Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पाण्यामुळे सिन्नरकर त्रस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर शहरात अनेक दिवसांपासून नगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठा अनियमित व अपुरा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दारणा धरणात पुरेसा पाण्याचा साठा असताना केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सिन्नरकरांना पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे. शहरातील बहुतेक भागात तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा होत असून, नगरपालिकेच्या गलथान काराभाराने ऐन सणासुदीच्या काळात शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

केवळ वीजपुरवठ्याचे कारण व रस्त्याच्या कामामुळे पाइपलाइन तुटल्याच्या कारणामुळे पाणी पाणीपुरवठ्याचे तीन तेरा वाजले आहे. नगरपालिका प्रशासन व विद्यमान नगरसेवक या प्रकरणी अनभिज्ञ असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाणी सोडण्याच्या वेळा निश्चित नसल्याने कर्मचाऱ्यांची मनमानी झाल्याने कधीही पाणी सोडण्याचे प्रकार होत असल्याने नागरिकांना पाण्याची वाट पाहत तिष्ठत बसावे लागते. अनेकांना पाण्यावाचून वंचित राहावे लागते.

वीजपुरवठ्याचा व्यत्यय

पळसे ता नाशिक येथील पंपिंग स्टेशनवरील खंडित वीजपुरवठ्यामुळे सिन्नर शहर, मुसळगाव, माळेगाव, नगरपरिषदेचा वाढीव भागात पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. याबाबत आमदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता यांना लेखी सूचना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रक धडकेने २ ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर कॉलेजजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू ट्रकने धडक दिल्याने कॉलेज विद्यार्थिनी व परप्रांतीय कामगार जागीच ठार झाले, तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. अपघातानंतर ट्रक डाव्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबावर आदळून उलटला. त्यामुळे विजेची हायटेंशन वायर तुटली. सुदैवाने कोणालाही विजेचा घक्का बसला नाही, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

सोमवारी दुपारी साडेबारा वाजता हा अपघात झाला. यावेळी सकाळचे कॉलेज सुटण्याची तर दुपारचे कॉलेज भरण्याची वेळ होती. रस्त्यावर दोन्ही बाजूंनी विद्यार्थी ये-जा करीत असताना भर गर्दीच्या वेळी हा अपघात झाला. नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर कॉलेजजवळील कडवा कॉलनी जवळून दीपाली सोपान बोराडे (वय १७, रा. सिन्नर) व तिची मैत्रीण मोनिका चंद्रभान पवार (वय १७, रा. सिन्नर) या कॉलेजमधून सिन्नरकडे परतत होत्या. त्यावेळी नाशिकहून भरधाव वेगाने मागून येणारी मालट्रक (एम एच ०४ सी ए ४०५) ने या विद्यार्थिनींना धडक दिली. त्यानंतर त्यांच्या पुढे चालत असलेले दोघे परप्रांतीय कामगार यांनाही ट्रकने धडक दिली. या धडकेत दीपाली बोराडे व वकील जोधू अहमद (वय १८, रा. उत्तरप्रदेश) हे जागीच ठार झाले. मोनिका पवार ही विद्यार्थिनी व कामगार मुजफर अली अहमद हे बालबाल बचावले. अपघातानंतर चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या डाव्या बाजूला विजेच्या खांबावर हा मालट्रक आदळला. या धडकेत खांबावरील विजेची हायटेन्शन वायर तुटली. तसेच, ट्रकचे पुढची चाकेही तुटली. सुदैवाने विजेचा धक्का कोणाला बसला नाही.

चालकाला चोप

अपघातात वाचलेला परप्रांतीय कामगार मुजफ्फर अली आपल्या लहान भावासह सिन्नर येथे दोन महिन्यापूर्वी ज्युसचा धंदा करण्यासाठी आला होता. देवी मंदिराच्या रस्त्यावर जुसचा ते व्यवसाय ते करीत होते. दोघे सायकल घेऊन माल आणण्यासाठी रस्त्याने चालले होते. समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दोन्ही मुलींसह त्याच्या भावाला धडक दिली. हे बघून मालट्रकच्या चालकाला मुजफ्फरने यथेच्च चोप दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायपास मार्गाला आडकाठी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराच्या पश्चिमेकडील बायपास रस्त्यांच्या शुभारंभप्रसंगी मुंजवाड येथील शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केल्याने बायपासची मागणी करणाऱ्या वकील संघाला घटनास्थळावरून काढता पाय घ्यावा लागला. खासदार-आमदारांसह अधिकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊनही शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्याने अखेर माघार घेत सन २००३ मधील राज्यमार्ग १९ च्या कामाचा नारळ फोडण्याची नामुष्की खासदार-आमदारांवर आली. दरम्यान, एका महिन्याच्या आत बायपास रस्ता कामाचे सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांची भूमिका समाजावून घेऊनच अखेर निर्णय घेण्याचा सुवर्णमध्य काढण्यात आला.

सकाळी १० वाजेच्या सुमारास मुजंवाड येथून सटाणा बायपास मार्गाचा पश्चिमेकडील रस्ता कामाच्या शुभारंभाप्रसंगी घटनास्थळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दीपिका चव्हाण यांच्यासह बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी. सी. झांबरे, वकील संघाचे सर्व सदस्य, नगरसेवक व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शुभारंभाप्रसंगी मुंजवाडचे माजी सरपंच राजेंद्र जाधव, जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी, दौलत जाधव, वैभव अहिरे यांनी तीव्र आक्षेप घेतला.

वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडित भदाणे यांनी वकील संघाला बाह्य वळण रस्त्याची आवश्यकता असून, आम्हाला यात राजकारण नको असून, तोडगा हवा असल्याची भूमिका घेतली. अ‍ॅड. सरोज चंद्रात्रे यांनी बायपासचे महत्त्व विषद करीत भारत-पाकिस्तान प्रमाणे भांडू नये, असे आवाहन केले. मात्र, शेतकऱ्यांनी आपली विरोधाची भूमिका तीव्र ठेवली. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी शेतकऱ्यांना सामंजस्याची भूमिका घेत सन २००३ मधील रस्ता विकासकामाचा शुभारंभ करून देण्याची विनंती करीत बायपास वळण रस्ता कामात मुंजवाडमधील कामांचे एक महिन्याच्या आत सर्व्हेक्षण करून किती शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करावी लागेल यांची माहिती घेऊन नंतरच शेतकऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आवाहन केले. अखेर बायपास कामाचा नारळ न फोडता विकासकामांचा नारळ वाढवून लोकप्रतिनिधींना माघारी फिरावे लागले. या प्रसंगी सा. बां. विभागाचे उपकार्यकारी अभियंता झांबरे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढून एक महिन्यात सर्व्हेक्षण अहवाल सादर करण्याची भूमिका घेतली. या प्रसंगी वकील संघाचे सदस्य अभिमन्यू पाटील, सोमदत्त मुंजवाडकर, नाना भामरे, नगरसेवक काका रौंदळ, राजेंद्र सोनवणे, भारत खैरणार, सुमनबाई सोनवणे, सिंधुबाई सोनवणे, सुशीला रौंदळ, लालचंद सोनवणे, साहेबराव सोनवणे, पंकज ततार, जगदीश मुंडावरे, श्रीधर कोठावदे, आण्णा अहिरे, डॉ. प्रशांत पाटील, सचिन सावंत आदींसह मान्यवर उपस्थित होते.

आत्मदहनाचा इशारा

रस्ता कामाच्या शुभारंभास मुंजवाडच्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून बायपास नेणार असल्यास प्रसंगी आत्मदहनाची भूमिका घेतली. जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी यांनी पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात गावठाण जागा नाही, प्रत्येक कुटुंबीयांना सरासरी दीड एकर शेतीचे क्षेत्र येत असल्याने वळण रस्त्यास विरोध असल्याचे नमूद केले. तसेच शहराचा पूर्वेकडील बायपास योग्य असताना पश्चिमेकडील बायपासला आमचा विरोध असल्याची भूमिका या ठिकाणी विषद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगाला उपासमारीची समस्या भेडसावणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'जगाला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या ही उपासमार असून त्याचे कारण हे दुष्काळ किंवा अन्नधान्याचा तुटवडा नसून लोकांची उपलब्ध अन्नधान्य विकत घेण्याची क्रयशक्ती नाही.' असे प्रतिपादन डॉ. गोविलकर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आयोजित तीन दिवसीय कृषि तंत्रज्ञान महोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. तंत्रज्ञान महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी 'सामाजिक संरक्षण आणि कृषी : ग्रामीण दारिद्रय चक्रभेद' या विषयावर जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील होते.

अन्न व कृषी संघटना दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी एक विषय घेऊन जागतिक अन्न दिन साजरा करत असते. यावर्षी 'सामाजिक संरक्षण आणि कृषी : ग्रामीण दारिद्रय चक्रभेद' हा विषय घेऊन हा दिवस साजरा केला जात आहे.

जगातील ७०० कोटी लोकसंख्येपैकी ८५ कोटी लोकसंख्या ही उपासमारीने ग्रस्त आहे. विशेष म्हणजे यातील जवळपास निम्याने लोकसंख्या ही आशिया खंडातील आहे. यात महिला व लहान मुलांची संख्या जास्त आहे. ४ कोटी लोक यामुळे दरवर्षी भूकबळीचे शिकार होतात. या देशांत अन्नधान्याचा तुटवडा नसूनही केवळ या लोकांची ते खरेदी करण्याची क्रयशक्ती नसल्याने ते या समस्येने ग्रस्त आहेत अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. लोकसंखेपेक्षा अन्नधान्याची वाढ ही जास्त आहे ही आशेची बाब असली तरी अन्नधान्यातील कमी पोषणमूल्य ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक स्तरावर मोठ्या उद्योग धंद्यातील गुंतवणुकीपेक्षा छोट्या शेतीक्षेत्रात गुंतवणुकीला प्राधान्य देण्याची शिफारस केली जात आहे. सामाजिक संरक्षणाचाच हा भाग आहे. सामाजिक संरक्षणासाठी अन्न व कृषि संगठना त्रिसूत्री राबविण्यावर भर देत आहे. यात श्रम बाजारपेठेत हस्तक्षेप, सामाजिक विमा कवच व सामाजिक सहाय्य या बाबींचा समावेश असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

प्रा. रावसाहेब पाटील यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात कृषि क्षेत्रात तंत्रज्ञाच्या वापरावर भर देताना सांगितले कि आपल्या देशात छोटे व सीमांत शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असून त्यांनी आपल्या शेतात तंत्रज्ञाचा वापर करून उत्पादनक्षमता वाढवण्याची गरज आहे. त्याचबरोबर अश्या शेतकऱ्यांनी केवळ पिकांवर अवलंबून न राहता कृषिपूरक जोडधंदे करावेत. वर्षभर उत्पन्न स्रोताची निर्मिती व संपूर्ण कुटुंबाला काम यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे व कृषि विज्ञान केंद्राने यावर काम केले असून शेतकऱ्यांना इत्यंभूत ज्ञान देण्यासाठी केंद्र तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहितच्या आजोबांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या १७ वर्षांच्या नातवाचा पैशांसाठी निर्घृण खून करण्यात आल्याची माहिती कानावर पडताच अस्वस्थ झालेल्या आजोबाचा हार्ट अॅटॅकमुळे मृत्यू झाला. दोधा यादव बच्छाव (७५) असे या आजोबाचे नाव आहे. ते जुनी बेज, तालुका कळवण येथील रहिवाशी होते.

२० लाख रूपयांच्या खंडणीसाठी मालेगाव येथे राहणाऱ्या मोहित बाविस्करची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येत त्याचाच बालपणीचा मित्र सौरभ चौधरी आणि आकाश प्रभू या दोघांचा समावेश होता. पोलिसांना त्यांना अटक केली. हा घटनाक्रम घडत असताना मोहितेचे आजोबा प्रकृती अस्वस्थेमुळे नाशिकच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. झालेल्या प्रकरणामुळे त्यांना धक्का बसू नये म्हणून डॉक्टर तसेच नातेवाईकांनी या घटनेची माहिती त्यांना समजू दिली नव्हती. मात्र, उपचार पूर्ण घरी परतल्यानंतर नातवाच्या मृत्युची बातमी त्यांच्यापर्यंत पोहचली. या घटनेने अस्वस्थ झालेल्या बच्छावांना आज, सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हार्ट अॅटॅकचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. नातवाच्या मृत्यु वियोगामुळे आजोबांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.

संशयितांना २३ पर्यंत कोठडी

मोहित बाविस्कर याचे अपहरण व खूनाचा आरोप असलेला संशयित आरोपी सौरभ चौधरीसह त्याच्या साथीदारास कोर्टाने २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. टीव्ही सिरीयलमधून 'प्रेरणा' घेत मोहितचा खून करणाऱ्या दोघा संशयित आरोपींना शहर पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या होत्या. संशयित आरोपींनी सफाईने हे काम केले आहे. यात आणखी काही साथीदार आहेत का? गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त करायची असून, या चौकशीसाठी संशयिताच्या पोलिस कोठडीची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा गंगापूर धरणावर ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर आणि आळंदी धरणातून मराठवाड्याला पाणी देवू नये या जोरदार मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी गंगापूर धरण परिसरात आंदोलन केले. शिवसेनेचे आमदार अनिल कदम, राजाभाऊ वाजे आणि योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांनी फळबागांना पाणी देवून शेतकरी आत्महत्या रोखण्याची मागणी केली.

मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी आणि दारणा धरणातून ३.२४ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. या निर्णयास नाशिक जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. आमदार अनिल कदम, राजाभाऊ वाजे आणि योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली निफाड, नाशिक, त्र्यंबकेश्वरसह इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गंगापूर धरण परिसरात आंदोलन केले. गंगापूर डाव्या कालव्यावर २५ हजार फळबागा आहेत. या बागांसाठी शेतकऱ्यांनी १७ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कालव्यावर अनेक पाणी वापर संस्था अवलंबून आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता गंगापूर धरणातून पाणी सोडणे कितपत संयुक्तिक आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

...तर फळबागा नष्ट होतील!

आळंदी धरणाचे पाणी शेतीसाठी राखीव असले तरी पाणी सोडण्याचे आदेश हे हुकूमशाही पद्धतीचे आहेत. फळबागांना पाणी न देता धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडले तर फळबागा नष्ट होणार आहेत. परिणामी, या सर्व शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून घेतलेली मेहनत वाया जाणार आहे. यातून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू होण्याची भीती अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. जेवढे पाणी सोडले जाते, त्यातील निम्मे पाणी वाया जात असल्याने पाणी टँकर किंवा रेल्वेद्वारे नेवून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता हायकोर्टात याप्रश्नी याचिका दाखल करण्याचा निर्णय तिन्ही आमदारांनी बोलून दाखविला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त धरण परिसरात तैनात केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायद्याच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेवरच बहिष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रिचेकींगचे पेपर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गहाळ केल्याच्या प्रकरणाने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आजपासून (दि. २०) सुरू होणाऱ्या विद्यापीठाच्या टर्म एंड परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे आज टर्म एंडचा पहिला पेपर देण्यासाठी उर्वरित विद्यार्थी परीक्षा केंद्रावर असताना अन्यायाची भावना असलेले विद्यार्थी मात्र विद्यापीठाच्या उपविभागीय केंद्राबाहेर बसून आंदोलन छेडणार आहेत.

कायद्याच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा 'इव्हीडन्स' या विषयाचा गोंधळ विद्यापीठात झाला. या विषयाची परीक्षा देऊन यात अनुत्तीर्ण ठरलेल्या एनबीटी कॉलेजच्या १२ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज केला होता. महिनाभराचा कालावधी उलटूनही विद्यापीठाने विद्यार्थ्यांना निकाल दिला नाही. यावर विचारणा करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकाच गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती कळाली होती. यावर विद्यापीठाने कुलगुरूंना साकडे घालत समन्वयवादी मार्ग काढण्याची विनंती केली होती. यानंतरही याप्रश्नाचा तिढा सुटलेला नाही. पुढील टर्ममध्ये या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा द्यावी,असे समुपदेशन विद्यापीठाच्या वतीने केले जात असून याला विद्यार्थी राजी नाहीत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्या समर्थनार्थ इतरही विद्यार्थी या बहिष्कारात सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगाचे राष्ट्रीय संमेलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

योगाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार व्हावा यासाठी योग विद्या गुरुकुलतर्फे नवव्या राष्ट्रीय योग संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन १८ ते २० डिसेंबर रोजी विश्व योग दर्शन आश्रम तळवाडे (ता. त्र्यंबकेश्वर) येथे होणार आहे.

योग शास्त्राचे आद्य प्रवर्तक योग महर्षी पतंजली यांनी पातंजल योग दर्शन या ग्रंथामध्ये ध्यानाचे महत्त्व सांगितले आहे. आधुनिक विज्ञानही याबाबत फारसे प्रगत नाही या संमेलनात या विषयावर जास्त प्रमाणात अभ्यास होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, आयुषचे संचालक कुलदीपराज कोहली, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू अरुण जामकर यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी ११ ते १२.३० या कालावधीत पुणे येथील चिन्मय मिशनचे स्वामी सिध्देशानंद यांचे 'उपनिशदातील ध्यान' या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी २ ते ३.३० या कालावधीत योग संशोधन मार्गदर्शक आशाताई वेळूकर, नंदीनी बेंडाळे रमेश भगत यांचे सादरीकरण होणार आहे. संध्याकाळी ५.३० वाजता योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक यांचे व्याख्यान होणार आहे. १९ डिसेंबर रोजी 'प्राणायाम' या विषयावर विश्वास मंडलिक, 'ध्यान व प्रात्यक्षिक' या विषयावर श्रीकृष्ण व्यवहारे, 'उपनिषद' यावर स्वामी माधवानंद, 'भावातीत ध्यान परिचय' या विषयावर डॉ. रमेश बोंडाळे, भीष्मराज बाम, 'ओंकार ध्यान' या विषयावर पौर्णिमाताई मंडलिक व्याख्यान देणार आहे. रविवार २० डिसेंबर रोजी योगाचार्य विश्वास मंडलिक हे प्राणायाम प्रात्यक्षिके करून घेणार आहेत. 'ध्यान समाधान' विषयावर रामचंद्र ढेकणे यांचे व्याख्यान होणार असून, डॉ. इश्वर आचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन दिवसीय योग संमेलनाचा समारोप होणार आहे. संमेलनस्थळी पोहचण्यासाठी सीबीएसवरून त्र्यंबकेश्वरसाठी बसेस सुटतात. तुपादेवी फाट्यावर उतरून संमेलनस्थळी जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी गंधार मंडलिक यांच्याशी (९४२०४८४०१०) किंवा योग विद्या धाम २३१८०९० ( ९४२०४८४०१७ ) या क्रमांकावर संपर्क साधावा] असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२८८ गावे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

$
0
0

प्रवीण बिडवे । नाशिक

भूजल सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यातील सरासरी स्थिर भूजल पातळी यंदा ०.९३ मीटरने खाली गेली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल २८८ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, जिल्हा परिषदेने टंचाई आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. राज्य दुष्काळी परिस्थितीतून जात असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीड हजार गावे दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. अलीकडेच करण्यात आलेल्या भूजल सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यातील

२८८ गावांना पुढील वर्षभरात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे नांदगावातील चार गावांना आताच पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा सामना करावा लागतो आहे. जिल्ह्यातील ९५ गावांना जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागणार आहे. ही परिस्थिती एप्रिल ते जून २०१६ या कालावधीत अधिक बिकट होणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील १८९ गावांमधील गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. या गावांना टंचाईपासून वाचविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील नाशिक, निफाड, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांमधील एकाही गावाला पुढील वर्षभरात पिण्याच्या पाण्याचे र्दुभिक्ष्य जाणवणार नसल्याचे सर्व्हेक्षणात स्पष्ट केले आहे. या तालुक्यांसह पेठ, सुरगाणा आणि कळवणमध्ये मार्च २०१६ पर्यंत पिण्याचा पाण्याचा प्रश्न उदभवणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पाणी पातळी दोन मीटरवर

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्यातील १९१ विहिरींची पाहणी केली. दिंडोरी, नाशिक, निफाड तालुक्यांत विहिरींमधील पाणी पातळीत ०.०८ ते ०.०१४ मीटरपर्यंत वाढ झाली. मात्र हा अपवाद वगळता अन्य सर्वच तालुक्यांत विहिरींमधील पाणी पातळी स्थिर भूजल पातळीपेक्षा सरासरी ०.९३ मीटरने खाली गेली आहे. पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवणमध्ये हीच पाणी पातळी सुमारे एक मीटरपर्यंत खाली गेली आहे. एक ते दोन मीटर पाणी पातळी खाली गेलेल्या तालुक्यांमध्ये बागलाण, नांदगाव, सिन्नर, सुरगाण्याचा समावेश आहे. तर दोन मीटरहून अधिक पाणी पातळी खाली गेलेले तीन तालुके पाणी टंचाईच्या धोकादायक उंबरठ्यावर आहेत. त्यामध्ये चांदवड (२.१३ मीटर), देवळा (२.०४), मालेगावचा (२.२०) समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी गळतीने प्रशासन त्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही वर्षांत जिल्ह्याला कोरड्या दुष्काळाच्या फारशा झळा बसल्या नाहीत. त्यामुळे वहन मार्गाद्वारे होणाऱ्या पाण्याचे गांभीर्य दुर्लक्षिले गेले. मात्र, या मार्गाने होणाऱ्या पाण्याचा अपव्यय पाहून आता जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीच्या प्रभावी उपाययोजनांवर भर द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्ह्यात विविध क्षेत्रांसाठी असणारी पाण्याची आवश्यकता, धरणांमध्ये उपलब्ध असणारा पाणीसाठा याचा आढावा घेऊन दरवर्षी पाणी वाटपाबाबतचे नियोजन केले जाते. हा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुशवाह यांनी सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा परिषद, महापालिका, एमआयडीसी, भूजल विभागासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गंगापूर धरणातून मराठवाड्याला वहन मार्गाने पाणी सोडणास विरोध होत आहे. वहन मार्गाने पाणी सोडले तरी त्यापैकी ८० टक्के पाणीही संबंधित ठिकाणापर्यंत पोहोचत नसल्याने अशा पध्दतीने पाणी सोडण्याऐवजी किमान जिल्हा पातळीवर पर्यायांचा विचार करता येईल का, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

किमान जिल्ह्यात ३० ते ४० किलोमीटरच्या परिघात जेथे वहन मार्गाने पाणी सोडण्यात येते तेथे टँकर किंवा तत्सम मार्गांनी पाणी सोडता येईल का याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आल्याची जाणीव अधिकाऱ्यांना करून देण्यात आली.

उपलब्ध पाणीसाठा अत्यंत मर्यादित असल्याने विविध विभागांसाठी पाणी राखून ठेवताना यंदा हात आखडता घ्यावा लागेल, असे संकेत या बैठकीत देण्यात आले. महापालिका, एमआयडीसी, अन्य पाणी योजनांना गतवर्षी किती दशलक्ष घनफूट पाणी दिले होते, त्यापैकी प्रत्यक्षात किती दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात आले याची माहिती या बैठकीत अधिकाऱ्यांनी सादर केली. या विभागांना

यावर्षी असणारी पाण्याची गरज विचारात घेऊन त्यांना किती पाणी द्यायचे याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. पाणी नियोजनासंदर्भातील पुढील बैठकीला येताना प्रत्येक विभागाने पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेऊन यावे, असे आदेश कुशवाह यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणून डीपी रस्त्याचे स्थलांतर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना व मिळकत विभागाने बिल्डरांच्या भल्यासाठी थेट महापालिकेच्या २४ मीटरचा डीपी रोडच स्थलांतरीत करण्याची तयारी सुरू केली आहे. गंगापूर नाका ते पंचवटी लिंकरोड (रामवाडी मार्ग) या रस्त्यावरील बिल्डरांच्या बड्या प्रोजेक्टसाठी हा रस्ता अडसर ठरत असल्यानेच थेट रस्त्याच्या स्थलांतरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप नगरसेविका मनिषा हेकरेसह स्थानिकांनी केला आहे. विशेष म्हणजे सिंहस्थातच हा रस्ता नव्याने तयार करण्यात आला आहे. असे असताना रस्ता स्थलांतर करण्याची प्रशासनाची लगीनघाई संशयास्पद असल्याने स्थानिकांनी आयुक्तांकडे धाव घेतली आहे. तर शिवसेनेने आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

महापालिकेतील नगररचना व भूसंपादन करणारा मिळकत विभागाच्या कारभाराकडे संशयास्पदरित्या पाहिले जात होते. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या दोन्ही विभागाच्या संशयास्पद कामगिरीला ब्रेक लावला असला तरी, या विभागातल्या काही हितसंबंधितांनी जुन्या पत्रांचा आधार घेत, आपले हेतू साधण्याची तयारी सुरू केली आहे. या जम‌िनीवरील प्रस्तावीत प्रोजेक्टला हा रस्ता अडसर ठरत आहे. त्यामुळे एकतर रस्ता रुंद करा किंवा तो स्थलांतरीत करा असा दबाव अधिकाऱ्यांवर टाकला जात आहे. तत्काल‌िन महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी 'हा रस्ता स्थलांतरीत करावा' असे पत्र दिल्याचा दाखला आता मिळकत विभागाकडून दिला जात आहे. सिंहस्थ होताच हे जुने पत्र काढून ही प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक धास्तावले आहेत. विशेष म्हणजे महापौरांच्या प्रभागातील या रस्ताबाबत त्यांनाच अंधारात ठेवण्यात आले आहे.

मागणी नसतानाच कारवाई

रस्ता स्थलांतरीत करावा किंवा रुंद करावा अशी कोणाचीही मागणी नसताना महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी स्थलांतराच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारीची साधी दखल न घेणाऱ्या प्रशासनाने अचानक हे जुने पत्र कसे काढले याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेषत: मिळकत विभागाची भूमिका संशयास्पद आहे.

या रस्त्यासाठी पालिकेने करोडो रुपये खर्च केले आहेत. मात्र काही बिल्डरांच्या भल्यासाठी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या स्थलांतराचा घाट घातला आहे. प्रशासनाने असा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.अजय बोरस्ते, गटनेता, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेचे पाण्यासाठी आंदोलन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठवाड्यासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद सोमवारी नाशिकमध्ये उमटली आहे. पाणी सोडण्याच्या विरोधात शेतकरी व सर्वसामान्यांपाठोपाठ शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसेने उघड विरोध केला आहे. तर आता शहरातील नागरिकही पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी शिवसेनेनेच्या नेतृत्वात सर्वपक्षीय मोट बांधली जात असून, मंगळवारी सर्वपक्षीय बैठक होणार आहे. दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांचे गंगापूर धरणावर आंदोलन केले.

नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याच्या विरोधात सोमवारी नाशिक व निफाडमधील शेतकऱ्यांनी गंगापूर धरणांवर ठिय्या आंदोलन केले. शिवसेनेच्या अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. धरणांतून पाणी सोडण्याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेने विरोध केला आहे. तर भाजपची भूमिका संदीग्ध आहे. तर इतर पक्षांनी सोमवारी वेगवेगळे विरोध नोंदविल्याने त्याची तीव्रता कमी झाली. त्यामुळे पाण्याविरोधात वेगवेगळे न लढता सर्वच पक्षांची एकत्र मोट बांधण्याचा निर्णय सेनेच्या अजय बोरस्ते यांनी घेतला असून, सर्वपक्षाच्या अध्यक्षांची मंगळवारी एकत्रीत बैठक घेऊन आंदोलनाची रणनिती ठरविणार आहेत.

भाजपची गोची...

दरम्यान, सर्वपक्षीयांनी पाणीविरोधात भूमिका घेतली असताना, भाजपची भूमिका मात्र अद्यापही संशयास्पद आहे. पाणी सोडणे आवश्यक असल्याचे भाजप नेते उघडपणे सांगत असले तरी, खासगीत विरोध करत आहेत. सरकार भाजपचे असल्याने भाजपला समर्थन करावे लागणार आहे. मात्र सेनेने उघड विरोधात भूमिका घेतल्याने अधिक गोची झाली आहे.

जिल्ह्यात २८८ गावे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

भूजल सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यातील सरासरी स्थिर भूजल पातळी यंदा ०.९३ मीटरने खाली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल २८८ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, जिल्हा परिषदेने टंचाई आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. राज्य दुष्काळी परिस्थितीतून जात असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीड हजार गावे दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. अलीकडेच करण्यात आलेल्या भूजल सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यातील २८८ गावांना पुढील वर्षभरात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

निषेधाचे मोर्चे

नगर- नाशिक जिल्ह्यातील धरणांतून सुमारे १३ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सोमवारी नगरजिल्ह्यात अकोले, संगमनेर , श्रीरामपूर, कोपरगांव या ठिकाणी हजारो शेतकर्यांनी निषेधाचे मोर्चे काढले. यावेळी संतप्त शेतकर्यांनी पाटबंधारे खाते व राज्यसरकार यांना शिव्यांची लाखोली वाहीली. दरम्यान महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण यांच्या निर्णयाविरोधात स्थगिती मिळवण्यासाठी तीन सहकारी साखरकारखान्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या, मंगळवारी मुंबई हायकोर्टात मुख्य न्यायाधिशांसमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. हायकोर्टाच्या निर्णयाकडे नगर-नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधानांकडून नाशिककरांचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'रेस अॅक्रास अमेरिका' ही जगप्रसिद्ध सायकल स्पर्धा जिंकणारे नाशिकचे सायकलपटू डॉ. महेंद्र महाजन आण‌ि डॉ. हितेंद्र महाजन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यालयात बोलवून विशेष गौरव केला.

या प्रसंगी महाजन बंधूंसोबत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण आण‌ि मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधानांनी महाजन बंधूंचे व सायकल चळवळीचे कौतुक केले तसेच, दैनंदिन जीवनात सायकलचा वापर करण्याचे आवाहन केले. मोदींनी महाजनबंधूंचा उल्लेख 'मन की बात' या कार्यकमातही केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठेबाजांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डाळींसह कडधान्याचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे व्यापाऱ्यांकडून साठेबाजी तसेच काळाबाजार होण्याची शक्यता बळावली आहे. असे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने विशेष पथक नेमले असून, शहरासह जिल्ह्यात नाशिकमध्ये मंगळवारी आठ व्यापाऱ्यांवर छापे टाकण्यात आले.

कधी नव्हे ते तूरडाळीचे भाव प्रतिकिलो २०० रुपयांच्यावर पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांकडून डाळींची साठेबाजी होण्याची शक्यता आहे. म्हणून राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जिल्हास्तरावर विशेष पथक स्थापून संबंधितांवर कारवाईचेे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पथक स्थापन केले असून, त्यामध्ये सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सौंदाणे, नायब तहसीलदार एन. एम. बिरारी यांच्यासह सर्व पुरवठा निरीक्षकांचे पथक नेमले आहे. या पथकासह जिल्ह्यात तहसीलदारांनी घाऊक व्यापाऱ्यांची गुदामे तसेच डाळ मिलवर छापे टाकले. जिल्ह्यात आठ घाऊक व्यापारी तसेच शिंदे पळसे आणि नाशिक शहरातील डाळ मिलवर छापे टाकले. मात्र त्यांना ठरवून दिलेल्या मर्यादेतच डाळी, तसेच खाद्य तेलांचा साठा असल्याचे तपासणीअंती आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहितच्या खुनात आणखी एकाचा सहभाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोहित बाविस्कर हत्या प्रकरणात दोघांव्यतिरिक्त आणखी काही आरोपींचा हात असण्याचा संशय असून, पोलिसांकडे त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. मालेगाव येथे मोहितचे पंचसंस्कार पार पडले. यावेळी जमा झालेल्या नातेवाईकांमध्ये ही चर्चा सुरू होती.

अपहरण झालेल्या मोहितची पैशांसाठी बालपणीचा मित्र सौरभ चौधरी आणि त्याच्या एका साथीदाराने १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री हत्या केली. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग असू शकतो. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करावीच, अशी मागणी नातेवाईक सातत्याने करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फार्मसी विद्यार्थ्यांची मान्यताच धोक्यात

$
0
0

जीतेंद्र तरटे । नाशिक

सेंट्रल फार्मसी कौन्सिलने घालून दिलेली बंधने धुडकावण्याची मनमानी यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यातील संस्थांनी केली आहे. परिणामी, राज्यभरातील सुमारे ९५ कॉलेजमध्ये प्रवेशित पाच हजारपैकी एकाही विद्यार्थ्याची नोंदणी स्टेट फार्मसी कौन्सिलकडे अद्याप करण्यात आलेली नाही. यामुळे सद्यस्थितीत या अभ्यासक्रमातील विद्यार्थी नियमबाह्य पध्दतीने शिक्षण घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

यंदा विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा दाखला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने तपासण्यात आलेला नाही. ज्या फार्मसी कॉलेजांकडे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने फार्मसी कायदा सेक्शन १२ खाली देण्यात येणारी पूर्वपरवानगी नाही, अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश मान्यतेच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने एम. फार्म अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मंडळाने या प्रक्रियेबाबत दिलेल्या माहितीपत्रकातील निकषांनाच या प्रकारामुळे छेद जात आहे.

माहितीपत्रकातील पात्रता या मुद्द्यांतर्गत यंदा ३१ जुलै २०१५ ही कट ऑफ डेट देण्यात आली होती. यानंतर स्टेट कौन्सिलकडे विद्यार्थ्यांची नोंदणी होणे अपेक्षित होते. मात्र, ही तारीख उलटून आता दोन महिन्यांचा कालावधीही मागे पडल्याने काही घटकांनी या प्रकरणी शिक्षणमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.

राज्यातील काही फार्मसी कॉलेजांकडे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची 'कोर्स ऑफ कंडक्ट' ची परवानगी असली तरीही फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची फार्मसी कायद्याच्या सेक्शन १२ खाली देण्यात येणारी सेक्शन १२ ची परवानगी नाही. या प्रकारच्या फार्मसी कॉलेजातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी स्वतःची रजिस्टर्ड फार्मसीस्ट म्हणून नोंदणी स्टेट फार्मसी कौन्सिलकडे करू शकत नाहीत. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची अंतिम परवानगी जी कॉलेज अपूर्ण ठरली तेथील विद्यार्थ्यांवर ही नामुष्की येणार आहे. संबंधित कॉलेजसने सेंट्रल कौन्सिलचे नियम न पाळल्याने त्यांना यंदा सेक्शन १२ अंतर्गत अत्यंत महत्त्वाची असणारी परवानगी बहुतांश कॉलेज मिळवू शकलेले नाहीत. सेंट्रल कौन्सिलच्या मुद्द्यांकडे कानाडोळा करून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ निकषपूर्ती न करणाऱ्या कॉलेजांना पाठीआड घालत असल्याच्या तक्रारीही आता शिक्षणमंत्र्यांच्या दरबारी दाखल होत आहेत. चुकीच्या वागणाऱ्या कॉलेजांना चाप बसवावा व या प्रक्रियेतील दोषींची उलटतपासणी व्हावी, अशी मागणी पुढील टप्प्यात जोर धरण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पटपडताळणीने कॉलेजेसची धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थिती अन् प्राध्यापकांची कामातील अनियमिततेच्या परिणामी उच्च शिक्षणासमोर निर्माण होणारी आव्हाने लक्षात घेता उच्च शिक्षण विभागाने आता कॉलेजेसच्या पटपडताळणी मोहिमेला प्रारंभ केला आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा सोमवारी शहर व जिल्ह्यातील कॉलेजेसमध्ये पार पडला. विद्यापीठाच्या तपासणी पथकांसमोर कॉलेजचे रेकॉर्ड सादर करताना सोमवारी दिवसभर कॉलेजेसचा जीव टांगणीला लागला होता.

‍राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने ही मोहीम उघडण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच धर्तीवर राज्यातील शाळांची पटपडताळणीची मोहीम उघडण्यात आली होती. यातून धक्कादायक निष्कर्ष हाती आले होते. या धर्तीवर आता कॉलेजेसचीही पटपडताळणी पार पडत असल्याने राज्याच्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत असेच निष्कर्ष हाती येऊन धक्कादायक ‌निर्णय राबविले जाण्याची शक्यता शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत सोमवारी नाशिकमध्ये ही मोहीम राबवली. आज (दि. १९) ही मोहीम नगर जिल्ह्यात तर उद्या पुणे जिल्ह्यातील कॉलेजेसमध्ये राबविण्यात येणार आहे. सोमवारी शहर व जिल्ह्यातील विविध कॉलेजेसमध्ये विद्यापीठाच्या तपासणी पथकांनी ठिय्या देत कॉलेजमधील प्रवेश नोंदवह्या, जनरल रजिस्टर, कॅटलॉग, विद्यार्थ्यांचे विद्यापीठाकडे नोंदणी असलेली वही, विद्यार्थ्यांची पात्रता नोंदवही, प्रवेश अर्ज संच, प्रवेश चलन पावत्या आदी कागदपत्रांची तपासणी करीत नोंदी घेतल्या आहेत. या संदर्भांनुसार उच्च शिक्षण विभागाच्या वतीने काही नवी धोरणे राबविण्यासाठी या प्रक्रियेचा फायदा होणार असल्याचा शिक्षण विभागाचा कयास असल्याने ही मोहीम राबविण्याची भूमिका उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विजय नारखेडे यांनी मांडली आहे.

अनुदान लाटणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार

या मोहिमेत प्राधान्याने अनुदानित असलेल्या आर्ट, कॉमर्स, सायन्स, शिक्षणशास्त्र आणि लॉ या पाच विद्याशाखांच्या कॉलेजेसची तपासणी सुरू आहे. गत काही वर्षात शिक्षणसंस्थांची संख्या वाढली आहे. बहुतांशी कॉलेज बोगस पटसंख्या दर्शवून मोठ्या प्रमाणावर अनुदान लाटताहेत. बोगस पटसंख्या या मोहिमेतून निदर्शनास आल्यास अनुदानात कॉलेजेसकडून होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी या मोहिमेची मदत होण्याचे मुख्य उद्दिष्ट यामागे असल्याची माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकषांचे दिले कारण

$
0
0


म. टा. प्रति‌निधी, ना‌शिक

आमदार आदर्श ग्राम योजना कशी राबविली जाणार, एका गावाच्या विकासासाठी राज्य सरकार किती निधी देणार, गावाच्या विकासप्रक्र‌ियेत काय अभिप्रेत आहे. याबाबतचे निकष राज्य सरकारने स्पष्ट करायला हवे होते. मात्र हे निकष अद्याप स्पष्ट नसल्याने आमदारांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे या योजनेसाठी गाव निवडतानाही आमदारांना मर्यादा पडत आहेत. समस्यांनी ग्रस्त गाव निवडल्यानंतर विकासासाठी दिला जाणारा निधी पुरेसा नसल्यास काय करायचे या प्रश्नाचे ‌निराकरण ग्रामविकास विभागाने करायला हवे होते. मात्र ते ही स्पष्ट करण्यात आलेले नाही. अशा सर्व प्रश्नांमुळे अजूनही काही आमदारांनी गाव निवडण्याबाबत अनास्था दाखविल्याचे बोलले जात आहे.

आमदार अन् गाव

डॉ. राहूल आहेर : खुंटेवाडी (ता. देवळा), बाळासाहेब सानप : ढकांबे (ता. दिंडोरी), देवयानी फरांदे : नन्हावे (ता. चांदवड), सीमा हिरे : निमगाव (ता. मालेगाव), डॉ. अपूर्व हिरे : निमगाव (ता. मालेगाव), निर्मला गावीत : वाघेरा (ता. त्र्यंबकेश्वर), दादाजी भुसे : गरबड, (ता मालेगाव), योगेश घोलप : चांदगिरी (देवळाली), नरहरी झिरवाळ : एकदरे (ता. पेठ).

यांनी दाखविली अनास्था

भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांचा जनाधार मुख्यत: ग्रामीण भाग आहे. तरीही ग्रामीण भागाच्या विकासाबाबत यांची उदासिनता आश्चर्यकारक आहे. राज्यातील वजनदार नेते आणि जिल्ह्याचे विकासपुरूष माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अद्याप त्यांच्या येवला मतदार संघातील गावाचे नाव प्रशासनाला कळविलेले नाही. नांदगावचे आमदार पंकज भुजबळ, सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, कळवणचे आमदार जे. पी. गावित, पदवीधरचे सुधीर तांबे, आमदार हेमंत टकले, आमदार जयंत जाधव आदींनी देखील ते कोणते गाव दत्तक घेणार हे अद्याप कळविले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोणते गाव दत्तक घ्यावे याबाबत आमच्याकडून चाचपणी सुरू आहे. या योजनेत तीन गावे दत्तक घेऊन त्यांचा विकास करावयाचा आहे. राज्यसरकारकडून मिळणारा निधी या गावांच्या विकासावर खर्च केला तर मतदार संघातील उर्वरीत २०० गावांचा विकास कसा करणार हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. - छगन भुजबळ माजी उपमुख्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभासदांची कसरत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोड परिसरातील सावरकरनगर येथील प्रथितयश मानल्या जाणाऱ्या जीमला मागील १५ दिवसांपासून टाळे लागले आहे. या हाय प्रोफाईल जीमसाठी पाच हजारांपासून ते २५ हजार रूपयांपर्यंत वर्गणी जमा करणारे सदस्य यामुळे वैतागले आहेत. फसवणूक झाल्याचा आरोप करीत त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली आहे.

गंगापूररोड परिसरात थाटामाटात सुरू झालेल्या या जीमचे नियंत्रण थेट मुंबईतून होते. व्यायामासाठी आधुनिक यंत्रसामुग्री, प्रशिक्षित ट्रेनर व निवडक व्यक्तींना प्रवेश अशा प्रचाराच्या आधारे सुरुवातीपासूनच संबंधित जीम सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरली. या जीमसाठी काही वर्षांसाठी किंवा लाइफटाइम सदस्यत्वासाठी हजारो रुपये आकारले गेले. गंगापूररोड, महात्मानगर आदी परिसरातील सुमारे ४५० नागरिकांनी पैसे भरून संबंधित जीमचे सदस्यत्व स्वीकारले. मात्र, या जीममधील एका कर्मचाऱ्याने जमा केलेले पैसे मॅनेजमेंटकडे देण्याऐवजी थेट आपल्या बँक खात्यावर जमा केले. यामुळे मॅनेजमेंटने ही जीम बंद करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. यातील काही सदस्यांनी मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत सर्व पुरावे सादर केले. त्यामुळे सदर जीमचे व्यवस्थापन १८ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आश्वासन मॅनेजमेंटने दिले.

प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. पैशांचा अपहार केल्याचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला असून, मॅनेजमेंटने पैसे जमा केलेल्या सभासदांना एकप्रकारे डावलले. यामुळे जीमचे सक्रिय सभासद असलेल्या १५ ते २० जणांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबत तुम्ही ग्राहक पंचायतीकडे दाद मागा, असे अधिकाऱ्यांने सांगितले. यानंतर, सर्व सभासदांनी पोलिस उपायुक्त विजय पाटील तसेच एन. अंबिका यांच्याशी संपर्क साधत तक्रार अर्ज सादर केला. या अर्जानुसार काय कायदेशीर कारवाई करता येईल, याबाबतचा निर्णय आज, बुधवारी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सादरे प्रकरणाची CID चौकशीच हवी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जळगावमधील पोलिस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणात संशयाची सुई ही महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर असल्याने त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सादरे प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे क्लिनचीट मंत्री बनल्याची टीका त्यांनी केली.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सादरे आत्महत्या प्रकरणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. राज्यातील सरकार कार्यक्षम अधिकाऱ्यांना आत्महत्या करायला लावते, तर अकार्यक्षमतांना बक्षिस देत असल्याचा आरोप करीत विधानसभेत हा प्रश्न आम्ही उपस्थित करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पोलिस अधीक्षक व पोलिस निरीक्षकांची हफ्तेबाजी हा गंभीर प्रकार आहे. प्रामाणिक अधिकाऱ्याचा यात बळी घेण्यात आला. विशेष म्हणजे राज्यातील वरिष्ठ मंत्र्याचेच यात नाव घेतले जात आहे. त्यामुळे खडसेंनी तत्काळ या प्रकरणात राजीनामा देऊन चौकशीचा सामना करायला हवा. सागर चौधरी सोबतचे त्यांचे पुरावे सोशल मीडियात झळकत आहे. तरीही ते या प्रकरणात हात झटकत आहेत. जळगावमध्ये गेल्यावर कुणालाही विचारले तर सागर चौधरी हा खडसेंचा कार्यकर्ता असल्याचे सांगतात. त्यामुळे खडसेंनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा दिला नाही तर, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेऊन या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. येत्या विधीमंडळ अधिवेशनात सादरे प्रकरण उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरातील गुन्हेगारीमुळे बदनाम झालेल्या पोलिस आयुक्त यांना शिक्षा करण्याऐवजी त्यांनी पुण्यात बढती देण्यात आली. त्यामुळे हे सरकार चांगल्या अधिकाऱ्यांना नाउमेद करून अकार्यक्षम अधिकाऱ्यांना रिवॉर्ड देत असल्याची टीकाही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images