नाशिकमध्ये पावसाच्या सरी कोसळत असताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करीत त्यांचे लाखो समर्थक सोमवारी रस्त्यावर उतरले. ओबीसी बांधवांनी एकजुटीचे दर्शन घडवत भुजबळांवरील कथित अन्यायाचा मूक मोर्चाद्वारे निषेध नोंदवून शांत व शिस्तबद्ध मोर्चा काढून सरकारला जाब विचारला. राज्य सरकार सूड बुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप करतानाच, ओबीसींचा देशातील विक्रमी मोर्चा ठरल्याचा दावा संयोजन समितीने केला.
आठवडाभरापूर्वीच मराठा समाजाने शहरातून विराट मोर्चा काढला. त्याचवेळी ओबीसी बांधवांनी मोर्चाची जय्यत तयारी सुरू केली. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आल्याने सर्वांचेच त्याकडे लक्ष लागले. शहरात सकाळपासूनच पावसाचा जोर असतानाही मोर्चेकऱ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. पावसाची तमा न बाळगता केवळ जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव मोर्चामध्ये सहभागी झाले. महिला, मुली तसेच ज्येष्ठ नागरिकांची संख्याही लक्षणीय होती.
दुपारी बारा वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.
दुपारी तीनच्या सुमारास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना विविध जाती धर्माच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर एका समर्थकाने मोर्चेकऱ्यांसमोर निवेदनाचे वाचन केले. राष्ट्रगिताने मोर्चाची सांगता झाली.
बीडमध्ये २० ला मोर्चा
भुजबळांच्या समर्थनासाठी ओबीसी समाजाच्या वतीने मराठा मोर्चांच्या धर्तीवर नाशिकपाठोपाठ अन्य जिल्ह्यांतही मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. नाशिकमधील भुजबळ समर्थक मोर्चांमध्ये बीड येथे येत्या २० ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट