म. टा. प्रतिनिधी, नाशिक देशभरातील आयआयटी, एनआयटीसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाणारी जेईई अॅडव्हान्स ही प्रवेश परीक्षा ऑनलाइन माध्यमातून रविवारी सुरळीत पार पडली. नाशिकमधील संदीप फाऊंडेशन व आयटी पार्क, वडाळा या दोन केंद्रांवर ही परीक्षा झाली. यामध्ये संदीप फाऊंडेशन येथील केंद्रावर ५५० विद्यार्थ्यांनी, तर आयटी पार्क येथील केंद्रावर ७०० विद्यार्थ्यांनी अशा एकूण १२५० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. जेईई मेन्सप्रमाणेच अॅडव्हान्समध्ये गणित विषय विद्यार्थ्यांचा कस लावणारा ठरला. पेपर २मधील गणित विषय कठीण तर फिजिक्स, केमिस्ट्री विषय विद्यार्थ्यांना तुलनेने सोपे गेले. हीच परिस्थिती पेपर १बाबत मात्र उलट ठरली. इंजिनीअरिंग, फार्मसीसारख्या शाखांमध्ये देशभरातील नामांकित संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना 'जॉइंट एंट्रन्स एक्झाम' देणे बंधनकारक असते. गेल्या ८ एप्रिल रोजी जेईई मेन्स ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने तर १५ व १६ एप्रिल रोजी ऑनलाइन पद्धतीने पार पडली होती. या परीक्षेला देशभरातून साडेअकरा लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये नाशिकमधील १० हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता. परीक्षेची काठिण्यपातळी जास्त असल्याने जेईई अॅडव्हान्ससाठी देशभरातून दोन लाख ३१ हजार २४ विद्यार्थीच जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले होते. नाशिकमधील १२५० विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. सकाळी ९ ते १२ पेपर १ तर दुपारी २ ते ५ यावेळेत पेपर २ पार पडला. फिजिक्स, केमिस्ट्री विषयांच्या तुलनेत गणित विषयातील प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त असल्याने हे प्रश्न सोडविताना कस लागल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट