रस्ते, पाणी, अस्वच्छतेवरून सातपूरमध्ये महापौर आक्रमक म. टा. वृत्तसेवा, सातपूर महापालिका आयुक्तांच्या 'वॉक विथ कमिशर'ला तोड देण्यासाठी 'महापौर आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत रंजना भानसी यांनी मंगळवारी प्रभाग १० व ११ मध्ये सातपूर परिसराला भेट दिली. यावेळी स्थानिकांनी समस्यांचा पाढा वाचल्यानंतर रस्ते, पाणी, अस्वच्छता व गाजर गवताच्या समस्यांवरून महापौरांनी अधिकाऱ्यांना कानउघाडणी केली. महापौर आपल्या दारी या उपक्रमास सकाळी दहा वाजेता अशोकनगर पोलिस चौकी येथून सुरुवात झाली. यावेळी सभागृहनेता दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके आहेर, मनसे गटनेता सलिम शेख, सभापती योगेश शेवरे, आरपीआय गटनेत्या दिक्षा लोंढे, नगरसेवक शशिकांत जाधव, नगरसेविका माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, सीमा निगळ, विक्रम नागरे यांच्यासह सर्वच विभागातील अधिकारी उपस्थित होते. निगळ चौकात दुपारी एक वाजता दौरा आटोपला. राधाकृष्णनगर येथील मंजूर असलेला डीपीरोडची समस्या नगरसेविका बोलकर यांनी मांडली. जलकुंभ नव्याने उभारण्यात आला असतानाही पाणी वाहून जाण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आल्या नसल्याने अशोकनगर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची समस्या नगरसेवक जाधव यांनी मांडली. जलवाहिनीचे काम मार्गी लावावे व मंजूर डीपी रस्त्याला किमान खडीकरण करण्याचे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले. १५ वर्षांपासून रस्ते नाही प्रभाग १० मध्ये पाहणी दौरा होत असताना खड्डेमय रस्त्यांवरून महापौरांना चालण्याची वेळ आली. गेल्या १५ वर्षांपासून नवीन रस्तेच तयार करण्यात आले नसल्याकडे नागरिकांनी महापौरांचे लक्ष वेधले. याप्रश्नी महापालिकेचे अधिकारी आयुक्तांकडे अहवाल सादर करीत नसल्याचा मुद्दा नगरसेविका पाटील यांनी मांडला. खड्डेमय रस्त्यांची स्थिती आयुक्तांकडे तात्काळ मांडा, असे आदेश महापौरांनी दिले. उद्यानात कचऱ्याचे ढिग राधाकृष्णनगर येथील उद्यानात कचऱ्याचे ढिग आणि वाढलेले गाजर गवत पाहून सर्वच नगरसेवक संतप्त झाले. उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. त्यांनी कचरा लगेच उचलतो, असे उत्तर दिले. मात्र, महापौरांनी भेट दिली नसती, तर कचरा तसाच पडून ठेवला असता का, असा सवाल सभागृहनेते पाटील यांनी केला. तसेच सर्वसामान्यांनी कचरा जाळल्यावर कारवाई केली जाते. मात्र, महापालिका कर्मचारीच उद्याना कचरा जाळतात, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा मुद्दा पाटील यांनी मांडला. मनपा शाळा समस्येच्या गर्तेत महापालिकेच्या विश्वासनगर येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे विद्यालयात माध्यमिक शाळेत शिक्षकच कमी असल्याची समस्या नगरसेविका बोलकर यांनी मांडली. तसेच महापालिकेने मानधन दिले गेले नसल्याने इंग्रजी माध्यमातील शाळेच्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आल्याचे नगरसेवक जाधव म्हणाले. याबाबत आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे महापौर भानसी यांनी सांगितले. सातपूर कालनीतील प्रभाग ११ मधील जिजामाता विद्यालयात चार शाळा आहेत. तेथे एकाचवेळी तीन शाळा भरतात. शौचालयाची संख्या कमी असल्याचे नगरसेविका निगळ यांनी सांगितले. शहरासोबत मनपा शाळाही स्मार्ट कराव्यात, अशी अपेक्षा नगरसेवकांनी केली. गाळे धारकांनी रचला समस्येंचा डोंगर प्रभाग क्रमांक ११ मधील सातपूर कॉलनीतील पडून असलेल्या खोका मार्केटमुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे मनसे गटनेते शेख यांनी सांगितले. महापालिकेने गाळे धारकांना करारनामा करण्याबाबत नोटिसा बजावल्या. नोटिसा आताच का आल्या, असा प्रश्नही शेख यांनी केला. सातपूर गावातील छत्रपती शिवाजी भाजीमंडईतील भाजी विक्रेते व व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. गावातील अतिक्रमणे हटवा सातपूर गावातील ग्रामस्थांनी नेहमीचा त्रास असलेला मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा, अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली. स्थानिक रहिवाशांना सायंकाळी घराकडे येताना अथवा त्र्यंबक रोडकडे जाताना रस्त्याच उपलब्ध होत नाही, असे गाऱ्हाणे ग्रामस्थांनी मांडले. यावेळी काही उत्साही तरुणांनी अतिक्रमणाच मुद्दा लावून धरल्याने महापौरांनी आवाज वाढवत एकच समस्या किती वेळा सांगणार, असा खडा सवाल केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट