प्रा. अशोक सोनवणे
विज्ञान तंत्राज्ञानाच्या व संसूचनाच्या साधनांचा जसा विकास झाला, तसा त्याचा मानवी जीवनावर परिणाम झाला. कृषी प्रक्रिया उद्योगावरही त्याचा परिणाम झाला. कृषी क्षेत्रातही अमुलाग्र बदल झाले. सुमारे २० वर्षांपूर्वी परंपरागत शेती करणारा शेतकरी आता हायटेक शेती करू लागला आहे. शेतीक्षेत्रात जे संशोधन होत आहे, ते आत्मसात करून शेतकरी त्याचा अवलंब करीत आहेत. भारतातील अनेक शेतकरी स्वतःही संशोधन करीत आहेत. अनेक शेतकरी गट शेतीच्या माध्यमातून शेती करताना दिसतात. काही शेतकरी अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया व इस्राईल यासारख्या विकसित देशांना भेटी देऊन तेथील शेतीच्या विकासाचा आणि संशोधनाचा अभ्यास करीत आहेत.
वर्षापूर्वी तृणधान्ये आणि कडधान्याचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेणारा शेतकरी आज आधुनिक शेती करतो आहे. आज हॉट्रीकल्चर, सेरीकल्चर, फ्लोरीकल्चर अशा विविध क्षेत्रात प्रवेश केला आहे आणि त्यात यशही मिळवलेले आहे. सर्वच शेतकरी यशस्वी झाले असे नाही. आजही दुष्काळी भागातील बहुसंख्य शेतकरी परंपरागत पध्दतीने शेती करीत आहेत. साधन सामुग्रीच्या अभावामुळे त्यांना आधुनिक शेतीची कास धरता आलेली नाही. काही तर अपयशामुळे अगदी खचून गेलेले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे त्यांना येत असलेले अपयश हे देखील एक कारण आहे.
शेती करणे हे एक सर्वात मोठे आव्हान आहे. त्यातही कोरडवाहू शेती करणे हे खडतर आव्हान आहे. कारण कोरडवाहू शेती अनिश्चिततेच्या फेऱ्यांमध्ये सदैव अडकलेली आहे. अपार कष्ट करूनही अपेक्षित लाभ पदरात पडत नाही. शेतात उपसलेल्या कष्टांचे योग्य फळ पदरात पडत नाही म्हणून सुमारे ४० टक्के शेतकऱ्यांची आज शेतीक्षेत्रातून बाहेर पडण्याची मानसिकता आहे. कोरडवाहू शेतीच्या आतबट्याच्या व्यवहाराचे दृष्टचक्र हे वर्षानुवर्षे चालू आहे. शेती क्षेत्रातील उत्पन्नाची अनिश्चितता व तोटा जेवढा वाढेल तेवढे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीतही जो धाडसाने शेती करतो अशा सर्व शेतकऱ्यांना सलामच केला पाहिजे.
नाशिक जिल्ह्यात आणि राज्यातही मी अनेक बहादूर शेतकरी पाहिले आहेत, की ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीला अतिशय धाडसाने तोंड दिलेले आहे. हतबल न होता यश मिळवलेले आहे. कोरडवाहू शेतीतही नवनवे प्रयोग केलेल आहेत. कुणी फळबागा फुलविल्या तर कुणी फळबागा उभ्या करून उत्पादनाचे नवनवे विक्रम प्रस्थ्यपित केले. काहींनी शेळी पालन केले तर कुणी उघड्या माळावर फूलशेती यशस्वी केली. एक मात्र खरे की जो सतत धडपड करतो तो निश्चितपणे यशस्वी होतो. अशा यशस्वी ठरलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा मांडता येतील. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुःखी व्यथा एका बाजूला आहेत, तर प्रचंड संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा एका बाजूला आहेत.
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कष्टाळू अन् नाविण्याचा शोध घेणारे आहेत. द्राक्षाची यशस्वी शेती या शेतकऱ्यांनी केली. द्राक्षाच्या उत्पादनाचे व त्याच्या गुणवत्तेचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले. नाशिकच्या द्राक्षाची चव जगभरातील लोकांनी चाखली. द्राक्षाची चव गोड असते याची नाशिकच्या द्राक्षांनी संपूर्ण जगाला ओळख दिली. फ्रान्समधील शॅम्पेनचे उत्पादक शारबोट हे भारतात आले त्यांनी येथील द्राक्षाची चव चाखली व या द्राक्षापासून उत्तम शॅम्पेन व वाईन तयार होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी येथून द्राक्षे फ्रान्सला नेली व तिथे त्यांची शॅम्पेन बनविली. ती अप्रतिम स्वादाची शॅम्पेन तयार झाली होती. त्यातूनच पुढे पिंपळगाव परिसरात माधवराव मोरे व मालोजीराव मोगल यांनी पिंपेनचा प्रकल्प सहकारी तत्वावर उभा केला. पुढे तो प्रकल्प बंद पडला. सहकारी तत्त्वावरील हा प्रकल्प बंद पडल्यानंतर खासगी क्षेत्रात अनेक शेतकरी पुढे आले आणि त्यांनी वाईन प्रकल्प उभे केले, ते फार मोठे धाडस होते. आव्हान स्वीकारल्याशिवाय व प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय यशप्राप्ती नाही, हे ब्रीद स्वीकारलेल्या शेतकऱ्यांनी वाईन उद्योगातही आपला जम बसविला. द्राक्षे निर्यात केली. काही वेळा दोन पैसे मिळाले तर काही वेळा आपला माल युरोपच्या बाजारपेठेत नाकारला गेला. नुकसान झाले तरी शेतकरी हटला नाही. त्याला परिस्थितीने खूप शिकवले आणि तो निर्यात करीतच राहिला. आज आव्हाने असूनही तो वाईन तयार करतो आहे. एका बाजूला शेतमालाच्या उत्पादनाच्या गुणवत्तेकडे त्याचे लक्ष आहे, तर दुसरीकडे त्याचे लक्ष बाजारपेठेवर आहे. उच्च गुणवत्तेसाठी उच्च तंत्रज्ञान फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही शेतकरी तर स्वतःच प्रयोग करतात व संशोधनही करतात.
आज नाशिकचा शेतकरी वाईन उद्योगात पुढे येत आहे. द्राक्षापासून तो वाईन तयार करतो आहे. उद्या जांभळापासून वाईन तयार करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी काही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक जांभळाची शेती सुरू केलेली आहे. वेगवेगळ्या फळांपासून वाईन तयार करण्याचे प्रयोग सुरू आहेत. सध्या तरी द्राक्षापासून तयार होणाऱ्या वाईनचीच चर्चा आहे. वाईनचे उत्पादन घ्यावे की नाही? अशाही चर्चा सध्या होत आहे, पण काही असो शेतकरी प्रयोगशील होत आहे. जगाच्या बाजारवार लक्ष ठेवून शेती करतो हे फार महत्त्वाचे आहे. कारण शेतकऱ्याच्या शेतमालावर प्रक्रिया झाल्याशिवाय त्याची मूल्यवृद्धी होणार नाही याची आता शेतकऱ्यांना खात्री पटली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशातही कृषी-प्रक्रिया उद्योग वाढत आहेत. सीताफळ हे तसे डोंगरी पीक पण आता त्याची शास्त्रीय पद्धतीने लागवड होत आहे. सीताफळापासून आईसक्रीम तयार करण्याच्या उद्योग वाढत आहे. आवळा, संत्री, केळी, आंबा इ. फळपिकांवर प्रक्रिया उद्योग वाढत आहे. तो अजून वाढवायला हवा.
यादृष्टीने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सर्वात पुढे आहे. सन २००० सालापासून पुढे वाईन उद्योग वाढत आहे. आज जिल्ह्यात ४० पेक्षा अधिक वायनरी आहेत. सुमारे दीडकोटी लिटर एवढी वाईन जिल्ह्यात तयार होते, त्यासाठी जगभरातील बाजारपेठ शेतकरी शोधतो आहे. एकूण उत्पादनापैकी सुमारे १० टक्के वाईन निर्यात केली जाते. निर्यातीसाठी जगभरात फार मोठी स्पर्धा आहे. चीन, जर्मनी, अमेरिका, इटली, चिली, ऑस्ट्रेलिया आदी देशांमधेही वाईनचे मोठ्या प्रमाणत उत्पादन होते. जगभरात मोठी स्पर्धा आहे. जगाच्या व्यापारातील स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी अत्यंत चिकाटीने गुणवत्तापूर्वक उत्पादन करावे लागणार आहे. प्रतिकूल परिस्थितीला भिडण्याची मानसिकता विचारात घेता हा शेतकरी एक दिवस जगाच्या बाजारात निश्चितपणे दिमाखाने उभा राहिल, असा विश्वास वाटतो. जागतिक बाजारपेठेत टिकाव धरणे हे भारतासारख्या विकसनशील देशांना फार अवघड आहे. गुणवत्तेच्या तंत्राबरोबर बाजारपेठेचे तंत्र शेतकऱ्यांनी आत्मसात केले तरच जागतिक पातळीवर आपल्याला टिकाव धरता येईल. येणारा भविष्यकाळ या गोष्टी निश्चितपणे भारतीय शेतकऱ्यांना शिकवेल.
(लेखक हे कृषी क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट