जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांमध्ये दररोज सरासरी तीन जणांचा मृत्यू होत आहे. बेदरकारपणे वाहन चालविणे हे जसे अपघातांचे कारण आहे तसेच हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर न करणे हे देखील अशा अपघाती मृत्यूंमागचे प्रमुख कारण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांत सुमारे नऊ हजार अपघात झाले असून, त्यामध्ये दोन हजार ४६७ जणांचा मृत्यू झाला आहे.
रस्ते अपघात हे देशापुढील मोठे आव्हान ठरत असून, त्यामध्ये दरवर्षी काही लाख जणांना जीव गमवावा लागत आहे. सन २०१४ या वर्षात देशातील सर्वाधिक अपघात महाराष्ट्रात झाले. सन २०१३ मध्ये देशात १ लाख ३७ हजार व्यक्तींचा अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील मृतांची संख्या १२ हजार ७०० होती. विशेष म्हणजे त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ९१८ होती. शहरात ११२७ तर जिल्ह्यात २४५४ अपघात झाले. त्यामध्ये अनुक्रमे ११५ आणि ८०३ अशा एकूण ३ हजार ५८१ अपघातांमध्ये ९१८ जणांचा मृत्यू झाला. सन २०१४ मध्ये नाशिक शहरात एक हजार ७० तर, जिल्ह्यात २१९८ अपघात झाले. वर्षभरात ३२६८ अपघात झाले. शहरातील अपघातांमध्ये १७२ तर जिल्ह्यातील अपघातांमध्ये ७६० अशा एकूण ९३२ जणांनी प्राण गमावले. जिल्ह्यात यंदाही अपघातांचे सत्र सुरूच असून, शहरात मे महिन्यापर्यंत ५७७ अपघात झाले. त्यामध्ये १०७ जणांन जीव गमावला आहे. जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत १४७८ अपघात झाले असून, ५१६ जणांनी त्यामध्ये जीव गमावला.
जिल्ह्यात अडीच वर्षांत २४६७ बळी
नाशिक शहरापेक्षा जिल्ह्यात दुपटीहून अधिक अपघात होत असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होते. शहरात गेल्या अडीच वर्षांत २७७४ अपघात झाले. त्यामध्ये ३९४ जणांनी जीव गमावला. जिल्ह्यात अडीच वर्षांत ६ हजार १३० अपघात झाले. त्यामध्ये २ हजार ७९ जणांचा मृत्यू झाला. शहर आणि जिल्ह्यात मिळून ८ हजार ९०४ अपघात झाले. त्यामध्ये २ हजार ४६७ जणांचा मृत्यू झाला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट