टीम मटा
राज्यभरातील दुष्काळी परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाभरात जेलभरो आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाभरात रास्तारोको आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून सुटका केली. नाशिक शहरासह जिल्हाभरात सुमारे ४५ हजारापेक्षा जास्त कार्यकर्त्यांना जेलभरो आंदोलनामध्ये अटक करण्यात आली.
मालेगावला रास्तारोको
मालेगाव तालुक्यात दाभाडी येथे सुनील कबाडे, तालुकाध्यक्ष गुलाब चव्हाण, राजेंद्र भोसले, अरुण देवरे यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील दाभाडी येथील प्रवेश द्वाराजवळ रास्तारोको करून आंदोलन करण्यात आले. दोन तास रास्तारोको केल्यानंतर आंदोलकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. या आंदोलनात किशोर इंगळे, आर. के. बच्छाव, काशिनाथ पवार, धर्मा पवार, आनंदसिंग ठोके, भरत आखाडे, बाळासाहेब बागुल, अशोक पवार, दौलत पवार, अशोक सूर्यवंशी आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कळवणला जेलभरो
कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, मविप्र संचालक रवींद्र देवरे, पक्ष निरीक्षक डॉ. योगेश गोसावी, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, ज्येष्ठ नेते नारायण हिरे, कळवण पंचायत समितीचे माजी सभापती कौतिक पगार, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समितीच्या सभापती संगीता ठाकरे, उपसभापती संजय पवार, प्रवीण रौंदळ, जितेंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली कळवण बसस्थानकाजवळ जेलभरो आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून कळवणला दुष्काळी जाहीर करावे, प्रत्येक गावाची आणेवारी ५० पैशांच्या आत लावावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे यांनी केली.
दिंडोरीत घोषणाबाजी
संपूर्ण कर्जमाफीसह तत्काळ दुष्काळी उपाययोजना कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कादवाचे अध्यक्ष तथा साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक-कळवण मार्गावर सुमारे दीड तास रास्तारोको करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर सुमारे आठशेहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून सुटका केली.
कृऊबाचे सभापती दत्तात्रय पाटील, जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, दिंडोरी रायुकाँ तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, विश्वासराव देशमुख, आनंद चौधरी, शोभा मगर, शेतकरी नेते भास्कर गोडसे, रघुनाथ पाटील आदींनी आंदोलकाना मार्गदर्शन केले.
बागलाणमध्ये आंदोलन
बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तालुक्यातील सटाणा, वीरगाव, ताहाराबाद व नामपूर येथे रास्ताराको आंदोलनासह जेलभरो आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार व बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सटाणा येथील शिवाजी पुतळ्याजवळ तब्बल दोन तास रास्ताराको व जेलभरोल आंदोलन छेडण्यात आले. पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांनी यावेळी आंदोलकांना ताब्यात घेतले.
ताहाराबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांच्या नेतृत्वाखाली तर नामपूर येथे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, जायखेडा येथ जि. प. सदस्य यतीन पगार यांच्या नेतृत्वाखाली तर वीरगाव येथै पंचायत समितीचे उपसभापती वसंत भामरे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास येथील शिवाजी पुतळ्याजवळ रायुकाँचे पदाधिकारी, शेतकरी आपल्या बैलजोड्यांसह जनावरे घेऊन मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाले. विंचूर-शहादा-प्रकाशा राज्य महामार्ग बंद पाडण्यात आल्यानंतर या ठिकाणी सभा घेण्यात आली. यावेळी आमदार दीपिका चव्हाण, जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, पांडूरंग सोनवणे, किरण पाटील यांची भाषणे झाली.
सिन्नरमध्ये निषेध
नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर बसस्थानकासमोर माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सिन्नर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा, जनावरांना मोफत चारा द्या, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करा, अशा घोषणा देत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत अटक केली. पोलिस ठाण्यात नेल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, राजाराम मुरकुटे, संजय काकड, अर्जुन बोडके, डॉ. विष्णू अत्रे, राजेंद्र भगत, संध्या भगत, राजेंद्र बलक, डॉ. संदीप लोंढे, संतू पाटील, कल्पना रेवगडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
इगतपुरीत अटक
इगतपुरी तालुक्यात तालुकाध्यक्ष गोरख बोडके व इगतपुरी शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत रास्ताराको व जेलभरो आंदोलनाला प्रारंभ झाला. सचिन पिंगळे, गोरख बोडके, प्रल्हाद जाधव, पांडूरंग वारुंगसे, सुनील वाजे, ज्ञानेश्वर फोकने, हिरामण कौटे, उत्तम सहाने, उमेश खातळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होत. जुना मुंबई-आग्रा महामार्गावर सुमारे दोन तास जाम झाला होता. पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक करून दोन तासांनी सोडून दिले.
येवल्यात वाहतूक कोंडी
अॅड. माणिकराव शिंदे, बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, राधाकिसन सोनवणे, हुसेन शेख, संतू झांबरे, जि. प. सदस्य प्रवीण गायकवाड, प्रकाश वाघ, बाबा थेटे, हारिभाऊ जगताप, बाळासाहेब लोखंडे, दत्तात्रय वैद्य, राजू पवार आदींनी आंदोलनात भाग घेतला. सुमारे एक तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे मनमाड-नगर राज्य तसेच नाशिक-औरंगाबाद या दोन राज्य महामार्गावरील येवला चौफुलीवरील चारही बाजूकडील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती.
या आहेत मागण्या
पीककर्ज व वीजबिले माफ करावीत, सर्व वसुल्या थांबवाव्यात, जनावरांच्या छावण्या सुरू करून चारा, पाणी व पशुखाद्य पुरवावे, दुष्काळी भागातील जनतेला तातडीने पिण्याचे पाणी पुरवून टँकरची संख्या व खेपा वाढवाव्यात, दुष्काळी भागातील जनतेला अन्नसुरक्षा योजनेत सहभागी करून प्रती किली २/३ रुपये दराने गहू, ज्वारी, तांदूळ त्याचप्रमाणे तुरडाळ या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा, शेतावर रोजगार हमी योजना राबवून उत्पादक स्वरुपाची तसेच जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट