म. टा. वृत्तसेवा, सटाणा
सटाणा शहराच्या पश्चिमेकडील बायपास रस्त्यांच्या शुभारंभप्रसंगी मुंजवाड येथील शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केल्याने बायपासची मागणी करणाऱ्या वकील संघाला घटनास्थळावरून काढता पाय घ्यावा लागला. खासदार-आमदारांसह अधिकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊनही शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्याने अखेर माघार घेत सन २००३ मधील राज्यमार्ग १९ च्या कामाचा नारळ फोडण्याची नामुष्की खासदार-आमदारांवर आली. दरम्यान, एका महिन्याच्या आत बायपास रस्ता कामाचे सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांची भूमिका समाजावून घेऊनच अखेर निर्णय घेण्याचा सुवर्णमध्य काढण्यात आला.
सकाळी १० वाजेच्या सुमारास मुजंवाड येथून सटाणा बायपास मार्गाचा पश्चिमेकडील रस्ता कामाच्या शुभारंभाप्रसंगी घटनास्थळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दीपिका चव्हाण यांच्यासह बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी. सी. झांबरे, वकील संघाचे सर्व सदस्य, नगरसेवक व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शुभारंभाप्रसंगी मुंजवाडचे माजी सरपंच राजेंद्र जाधव, जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी, दौलत जाधव, वैभव अहिरे यांनी तीव्र आक्षेप घेतला.
वकील संघाचे अध्यक्ष अॅड. पंडित भदाणे यांनी वकील संघाला बाह्य वळण रस्त्याची आवश्यकता असून, आम्हाला यात राजकारण नको असून, तोडगा हवा असल्याची भूमिका घेतली. अॅड. सरोज चंद्रात्रे यांनी बायपासचे महत्त्व विषद करीत भारत-पाकिस्तान प्रमाणे भांडू नये, असे आवाहन केले. मात्र, शेतकऱ्यांनी आपली विरोधाची भूमिका तीव्र ठेवली. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी शेतकऱ्यांना सामंजस्याची भूमिका घेत सन २००३ मधील रस्ता विकासकामाचा शुभारंभ करून देण्याची विनंती करीत बायपास वळण रस्ता कामात मुंजवाडमधील कामांचे एक महिन्याच्या आत सर्व्हेक्षण करून किती शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करावी लागेल यांची माहिती घेऊन नंतरच शेतकऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आवाहन केले. अखेर बायपास कामाचा नारळ न फोडता विकासकामांचा नारळ वाढवून लोकप्रतिनिधींना माघारी फिरावे लागले. या प्रसंगी सा. बां. विभागाचे उपकार्यकारी अभियंता झांबरे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढून एक महिन्यात सर्व्हेक्षण अहवाल सादर करण्याची भूमिका घेतली. या प्रसंगी वकील संघाचे सदस्य अभिमन्यू पाटील, सोमदत्त मुंजवाडकर, नाना भामरे, नगरसेवक काका रौंदळ, राजेंद्र सोनवणे, भारत खैरणार, सुमनबाई सोनवणे, सिंधुबाई सोनवणे, सुशीला रौंदळ, लालचंद सोनवणे, साहेबराव सोनवणे, पंकज ततार, जगदीश मुंडावरे, श्रीधर कोठावदे, आण्णा अहिरे, डॉ. प्रशांत पाटील, सचिन सावंत आदींसह मान्यवर उपस्थित होते.
आत्मदहनाचा इशारा
रस्ता कामाच्या शुभारंभास मुंजवाडच्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून बायपास नेणार असल्यास प्रसंगी आत्मदहनाची भूमिका घेतली. जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी यांनी पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात गावठाण जागा नाही, प्रत्येक कुटुंबीयांना सरासरी दीड एकर शेतीचे क्षेत्र येत असल्याने वळण रस्त्यास विरोध असल्याचे नमूद केले. तसेच शहराचा पूर्वेकडील बायपास योग्य असताना पश्चिमेकडील बायपासला आमचा विरोध असल्याची भूमिका या ठिकाणी विषद केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट