मुजोर रिक्षाचालक आणि बेफिकीर मोटरसायकलस्वार यांचे रस्त्यांवरील तांडव यांचे यथार्थ चित्रण महाराष्ट्र टाइम्स सातत्याने मांडते आहे. नाशिककर घराबाहेर पडतो तेव्हा तो सुखरूप घरी परतेल की नाही याची खात्री नसते.
बऱ्याच अपघातांची नोंदच होत नाही. असे अपघात सिग्नलवर रस्ता ओलांडताना होतात किंवा सिग्नलजवळच्या भागात. सीबीएस येथील सिग्नलचा अपवाद सोडला तर अन्य कोठेच शिस्त पाळली जात नाही. पोलिस असो अथवा नसो वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. नियम मोडण्यात सीटी बसेसही पुढे असतात. प्रत्येक सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग, सफेद पट्टे, कोठे थांबावे याबाबतचे फलक असायला हवेत. परंतु ते नसतात. ते बसविणे आवश्यक आहे. नगरसेवकांनी आपापल्या भागात त्यासाठी पुढाकार घेतला तरी वाहतुकीच्या नियमनास मदत होऊ शकते. नियम समजावून सांगणे हे पोलिसांचेच काम आहे. ते मुजोर वाहनचालकांना वठणीवरही आणू शकतात. सिग्नलवर कोणते नियम पाळले गेले पाहिजेत हेच नागरिकांना माहित नाही. यासाठी जनजागृतीची गरज आहे. पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे त्यामुळे शक्य होईल.
बऱ्याच ठिकाणी चौकात सिग्नल नसतात. काही ठिकाणी रस्ता क्रॉसिंग भरपूर असते. अशा ठिकाणी देखील नगरसेवक स्वखर्चाने अथवा इतरांच्या मदतीने बऱ्याच गोष्टी करू शकतात. रस्त्यांवर पांढरे पट्टे मारणे, त्यावर रात्रीच्या वेळी झगमगीत उजेड पाडणे, सौरशक्तीवरील पिवळा दिवा लावणे, अशा गोष्टी सहज शक्य आहे. अशा ठिकाणांहून सर्वच वाहनांनी हळू जाणे आणि पादचाऱ्यांना प्रथम रस्ता ओलांडू देणे अपेक्षित असते. पादचाऱ्यांनी देखील चालण्याची शिस्त पाळली पाहिजे. योग्य ठिकाणांहून आणि योग्य पध्दतीनेच रस्ता ओलांडला गेला पाहिजे. रस्ता सर्वांचा असतो, कोणा एकाच्या मालकीचा नसतो. याचे भान ठेवले गेले पाहिजे.
विरुध्द बाजूने वाहन चालविणे हे मोटरसायकलस्वार आणि रिक्षाचालकांचे आवडते काम. यात सर्वच अग्रेसर असतात. बरे, असे नियम मोडताना शरमही बाळगली जात नाही हे विशेष. मग पादचाऱ्यांनी याबाबत जाब विचारला तर वाद निर्माण होतात. पोलिस कठोर बनले तर हे थांबविणे शक्य
आहे.
बरेच मोटरसायकलस्वार दुभाजकाच्या बाजूने मोठ्या वाहनांना ओव्हरटेक करतात. हे चुकीचे आहे. अन यात धोकाही खूप आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसही अशाप्रकारे जोखमी पत्करताना दिसतात.
रिक्षा आणि मोटरसायकलस्वारांना लेनची शिस्त काय असते हे माहितच नाही. वाहन खरेदी करण्याची ऐपत आली पण ते चालविण्याची अक्कल आलेली नाही. कोठूनही वाकडे तिकडे वाहन चालवित लेन तोडायची अन अन्य वाहनचालकांच्या अपघातास कारणीभूत ठरायचे असे प्रकार वारंवार घडतात. विशेष म्हणजे वाहनधारकांना हे कौशल्याचे काम वाटते. मोठ्या वाहनांनी दुभाजकाच्या बाजूने चालावे तर छोट्या वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेने चालावे जेणेकरून अपघात होणार नाहीत. अल्पवयीन मुलांनी वाहने चालविण्यावर बंधने आलीच पाहिजेत. प्रचंड वेगात आवाज करीत वाहने चालविणाऱ्यांवरही अंकुश असायला हवा. पालकांनी याबाबतची काळजी प्रामुख्याने घ्यायला हवी. शेवटी लगाम महत्त्वाचा.
प्रकाश ठोंबरे, नाशिकरोड
ज्येष्ठांना संधी का नाही?
ट्रॅफिक बाबत बेशिस्तपणाचे दर्शन घडविणारे नाशिककर, निष्क्रीय पोलिस, डेंजरस मोबाइल पीपल, शोभा वाढविणारे सिग्नल्स, स्पीड ब्रेकर्स, याबाबत वर्तमान पत्रांतून बरेच उद्बोधक लिखाण गेली काही वर्ष सातत्याने प्रसिध्द होत आहे. परंतू त्यापासून बोध घेण्याची ना नाशिककरांची इच्छा आहे ना पोलिसांची. रोज स्व: म्हणून अपघातांमध्ये मनुष्य प्राण्याची आहुती पडतेच आहे. या सर्वांना काही मानवनिर्मित म्हणजे सुलतानी संकटही मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत. सर्व रस्ता म्हणजे आपलीच जहागिरी असल्यासारखे वावरायचे. समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारावा तसे रस्त्याने पायी चालायचे, मोबाइलशी चाळा करत, कधी साखळी करून, तर कधी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून सिग्नलचे भान न ठेवताच कुटुंब कबिल्यासह अनेकजण रस्ता ओलांडताना दिसतात. स्वत:ला सुलतान समजत बाइक चालविणारे, ३-४ जण बाइकवर बसणारे, शिड्या, बांबू, होर्डिंग्जपर्यंत बऱ्याच वस्तू बाइकवरून नेणारे, अनेक पिशव्या बाइकला लटकवणारे, पाच सात फुटापर्यंत बाहेर डोकावणारे, लोखंडी तसेच लाकडी सामान नेणारे टेम्पो, नादुरूस्त व प्रचंड आवाज करणारी वाहने, ब्रेक न लागणारी वाहने, इंडिकेटर न देता वळणारी वाहने, मंगल कार्यालये, हॉटेल्स, सोसायट्या येथे वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्ताने आलेली व जागा मिळेल तेथे वाट्टेल तशी उभी केलेली वाहने, समोरून मित्र मैत्रिणी येताना दिसताच कोणाचीही पर्वा न करता झटकन वळणाऱ्या बाइक, हाय हॅलो करणारे टपोरी, कधीही गिरकी घेणारा रिक्षावाला आणि कहर म्हणजे दुचाकी, चारचाकी, रिक्षावाले, बस प्रवासी इतकेच नव्हे तर कारचा दरवाजा उघडून रस्त्यांवर पिंक टाकून नक्षीकाम करणारे नाशिककर शहरात रोजच नजरेस पडतात.
यामध्ये पोलिसांची भूमिका अशी की १०० टक्के दोष न देता निष्क्रीय या विशेषणानेच यांचा गौरव करणे उचित ठरेल. सध्या लाचखोरीत क्रमांक दोनवर असलेले व क्रमांक एकवर येण्यासाठी जीवापाड मेहनत घेत असलेले, चिरीमिरीसाठी प्रसिध्द पोलिस असा अनुभव नाशिककर रोजच घेत आहेत. नवीन भरती होणारे अधिकारी व पोलिस त्यांचीच री ओढण्यात धन्यता मानत असल्याचे खेदजनक वास्तव आहे. आपल्या मूळ कर्तव्यापासून यांनी फारकत घेतली असून त्यांच्यातील इच्छाशक्तीचा केव्हाच अंत झाला आहे.
ज्येष्ठांना काही अधिकार देऊन त्यांची मदत घ्या असे आवाहन आम्ही वारंवार केला मात्र ही खाकी वर्दीवाली मंडळी ढिम्म हालायला तयार नाही. केवळ दिखावा म्हणून एक दिवस वाहतूक नियमनासाठी विद्यार्थ्यांची मदत घेणे चांगले की कुठल्याही स्वार्थाशिवाय सातत्याने मदत करण्यास आग्रही असणाऱ्या ज्येष्ठांची मदत घेणे चांगले हा खरा प्रश्न आहे. बेशिस्त नाशिककरांना शिस्त लावून रोजची प्राणहानी टाळण्यापेक्षा कागदपत्रांची पूर्ततेसारख्या निरर्थक आणि लाचखोरीला प्रोत्साहन देणाऱ्या अनुत्पादक बाबींकडेच खाकी मेंदूवाल्यांचे बारीक लक्ष असते. वरील उल्लेखलेल्या बाबींकडे यांनी बारकाईने लक्ष देऊन कारवाई करण्याचे ठरविले तर त्यांची पंचाईत होईल. हेच त्यांच्या क्रमांक एकीकडे कूच करण्यामधील अडथळ्यांचे कारणही ठरेल. पोलिस आयुक्तांनी वाहतूक नियमनासाठी ज्येष्ठांची मदत घेऊन पहावी. विद्यार्थ्यांची मदत घेता तसा हा प्रयोग करायला देखील काय हरकत आहे.
दिलीप देशमुख, ज्येष्ठ नागरिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट