सिंहस्थ कुंभमेळ्यात राज्य सरकारच्या वाट्यातील ६८९ कोटींपैकी पालिकेला अद्याप २०२ कोटींची प्रतीक्षा आहे. सिंहस्थ कामांचे आतापर्यंत ५७५ कोटींचे वाटप करण्यात आले आहे, तर ३५० कोटींची बिले कोषागरात येणे बाकी आहे. सोबतच मंजूर साडेतीनशे कोटींच्या कर्जापैकी पालिकेने ७० कोटींचीच उचल घेतली आहे. पालिकेची सध्याची परिस्थिती ठिकठाक असली तरी भविष्यात पालिकेच्या डोलाऱ्याला हादरा बसण्याची चिन्हे आहेत.
सिंहस्थ कुंभमेळा आटोपल्यानंतर आता ठेकेदारांची बिले सादर करण्याची लगीन घाई सुरू आहे. पालिकेची आर्थिक स्थिती डामडोल असल्याने पालिकेने ३५० कोटींचे कर्ज घेतले आहे. तर सिंहस्थ आराखड्यातील ९१९ कोटींपैकी २३० कोटींचा भार पालिकेला उचलायचा आहे. पालिकेने मंजूर केलेल्या सिंहस्थ आराखड्यातील कामांपैकी आतापर्यंत ५७५ कोटींची बिले ठेकेदारांनी काढली आहेत. तर शासनाकडून ४८७ कोटी रुपये आलेले असून, २०२ कोटी रुपये अद्याप येणे बाकी आहे. सिंहस्थासाठी मंजूर केलेल्या ३५० कोटींच्या कर्जापैकी पालिकेने आतापर्यंत ७० कोटींचे कर्ज उचलले असल्याची माहिती लेखा विभागाने दिली आहे.
सिंहस्थ कामे झालेल्या ठेकेदारांची बिले सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून, सध्या कोषागारात जवळपास २० कोटींची बिले सादर आहेत. आर्थिक स्थिती बरी असल्याने ती देण्यास अडचण नाही. जवळपास अजून ३५० कोटींची बिले अद्याप सादर होणे बाकी आहे. टप्प्याटप्याने ही बिले सादर केली जातील. त्यानुसार कर्जाची उचल घेतली जाणार असल्याचे लेखा विभागाने स्पष्ट दिली. संपूर्ण बिले सादर झाल्यानंतर व कर्ज पूर्ण घेतल्यानंतर मात्र आर्थिक स्थिती डामडोल होण्याचे संकेत आहेत. एलबीटी कमी, उत्पन्नाचे स्रोतही कमी असल्याने कर्ज फेडण्यासह कर्मचारी व विकासकामांचे वेतन अदा करण्याचेही बळ पालिकेकडे राहणार नसल्याचे चित्र आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट