मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
स्वामी समर्थनगरात वृक्षतोडीचा गुन्हा
काँग्रेस गटनेतेपदी शाहू खैरे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
विकासकामांवरून राडा
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नगरसेवक निधी, रखडलेली विकासकामे आणि सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रीयतेसह आक्रमक असलेल्या प्रशासनावर भाजपसह शिवसेना व सत्ताधारी गटातीलच नगरसेवकांनी हल्लाबोल करत महासभेत राडा केला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी वेलमध्ये येवून राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. विकासकामे होत नसल्याने संतप्त नगरसेवकांनी आयुक्त व महापौरांनाही घेराव घालण्याचा प्रयत्न केला. भाजप नगरसेवकांनी निषेधाचे फलक झळकावत प्रशासन व सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांनीही या आक्रमक नगरसेवकांना जशासतसे उत्तर दिले. मात्र, या वादामुळे नगरसेवकांच्या पदरात ३० लाखांची रक्कम पडली.
महापौर अशोक मुर्तडक याच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महासभा झाली. यात विषय सुरू होण्यापूर्वीच नगरसेवकांनी ५० लाखाचा नगरसेवक निधी आणि विकासकामे होत नसल्यावरून सत्ताधारी व आयुक्तांवर आक्रमक चाल केली. शिवसेना भाजपच्या नगरसेवकांनी एकत्रित येवून ५० लाखांचा नगरसेवक निधीच्या कामांसह विविध विकासकामे होत नसल्याचा टाहो फोडला. त्यावर आयुक्तांनी आर्थिक लेखाजोखा मांडत नगरसेवक निधी राज्य सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे सात ते आठ लाखांपर्यंतच असल्याचा दावा केला. ४९० कोटींची कामे सुरू असल्याचा दावा केला. मात्र, नगरसेवकांचे समाधान न झाल्याने त्यांनी थेट वेलमध्ये येवून गोंधळ व घोषणाबाजी सुरू केली.महापौरांचा राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त व महापौरांनाच घेराव घातला. 'विकासकामांचे बोला', असे सांगत स्पष्टीकरणाची मागणी केली. भाजप नगरसेवकांनी निषेधाचे फलक झळकावले. स्मार्ट सिटी व सिंहस्थाच्या नावाखाली पळवाट काढू नका, अशा घोषणा दिल्या.
नगरसेवकांपुढे नमते धोरण
नगरसेवकांच्या आक्रमक रेट्यापुढे महापौरांसह आयुक्तांनी नमते घेत, नगरसेवक निधीची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, नगरसेवकांनी निश्चित वेळेची मागणी केली. त्यामुळे ५० लाखांची कामे सात दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. बजेट आले नसल्याने सुरुवातीला ३० लाखांची कामे तात्काळ मार्गी लावा, असे महापौरांनी आदेश दिले. कामांच्या फाईल्स इकडे तिकडे फिरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन आयुक्तांनी दिले. त्यामुळे आक्रमकतेनंतर नगरसेवकांच्या पदरी ३० लाखांचा निधी तत्काळ पडला आहे.
आयुक्तांची खरी-खोटी
नगरसेवक निधीवरून आक्रमक होणाऱ्या नगरसेवकाना 'तुम्हाला दुसरी टर्म आहे, मात्र मला एकच टर्म आहे, असे सांगून त्यांची हवा काढून घेण्याचा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रयत्न केला. नगरसेवक निधी राज्यसरकारच्या जीआरनुसार २ ते ८ लाख असल्याचा दावा केला. नगरसेवक निधी वाढविण्यासाठी आपण राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवू असे सांगून मी जाणीवपूर्वक कामे रेंगाळत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. आम्ही पर्ण क्षमता वापरत असून बजेटच आले नसल्याने कामे करतांना अडचण येत असल्याचा खुलासा आयुक्तांनी केला. शहराचा विकास व्हावा असे आम्हालाही वाटते. मला एकच टर्म असल्याचा टोला नगरसेवकांना लावला. सोबतच त्यांनी महापालिकेमार्फत सुरू असलेल्या ४९० कोटींच्या कामांचा लेखाजोखा सादर करत नगरसेवकांची आक्रमकता कमी करण्याचा प्रयत्न केला.
... तर माझा पदभार खुने यांच्याकडे
शेतकऱ्यांच्या जमीन संपादनाचा मोबदला मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या उद्धव निमसे यांना अधीक्षक अभियंता सुनील खुने यांनी सभागृहात लिलया शांत केले. आपल्याच सूचनेने कामे झाल्याचे सांगून आपणच नारळ फोडल्याची आठवण करून दिली. सोबतच काही नगरसेवकांची नावे त्यांनी साक्षीला घेतल्याने सभागृहात एकच हशा पिकला. निमसे यांच्या आक्रमकतेची धार एकदमच कमी झाली. तर खुनेंच्या खऱ्या बोलामुळे अनेक नगरसेवक शांत झाल्याचे बघून आयुक्तांनी 'आता मी रजेवर गेलो तर खुनेंकडेच पदभार देईल' असा उपहासात्मक टोला नगरसेवकांसह खुने यांना लगावला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
नाशिककर विद्यार्थ्यांना ‘टीआयएफआर’चे प्रशिक्षण
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डामेंटल रिसर्च (टीआयएफआर) या जागतिक दर्जाच्या विज्ञान संशोधन संस्थेत प्रशिक्षण घेण्याची संधी नाशिकमधील काही विद्यार्थ्यांना मिळाली आहे. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली असून आज, ते यासाठी मुंबईला रवाना होणार आहेत.
विज्ञानाची उत्सुकता व प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या भेटींचे आयोजन या संस्थेकडून केले जाते. देशातील विद्यार्थ्यांचा संशोधन क्षेत्रात मोठा सहभाग असावा, या हेतूने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या वेळेस हा मान नाशिकच्या निवडक शाळांना मिळाला आहे. यामध्ये पुरूषोत्तम इंग्लिश स्कूल, नाशिकरोडची र. ज. बिटको गर्ल्स हायस्कूल, जु. स. रुंगटा हायस्कूल, चांडक कन्या विद्यालय, सिन्नर येथील ब. ल. सारडा विद्यालय या शाळांचा समावेश आहे.
दोन दिवसीय प्रशिक्षणात नेहरू विज्ञान केंद्र, टाटा इन्स्टिट्यूटमधील विविध प्रयोगशाळा, दिग्दर्शनासह प्रात्याक्षिक, दृकश्राव्य माध्यमातून व्याख्याने, शास्रज्ञ कसे होता येईल, विज्ञान प्रश्नमंजुषा इत्यादी अभ्यासपूर्ण बाबींचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. संशोधन क्षेत्रात काम कसे चालते, शास्त्रज्ञ म्हणून काम करण्यासाठी काय करावे लागते, या संस्थेत चालणारी शास्त्रज्ञांची कामे जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा प्रवास व निवास खर्च 'टीआयएफआर' करणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
स्वच्छता खासगीकरणाला नकार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
नाशिककर थंडीने गारठले
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढत असल्यामुळे राज्यात हळूहळू थंडीचा कडाका वाढू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरू लागली असून, गुरुवारी बहुतांश ठिकाणी किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. राज्यात नाशिकमध्ये ११.५ अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली.
नाशिकमध्ये दिवाळी सरल्यानंतर तापमान घटण्यास सुरुवात झाली. या आठवड्यात १४ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत तापमान सरासरी १५ अंश सेल्सियस इतके होते. मात्र, १७ तारखेपासून तापमान कमी होण्यास सुरुवात झाली. राज्यात गुरुवारी सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक शहरात झाली. यात आणखी घट होण्याची चिन्हे असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार २६ नोव्हेंबरपर्यंत ११ अंश सेल्सियस होण्याची चिन्हे
आहेत.
थंडीचा सिझन हा आरोग्यासाठी चांगला असल्याने जॉगिंग ट्रॅकवरची गर्दी वाढत आहे. शहरातील इंदिरानगर, अनंत कान्हेरे मैदान त्याचप्रमाणे पंचवटी, नाशिकरोड येथील जॉगींग ट्रॅकवर गर्दी वाढत आहे. त्याचप्रमाणे गरम कपडे घेण्यासाठी तिबेटीयन मार्केटमध्ये गर्दी वाढत असून, खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
लहान मुलांच्या हातमोजापासून ते विविध लहान-लहान सुंदर बंद गळ्याचे जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. मऊ कापसाचे सुंदर स्वेटर आणि क्विक ड्रायची मुलांचा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी खरेदी केली जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
दुष्काळग्रस्तांनी मांडली कैफियत
तीन वर्षांपासून जेमतेमच पाऊस असल्याने कोरडाठाक पडलेला गावचा बंधारा, त्यात पाण्याचा मागमूस नसल्याने आणि थेंब भर पाण्यासाठी आसुसलेल्या विहिरी तसेच, उद्ध्वस्त शेतकऱ्याचे भकास आयुष्याची चित्तर कथा सांगणाऱ्या नापीक जमिनी... नांदगाव तालुक्यातील अनकवाडे या गावातील दुष्काळाचे हे भीषण चित्र पाहून या गावाची पाहणी करण्यासाठी थेट दिल्लीवरून आलेले केंद्रीय कृषी व नियोजन समितीच्या पथकातील अधिकारी ही निःशब्द झाले.
दुष्काळग्रस्त गावांच्या पाहणी दौऱ्यांतर्गत केंद्र सरकारच्या कृषी व नियोजन समिती पथकाचे अधिकारी सौमित्र चटर्जी व मानस चौधरी यांनी नांदगाव तालुक्यातील अनकवाडे या अवघ्या १९३० लोकसंख्या असलेल्या गावाला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासह जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, प्रांताधिकारी वासंती माळी, तहसीलदार सुशील बेलेकर, गटविकास अधिकारी सुलेखा कोठावळे, कृषी अधिकारी अशोक कुळधर, मंडल अधिकारी कैलास चौधरी, सरपंच बाळासाहेब धिवर आदी उपस्थित होते.
केंद्रीय पाहणी पथक येणार म्हणून अनकवाडे गावातील महिलांनी आपली कैफियत मांडण्यासाठी प्रमुख मार्गावर सकाळी नऊ वाजेपासून एकच गर्दी केली होती. तहसीलदार, सरपंच यांच्याकडे त्यांनी पाणी द्या, पाणी द्या अशी आग्रही मागणी केली. दरम्यान, केंद्रीय पाहणी पथकातील चटर्जी आणि चौधरी यांनी अनकवाडे गावाचा बंधारा निवृत्ती धीवर, कारभारी धीवर या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सद्यस्थिती पिकांची अवस्था, विहिरींची परिस्थिती पाहून शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती घेतली. मका लावला पण, त्यानेही दगा दिला. दिवाळीच्या उंबरठ्यावर पाऊस एकदा तरी येईल म्हणून कांद्याचे पीक घेतले पण तेही काही आले नाही. ही वास्तव स्थिती पाहून केंद्रीय अधिकारीही जणू निःशब्द झाले. गावाचा बंधारा तीनवर्षापासून भरलाच नाही. पाण्याचा दुसरा स्त्रोत नाही ही भीषण स्थिती पाहून अधिकारी वर्गही गहिवरला. ग्रामसेवक पी. के. आहिरे यांच्याकडून दारिद्र्य रेषेखालील तसेच कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेतली.
कर्ज मिळते का?
व्याज दर किती? शासकीय योजना पोहचतात का? असे अनेक प्रश्न सौमित्र चटर्जी यांनी विचारून महत्त्वाचे मुद्दे नोंदवून घेतले. जिल्हाधिकारी कुशवाह यांनी स्थानिक व तालुका अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. दरम्यान, पाहणी पथक आले नि गेले आमच्या पदरात काय पडणार असा, सवाल ग्रामस्थ विचारताना दिसत होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
७५ टक्के घरफोड्या ‘अंधारात’
चालू वर्षात झालेल्या एकूण २३९ घरफोडीच्या घटनांपैकी अवघ्या ५७ गुन्ह्यांमधील संशयितांपर्यंत पोहचणे पोलिसांना शक्य झाले आहे. दिवसा घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांनी तर पोलिसांसमोर आव्हानच निर्माण केले असून, याच वर्षात दिवसा आणि रात्रीच्या सुमारास घरफोडी करून गुन्हेगारांनी सुमारे तीन कोटी ३९ लाख ६९ हजार ५२७ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत शहरात एकूण २३९ घरफोड्या झाल्या. यात दिवसाच्या ३८ तर रात्रीच्या २०१ घरफोडींचा समावेश आहे. दिवसाच्या घरफोडींचा तपास करताना पोलिसांची दमछाक होत आहे. या प्रकरातील आतापर्यंत अवघ्या पाच गुन्ह्यांचा तपास पोलिसांना करणे शक्य झाल्याचे दिसते. रात्रीच्या घरफोडींमध्ये सुध्दा ७५ टक्के गुन्ह्यांमधील आरोपी मोकाट असून, अवघ्या ५२ गुन्ह्यांचा पोलिसांनी माग काढला आहे. नोव्हेंबर महिन्यात सुध्दा घरफोडींच्या घटनांना ब्रेक लागला नसून, पंचवटी आणि आडगावसारख्या भागात दिवसाच्या घरफोडीची संख्या तुलनेत वाढली आहे. घरफोडीच्या गुन्ह्यात चोरी गेलेल्या तीन कोटी ३९ लाख ६९ हजार ५२७ रुपयांपैकी अवघ्या २१ लाख रुपयांचा मुद्देमाल परत मिळाला आहे.
दिवसाची घरफोडी करणे चोरट्यांना रात्रीच्या तुलनेत सोपे जाते. गंगापूररोड, अंबड, उपनगर, सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रहिवाशी भाग, तसेच इंदिरानगरमध्ये दिवसाच्या घरफोड्या होतात. दिवसाच्या वेळी अनेक इमारती ओस पडतात. याचा फायदा घेऊन चोरटे टेहाळणी करून इमारतीत घुसतात. त्यानंतर धारदार शस्त्राच्या मदतीने लॉक तोडून घरात प्रवेश करतात. बऱ्याचदा घरांना सेफ्टी दरवाजा नसल्याने चोरट्यांचे हे काम अगदी काही सेकंदात होते. याबाबत बोलताना क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, कोणत्याही गुन्ह्यांचा तपास करताना घटनास्थळी आढळून आलेले पुरावे, सीसीटीव्ही, गुन्हेगारांची काम करण्याची पध्दत याद्वारे तपास केला जातो.
अनेकदा घरफोडीच्या गुन्ह्यात हे पुरावे सापडून येत नाहीत. यामुळे तपासाचे चक्र कोठेतरी थांबते. एखाद्या सराईत गुन्हेगाराला अटक केल्यानंतर अनेक गुन्हे उघडकीस येतात. त्यामुळे घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सातत्याने सुरूच असतो. प्रतिबंधकात्मक कारवाई देखील होते. परजिल्ह्यातून येऊन गुन्हे करून जाणारे काही गुन्हेगार असू शकतात. त्यातील काहींच्या मागावर आम्ही आहोत, असे गोरे यांनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
शेतकऱ्यांशी साधला संवाद
गेली दोन तीन वर्षे पुरेशा पावसाअभावी मोठ्या अस्मानी संकटाशी झुंजणाऱ्या, दुष्काळी परिस्थितीने पिकांची वाताहत होताना मोठ दुखः सोसणाऱ्या टंचाईग्रस्त येवला तालुक्याचा शुक्रवारी सकाळी केंद्रीय पथकाने पाहणी केली. तेथील एकूण परिस्थिती जाणून घेतली.
डोंगरगाव, सायगाव फाटा, अंदरसूल शिवारातील संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या शेत अन् बांधावर धडकलेल्या या पथकाने पिकांची अवस्था बघत पेरण्या, उपलब्ध पाणी, उचललेले कर्ज व नुकसानीबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय नीति आयोगाचे सल्लागार मानस चौधरी व केंद्रीय उर्जा प्राधिकरणाचे उपसंचालक शंतनु विश्वास हे द्विसदस्यीय पथक गवंडगाव येथे पोहोचले. त्यांच्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी होते.
गवंडगाव येथे पोहचताना या पथकाने प्रथम कोरड्याठाक बंधाऱ्याला भेट दिली. किती दिवसापासून हा बंधारा पाण्याविना आहे, हे जाणून घेतले. गावाचा कमांड एरिया किती, आपण काय काय लागवड केली होती, त्यासाठी एकरी किती खर्च आला, पाणी किती होते अशी शेतकऱ्यांना विचारपूस करीत या पथकाने जळालेली कपाशी बारकाईने न्याहाळली. एकरी ४० हजारांच्या वर खर्च आला. मात्र, पाण्याअभावी होत्याचे नव्हते झाल्याचे पथकासमोर शेतकऱ्याने विषद केले. हातपंपाचीही पाहणी केली. जिल्हाधिकारी कुशवाह यांनी हातपंप हापसला खरा, मात्र पाणीच आले नाही.
केंद्रीय पथकाने गावाचे क्षेत्र किती, किती महिन्यांपासून या हातपंपाला पाणी नाही आदी माहिती घेतली. पुढे हे पथक नाना पाटील या शेतकऱ्याच्या शेतावर धडकले. आपण तीन हेक्टर चार आर इतक्या क्षेत्रात कपाशी केली असून, काही क्षेत्रात तूरडाळ केल्याचे पाटील यांनी दाखवले. सहकारी संस्थानकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले, मोठा खर्च केला पण आज हाती काय लागणार आहे? हे आपणच बघा असे या शेतकऱ्याने सांगताना केंद्रीय पथकाचे त्याकडे लक्ष वेधले गेले.
सायगाव फाट्यावर पाण्याभावी सुकलेल्या बाजऱ्या, न भरलेली कणसे गळून पडलेली हे चित्र दृष्टीक्षेपात पडले. अंदरसूल शिवारात पथकाने वाल्मिक बाबुराव जेजुरकर या शेतकऱ्याच्या शेताला भेट दिली. तीन एकरात घेतलेले बाजरी व मका, जळालेली बाजरीची कणसे असं सर्व काही यावेळी जेजुरकर यांनी केंद्रीय पथकाला दाखवलं. यावेळी केंद्रीय पथकाने एका शेतकऱ्याच्या कांदा पिकाची पाहणी केली. पाणी नसल्याने आता कांदा पोसलाच जाणार नाही, त्यामुळे मार्केटमध्ये तो कोण घेणार? असा प्रतिसवाल यावेळी या शेतकऱ्याने केला.
आम्ही केंद्रा शासनाच्या आदेशाने येथील दुष्काळी परिथितीची पाहणी केली. जे जे आम्हाला प्रत्यक्ष दिसले त्याचा अहवाल आम्ही केंद्राला सादर करणार आहोत.
- मानस चौधरी व शंतनु विश्वास, सदस्य, केंद्रीय पथक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
अंधारातच केली सिन्नरला पाहणी
केंद्रीय पथकाने येवला, नांदगाव येथील दुष्काळाची दाहकती अनुभवल्यानंतर सिन्नर तालुक्याला भेट देऊन पाहणी दौऱ्याची सांगता केली. अधिकाऱ्यांनी मोबाइल, बॅटरी लावून अंधारात पिकांची व बंधाऱ्याची पाहणी केली.
सिन्नर तालुक्यातील दोडी शिवारात हरिभाऊ आव्हाड यांच्या शेतातील ज्वारी पिकाची या शंतनु विश्वास व ऊर्जा प्राधिकरणाचे अधिकारी यांनी पाहणी केली. येवला व नांदगाव येथे पाहणी केल्यानंतर हे पथक सिन्नरमध्ये दाखल झाले. अंधार पडल्याने मोबाइल व बॅटरीच्या साहाय्याने पाहणी करण्यात आली. माळवाडी शिवारातील बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली. तसेच पीकविमा काढूनही विमा मिळाला नसल्याची कैफीयत शेतकऱ्यांनी मांडल्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदशे दिले. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह व इतर अधिकारी उपस्थित होते.
दुपारी चार वाजेपासून शेतकरी या पथकाची वाट पहात होते. मात्र, अंधार पडेपर्यंत पथकाचा मागमूसही नव्हता. यामुळे शेतकरी नाराज झाले. अंधारात पाहणी करून पथकान काय साधले, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत होते. आता पथकाच्या अहवालावरच बळीराजाची नजर लागली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
जायकवाडीला पाणी सोडले म्हणून मंत्र्याला घेरले
नाशिकमधील पाणी प्रश्न अधिक बिकट असताना जायकवाडीला पाणी सोडल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवली. यावेळी गिरीश महाजन यांना धक्काबुक्की केल्याचेही वृत्त आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याची समस्या भेडसावत असताना देखील जायकावाडीसाठी पाणी सोडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री महाजन हे बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत हे लक्षात घेऊन सकाळपासूनच हजारो शेतकरी या परिसरात ठिय्या मांडून बसले होते. महाजन यांची गाडी अडवून शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारचा निषेध करत घोषणा दिल्या, काळे झेंडेही दाखवले. आंदोलकांशी बोलणीसाठी म्हणून महाजन गाडीतून उतरले, तेव्हा जमलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी मंत्र्यांना धक्काबुक्की केली. भाजपनेते आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते यांच्यात वादावादी झाली. मग शिवसेनेचे नेते दादासाहेब भूसे यांनी मध्यस्थी करून वाद शांत केला.
मात्र यावेळी शेतकरी आंदोलकांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे पोलिसांना सौम्य लाठीमार केला. गेले दोन-अडीच तास पालकमंत्री आणि फडणवीस सरकारच्या विरोधात येथे घोषणाबाजी सुरू असल्याचे कळते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
लाल कांद्याचे दर कोसळले
म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. पाच दिवसात कांद्याच्या दरात ९०० रुपयांची घसरण झाली असून, दोन महिन्यात प्रथमच कांद्याचे दर दोन हजार रुपये क्विंटलच्या खाली आले आहेत. यामुळे शहरी ग्राहक सुखावला असला तरी शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. सातत्याने दर कोसळत राहिल्यास कांदा उत्पादक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
दिवाळीच्या सुटीनंतर सोमवारपासून (१६ नोव्हेंबर) कांदा लिलावास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी कांद्याला सरासरी २५५२ रुपये क्विंटल रुपये भाव मिळाला. यानंतर सातत्याने घसरण होत शनिवारी (२१ नोव्हेंबर) १६२१ रुपयांपर्यंत लाल कांद्याचे भाव कोसळले. दोन महिन्यापूर्वी सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचलेल्या कांद्यादरात सातत्याने घसरण होतच आहे.
पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती असतानाही पिंपळगाव, लासलगाव, दिंडोरी, चांदवड, येवला, कळवण, देवळा व उमराणा आदी बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश आदी ठिकाणचा लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात आल्याने भावात घसरण होत आहे. पावसाअभावी उशिरा लागवड झालेल्या खरीप हंगामात रांगडा कांदा आगामी महिना, दोन महिन्यात बाजारात दाखल होणार असल्याने इतक्या दिवस शहरवासीयांना रडवणारा कांदा आता शेतकऱ्यांना रडवणार असे दिसू लागले आहे.
काही प्रमाणात कांद्याची निर्यात सुरू असली तरी जागतिक बाजारपेठेत चीन व पाकिस्तानचा कांदा भारतीय कांद्याशी स्पर्धा करीत आहे. कोलंबो, दुबई, मलेशिया, बांगलादेश आदी ठिकाणी कांद्याला मागणी होत असल्याने पाकिस्तान सरकारने निर्यातमूल्य शुन्य केले आहे. भारतातील कांदा निर्यात मंदावल्याने बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली आहे.
याचा दरावर परिणाम झाला आहे. निर्यातमूल्य कमी करून निर्यातीस चालना द्यावी, अशी मागणी कांदा उत्पादक करीत आहेत.
भारतीय कांद्याशी चीन व पाकिस्तानचा कांदा स्पर्धा करीत असून, दुष्काळी परिस्थितीतही गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक भागात कांद्याचे विक्रमी उत्पादन हाती आले आहे. यामुळे कांदा निर्यात झाला तरच बाजारभावाची घसरण थांबेल. निर्यातवाढीसाठी निर्यातमूल्य ७०० डॉलरवरून ३०० डॉलरपर्यंत कमी करणे गरजेचे आहे.
- अतुल शहा,
कांदा व्यापारी, निर्यातदार
कांद्याचे निर्यातमूल्य
पाकिस्तान - ००
चीन - २०० डॉलर
भारत - ७०० डॉलर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
‘तर, उत्तम दर्जाच्या सुविधा देता येतील’
त्र्यंबकेश्वर येथे वर्षाला कोट्यवधी भाविक येत असतात. म्हणूनच पंढरपूरप्रमाणे नाशिक आणि त्र्यंबकला शासनाच्या तीर्थक्षेत्र यादीत अ वर्ग दर्जा मिळाल्यास भाविकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळवून देता येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
त्र्यंबकेश्वर येथील श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान भक्तनिवास इमारतीच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. तसेच, कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन पुन्हा अधोरेखीत केले. त्या अगोदर माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांचे त्यांना कोपरखिळ्या देणारे भाषण झाले. त्याचा देखील समाचार त्यांनी समर्पक उत्तरे देऊन केला.
आमदार छगन भुजबळ यांनी विकासाच्या दिंडीत आपण राजकीय पक्षाचे जोडे काढून चालायला पाहिजे. आपले झेंडे केवळ निवडणुकीत बाहेर काढू तोपर्यंत वारकरी संप्रदायाप्रमाणे सर्व भेदाभेद विसरून विकास केला पाहिजे. पर्यटनाच्या माध्यमातून भाविक पर्यटन विकसित करणे सहज शक्य आहे. त्याकरिता सातत्याने काम झाले पाहिजे, असे अधोरेखीत केले.
सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी येथे देखणे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट ठरेल, असे भक्तनिवास साकार होत आहे. त्यास शासनाने मंजूर केलेला निधी व त्या व्यतिरिक्त निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी जिल्ह्यातील खासदारांनी त्यांच्या निधीतून ५० लाख आणि सर्व आमदारांनी २५ लाख श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर संस्थान विकासासाठी दिला पाहिजे, अशी मागणी केली. अध्यक्ष त्र्यंबकबाबा भगत यांचेही भाषण झाले. विश्वस्त पुंडलीक थेटे आणि संजय महाराज धोंडगे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव जयंत महाराज गोसावी यांनी आभार मानले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
स्मार्ट सिटीची संकल्पना अद्याप धूसरच
सध्या सर्वत्र स्मार्ट सिटीच्या नावाने स्वप्न दाखविली जात असली तरी स्मार्ट सिटी म्हणजे नेमके काय? याची संकल्पना अद्यापही धूसरच असल्याचे चित्र दिसून येत आहे. आपापल्या सोयीनुसार ही व्याख्या बदलली जात असून, यात प्रशासनाची हुशारी दिसते, असे प्रतिपादन पुण्यातील परिसर संस्थेचे प्रकल्प संचालक रणजीत गाडगीळ यांनी केले.
लोकनिर्णय सामाजिक संस्थेच्या संयोजनानी आयोजित केलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे तेविसावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. 'स्मार्ट सिटी व लोकसहभाग' या विषयावर त्यांनी भाष्य केले. सीबीएसजवळील हुतात्मा स्मारकात या व्याख्यानाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. पुढे गाडगीळ म्हणाले की, भाजप सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सादर केलेल्या जाहीरनाम्यात '१०० नवीन शहरे' असा उल्लेख करण्यात आला होता. त्यालाच नंतर स्मार्ट सिटीची उपमा दिली गेली. आज स्मार्ट सिटीत लोकसहभाग करून घेण्याविषयी सर्वत्र बोलले जात आहे. मात्र, केवळ सोशल साईट्सवर लाईक आणि कमेंट्स करण्यापुरताच हा सहभाग मर्यादित राहत असल्याचे चित्र दिसत आहे. या सहभागाचा फारसा काही परिणाम होईल, असे वाटत नाही. तसेच स्मार्ट सिटीसाठी तंत्रज्ञान हा रामबाण उपाय असल्याचे दाखवले जात असते. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर कशाप्रकारे होणार आहे? त्याचे निकष काय? हे अद्यापही स्पष्ट करण्यात आलेले नाही. कायमस्वरुपी 'वाय-फाय' उपलब्ध करून देणे, उद्योगविकासाला चालना देणे अशी आश्वासने दिली जात असली तरी या सुविधा फार काळ मिळतील, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. तसेच, स्मार्ट सिटीची संकल्पना ही काही वर्षांपूर्वी आलेल्या जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन या योजनेशी निगडीत असल्याचेही गाडगीळ यांनी सांगितले. सचिन मालेगावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे डॉ. मिलिंद वाघ, सामाजिक कार्यकर्त्या छाया देव, कविता कर्डक आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
वीस तासांनंतर बिबट्या विहिरीबाहेर
निफाडच्या तामसवाडी गावात वीस तासांहून अधिक काळ विहिरीत अडकून पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात रेस्क्यू टीमला यश आल्याने वन्यजीवप्रेमींनी समाधान व्यक्त केले. शुक्रवारी रात्री शिकारीसाठी मार्गस्थ असणारा बिबट्या अंदाज न आल्याने तामसवाडी येथील गुलाब आण्णा शिंदे यांच्या विहिरीत पडला.
सकाळी जयंत शिंदे उसाला पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेला असता त्याला बिबट्याच्या जोरदार डरकाळ्या ऐकू आल्या. विहिरीत बिबट्या पडल्याचे लक्षात येताच त्याने वडिलांच्या मदतीने वनखात्याला याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वनखात्याचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी प्रदीप भामरे, आरएफओ एम. एन. बोडके, ए. बी. साळवे, आर. एम. सोनार, डावरे यांच्यासह रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. शनिवारी सकाळी ११ वाजता रेस्क्यू टीमने बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. बिबट्याला पकडण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. प्रारंभी बिबट्या पिंजऱ्यात आला मात्र पिंजऱ्याच्या दरवाजात तो अडकल्याने बराच वेळ प्रयत्न करूनही बिबट्याला पकडण्यात यश येत नव्हते. शेवटी पुन्हा एकदा पिंजरा सोडण्यात आला आणि बिबट्या अलगद पिंजऱ्यात येवून जेरबंद झाला. पकडण्यात आलेला बिबट्या नर असून, सुमारे एक वर्ष वयाचा असल्याचे वन्यजीवचे सहाय्यक वनसंरक्षक भामरे यांनी सांगितले. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढताच बेशुद्ध करून मोठ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले. रेस्क्यू ऑपरेशनला यश येताच बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. निफाडच्या गोदाकाठ भागात बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, वेळोवेळी बिबटे व त्यांचे छावे या परिसरात नजरेस पडत आहेत. गेल्या तीन वर्षाच्या काळात बिबट्यांनी अनेक पाळीव जनावराचा फाडशा पडला असून पाच लहान मुलांचा जीव घेतला आहे. बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने वनविभागाने याप्रश्नी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
विक्रीकराचा भुर्दंड वाढला
विक्रीकराचा भरणा उशिरा करणाऱ्यांसाठी वाईट बातमी असून, विक्री कर विभागाने उशिरा कर भरणाऱ्यांवरील दंड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ डिसेंबरपासून हा निर्णय लागू होणार असल्याने विहीत वेळेतच कराचा भरणा करावा लागणार आहे, अन्यथा भुर्दंड सहन करावा लागेल.
महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायद्यांतर्गत कर भरणा करण्यास पात्र असणाऱ्या व्यापाऱ्यांना विक्रीकराचा भरणा विहीत मुदतीत करणे आवश्यक आहे. विहीत मुदतीपेक्षा उशिरा कर भरल्यास सध्या दरमहा १.२५ टक्के इतक्या व्याजाची आकारणी करण्यात येते. या व्याजदरामध्ये येत्या १ डिसेंबरपासून बदल करण्यात आला आहे. तसे विक्रीकर विभागाने कळविले आहे.
प्रलंबित कराचा कालावधी एक महिन्यापर्यंत असल्यास अशा कराच्या रकमेवर त्या महिन्यासाठी किंवा त्याच्या भागासाठी कराच्या १.२५ टक्के प्रलंबित कालावधी कर आकारला जातो. तीन महिन्यापर्यंत असल्यास कराच्या रकमेवर विलंब झालेल्या पहिल्या महिन्यासाठी किंवा त्याच्या भागासाठी १.२५ टक्के कर लागणार आहे. अशा कराच्या रकमेवर पुढील एक महिन्यापासून तीन महिन्यापर्यंतच्या विलंब झालेल्या
प्रत्येक महिन्यासाठी किंवा त्याच्या भागासाठी १.५० टक्के व ३ महिन्यांपेक्षा जास्त प्रलंबित कालावधी असल्यास अशा कराच्या रकमेवर पाहिल्या महिन्यासाठी किंवा त्याच्या भागासाठी १.२५ टक्के कर लागेल.
पुढील एक महिन्यापासून तीन महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यासाठी व त्याच्या भागासाठी १.५० टक्के आणि तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी प्रलंबित राहिल्यास प्रत्येक महिन्यासाठी व त्याच्या भागासाठी दोन टक्के इतके व्याज येत्या १ डिसेंबरपासून आकारले जाणार आहे. यामुळे करदात्यांना प्रलंबित करासाठी जास्त व्याज सरकारला द्यावे लागणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी प्रलंबित थकबाकी व नियमित करभरणा विहीत मुदतीत करावा. भर्दंड टाळण्यासाठी दिरंगाई करू नका, असे आवाहन विक्रीकर विभागाने केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
आंदोलनामुळे वाहतुकीचा बोजवारा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
मंगळवारी शहरात पाणीपुरवठा बंद
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
आता पाणी जाऊ देणार नाही!
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
पाण्याची लढाई वेगवेगळ्या बॅनरखाली
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट