Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आरोप-प्रत्यारोपांच्या झडल्या फैरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडीला पाणी देण्याविरोधात तब्बल सहा तास चाललेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी भाजपला कोंडीत पकडत आमदारांसह पक्षाचे वस्रहरण केले. हक्काच्या पाण्यासाठी नगरसेवकांनी पक्षभेद विसरत एकत्रित येऊन लढा उभारण्याचा पवित्रा घेतला. सभागृहात नगरसेवकांनी एकमेकांची उणीदुणी काढण्याची संधी सोडली नाही. पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करू नका असे सांगत सर्वानीच एकमेकांचे चेहरे उघडे पाडण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे सभागृहाला आखाड्याचे रूप मिळाले होते.

पाणीप्रश्नावर भाजपने ऐनवेळी नरो वा कुंजरोची भूमिका घेतल्याने भाजपला उघडे पाडण्याची एकही संधी नगरसेवकांनी सोडली नाही. महापौर अशोक मुर्तडक, शिवसेना गटनेता अजय बोरस्ते व शिवसेना आमदार अनिल कदम यांचे जाहीर कौतुक करीत भाजपला दुषणे दिली. पाण्याची दाहकता दाखवत भाजपवर आरोपाची एकही संधी नगरसेवकांनी सोडली नाही. शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांनी सर्वपक्षभेद विसरून या अन्यायाविरोधात राजकीय व न्यायालयीन लढाई लढू असे सांगत वर्धापन दिनालाचा आंदोलनाची दुर्दैवी वेळ आल्याची टीका केली.

कौतुकाची थाप

पाण्याच्या प्रश्नावर प्रथम नागरिक म्हणून पुढाकार घेणाऱ्या महापौर अशोक मुर्तडक यांचे सभागृहातील सर्वच नगरसेवकांनी कौतुक केले. बोस्टनवरून परत येताच त्यांनी पाण्यासाठी रस्त्यावर उतरून सर्वपक्षीयांना सोबत घेऊन आंदोलन उभे केले. पाणी आंदोलनासाठी त्यांनी केलेली धावपळ ही निश्चित कौतुकास्पद असल्याचे उद्गार सर्वच सदस्यांनी काढले. शहरवासीयांच्या पाण्यासाठी महापौरांचा पुढाकार हा भूषणावाह असल्याचा दावा नगरसेवकांनी केला तर, दुसरीकडे भाजपसह आमदारांचा निषेध केला.

भुजबळ फार्महाऊसवर जाणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करणाऱ्या आमदार देवयानी फरांदे यांनी नगरसेवक सचिन महाजन यांना चांगलेच सुनावले. तसेच आपण बराच काळ आमच्या सोबत होता. आमच्या घरातही तुम्ही यायच्यात असे सांगत तुमच्या पोटात आता का दुखते असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. छगन भुजबळांच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा भुजबळांना जे जमले नाही ते भाजप आमदारांना का जमत नाही, असा सवाल त्यांनी केला.

मराठवाड्याची सुपारी!

या महासभेत बोलताना काँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे यांनी मराठवाड्यात हजारो शेतकरी पाणी वापरत आहेत. मात्र दिवाळीत आपल्यावर पाणीकपातीचे संटक आले आहे. हा आमचा गुन्हा झाला आहे. गोदावरी प्रदूषणात कधी उच्च न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत. मात्र, आताच आदेश पाळले जात आहेत, असे सांगत कोणीतरी पाणी सोडण्यासाठी मोठी सुपारी वाजवल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला.

मंत्रिमंडळ विस्ताराची भीती

महासभेत स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी चुंभळे यानी भाजपच्या आमदारांवर चांगलेच टीकास्र सोडले. आमदार आपल्या कर्तव्यापासून दूर गेल्याने त्यांनी जनतेचा मनस्ताप ओढवून घेतला आहे. आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. त्यामुळे कदाचित पद मिळावे यासाठी ते गप्प बसल्याची टीका त्यांनी केली. आता तुम्ही २०१७ ची स्वप्ने पाहू नका, असा टोला लगावत तुम्हाला जनता माफ करणार नाही असा इशारा दिला.

अन् शेवट ३८ ने!

पाण्याच्या ज्वलंत प्रश्नावर महासभा बोलावली असताना नगरसेवकांनी त्यातही उदासीनता दाखवली. महासभेत १२७ नगरसेवक आहेत. प्रत्यक्षात हजेरी ८९ नगरसेवकांनी लावली, तर शेवटपर्यंत निम्मेच म्हणजे ३८ नगरसेवक उपस्थित राहिले. महासभेत ३९ नगरसेवकांनी आपली भूमिका मांडली. काहींनी काढता पाय घेतला. महापौरांनी चाप लावला तरी नगरसेवकांचे पलायन सुरूच होते.

भाजपची गोची

सभागृहात सर्वाधिक हल्लाबोल झाला तो भाजप आमदार व सरकारवर. त्यामुळे या आक्रमणाचा सामना करताना भाजपचे गटनेते संभाजी मोरूस्कर यांची तारांबळ उडाली. ज्या आमदारांना निवडून दिले, त्यांनीच पाठ फिरवल्याने नगरसेवक आक्रमक झाले होते. थेट भाजपचेच धिंडवडे नगरसेवकांनी काढत पालकमंत्री, मुख्यमंत्री यांनाही टीकेचे धनी केले. मात्र, आम्ही महापौरांसोबत असल्याचे सांगत पाणी आंदोलनावर सोबत असल्याचे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

पालकमंत्री कुंभकर्ण

मनसे जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी पालकमंत्र्यांवरच हल्लाबोल केला. पालकमंत्री कुंभकर्णासारखे झोपी गेल्याचा आरोप करीत पालकमंत्री उपरा मिळाल्याने व त्यांनी झोपेचे सोंग घेतल्यानेच हाल झाल्याचा आरोप सुदाम कोंबडे व वंदना बिरारी यांनी केला. या वक्तव्यावरून सभेत वादंग झाला..

पाटलांचे आंदोलन

सभागृहात भाजपचे नगरेसवक दिनकर पाटील यांनी सभागृहातच भाजपविरोधात भूमिका घेत थेट आंदोलन करण्याची सूचना केली. सभागृहात आंदोलन करून सरकारला जाग आणून देऊ, अशी विनंती त्यांनी केली. शिवसेनेच्या नेत्यांनी चांगले केले असे सांगत आमच्या आमदारांचे आता विचारूच नका असा टोलाही त्यांनी स्वपक्षीयांना लगावला. जनतेचा कळवळा असेल तर थेट आंदोलन करा, असे आव्हानच त्यांनी सर्वांना दिले. सभागृहात आंदोलन करण्याची केलेली घोषणा त्यांनी मागे घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चेन स्नॅचिंग

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पायी जाणाऱ्या वृद्धेस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून दुचाकीवरील दोघा संशयितांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून पळ काढला. ही घटना शिवाजीनगर येथील विद्युत कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवाजीनगर येथे राहणाऱ्या कमल रामदास गायकवाड (वय ७३) या शुक्रवारी सायंकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घराजवळून पायी जात होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन संशयित त्यांच्याजवळ आले. संशयितांनी गायकवाड यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करीत त्यांचे लक्ष विचलित केले. त्याचवेळी एका संशयिताने गायकवाड यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून पळ काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसाबसा उरकला उद्‍घाटन सोहळा

$
0
0

चित्रपट महामंडळ कार्यालयाच्या पदरी उपेक्षाच

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दीर्घप्रतीक्षेनंतर दिवाळीच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये साकारलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कार्यालयाच्या उद्‍घाटन सोहळ्याने रसिक प्रेक्षकांचा भ्रमनिरास केला. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचा वारसा सांगणाऱ्या नाशिक नगरीने महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या पदरी पदार्पणातच उपेक्षेचे दान टाकले आहे.

कशाबशा उरकलेल्या या सोहळ्याकडे प्रशासन पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनीही पाठ फिरवली. धावपळीच्या जगण्यातही चित्रपटासारख्या सर्जनशील कलाकृतीसाठी थोडा वेळ काढण्याचे आवाहन करणाऱ्या चित्रपट महामंडळाकडे उद्‍घाटन सोहळ्याला द्यायला पुरेसा वेळ नसल्याची खंत या प्रकारामुळे व्यक्त होत आहे. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे वर्षानुवर्षे कार्यालयच नव्हते. मात्र, खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकारानंतर शालिमार सारख्या शहराच्या केंद्रस्थानी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासाठी जागा मिळाली. शनिवारी (७ नोव्हेंबर ) उद्‍घाटन कार्यक्रम घेण्याचे ठरले. अतिशय आकर्षक निमंत्रण पत्रिका छापण्यात आली. अभिनेत्री अलका कुबल यांनी स्वीकारलेले निमंत्रण या वैशिष्ट्यांमुळे या कार्यक्रमाची उंची वाढली. कार्यालयात आणि कार्यालयाबाहेरही केवळ कार्यकर्त्यांचाच भरणा असल्याने प्रमुख पाहुण्यांना वाट काढत कार्यालयात येणेही अवघड झाले. अभिनेत्री अल्का कुबल आणि खासदार गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून कार्यालयाचे उद्‍घाटन कसेबसे उरकले गेले. मात्र, चित्रपट महर्षींच्या भूमीतील या सोहळ्याच्या पदरी पडलेली उपेक्षा रसिक मनाला नाराजीची झालर देऊन गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

$
0
0

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी

प्रेयसीच्या लहान मुलीवरच अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाविरोधात नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितास विरोध करतानाच आईकडे मदत मागितली असता आईनेही याकडे दुर्लक्ष केल्याची गंभीर बाब या प्रकरणात समोर आली. चेहडी बुद्रुक येथील ताजनपुरे मळा येथे राहणाऱ्या संशयिताचे नाव शरद पुंजा जाधव (वय ३५) असे असून, या संशयिताविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. पळसे येथील फुलेनगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेसोबत संशयित जाधवचे प्रेमसंबंध आहे. या विवाहितेस १४ वर्षाची मुलगी असून, शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास जाधव याने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. झोपेत असलेल्या मुलीला जाग आली व तिने भीतीपोटी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आईला मदतीसाठी आवाज दिले मात्र, आईने प्रतिसाद दिला नाही. मुलीच्या आरडाओरडीमुळे संशयित पसार झाला. यापूर्वीही संशयिताने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित मुलीने तक्रारीत केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योग, पाणीप्रश्न सोडविण्याचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर दादा भुसे यांच्याकडून मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात उंचावल्या आहेत. विकासापासून वंचित असलेल्या तालुक्यात विकासाची गंगा वाहती होईल, अशी अपेक्षा मतदार बाळगून आहेत. जिल्हा निर्मितीचे भिजत घोंगडे मार्गी लावण्याबरोबरच रोजगार वाढीसाठी उपयुक्त असलेला औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, पिण्याचे पाणी तसेच शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्याचे आव्हान ना. भुसे यांच्यापुढे आहे.

सलग तिसऱ्यांदा संधी मिळाल्याने ना. भुसे यांनी आजवर मतदारसंघात छोटी-मोठी अनेक कामे केली. मात्र, मतदारसंघाच्या विकासासाठी लक्षवेधी कामे होऊ शकलेली नाहीत. मालेगावात औद्योगिक वसाहतींची आजही प्रतीक्षा आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध होत असले तरी शेती सिंचनाचा प्रश्न आ वासून उभा आहे. वर्षभरात आमदार निधीसाठी मिळणारा निधीही ते पूर्ण खर्च करू शकलेले नाहीत. मतदारसंघात आतापर्यत सुमारे ३३ लाख ११ हजार रुपयांची कामे केली आहेत. यामुळे मतदारसंघातील पायाभूत कामेही होऊ शकलेली नाहीत. मात्र, वर्षभरात त्यांनी ८० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळवली आहे. या निधीतील काही कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे पूर्ण झाल्यास मालेगाव बाह्य मतदारसंघाच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.

अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याचे कामकाज वडनेर उपविभागाला जोडण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळवली. तसेच, मालेगाव महापालिकेच्या हद्दवाढ झालेल्या भागात मूलभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष अनुदान म्हणून १४.५५ कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. तळवाडे धरणाची क्षमता वाढविण्यासाठी ५.८० कोटी, उर्दू घर बांधण्यासाठी चार कोटी, अभ्यासिकेचे काम पूर्णत्वाकडे आहे. तालुका क्रीडा संकुल आंतरखेळ काम सुरू आहे. राज्यमार्ग व जिल्हा आणि इतरमार्गाचे कामांना मंजुरी मिळवली आहे. एस. सी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी निधी मंजूर करून घेतला आहे. तसेच आदिवासी विकास ठक्कर बाप्पा, २५१५ गाव अंतर्गत कामे, क्रीडांगण कंपाऊंड, इन्फ्रा-२ अंतर्गत कामांना मंजुरी मिळवली आहे. तसेच, तळवाडे येथे ३३ केव्हीच्या सबस्टेशनचे काम सुरू आहे.

मालेगाव जिल्हा निर्मितीचा मुद्दा गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत लक्षवेधी ठरला आहे. मालेगावला मंत्रिपद मिळाल्याने तरी हा प्रश्न मार्गी लागेल, अशी मतदारांना अपेक्षा आहे. यामुळे ना. भुसे यांच्यापुढे सद्यस्थितीत तरी जिल्हा निर्मितीचे मोठे आव्हान आहे. तसेच, गिरणा धरणाच्या पाण्याचा प्रश्नही सध्या ऐरणीवर आला आहे. यामुळे जळगाव व मालेगावमध्ये पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. यावर ना. भुसे यांना मालेगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचलावी लागणार आहेत.

भुसे यांनी अनेक कामांचा आढावा घेतला असून, अनेक कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये महिला रुग्णालय, पश्चिम भागत अश्निशमन केंद्र सुरू करणे, भूमी अभिलेख केंद्र सुरू करणे, शहरातील रस्ते रुंदीकरण, मनपा हद्दवाडीतील ५९ कर्मचारी सामावून घेणे, मालेगावला भुयारी गटार योजना, पूरपाणी कालवे, नवीन सबस्टेशन, शेती महामंडळाच्या जमिनीवर औद्योगिक वसाहत सुरू करण्यासाठी पाठपुरावा, आदिवासी विकास उपकार्यालय सुरू करणे, केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत कामांचा पाठपुरावा करणे आदी कामे प्रस्तावित आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्ज रक्कमेच्या दुप्पटीहून अधिक वसुली न करण्याचा निर्णय घेऊन तातडीने अमंलबजावणी करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, कागदोपत्री असलेल्या सहकारी संस्थांची तपासणी करून तसेच मतदानापुरतीच संस्था म्हणून कार्यरत असलेल्या संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, विविध संस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित करण्यासाठी पावले उचलण्यात येण्यात आहेत. ठेवी सुरक्षित राहण्यासाठी येत्या अधिवेशनात कायदा करण्याचे विचाराधीन आहे, असे ना. भुसे यांनी सांगितले.

विशेष करून मालेगावमध्ये उद्योग धंदे स्थापन करण्यावर भर दिला आहे. शेती महामंडळाच्या जमिनीवर औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारच्या धारेणानुसार हा प्रश्नही मार्गी लागेल. सहकारी कारखाने विकण्याचे गेल्या सरकारचे धोरण होत, त्यातूनच गिरणा कारखान्याची विक्री झाली. सहकारी साखर कारखाने सुरू करण्यासाठी काही नवीन प्रस्ताव विचाराधीन आहेत. मालेगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

- दादा भुसे, सहकार राज्यमंत्री

गेली दहा वर्षे विरोधी पक्षात असल्यामुळे विकासकामे करता आली नाही म्हणून त्यांनी मतदारांकडे मतांसाठी झोळी पुढे केली. मात्र, आता दादा भुसे यांना मंत्रिपदही मिळाले आहे. तरी सुध्दा मतदारसंघात विकासकामे झालेली नाहीत. पाणीप्रश्नावर निवडणूक जिंकणाऱ्या भुसे यांना मतदारसंघातील पाणीप्रश्न अद्याप सोडवता आला नाही. एकही उद्योग आणता आलेला नाही. जिव्हाळ्याच्या गिरणा सहकारी साखर कारखानाही त्यांना राखता आला नाही. सहकार राज्यमंत्री असूनही मतदारसंघात बँकाचे क्षेत्र वाढीस लागलेले नाही.

- पवन ठाकरे, ‌प्रतिस्पर्धी उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन ठिकाणी चो-या

$
0
0


महिलेस अटक

पर्सची चैन उघडून त्यातून पैसे चोरणाऱ्या रंजना अशोक पगारे (पाथर्डी फाटा) या महिलेस नागरिकांनी रंगेहाथ पकडले. पाथर्डी फाटा येथे राहणारे मारुती फकीरा भड (वय ४९) हे शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सीबीएस जवळील सिग्नलवर त्यांच्या पत्नीसोबत जात असताना रंजनाने त्यांच्या पत्नीच्या पर्सची चैन उघडून पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. ही चोरी भड यांच्या लक्षात येताच त्यांनी रंजनाला हटकले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल करून रंजनाला अटक केली आहे. दुस-या घटनेत आंबेडकर नगर ते काठेगल्ली या प्रवासादरम्यान शहर बसमधून प्रवास करीत असताना पॅन्टच्या खिशातील २५ हजार रुपयांची रोकड चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी श्रावण लक्ष्मण रुपवते (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तिस-या घटनेत सिडकोतील सिंहस्थनगर परिसरात राहणाऱ्या नंदकिशोर प्रल्हाद कोष्टी यांच्या घरी चोरट्यांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घरफोडी केली. यात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि मोबाइल असा ३९ हजार रुपयांचा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोल्डन राईड’ ने वेधले नाशिककरांचे लक्ष

$
0
0

नाशिक : नागरिकांचे आरोग्य आणि शहराचे पर्यावरण यांचा मेळ साधण्यासाठी आयोजित 'गोल्डन राईड' या उपक्रमाने नाशिककरांचे लक्ष वेधले. नाशिक सायकलिस्ट आणि सीआयआय (कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) यांच्या वतीने सायकल राईडच्या उपक्रमाचे आयोजन केले हाेते.

डॉक्टर्स, इंजिनीअर्स, कंपन्यांचे सीईओ, जनरल मॅनेजर, उद्योजक, बँकर्स आदी मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला. सायकलिंगबाबत जनजागृती वाढविण्याचे उद्दिष्ट यामागे होते. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते झेंडा फडकावून या गोल्डन राईडला सुरुवात झाली. महापौर अशोक मुर्तडक यांनीही सायकल चालवून यात सहभाग घेतला. नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपाल सिंग यांचे विशेष प्रयत्न होते. या उपक्रमात महापौर अशोक मुर्तडक, पोलिस अधिकारी हरिष बैजल, सीआयआयचे अध्यक्ष सुधीर मुतालिक, एस. बॅनर्जी, सुनील बापट, श्रीनिवास पत्की देखील उपस्थित होते. प्रसाद गर्भे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक-कार अपघातात भाऊ-ब‌हिणीचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

दिवाळीच्या सुटीकरिता लोणावळाहून लासलगावी घरी परतत असताना इगतपुरी येथे कार व मालट्रक यांच्यात झालेल्या अपघातात भाऊ व बहिण जागीच ठार झाले. तर, आई-वडील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिकमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लासलगाव येथील राजा ड्रेसेसचे संचालक गुरुविंदरसिंग दलजीतसिंग भल्ला हे आपली पत्नी अविनाशकौर व मुलगी तनमितकौर (वय २४) यांना घेऊन लोणावळा येथे मुलगा सिमरनजीतसिंग (वय १८) यास दिवाळीची सुटी लागल्यामुळे घरी आणण्यासाठी टोयोटो कार (एम.एच.१५ डी.सी.७०४७) ने गेले होते. लोणावळा येथून कल्याणमार्गे परतत असताना रात्री १२.३० च्या सुमारास इगतपुरी येथे हॉटेल गारवाजवळ त्यांची कार व ट्रकचा अपघात होऊन त्यात मुलगी तनमितकौर व मुलगा सिमरनजीतसिंग हे दोघे जागीच ठार झाले. तर, आई-वडील गंभीर जखमी झाले. शनिवारी दुपारी दोन वाजता लासलगाव येथील अमरधाममध्ये दोघा भाऊ-बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रदूषण करणाऱ्यांवर आता कारवाई

$
0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : प्रदूषण करणारेच आता यापुढे दोषी ठरणार असून त्यासाठीची तजवीज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) केली आहे. ग्रीन ट्रिब्युनलच्या निर्देशानुसार एमपीसीबीने पर्यावरण कायद्यांच्या अंमलबजावणीसाठीचा कृती आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यात 'पोल्यूटर टू पे' या तत्वाला अधिक प्राधान्य दिले आहे.

हवा, पाणी आणि जमीन यांच्या प्रदूषणाचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. त्या तुलनेत प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना कमी पडत आहेत. त्यामुळेच कोर्टात याचिका दाखल होण्यासह विविध प्रकारच्या अपर्यावरणीय प्रकारांबाबतच्या सुनावण्याही वाढत आहेत. विविध प्रकारचे पर्यावरणीय कायदे अस्तित्वात असले तरी त्याचा कुठलाही परिणाम प्रदूषण रोखणे किंवा बंद करण्यावर होत नसल्याची बाब पुण्यातील ग्रीन ट्रिब्युनलच्या निदर्शनास आली. त्यामुळेच पर्यावरण कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातील सर्वंकष धोरण (एन्फोर्समेंट पॉलिसी) तयार करावे, असे निर्देश ट्रिब्युनलने गेल्यावर्षी एमपीसीबीला दिले. त्यानुसार एमपीसीबीने या धोरणाचा मसुदा तयार केला आहे. एमपीसीबीच्या वेबसाइटवर हा मसुदा सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यात 'पोल्यूटर टू पे' अर्थात प्रदूषण करणाऱ्यांनाच कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना नोटीस बजावण्यासह विविध कारवाई केली जाते. तसेच, परवान्यांचे नूतनीकरणावेळी काळजी घेतली जात नाही. म्हणूनच येत्या काळात ही सारीच प्रक्रिया पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक कठोर केली जाणार आहे. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांकडून होणाऱ्या प्रदूषणापोटी कारवाई करण्यातही अडचणी येतात. मात्र, नवीन मसुद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांवर कडक कारवाई होणार आहे. तसेच, बँक गॅरंटीसंदर्भातील अनेक नियम कडक होतानाच एमपीसीबीकडून दिल्या जाणाऱ्या संमती पत्राचे (कन्सेन्ट) निकषही वाढणार असल्याचे मसुद्यात नमूद आहे.

पर्यावरण कायद्याच्या अंमलबजावणीचे धोरणाचा मसूदा आम्ही तयार केला आहे. हा मसुदा http://mpcb.gov.in/legal/legal.php या लिंकवर सर्वांसाठी उपलब्ध आहे. नागरिकांच्या काही सूचना किंवा हरकती असतील तर त्यांनी त्या आवर्जून द्यावात.

- पी. अनबलगन, सदस्य सचिव, एमपीसीबी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपोत्सवासाठी नटले शहर

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, नाशिक मांगल्य अन् समृध्दीचा संदेश देणाऱ्या दीपोत्सावाच्या स्वागतासाठी शहर उत्साहाने नटले आहे. सोमवारपासून (दि. ९) दीपावलीच्या मुख्य दिवसांना सुरुवात होत असल्याने नागरिकांची लगबग शहरभर दिसून येत आहे. आरोग्यदेवता धन्वंतरींच्या पूजनासह लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीजेच्या पूर्वतयारीसाठी बाजारपेठही बहरली आहे. शहरात जागोजागी नजरेस पडणारी विद्युत रोषणाई, बाजारपेठेत लक्ष्मीपूजनासाठी दाखल रंगबेरंगी नक्षीकाम केलेल्या इवल्याश्या पणत्या, केरसूणीसह आकाशकंदीलापर्यंत विविध वस्तूंची दुकाने लक्षवेधी ठरत आहेत. औद्योगिक वसाहतींमध्येही नुकतेच बोनस वाटप झाल्याने कर्मचारी वर्गही कपड्यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेकडे वळला आहे. मोठ्या वस्तूंकडे नागरिकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनाही विक्रेते आणि कंपन्यांनी बाजारपेठेत आणल्या आहेत. सुगंधी द्रव्य, कपड्यांसह फर्निचर, वाहने व गृहसजावटीच्या वस्तूंची बाजारात रेलचेल आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शहरातील रस्त्यांमध्येही गर्दीच्या परिणामी वाहतूक कोंडी होते आहे. सोमवारच्या (दि. ९) दिवशी धनत्रयोदशी नवीन वस्त्र, अलंकार व वह्यांच्या खरेदीची प्रथा आहे. यामुळे आज या वस्तूंच्या दुकानांमध्ये विशेष गर्दी राहील. मंगळवारी (दि. १०) नरक चर्तुदशी असल्याने या दिवशी अभ्यंग स्नानास विशेष महत्त्व आहे. यादिवशी अभ्यंगासाठी पहाटे ५.२० ते ६.४४ हा मुहूर्त पंचागकर्त्यांनी दिला आहे. तर बुधवारी लक्ष्मीपूजनासाठी दिवसभर मुहूर्त आहेत. यामध्ये विशेषत: पहाटे ६.३० ते सकाळी ९.४२, सकाळी ११ ते दुपारी ११.४२, दुपारी २.०५ ते रात्री ८.२४ आणि रात्री ९.२५ ते १२.२५ या कालावधीत मुहूर्त देण्यात आले आहेत. गुरूवारी पाडव्याच्या दिवशी महासरस्वतीच्या पूजनासाठी पहाटे ३.३० ते रात्री ८.१० व सकाळी १०.१५ ते दुपारी २ या कालावधीत मुहूर्त आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारीवर्ग हिशेबाच्या नवीन पोचट्यांचे पूजन करतात. या चोपड्या खरेदी करण्यासाठी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी रविवार कारंजा आणि मेन रोडवर परिसरात गर्दी केल्याचे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाके न फोडण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला "नको फटाक्याची वात, लावू विवेकाची ज्योत" असा नारा देत, फटाके वाजवल्याने आजारांना निमंत्रण मिळते, प्रदूषण होते, प्राण्यांनाही त्याचा त्रास होतो. तसेच हजारो रुपयांचा चुराडा होतो असे फटाक्यांचे दुष्परिणाम अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मांडले आणि त्याला साद देत येवला तालुक्यातील बाभूळगाव येथील संतोष श्रमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी यंदा दिवाळीला महागडे फटाके न वाजवण्याचा संकल्प केला. दिवाळी हा फटाक्यांचा सण नसून तो दिवे-पणत्यांचा आहे. दिवाळीच्या काळातील प्रदूषण आटोक्यात आणणे आणि फटाक्यांच्या अनुत्पादक खर्चाला आवर घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या 'अंनिस'च्या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला. 'अंनिस'चे येवला शाखा कार्यवाह उदयकुमार कुऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांना फटाके कमी फोडणे अथवा अजिबात न फोडण्याचे आवाहन केले. फटाक्यांच्या वाचलेल्या पैशातून खाऊ, खेळणी, पुस्तके घेण्याचे व गरीब गरजूंना मदत करावी, असे सूचवले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी संकल्पपत्र भरून देत १०० ते दोन हजारांहून अधिक रुपयांचे फटाके न वाजवण्याचा निर्धार केला, तशी शपथ देखील घेतली. यावेळी प्राचार्य जी. एस. येवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. एम. पी. गायकवाड, प्रा. किशोर सोनवणे, उपप्राचार्य आप्पासाहेब कदम, माध्यमिक विभाग प्रमुख व्ही. आर. परदेशी, दत्तात्रय खोकले, तुषार जेजुरकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणेदोनशे कोटींची मालमत्ता जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धान्य घोटाळ्यातील ठेकेदार संपत घोरपडे व त्याच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली मालमत्ता जप्तीची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. आतापर्यंत ८० टक्क्यांहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये शेकडो गुंठ्यांचे भूखंड, दोन पेट्रोलपंप, सदनिका, ११ वाहनांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली. घोरपडे कुटुंबीयांकडे तब्बल पावणेदोनशे कोटींचे घबाड सापडल्याने सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत.

वाडीवऱ्हे, घोटी, सुरगाणा, अंबड, पिंपळगाव बसवंत, ओझर यांसह अनेक ठिकाणी स्वस्त धान्य दुकानातील घोटाळ्यांमध्ये घोरपडे कुटुंबीयांचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संपत घोरपडे, त्यांच्या दोन भावांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मोक्कान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोर्टाने त्यांना शरण येण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही ते हजर न झाल्याने त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या त्या भागातील तहसीलदारांच्या माध्यमातून ही जप्तीची कारवाई केली जात असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. इगतपुरी तालुक्यातील भंडारवाडी, भरवीर, सिन्नर तालुक्यातील धारणगाव, फर्दापूर, वडनेर दुमाला, दिंडोरी तालुक्यातील जऊळके या ठिकाणी घोरपडे यांची शेकडो गुंठे जमीन असून, ती जप्त करण्यात आली. बहुतांश भूखंडांचे सातबारा उतारेही प्राप्त झाल्याची माहिती खेडकर यांनी दिली. याखेरीज म्हसरूळ येथे आकाश पेट्रोलपंप आणि त्रिमूर्ती चौकातील विशाल पेट्रोलपंपावर देखील जप्तीची कारवाई करण्यात आली. आतापर्यंत सुमारे १७५ कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, अजूनही २० टक्के मालमत्ता जप्त होणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अशी आहे मालमत्ता

इगतपुरी तालुक्यातील भरवीर, भंडारवाडी येथे ९३ गुंठे, सिन्नर तालुक्यातील धारणगाव, फर्दापूरमध्ये २२० गुंठे, पिंपळद येथील ९८ गुंठे भूखंड जप्त केल्याची माहिती पुढे आली आहे. याखेरीज दोन पेट्रोलपंप, पाथर्डी, उंटवाडी येथील सदनिका तसेच जऊळके येथील अनेक भूखंड जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती खेडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक बाजारावर कारवाईचे सावट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकवासीयांच्या दिवाळीवर अतिक्रमण निर्मूलनाचे सावट दाटले आहे. मेनरोड गंगास्लॅबवर दरवर्षी भरभरून वाहणारा बाजार यावर्षी विशेष सजलेला नाही. येथे काही दिवसांपर्यंत व्यवसायिकांना बसू देण्यास मनाई करण्यात आली होती. दरम्यान, रविवारपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने येथे बाजार भरला; मात्र व्यवसायिक आणि ग्राहक दोन्ही पातळीवर निरुत्साह स्पष्टपणे दिसून आला आहे.

पाणत्या, बत्तासे, केरसुणी, महालक्ष्मी अशा विविध वस्तुंची पारंपरिक दुकाने थाटली होती. शहरात सिंहस्थपूर्व अतिक्रमण मोहीम त्यानंतर सिंहस्थाचे नियाजन व त्यासाठी व्यवसायिकांना केलेली बंदी त्यानंतर पितृपक्ष आणि नंतर पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेने अतिक्रमणाच्या हातोड्याची धास्ती यामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये केवळ व्यवसायिकच नव्हे तर जवळपास प्रत्येक रहिवाशी काही ना काही कारणाने अस्वस्थतेच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे. मंदिर परिसरात पुरातत्व विभागाच्या १००, २००, ३०० मीटर नियमांचा बडगा, शासकीय भूखंडावर वसलेल्या वस्त्यांना आणि तसेच इतर बांधकामधारकांना नियमबाह्य ठरवत अतिक्रमणाची नोटीस, मंदिरात फुल नारळास केलेली बंदी त्यामुळे पूजा साहित्य व्रिकेत्यासह अनेकांना व्यवसायास पारखे व्हावे लागत आहे. अशा एक ना अनेक बाबतीत प्रत्येक नागरिक भीतीखाली वावरत आहे. तशात सिंहस्थानंतर भाविक पर्यटकांचा ओघ विशेष राहिलेला नाही. येथील अर्थव्यवस्था भाविक पर्यटनावर अवलंबून असल्याने पुजा साहित्य विक्री अथवा खाणावळ किंवा निवासाची व्यवस्था करणारे सारेच मंदिच्या फेऱ्यात सापडले आहेत. एकूणच यंदाची दिवाळी त्र्यंबवासीयांना काळजीत टाकणारी असल्याचे स्पष्ट चित्र जाणवत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांची दिवाळी फसली मंदीच्या फेऱ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

शहरातील एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची यंदाची दिवाळीच्या 'कही खुशी, कही गम' अशी साजरी होत आहे. अनेक कंपन्यांना मंदीचा फटका असल्याने कामगारांच्या हातात बोनस आलेला नाही. काही कंपन्यांनी बोनस दिला असला तरी तो समाधानकारक नसल्याने कामगारांमध्ये विशेष उत्साह दिसत नाही.

बहुतांश कंपन्यांमधील कंत्राटी कामगार दिवाळी बोनसपासून वंचित आहेत. यावर्षी मंदीचे सावट असल्याने काही कंपन्यांनी बोनस दिलेले नाहीत. सिटू युनियनने मात्र वेतनवाढीच्या करारात नमूद केलेल्या रक्कमेवरूनच कामगारांना बोनस मिळवू दिले आहेत. परंतु, काही कंपन्यांमध्ये दिवाळीचा सण तोंडावर आला असतांना बोनस दिला गेल्या नसल्याचे कामगार संघटनांची प्रतिनिधी सांगतात.

'त्यांची' दिवाळी अंधारात

ट्रायकॉम कंपनीतील कामगार वेतनापासून वंचित आहेत. दरम्यान, रविवारी कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांनी कंपनी मालकांशी दूरध्वनीदवारे संपर्क साधत बोलणी केली. मंगळवारी काही रक्कम देण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापन करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांगीतुंगी सोहळ्यासाठी ५० कोटींच्या निधीची अपेक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जैन धर्माचे पहिले तीर्थकार ऋषभदेव यांची मांगीतुंगी (ता. बागलाण) येथे भव्य मूर्ती साकारण्यात येत असून, मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा फेब्रुवारीत होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मंत्रालयात घेतला. या सोहळ्यासाठी ५० कोटींचा निधी मागण्यात आला असून, दोन तीन दिवसात त्याला मंजुरी मिळेल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

मांगीतुंगी डोंगरावर भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंचीची मूर्ती साकारण्यात येत आहे. १६ वर्षांपासून एका अखंड पाषाणात राजस्थानी कारागिर ही मूर्ती साकारत आहेत. ११ ते १६ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच, महामस्तकाभिषेक महोत्सव होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. जगभरातील सुमारे २० लाख भाविक या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी बैठक बोलावली होती. त्यास खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दीपिका चव्हाण, सीमा हिरे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव नील पोरवाल, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे सीईओ सुखदेव बनकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार, शशांक काळे उपस्थित होते.

कुशवाह यांनी यावेळी महोत्सवाच्या तयारीबाबतचे सादरीकरण केले. मांगीतुंगी परिसराचा नैसर्गिक पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. मूर्तीच्या परिसरात व्हॅली उद्यान विकसित करणे, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी डोंगर भागाचे सबलीकरण करणे, पर्यटन वाढीसाठी प्रचार करणे, ऋषभदेव मूर्ती मार्गावरील रस्त्याचे मजबुतीकरण करणे, हरणबारी धरण परिसरात पर्यटनस्थळ विकसित करणे, मांगीतुंगी परिसरातील इतर पर्यटनस्थळांचा विकास करणे आदी कामांचा समावेश आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबलीच्या ५७ फूट मूर्तीच्या मस्तकाभिषेकासाठी केंद्र आणि तेथील राज्य सरकार ज्या पद्धतीने आर्थिक सहकार्य करते तसेच सहकार्य करून या महोत्सवासाठी केंद्र तसेच प्रादेशिक पर्यटन विकास महामंडळाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रशासनामार्फत करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पणती सजावटीतून उजळली येवलानगरी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

मांगल्याचे प्रतिक असलेल्या घरादारांसमोरील मिणमिणत्या पणत्या अन् रांगोळी म्हणजे दिपावलीतील मोठे देखणेपण. येवल्यातील खटपट युवा मंचने आयोजित केलेल्या पणती सजावट स्पर्धेमुळे शहर उजळून निघाले. शहरातील संत नामदेव मंदिरात झालेल्या पणती सजावट स्पर्धेला महिलांसह युवतींचा भरभरून प्रतिसाद लाभला. ‍

आकर्षकरित्या घरूनच सजवुन आणलेल्या पणत्या अन् तितक्याच खुबीने त्याभोवती सुंदरतेने रेखाटलेली रांगोळी अशी मनमोहक सजावट महिलांनी यावेळी केली. या लखलखत्या पणत्यांनी मंदिर प्रकाशमय झाले. महिलांचे कलागुण सजावट स्पर्धेतून दिसून आले आणि तितकाच उत्साह देखील. स्पर्धेत एकूण ५३ महिला व युवतींनी सहभागी घेतला.

स्पर्धेचे परिक्षक म्हणून शंकरसा टाक, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, संतोष खंदारे यांनी काम पाहिले. मंचचे अध्यक्ष आयोजक मुकेश लचके यांनी प्रास्ताविक तर प्रा. दत्तात्रय नागडेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष नंदलाल भांबारे, रमाकांत खंदारे, अमोल लचके, ज्ञानेश टिभे, श्रीकांत खंदारे, विशाल तुपसाखरे, तुषार भांबारे आदी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

असे आहेत विजेते

गट - १५ वर्षाखालील : १) प्रियंका धकाते, २) वैष्णवी भुसनळे, ३) पायल एंडाईत (अंदरसुल), उत्तेजनार्थ : वैष्णवी भिंगारकर, रक्षिता बाबर, अनुजा धकाते

गट - १५ वर्षावरील : १) श्रुती नाळके, २) ज्योती बाबर, ३) कोमल मारवाडी, उत्तेजनार्थ :

माया काबरा, भाग्यश्री बाबर, मिनाक्षी क्षत्रिय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुने कपडे जमा करण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर दिवाळीचा सणात आदीवासी पाड्यांवर जुने कपडे सातपूरमधून गोळा करून दरवर्षी वाटण्यात येतात. यासाठी जनसेवा सेवापुर्ती फाऊंडेशनने जुने कपडे गोळा करण्याची मोहीम हाती घेतली होती. सातपूर परिसरातील अनेक नागरिकांनी जुने कपडे जनसेवा संस्थेकडे जमा केली आहेत. जमा करण्यात आलेले जुने कपड्यांचे हरसूल भागात आदिवासी पाड्यांवर वाटप केले जाणार आहे. तसेच आदिवासी बांधवांना पणती, फराळाचे साहित्य देखील वाटण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष धनंजय खाडीकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो पाऊस आणि टाफेटा’ने मारली बाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबईतील अश्व थिएटर संस्थेच्या 'तो पाऊस आणि टाफेटा' ही तुषार गोडसे लिखित एकांकिका 'बाबाज करंडक २०१५' या राज्यस्तरीय स्पर्धेची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. 'लायन्स क्लब ऑफ नाशिक' व 'बाबाज थिएटर' यांच्या वतीने आयोजित केलेल्या या एकांकिकेने परीक्षकांबरोबरच प्रेक्षकांचीही दाद मिळवित स्पर्धेत यश मिळवले.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पडलेल्या या दोन दिवसीय स्पर्धांचा निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. रंगकर्मींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील २४ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत पुण्यातील संक्रमण संस्थेच्या 'एकूट समूह' या यतीन माझिरे लिखित एकांकिकेला द्वितीय तर व्यक्ती या संस्थेच्या 'प्रती गांधी' या धनंजय सरदेशपांडे या एकांकिकेला तृतीय क्रमांकांने गौरविण्यात आले. नितीन सावळे, जुईली शिर्के, यतीन माझिरे व सुयश झुंजुरके यांना उत्तम दिग्दर्शन या पारितोषिकाने गौरविण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण शुभांगी पाठक, रवींद्र ढवळे व आशू सिंग यांनी केले. यावेळी लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी मुकुंद कुलकर्णी, बाबाज थिएटरचे प्रशांत जुन्नरे, सावानाचे सुरेश गायधनी, लायन्स क्लब ऑफ नाशिकचे उमेश सोनवणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकातही बिहारचा आनंदोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आज बिहारियोंने मोदीजीको अपने मन की बात बता दी यासारख्या कोट्यांचा आज व्हॉटस अॅपसह अन्य सोशल मीडियावरही पाऊस पडला. रोजगारानिमित्त नाशकात आलेल्या बिहारी बांधवांनीही महाआघाडीला यश मिळाल्याबद्दल आंनदोत्सव साजरा केला.

बिहार निकालाचा आनंदोत्सव बिहारी बांधवांनी नाशिकमध्येही साजरा केला. रोजगारानिमित्त सुमारे ४० ते ५० हजार बिहारी नागरिक नाशिकमध्ये वास्तव्यास आहेत. सातपूर येथील स्वारबाबानगर, नाशिकरोड, अंबड लिंकरोड, श्रमिकनगर परिसरात बिहारी बांधव मोठ्या संख्येने राहतात. लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांना मानणारा मोठा बिहारी वर्ग नाशिकमध्ये असून, त्यांनी एकेमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. गुलालाने माखलेले काही बिहारी लोक शहरातील एमजी रोड, मेनरोड परिसरात दिवाळीच्या खरेदीसाठी आल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान भाजपचा पराभव झाल्याने व्हॉटस अॅप, फेसबुकच्या वॉलवरही दिवसभर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपच्या रणनीतिची खिल्ली उडविली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजाच्या उंबरठ्यावर तेवणार मदतीचा दीप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रत्येक जण दीपावलीच्या तोंडावर स्वानंदात मग्न असताना निसर्गाच्या अवकृपेचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या मदतीसाठी पंचवटीतील दंडे हनुमान मित्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकाची पावले बाजारपेठेकडे ओढली जात असताना सामाजिक जाणिवेचे भान जागृत करण्यासाठी आयोजित निधी संकलन उपक्रमात सुमारे लाख रुपयांपेक्षाही अधिक निधी रविवारी संकलित करण्यात आला.

'रुपया तुमचा, प्रयत्न आमचा' असे आवाहन करीत दंडे हनुमान मित्र मंडळाच्या वतीने रविवारी शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील सर्व व्यापारी वर्गासह नाग‌रिकांनी या उपक्रमात मुक्त हस्ते मदत करीत सहभाग नोंदवला. हा उपक्रम दिवाळीच्या कालावधीतही सुरूच राहणार असून, यातून जमा होणारी सर्व रक्कम मुख्यमंत्री निधीसाठी देण्यात येणार आहे. हा निधी राज्यातील जलयुक्त शिवार मोहिमेसाठीच वापरला जावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे.

रविवार सुटीचा दिवस असला तरीही दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत गर्दी होती. व्यापारी वर्गही रविवारी दुकानात उपस्थित होता. यामुळे पंचवटीसह मेनरोड, सीबीएस, शालीमार, अशोक स्तंभ आदी परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात मोठी मदत देऊन सहभाग घेणाऱ्या व्यापाऱ्यांना तुळशीचे रोप देऊन गौरविण्यात आले. या मदतनिधीत मोठा सहभाग घेणाऱ्या व्यापारी वर्गात प्रकाश सुपारी समूहाचे फासलीवाल परिवार, आनंद फूटवेअरचे विनोद जेठवा, मे. पांडूरंग पवार, दगडू तेली, चांदवडकर, आमले परिवार, श्रीराम ट्रेडर्स, सुनील जाधव, जयहिंद लेदर ब्रदर्स, चोकसी ज्वेलर्स, सागर बुक डेपो आदींनी सहभाग घेतला.

दंडे हनुमान मित्र मंडळाच्या वतीने गजानन शेलार, राहुल शेलार, सतीष आमले, नंदन भास्करे, मुन्ना अन्सारी, गौरव सोनार, विशाल आटोळे, अंकित पाटील, वैभव शुक्ले, सचिन कदम, रमेश महाले, वैभव वाकचौरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री निधीस मदत

यंदा निसर्गाच्या अवकृपेने राज्यात बहुतांश ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीच्या आनंदात सर्वजण मग्न असताना अर्थव्यवस्थेचा कणा असणारा बळीराजा उपेक्षित राहू नये, यासाठी हा उपक्रम राबवला. यातील निधी मुख्यमंत्री निधीस देण्यात येईल.

- राहुल शेलार, दंडे हनुमान मित्र मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images