महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या १७ व्या जिल्हा अधिवेशनात उपस्थित शेतकरी बांधवांनी 'शेतकरी वाचवा, शेती वाचवा' अशी सामूहिक हाक दिली. किसान सभेच्या माध्यमातून आपल्या हक्कासाठी लढायचे असा संकल्प व ठराव या अधिवेशनात करण्यात आला.
अधिवेशन स्थळाला कॉ. गोविंद पानसरे, व्यासपीठाला कॉ. भगवंत ठोंबरे तर प्रवेशद्वाराला कॉ. एल. एम .पाटील असे नाव देण्यात आले. यावेळी किसान सभेच्या जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. त्यात जिल्हाध्यक्षपदी भास्कर शिंदे तर कार्याध्यक्षपदी प्रा. के. एन. अहिरे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
किसान सभेच्या अधिवेशनाचा प्रारंभ क्रांतिसिह नाना पाटील यांच्या प्रतिमेला हार घालून करण्यात आला. या वेळी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, कॉ. एल. एम. पाटील आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. अधिवेशनाचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी उत्तम ठोंबरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे राज्य सचिव अॅड. हिरालाल परदेशी, शेतकरी वाचवा अभियानाचे निमंत्रक राम खुर्दळ, किसान सभेचे कार्याध्यक्ष प्रा. राजू देसले, जिल्हा सचिव भास्कर शिंदे यांची उपस्थिती होती.
अधिवेशनाला मार्गदर्शन करताना किसान सभेचे राज्य सचिव हिरालाल परदेशी म्हणाले की, किसान सभेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या म्हणून कसोशीने प्रयत्न करावे लागतील. शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के नफा देवून शेती मालाच्या घामाचा दाम शेतकऱ्याला देण्यासाठी लढा उभारू असेही ते म्हणाले. प्रा. राजू देसले यांनी प्रास्ताविकात शेतकरी वाचला तर देश वाचेल, यासाठी शेतकरी बांधवानो आता मरायचे नाही किसान सभेच्या माध्यमातून हक्कासाठी लढायचे असा नारा दिला. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनीही मनोगत व्यक्त केले .
अधिवेशनाच्या शेवटी किसानसभेची जिल्हा कार्यकारणी तीन वर्षांसाठी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. सचिवपदी कॉ. देविदास भोपळे (नांदगाव), उपाध्यक्ष नामदेव राक्षे (इगतपुरी), संजय बैरागी (घोटी), जगन माळी (सिन्नर), संपत थेटे (नाशिक) तसेच जिल्हा कार्यकारिणीत कॉ. किरण डावखर, शिवाजी शिंदे, देवचंद सुरसे, सूर्यभान शिंदे, बाळासाहेब काळे, विष्णुपंत गायखे यांची निवड करण्यात आली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉ. किरण डावखर, कॉ. रमजान पठाण, कॉ. अनिल देशमाने, अॅड. दत्तात्रेय गांगुर्डे, संपत शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
अधिवेशनातील ठराव
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या.
कांद्याचे निर्यातमूल्य कमी करा.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबवा.
शेतकऱ्यांच्या शेतावर पोट रस्ता द्या, बांधावरील कामे रोजगार हमीतून करा.
स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार खर्च + ५० टक्के नफा हमीभाव यानुसार द्या.
शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प केंद्र व राज्य सरकारने जाहीर करावा.
कृषिमूल्य आयोगात शेतकरी प्रतिनिधी वाढवा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट