म. टा. प्रतिनिधी, नाशिक
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याकडील पैशांची तसेच दागिन्यांची पूजा केली जाते. सर्वत्र तेच वातावरण असल्याने या परिस्थितीचा फायदा चोरटेही घेऊ शकतात. यापार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बंदोबस्तात वाढ केली असून नंतरच्या काळात होणाऱ्या घरफोडी सारख्या गुन्ह्यांना आळा घालण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.
दोन वर्षांपूर्वी उपनगर पोलिसांनी दरोड्याची तयारी करणाऱ्या एका टोळीला अटक केली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन करोडपती व्यवसायिकांच्या घरी दरोडा टाकण्याची त्यांनी तयारी केली होती. यानंतर नुकतेच धुळे जिल्ह्यातील एका गावात १० ते १२ सशस्त्र दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने लुटून नेले. यापार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. याबरोबर, लक्ष्मीपूजनानंतर अनेक कुंटुंब बाहेरगावी पडतात. यामुळे अनेक रहिवाशी इमारती रिकाम्या होतात. याचा फायदा घेत चोरटे दरवर्षी चार ते पाच दिवसात लाखो रुपयांचा ऐवज लंपास करतात. चालू वर्षातील सप्टेंबर महिन्यापर्यंत २९ ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करीत सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली. आतापर्यंत यातील अवघे ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. रात्रीच्या घरफोडींची संख्या सुध्दा १८७ च्या पुढे सरकली असून अवघ्या ६३ गुन्ह्यांमधील आरोपींपर्यंत पोहचण्यास पोलिस यशस्वी ठरलेत.
नागरिकांनो, सावध रहा!
सोसायटीसाठी वॉचमॅन नसणे, सोसायटीमध्ये कमी सभासद आणि त्यातील बहुतांश बाहेरगावी जाणे, रस्त्यावर दुचाकी पार्क करून बाहेरगावी जाणे, अशा घटना गुन्हेगारांना निमंत्रण देतात. त्यामुळे घरमालकांनी आपल्या घराची तसेच वाहनाची सुरक्षा पक्की करणे फायद्याचे ठरू शकते, असे मत पोलिस सूत्रांनी व्यक्त केले. पोलिस आपल्यापरीने प्रयत्न करतील; मात्र नागरिकांनी थोडी सावधगिरी बाळगावी, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली.
झटपट लोन उपलब्ध
इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंप्रमाणे गाड्यांची बुकींगही जोरात सुरू आहे. गाड्यांच्या खरेदीसाठी अनेक फायनान्स कंपन्या अर्थिक सहाय्य करण्यास तयार असल्याने गाड्यांचा बाजार तेजीत आहे. अवघे काही कागदपत्रे असल्यास ताबडतोब लोन उपलब्ध करून दिले जात आहे. जुन्या गाड्या वितरकांकडून घेतल्या जात आहेत. टू व्हिलरप्रमाणेच चारचाकी गाड्यांच्या मागणीत यंदा वाढ झाल्याचे वितरकांचे म्हणणे आहे.
कारवाई
भद्रकालीतील फळबाजाराजवळ अवैधपध्दतीने फटाके दुकान सुरू करणाऱ्या चार व्यवासायिकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कारवाईनंतर फटाक्यांचा सर्व साठा जप्त करण्यात आला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चार व्यवसायिकांनी भद्रकाली फळबाजारावर महापालिकेची अथवा पोलिसांची कोणतीही मंजुरी न घेता दुकान सुरू केले होते. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर भद्रकाली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी कारवाईस सुरुवात केली. यात काही हजाराचा माल जप्त केल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यवसायिकांविरोधात कलम २८६ नुसार गुन्हा दाखल केला. या कलमानुसार स्फोटक पदार्थ बाळगताना निष्काळजीपणा दाखवून मनुष्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे सिध्द झाल्यास तुरुंगावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.
लक्ष्मीपूजन
दिवाळीच्या सणामधील महत्त्वाचा दिवस म्हणजेच अश्विन अमावस्या अर्थात लक्ष्मीपूजनाचा दिवस. धनधान्य, समृध्दी, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य लाभावे यासाठी या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विष्णू देवांनी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा सांगितली जाते. या दिवशीही सूर्योदयापूर्वी स्नान करण्याला म्हणजेच अभ्यंगस्नानाला विशेष महत्त्व आहे. प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा करुन नवीन वस्त्रे परिधान केली जातात व फटाक्यांची आतषबाजी केली जाते. सायंकाळी लक्ष्मी, श्रीविष्णू इत्यादी देवता आणि कुबेर यांची विधीवत पूजा केली जाते. यावेळी घरातील दागिने, सोने तसेच चांदीच्या वस्तू, कुंचा, सूप, पैसे यांचेही पूजन केले जाते. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे, खवा, पाच फळे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते असे मानले जाते. त्यामुळे घरोघरी ही पूजा केली जाते. पहाटे तसेच रात्री दीपोत्सव केला जातो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट