेकीन इन्होंने हमारा पुरा ख्याल रखा, दर्शन के लिए मदत भी की, और किराये के बारे में भी हिचकिचाहट नही की, सच कहू तो तुम्हारे नासिक के रिक्षावाले इमानदार है...' निलीमा देव यांच्या या एका वाक्याने नाशिकच्या संपूर्ण रिक्षावाल्यांना एक प्रमाणपत्रच बहाल केलं होतं.
जाधव यांच्यासारखे हजारो रिक्षावाले आज अनेक पर्यटकांची नाशिक शहरात दर्शनासाठी ने-आण करीत आहेत. तसं पाहिलं तर कुठल्याही शहरात चहावाले आणि रिक्षावाल्यांबाबत कुणी चांगलं बोललं तरच नवल. रिक्षावाला अमूक ठिकाणी सोडायचे कितीही रुपये म्हंटला तरी प्रत्येक प्रवाशांना ते जास्तच वाटतात. त्यामुळे शहर कुठलेही असो, रिक्षावाले सगळीकडे सारखेच असतात असा एक गैरसमज आज समाजात पसरला आहे. मात्र जाधव यांच्यासारखे काही रिक्षावाले आजही आहेत, की जे संपूर्ण शहराचे प्रतिनिधीत्व करतात. आपल्या शहराचे नाव खराब होणार नाही यासाठी प्रयत्न करतात. कुंभमेळ्यात आलेले सगळेच पर्यटक रिक्षा करतात असे नाही; मात्र जे करतात त्यांना जर रिक्षावाल्यांकडून चांगली वागणूक मिळाली तर नक्कीच नाशिक पर्यटकांचं सर्वात आवडतं शहर बनणार, यात शंका नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट