प्रा. डॉ. विवेक खरे
मराठी भाषा बोलणाऱ्यांचे राज्य म्हणून १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. १९५६ साली भारत सरकारच्या राज्य पुनर्रचना कायद्याद्वारे भारतातील राज्याराज्यांच्या सीमा भाषेच्या आधारावर निश्चित करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्याची निर्मिती सुद्धा याच आधारे झाली. अर्थात यासाठी लढा देखील द्यावा लागला. १०५ जणांच्या हौतात्म्या नंतर हे राज्य निर्माण झाले, मराठी आपली मातृभाषा झाली. आज पंचावन्न वर्षांनतर या मातृभाषेची स्थिती काय आहे हा अभ्यासाचा विषय आहे. अर्थात शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा शिकविणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक यांच्यापुरता हा विषय मर्यादित आहे असे समजण्याचे कारण नाही. महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या प्रत्येकानेच या विषयाकडे जिव्हाळ्याने बघितले पाहिजे अशी स्थिती आज नक्कीच आहे.
हा विषय मांडण्याचे कारण म्हणजे नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ जानेवारी ते १५ जानेवारी यादरम्यान साजरा करण्यात आलेला 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' होय. या निमित्ताने सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र सरकारची राज्यातील कार्यालये, सरकारी संस्था, विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून बरेच काही केले गेले. यात खरोखर भाषेविषयी आस्था किती होती व शासकीय सोपस्कार किती होता हा संशोधनाचा भाग ठरू शकतो. भाषेविषयीची आपली अस्मिता आज नेमकी कशी आहे हे सांगणे जरा अवघडच आहे.
आपण आपल्या मराठी भाषेवर खरंच प्रेम करतो का? तिच्या वाढीसाठी, तिच्या संवर्धनासाठी आपण काय आणि कशा प्रकारे योगदान देतो किंवा देण्याचा प्रयत्न करतो? असे प्रश्न आपण स्वत:ला विचारले तर अंतर्मुख होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भाषेवर आपले प्रेम आहे तर तिच्या संवर्धनाच्या जबाबदारीतून आपण पळ का काढतो? भाषिक अस्मितेसंदर्भात नेहमी भारतातील दक्षिणेकडील राज्यांची उदाहरणे दिली जातात. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ या राज्यांमध्ये आपापल्या भाषेविषयी टोकाची अस्मिता प्रत्येकवेळी बघायला मिळते. सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात ही भाषिक अस्मिता जोरकसपणे पुढे येते. आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वच स्तरावर ही राज्ये प्रयत्नशील होती व नेहमीच असतात. सर्वसामान्य नागरिक ते साहित्यिक, राजकारणी, उद्योजक अशा प्रत्येकांमध्ये ही अस्मिता ठासून भरलेली असते. या अस्मितेविषयी आपण मराठी माणसंही भरभरून बोलतो, तिचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. मग हे सगळे आपणाला का शक्य नाही असा प्रश्न निर्माण होतो, आणि तो होणे सहाजिकही आहे. भाषिक अस्मितेबरोबर तिच्या संवर्धनासाठी कृतीशील व्यवहाराची गरजही महत्त्वपूर्ण आहे हेच मुळात आपल्या लक्षात येत नाही. मराठीतील जेष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव म्हणतात त्याप्रमाणे, 'मातृभाषेबद्दल अज्ञान, आळस, गहाळपणा व वरवर चकाकणाऱ्या भाषिक संकाराला सोने समजण्याचा भ्रम यांचे निरसन करण्याची इच्छाशक्तीच आपण हरवून बसलो आहोत.'
मराठीशिवाय इतर भाषा शिकू नये असे कोणताही शहाणा मनुष्य आजतरी बोलणार नाही. पण इतर भाषांच्या प्रभावाने मायभाषेकडे दुर्लक्ष करू नये, तिच्या वापरात संकोच बाळगू नये हेही तितकेच खरे आहे. आपली भाषा आपल्या संस्कृतीची वाहक असते. भाषा टिकली तर संस्कृती टिकेल. मात्र आज सर्रास इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढलेला दिसतो. बोलतांना, मुलांना शाळेत घालतांना इंग्रजीचा पर्याय बहुतेक जण निवडतात. खोट्या प्रतिष्ठेपायी बरेच जण मराठी सोडून इतर भाषांना जवळ करण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. खरे म्हणजे इतर भाषा शिकणे वाईट मुळीच नाही पण आपल्या मातृभाषेला दूर करुन इतर भाषेचा स्वीकार व बडेजाव कधीही चांगला ठरणारा नाही. एखाद्या माणसाला एकापेक्षा जास्त भाषा येत असतील तर तो नक्कीच ज्ञानी असतो. माहितीचे भांडार त्याच्याकडे कांकणभर जास्तच असते असे निदर्शनास येते. भारतात, महाराष्ट्रात अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यात भारताचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, जेष्ठ कन्नड साहित्यिक गिरीश कर्नाड, मराठीतील श्रेष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर, रावसाहेब कसबे, अरुण टिकेकर, जेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर अशा अनेकांचा समावेश होतो. माझे मार्गदर्शक आणि मित्र असलेले तसेच मराठीतील एक नामवंत समीक्षक व भाषेचे अभ्यासक डॉ. मिलिंद मालशे यांचे उदाहरण या संदर्भात बोलके ठरू शकेल. मुंबई येथील आयआयटी या भारतातल्या नामांकित संस्थेत इंग्रजी विषयाचे प्राध्यापक असलेल्या मालशे सरांनी इंग्रजी बरोबरच मराठी भाषेत मोठ्या स्वरूपात आपले लेखन केले आहे. मराठी भाषेसाठी त्यांनी केलेले काम खचितच महत्त्वाचे आहे. मराठी भाषेसाठी माझी ही सेवा आहे हा त्यांचा यामागील भावदेखील महत्त्वाचा आहे.
शासन आपल्या स्तरावर भाषेच्या विकासाठी, संवर्धनासाठी नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कार्य करण्याचा प्रयत्न करीत असते. महाराष्ट्र शासन देखील याला अपवाद नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मध्यंतरी शासनाने बऱ्यापैकी वातावरण निर्माण केले होते. पण या राज्यातले लोक जे या भाषेचे वाहक आहेत, त्यांनी स्वत:हून काही करायला हवे की नाही. मराठी शाळा बंद पडत आहेत म्हणून नक्राश्रू गाळणारे किती लोक या शाळा जिवंत राहाव्यात म्हणून आपली मुले त्यात घालतात? मराठी कानडी सीमाप्रश्नात किती लोक सीमाभागातील मराठी लोकांच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होतात किंवा आहे त्या ठिकाणांहून आंदोलनाला पाठिंबा देतात. रोजच्या जीवन व्यवहारात मराठीचा जाणीवपूर्वक वापर करणारे किती लोक आहेत? मराठी पुस्तकांची गोडी आपल्या मुलांना लावण्यासाठी कितीजण प्रयत्न करतात?, मराठी पुस्तकांच्या प्रदर्शनास कितीजण आपल्या मुलाबाळांना घेवून जातात आणि पुस्तके विकत घेतात? मराठी नाटक, सिनेमा बघण्यासाठी आपण किती आग्रही असतो? असे अनेक प्रश्न मराठी माणसांनी स्वत:ला विचारले पाहिजेत आणि त्यांच्या उत्तरांसाठी भाषिक कृती केली पाहिजे. नाहीतरी कुसुमाग्रजांनी लिहूनच ठेवले आहेच की....
मायमराठी मरते इकडे
परकीचे पद चेपू नका,
भाषा मरता देशही
मरतो संस्कृतीचाही दिवा विझे,
गुलाम भाषिक होऊन
आपल्या प्रगतिचे शिर कापू नका.
(लेखक एसएमआरके कॉलेजमध्ये मराठीचे
प्राध्यापक आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट