हरित लवादाने नाशिक शहरातील बांधकामे थाबविण्याचे आदेश देवून महिना लोटला तरी त्यावर अपील झाले नसल्याने शहराच्या विकासाला ब्रेक लागला आहे. सत्ताधारी मनसे आणि प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे शहर संकटात सापडले असल्याची टीका शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे. महापौरांनी तातडीने बैठक बोलावून या विषयावर तोडगा काढला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा बोरस्ते यांनी दिला आहे.
कपाटामुळे शहरातील बांधकाम परवानग्या रखडल्या असतांना पुण्याच्या हरित लवादाने खत प्रकल्पाची व्यवस्थित देखभाल केली नसल्याने शहरातील बांधकाम परवानग्या थांबविल्या आहेत. हरित लवादाच्या या निर्णयाला महिना लोटला तरी अद्याप अपील केले नाही. लवादाच्या आदेशामुळे शहरातील बांधकामे ठप्प आहेत. महिनाभरापासून एकाही इमारतीच्या बांधकामाला परवानगी मिळालेली नाही. प्रशासनाच्या वतीने अपील करण्यासंदर्भात व पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यासंदर्भात कोणतीही हालचाल केली नसल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे. लोकप्रतिनिधी सोबतच चर्चा करून यात तोडगा काढता आला असता, परंतु तेही काम सत्ताधाऱ्यांनी केलेले नाही. त्यामुळे ही उदासीनता शहराला संकटात लोटणारी आहे. महापौरांनी तातडीने प्रशासनाला आदेश दिले पाहिजे. परंतु, तसे होत नाही. त्यामुळे महापौरांनी तातडीने लोकप्रतिनिधी व प्रशासनाची एकत्रित बैठक घेवून तोडगा काढा अन्यथा शिवसेना स्टाईल आम्ही आंदोलन करू असा इशारा बोरस्ते यांनी दिला आहे.
सत्ताधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
प्रशासन व सत्ताधारी यांच्या ढिम्म कारभारामुळे शहराचा विकास थांबला आहे. संबंधित नागरिकांची समजूत काढून हा 'स्टे' उठवता आला असता; मात्र सत्ताधारीच याबाबत गंभीर दिसत नाहीत. महापालिकेत बेभरवशाचे व बेफिकीरीचे कामकाज चालू आहे. शहर अस्वच्छ असल्याचा संदेश बाहेर जात आहे. लवादाच्या आदेशावर साधा अभ्यासही केलेला नाही, असा आरोप बोरस्ते यांनी केला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट