येवला तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायतीला 'एलआयसी' अर्थातच भारतीय जीवन विमा निगमच्या वतीने ७५ हजारांचा धनादेश देवून 'आदर्श विमा ग्राम' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतीय जीवन विमा निगम ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी संस्था असून, देशभरातील समाजाच्या सुख सोयीसाठी आजपर्यंत संस्थेने भरीव स्वरूपाची मदत करताना राष्ट्रकार्यात हातभार लावला आहे. या कार्याचा एक भाग म्हणून पुरस्काराच्या धनादेशातून ग्रामीण भागातील मूलभूत सोयी पुरवण्यासाठी एलआयसीने आदर्श विमा ग्राम पुरस्कार एक अभिनव उपक्रम हाती घेतला असल्याचे यावेळी नाशिक विभागाचे मार्केटिंग मॅनेजर अभय कुलकर्णी यांनी सांगितले.
विमा प्रतिनिधी अनिल सोनवणे यांनी केवळ सायगावमधून सन २०१४-१५ या आर्थिक वर्षांत सुमारे ९ लाख रुपयांच्या पॉलिसिंचे धेय्य पूर्व केल्याने भारतीय जीवन विमा निगम कंपनीने हा पुरस्कार देऊन सायगाव या गावाचा गौरव केला. धनादेश प्रदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच योगीता भालेराव होत्या. मनमाड शाखेचे विकास अधिकारी सुनील वाढवणे, पी. जी. जोशी, गजहंस यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. भारतीय जीवन विमा निगमचे अभय कुलकर्णी यांच्या हस्ते सरपंच योगीता भालेराव यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थित ७५ हजार रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
प्रा. शिवाजी भालेराव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. ग्रामविकास अधिकारी रवींद्र शेलार यांनी आभार मानले. कार्यक्रमास येवला पंचायत समितीचे माजी सभापती आर. डी. खैरनार, उपसरपंच सुनील देशमुख, अॅड. सुभाष भालेराव, चेअरमन लहानु भालेराव, ग्रामपंचायत सदस्य दिनेश खैरनार, गोरख भालेराव, बाबुराव पठारे, बाळासाहेब बोराडे, विजय खैरनार, प्रकाश कोथमीरे, कैलास पुंड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट