Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आज रंगणार श्रावणक्वीन

$
0
0

>> नाशिक टाइम्स टीम

गेल्या काही दिवसांपासून तरुणींच्या चर्चेचा विषय बनलेला 'वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत' 'मटा श्रावणक्वीन २०१५' एलिमिनेशन राऊंड आज (२१ ऑगस्ट) मुंबई-आग्रारोडवरील 'हॉटेल म्यूस ज्युपीटर' येथे रंगणार आहे. 'ऱ्हिदम म्युझिक' याचे म्युझिक पार्टनर आहेत. टॅलेंटला वाव देणाऱ्या श्रावणक्वीनसाठी नाशिकमधून तरुणींचा भरघोस प्रतिसाद लाभला. यामध्ये वाचकांची मते आणि तज्ज्ञांच्या सहाय्याने एलिमिनेशन राऊंडसाठी तरुणींची निवड करण्यात आली आहे.

गेल्या चार वर्षात श्रावणक्वीनने नाशिकमधील तरुणींच्या टॅलेंटला उत्तम व्यासपीठ मिळवून दिले आहे. श्रावणक्वीनच्या माध्यमातून आज या तरुणी मॉडेलिंग, अभिनय, फॅशन या क्षेत्रात झळकताना दिसतात. मुंबईमध्ये होणाऱ्या ग्रुमिंग सेशन आणि फायनल राऊंडसाठी आज अशाच चार तरुणींची निवड नाशिकमधून करण्यात येणार आहे. यामध्ये परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. नावनोंदणी केलेल्यांनाचा यावेळी प्रवेश दिला जाणार असून यासाठीची नोंदणी प्रक्रिया संपली आहे. कार्यक्रमस्थळी नावनोंदणी केली जाणार नाही.

सहभागींसाठी सूचना

सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार असून सहभागींनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे कार्यक्रमस्थळी पोहोचणे अनिवार्य आहे. यावेळी सहभागींना रॅम्पवॉक करायचा असून त्याचबरोबर सादरीकरणही करायचे आहे. यासाठी प्रत्येकीला तीन मिनिटांचा अवधी दिला जाईल.

यासाठीची सर्व तयारी घरूनच करून यायची असून कार्यक्रमस्थळी तयारीची सोय उपलब्ध करून दिली जाणार नाही. तसेच तुम्ही सादर करीत असलेल्या गाण्याची सीडी सोबत आणणे आवश्यक आहे. चला तर मग 'मटा'ने उपलब्ध करुन दिलेल्या या व्यासपीठावर तुमच्यामध्ये असलेलं टॅलेंट दाखवा आणि बना श्रावणक्वीन.

कार्यक्रमाचे ठिकाण

मॉन्टेरीअल हॉल, हॉटेल म्यूस ज्युपीटर, पाथर्डी फाटा,
मुंबई-आग्रा हायवे, नाशिक,
वेळ : सकाळी ११ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुंभदर्पण फोटो स्पर्धेचे आयोजन

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

इंडियन इन्स्टिट्युट्स ऑफ आर्किटेक्ट्सच्या नाशिक सेंटरमार्फत फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. व्यावसायिक आणि हौशी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून १९ ते ३० ऑगस्ट असा या स्पर्धेचा कालावधी असणार आहे.

ही केवळ फोटो स्पर्धा नसून या माध्यमातून कुंभमेळ्याचा एक मोठा दस्तऐवज निर्माण होणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रदीप काळे यांनी दिली. शहर व राज्यातील नामवंत फोटोग्राफर्स यासाठी परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. तसेच या स्पर्धेत प्राथमिक फेरीत निवड झालेल्या फोटोंचे तीन दिवसिय प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच या फोटोंची सीडीदेखील प्रकाशित केली जाणार आहे. एका मोठ्या समारंभामध्ये स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार असून वेगवेगळ्या विभागात अकरा हजार रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष रसिक बोथरा यांनी दिली. स्पर्धेच्या प्रवेशिकांचे वितरण १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान होणार असून प्रवेशिका जमा करण्याची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. स्पर्धेची नियमावली तसेच प्रवेशिका इंडियन इन्स्टिट्युट्स ऑफ आर्किटेक्ट्सच्या नाशिक सेंटरमध्ये उपलब्ध असणार आहे. जास्तीत जास्त हौशी व व्यावसायिक फोटोग्राफर्सनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रपतींना कॉलेजियन्सचे साकडे

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

अंधश्रद्धेविरुद्ध काम करताना आपले आयुष्य खर्ची घालणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांची हत्त्या काही समाजकंटकांकडून करण्यात आली. या दोन्ही घटनांमधील गुन्हेगारांना अद्यापही सरकार पकडू शकलेले नाही. त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी एचपीटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांमार्फत पत्रलेखन मोहीम राबविण्यात आली. ही पत्रे थेट राष्ट्रपतींना पाठविली जाणार आहेत.

दोन वर्षे उलटूनदेखील डॉ. दभोलकरांच्या मारेकऱ्यांना गजाआड करण्यात सरकारला यश आलेले नाही. त्यामुळेच कॉलेजमधील जवळपास ३५० विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेत पत्रलेखन केले. 'भारतातील समाजसुधारकांची हत्या करणाऱ्या या नराधमांना पकडून फाशी दिली जावी. मा. राष्ट्रपती महोदय याची दखल घेत पाठपुरावा करतील अशी इच्छा व्यक्त करुन न्याय मिळेल अशी आशा आम्ही बाळगतो', असा उल्लेख या पत्रांमध्ये करण्यात आला आहे. हे पत्र पोस्टाने राष्ट्रपती भवनात पाठवले जाणार असून याचा पाठपुरवठा करण्याची जबाबदारी कॉलेजच्या जीएसची आहे.

एचपीटी कॉलेजमधील विवेक वाहिनी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ही मोहिम गुरुवारी राबवली. सर्व कॉलेजियन्सनी स्वेच्छेने राष्ट्रपती महोदयांना पत्र लिहिले. विवेक वाहिनी ही संस्था अंनिस अंतर्गत कॉलेजमध्ये कार्यरत असून प्रा. हरिष खैरनार, प्रा. डॉ. गिरी हे तसेच दिपक चौधरी, विशाल गोराने, निखिल गुरव हे या संस्थेचे कॉलेज स्तरावरील प्रमुख कार्यकर्ते आहेत. या मोहिमेस कॉलेजचे विद्यार्थी प्रतिनिधी सुरेश नखाते, पुष्कर तिवारी, ऐश्वर्या गुजराथी, भक्ती आठवले, नेहा तावडे यांचे सहकार्य मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला बाजार समितीवर उषा शिंदे

$
0
0

उपसभापतीपदी गणपत कांदळकर यांना संधी

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी उषा माणिकराव शिंदे तर उपसभापतीपदी गणपत ठकाजी कांदळकर यांची बिनविरोध निवड झाली. राज्याचे माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी शिंदे व कांदळकर यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवतांना या दोघांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीवर बाजार समिती संचालकांच्या गुरुवारी सकाळी झालेल्या विशेष सभेत शिक्कामोर्तब झाले.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील महिन्यात झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ प्रणित 'प्रगती' पॅनल'ने बाजार समितीच्या १८ पैकी १२ जागा जिंकत बहुमत प्राप्त केले होते. बहुमत प्राप्त केलेल्या याच गटाचे संचालक सभापती व उपसभापतीपदी विराजमान होणार हे स्पष्ट होते तरीही आमदार भुजबळ सभापती व उपसभापती पदासाठी कुणाच्या नावाला 'ग्रिन सिग्नल' देतात याबद्दल तालुक्यातील राजकीय धुरीणांसह संचालकांनाही मोठी उत्सुकता होती. येवला शहरातील भुजबळ संपर्क कार्यालयातील सभागृह कक्षात गुरुवारी सकाळी बाजार समितील बहुमतातील १२ संचालक एकत्र जमल्यावर मुंबईत असलेल्या आमदार भुजबळ यांनी भ्रमणध्वनीवरून या संचालकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सभापतीपदासाठी उषा शिंदे तर उपसभापतीपदासाठी गणपत कांदळकर यांच्या नावाला संमती दिली. त्यानंतर सभापतीपदासाठी शिंदे याचा संजय बनकर हे सूचक तर मोहन शेलार हे अनुमोदक असलेला अर्ज दाखल झाला. उपसभापतीपदासाठी कांदळकर यांचा अर्ज दाखल होतांना त्यांना कृष्णराव गुंड हे सूचक तर नवनाथ काळे हे अनुमोदक होते. सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती संचालकांची विशेष सभा झाली.

सभापती व उपसभापती पदाची निवड बिनविरोध होताच बाजार समिती आवारात जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिंदे समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा भुजबळ यांचे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, अंबादास बनकर, माजी सभापती सुभाष निकम, मावळते सभापती शिवाजी वडाळकर, दामोदर पवार, माजी नगराध्यक्ष निलेश पटेल,नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे आदींनी सत्कार केला.



उषा शिंदेंना दुसऱ्यांदा सभापतीपद

येवला तालुक्याच्या राजकीय पटलावरील एक मात्तबर नेते तथा जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांच्या पत्नी असलेल्या उषा शिंदे यांनी या अगोदर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद, येवल्याचे नगराध्यक्षपद भूषविलेले होते. महाराष्ट्र कापूस पणन महामंडळ (नागपुर) च्या विद्यमान संचालिका तसेच येवला पालिकेच्या विद्यमान नगरसेविका असलेल्या सौ. शिंदे यांनी सन २००३ ते २००८ या कालावधीत येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद भूषवितांना बाजार समितीच्या विकासाला गती दिली होती. बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोसायटी महिला राखीव जागेवर विजय संपादन करत त्यांनी बाजार समितीत संचालक म्हणुन सलग चौथ्यांदा पोहचण्याची किमया केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नूतन’च्या विद्यार्थ्यांनी साकारला गणपती बाप्पा!

$
0
0

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत चाललेला ऱ्हास आणि त्यामुळे होणारे विविध प्रदूषण मानवी जीवनावर हानिकारक ठरत आहेत. त्यामुळे आपल्या विविध सणही साजरे करताना पर्यावरण जपणे गरजेचे झाले आहे. हे लक्षात घेऊन येत्या १५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील गणेशमूर्ती स्वतःच्या हाताने बनविण्याचा संकल्पही केला. नाशिककरांनीही प्लास्टर ऑफ पेरिसने बनविलेली मूर्ती वापरू नये, असे आवाहन विद्ार्थ्यांनी केले आहे.

भगूर येथील भगूर शिक्षण मंडळ संचालित नूतन प्राथमिक विद्यामंदिराने नेमकी हीच बाब लक्षात घेत हा उपक्रम राबविला. विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी शाडूमातीपासून गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत २३० विद्यार्थ्यांच्या सहभाग घेतला. गणेशमूर्ती कार्यशाळेत प्रसिध्द मूर्तीकला प्रशिक्षक संदीप गायकवाड, विशाल शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांसमवेत पालकांनीही सहभाग नोंदवीत नूतन विद्यामंदिर यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. मुख्याध्यापक ल. चं. जोशी, श. रा. वैद्य, के. डी. वाघ, जीवन गायकवाड, माधुरी कनौजिया आदी मान्यवरांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळावी याकरिता प्रोत्साहन दिले. यावेळी मूर्ती प्रशिक्षक संदीप गायकवाड म्हणाले, 'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या गणेशमूर्ती बनविण्याच्या अनोख्या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.' विद्यार्थी ज्या प्रमाणे चित्रकलेत आपले कौशल्य दाखवतात त्याच प्रमाणे मूर्तीकलेतील त्यांचे कौशल्य पाहून आश्चर्य वाटते. असेही शिक्षण जीवन गायकवाड यांनी सांगितले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्व्हमेंट होस्टेल्ससाठी समाजकल्याणची मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गर्व्हमेंट होस्टेलसाठी अद्यापही ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरता आलेले नाहीत. त्यांच्यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढील गुणवत्ता यादी जाहीर होईपर्यंत आता विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत.

सामाजिक न्याय विभागाच्या गर्व्हमेंट होस्टेलमध्ये मॅट्रिकपूर्व, ज्युनीअर, वरिष्ठ व व्यावसायिक अभ्यासक्रमांची पहिली यादी शासनाच्या संगणक प्रणालीवर प्रसिध्द करण्यात आली आहे. मॅट्रिकपूर्व व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज २६ ऑगस्ट २०१५ पर्यंत भरावेत. या अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी २८ ऑगस्ट २०१५ रोजी प्रसिध्द होणार आहे. वरिष्ठ, व्यावसायिक प्रवर्गातील विदयार्थ्यांनी आपले ऑनलाइन अर्ज ३१ ऑगस्ट २०१५ पर्यंत भरावेत. या अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी २ ऑगस्ट २०१५ रोजी लागणार आहे. यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावेत. ज्यांना अर्ज करतांना अडचणी येत असतील त्यांनी त्या जिल्हयातील सहाय्यक आयुक्त कार्यालयांना आणि शासकीय वसतिगृहाच्या ठिकाणी गृहपाल यांची भेट घ्यावी.

विभागात ४९ होस्टेल्स

नाशिक विभागात एकूण मुला-मुलींचे ४९ होस्टेल्स आहेत. यात नाशिक जिल्ह्यात १३, धुळे ५, नंदुरबार ३ , अहमदनगर १६ व जळगांव १२ येथे होस्टेल्स आहेत. यानंतरही ज्या जागा होस्टेल्समध्ये रिक्त राहतील त्या जागांसाठी दुसरी गुणवत्ता यादी लावली जाईल. पूर्वीचे राहिलेले अर्ज व आत्ता उशिराने भरले गेलेले अर्ज यांचा एकत्रीत विचार करुन गुणवत्ता, प्रवर्गनिहाय रिक्त जागा यानुसार दुसरी गुणवत्ता यादी लावली जाईल. दुसऱ्या यादीच्या वेळी ज्या जागा रिक्त असतील त्यासाठीच उशीराने ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यांचा गुणवत्तेनुसार व प्रवर्गनिहाय रिक्त जागा यांचा विचार करुन त्यांना प्रवेश दिला जाईल. आता उशीराने जे विद्यार्थी अर्ज भरणार आहेत. त्यांना पहिल्या गुणवत्ता यादीमधील विदयार्थ्यांपेक्षा जास्त गुण असले तरी त्यांचा विचार पहिल्या गुणवत्ता यादीसाठी केला जाणार नाही.

अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेले व अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज भरताना विकल्पामध्ये जेवढी शासकीय वसतिगृहे असतील त्या सर्वांना प्राधान्यक्रम देणे गरजेचे आहे. वसतिगृहासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिंनवर कळविले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरला बिबट्याचा थरार

$
0
0

जयभवानी रोडवर तीन तासांच्या प्रयत्नांनंतर पकडण्यात यश
म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जयभवानी रोडवरील लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात दीड वर्षाचा युवा बिबट्या घुसल्याने कल्लोळ उडाला. पोलिस व वनविभागाने तीन तासांच्या मेहनतीनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले. सुदैवाने बिबट्याने कोणावरही हल्ला केला नाही.

उपनगरहून जयभवानीरोडने जाताना उजव्या हाताला १९६४ साली स्थापन झालेली अश्विनी सोसायटीमध्ये दिवंगत लेफ्ट. कर्नल फडकर यांचा 'जानकी' बंगला आहे. त्यामध्ये त्यांच्या पत्नी मंगला आणि कन्या मोहिनी राहतात. सकाळी सातच्या सुमारास मोहिनी या गेटवर दूधाची पिशवी घेण्यास गेल्या असता बिबट्या दिसला. भीतीने त्यांची तारांबळ उडाली. त्यांनी आपल्या नॅनो कारमध्ये आश्रय घेतला. समोरच राहणाऱ्या सुषमा रणभिसे यांची नात नतालिया आयझेकने बिबट्याला उडी मारून बंगल्यात जाताना पाहिल्यावर आरडाओरड केली. सोसायटीतील रहिवाशांनी चोर आल्याचे समजून धाव घेतली. तेव्हा पत्र्याच्या शेडमध्ये बिबट्या बसलेला आढळला. गोंगाट वाढल्याने बिबट्याने बंगल्यातील मोरीत मुक्काम हलविला. उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार, उपनिरीक्षक काळे सहकाऱ्यांसह सकाळी आठच्या सुमारास घटनास्थळी हजर झाले. सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे यांनीही धाव घेतली. त्यांनी वनविभागाला पाचारण केले.

..आणि ऑपरेशन सुरू

गर्दी प्रचंड वाढल्यामुळे पोलिसांनी जयभवानीरोड बंद केला. बंदुकीतून केटामायनस हे भूलीचे इंजेक्शन सोडून बिबट्याला बेशुद्ध करण्याची तयारी सुरू झाली. बिबट्याला बघण्यासाठी गेलेल्या पोलिसावर बिबट्याने हल्लाबोल केला. मात्र, जाळीमुळे पोलिस बचावला. बिबट्या लहान असल्याचे समजल्यावर शेजारील पदमनाभ यांच्या बंगल्यावरून वनरक्षक थोरात यांनी बंदुकीतून इंजेक्शन सोडले. ते वर्मी लागून बिबट्या बेशुद्ध झाला. स्ट्रेचरवरून त्याला वनविभागाने सुरक्षित स्थळी नेले.

तीन तास कारमध्येच

मोहिनी फडकर यांना सकाळी बिबट्या दिसल्यावर त्यांनी इतरांना सावध केले. चपळाई दाखवत आपल्या नॅनो कारमध्ये जाऊन दरवाजा लावून घेतला. मंगला फडकर यांनीही घराचा दरवाजा पक्का बंद केला. मोहिनी यांनी कारमधूनच बिबट्याला हुसकण्याचा प्रयत्न केला. तीन तासांनी बिबट्या जेरबंद झाल्यावर त्या कारमधून बाहेर आल्याचे रहिवशांनी सांगितले.

बिबट्या आला कोठून?

जयभवानी रोड आणि सेंटररोडच्यामध्ये अश्विनी कॉलनी आहे. सेंटररोडलगत लष्कराचा शेकडो एकराचा प्रदेश आहे. तेथे बिबट्या तरस, मुंगूस, घोरपड, कोल्हे, मोर, ससे, साप आदींचा मुक्त वावर आहे. वर्षभरापूर्वी तरसाने येथे तीन पिलांना जन्म दिला होता. रहिवाशांना ही जंगली जनावरे कायम दर्शन देत असतात. लष्कराने येथील जाळीच्या कुंपणाची उंची कमी केल्यामुळेच बिबट्या उडी मारून रहिवाशी भागात आला असावा.

आमचा टॉमी कुत्रा रात्रभर भुंकत होता. सकाळी तो फडकर यांच्या बंगल्याच्या दिशेने पाहून भुंकू लागला. त्यावरून बिबट्या रात्रीच कॉलनीत आला असावा. निवास व खाद्य धोक्यात आल्याने बिबटे रहिवाशी भागात अतिक्रण करीत आहेत.

- ज्युलियस मस्कारेनीयस, रहिवासी

कॉलनीत लहान मुले खेळतात. त्यांच्या आणि रहिवाशांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला आहे. सतत असुरक्षित वाटत असते. वनविभागाने सुरक्षेची उपाययोजना करून आम्हाला दिलासा द्यावा.

- मंगला कर्णिक, रहिवासी

पोलिसांना सकाळी आठला येताच तातडीने हालचाल केली. गर्दी झाल्यामुळे बिबट्या चवताळला होता. मात्र, आवाहन केल्यावर लोकांनी चांगले सहकार्य केले. पोलिस व वनविभागाच्या सहकार्यामुळे मोहीम यशस्वी झाली. बिबट्यासह कोणालाही दुखापत झाली नाही.- अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगाभ्यासासाठी फ्रान्सची अॅना कुंभात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ही संतांची भूमी असून या ठिकाणी आम्हाला सिंहस्थ कुंभमेळा अनुभवता येतो आहे ही भाग्याची गोष्ट आहे, असे सांगतांना अॅना ब्युसेट यांना किती बोलू आणि किती नको असे होते. अॅना या योगा टीचर असून सिंहस्थाच्या अभ्यासासाठी फ्रान्सहून नाशिकला आल्या आहेत.

अॅना यांच्या समावेत १९ लोकांचा टीम आहे. यात १० महिला व ९ पुरुषांचा समावेश आहे. तपोवनातील साधुग्राममध्ये बुधवारी त्या ध्वजारोहणास उपस्थित होत्या. त्यांनी विविध साधू-महंताशी चर्चा करून धार्मिक परंपरेबाबत माहिती जाणून घेतली. तसेच ध्वजारोहण का करतात, त्यामागे कोणता उद्देश आहे हे त्यानी जाणून घेतले. त्याच्या माहितीनुसार एखादी मोहीम जिकल्यानंतर किंवा मोहीम फत्ते झाल्यानंतर ध्वजारोहण करण्याचा प्रघात आहे.

भारताबद्दल त्या म्हणाल्या, की भारत हा पवित्र देश आहे. येथील लोक जास्त चांगल्या पध्दतीने परमेश्वराशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. त्याची अनुभूती आम्ही नाशिकला घेत आहोत. या धार्मिक सोह‍ळ्याला आम्हाला उपस्थित रहाता आले त्याची अनुभूती घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले याबद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानतो. भारताला योगाची मोठी परंपरा आहे. येथील मार्गदर्शांकडून जास्त चांगला अभ्यास करण्यासाठी योगा स्कूलच्या शिक्षकांना मी येथे घेऊन आले आहे.



नाशिकमधील नियोजन उत्तम

योगाचा अभ्यास करणारी अनेक मंड‍ळी फ्रान्समध्ये आहे. यातील योग शिक्षक इस्ट्रेला पेलीन म्हणाले, की कुंभमेळ्याला उपस्थित रहाण्याचा माझा दुसरा अनुभव आहे. या अगोदर हरिद्वार येथील कुंभमेळ्यात मी सहभागी झालो होतो. मात्र, नाशिकमधील कुंभमेळा वेगळा असून नियोजनाचा उत्तम नमुना म्हणावा लागेल. येथील वातावरण स्वच्छ आहे. कुणालाही कोणत्या बाबी लागल्यास त्या तत्काळ उपलब्ध होत आहेत. नाशिकमध्ये १९ लोकांची टीम वास्तव्यास असून योगाचा अभ्यास करीत आहे. अधिकाधिक लोकांनी कुंभमेळा अनुभवावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तेथील नागरिकांना भारतीय परंपरेचा अभ्यास करावा असे देखील सूचित करणार असल्याची त्यांनी सागितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘खाना पकानाही परब्रह्म की सेवा’

$
0
0

बल्लवाचार्य महाराज यांची भावना



प्रशांत भरवीरकर, नाशिक

'आत्मज्ञान की प्राप्ती के लिए साधना तो सभी साधू करते है, परंतु पेट का यज्ञ शुरू रखना भी तो साधनामें जरुरी होता है, इसलिए में उनकी सेवा करता हूँ, खाना पकानाही परब्रह्म की सेवा करना है' हे बोल आहेत बल्लवाचार्य महाराजांचे. अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी अनि आखाडाचे स्वयंपाकघर ते सांभाळतात. त्यांच्या दृष्टीने स्वयंपाक करून खायला घालणे हेच मोठे पुण्याचे काम आहे. तीच माझी साधना आहे, असेही ते म्हणाले.

बल्लवाचार्य महाराजांना मोठी परंपरा आहे. त्यांचे पूर्वज या आखाड्याची नित्यनेमाने सेवा करीत असल्याने पूर्वपरंपरा जपण्यासाठी आपणही त्याच मार्गात आल्याचे ते म्हणतात. गेले अनेक कुंभमेळे हे महाराज या आखाड्यासोबत आहेत. अलाहाबाद येथे झालेल्या कुंभमेळ्यातही आपण निर्वाणी आखाड्यासोबत होतो तेथेही आपण स्वयंपाकाचे काम इमाने इतबारे केल्याचे महाराज सांगतात.

'शुध्द घी से बना खाना खिलाना यह काम में बडे चावसें करता हूँ, मैं सिर्फ साधुके लिए नहीं आनेवाले भाविकों के लिएभी खाना बनाना अपना धर्म समझता हूँ। यह काम में लगातार ३० सालसें करता रहा हूँ। बाजार में जाकर सब्जियाँ लाना भी बडे प्रेम से मैं ही करता हूँ, असेही बल्लवाचार्य महाराज यांनी सांगितले.

लकडी का बंदोबस्त करना चाहीए

'साधुग्राममें एक चीज की बहुत कमी है और वो है लकडी। रोज खाना पकाने के लिए लकडी का बंदोबस्त तो करना चाहीए' अशी भावना बल्लवाचार्य महाराज यांनी व्यक्त केली. साधुग्राममध्ये जेवण शिजविण्यासाठी तपोवनातील आसपासची झाडे तोडली जात असल्याची तक्रार मध्यंतरी करण्यात आली; परंतु स्वयंपाक बनवायचा असेल तर लाकडे लागतातच. आजचा स्वयंपाक झाल्यावर उद्याच्या दिवसासाठी लाकडे आणायची कोठून असा प्रश्न बल्लवाचार्य महाराजांसमोर रोजच पडतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० मेटल डिटेक्टर; २५ श्वान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बॉम्बची अफवा पसरल्याने नाशिकरोड रेल्वे स्टेशवरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. स्टेशनवर २० मेटल डिटेक्टर बसविण्यास प्रारंभ झाला आहे. बंद पडलेले बॅग स्कॅनरही सुरू झाले आहे. सुमारे हजार पोलिस तैनात करण्यात आले असून बॉम्ब शोधणारे २५ श्वान दाखल होत आहेत.

रेल्वे स्टेशनवरील बुकिंग केंद्राशेजारी प्रवेशद्वार स्कॅनर आणि डोअर मेटल डिटेक्टर अनेक महिन्यांपासून बंद होते. टीकेनंतर स्कॅनर सुरू झाला आहे. जुना मेटल डिटेक्टर हटवून येथे सात मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहे. मेनगेटवर तीन तर सिन्नर फाटा येथील प्लॅट क्रमांक चारवर दोन डिटेक्टर बसविण्यात आले आहे. आणखी आठ मेटल डिटेक्टरची जागा लवकरच निश्चित केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.

एक वर्षाची वॉरंटी

हरियाणातील कंपनीने बनविलेल्या या मेटल डिटेक्टरची एक वर्षाची वॉरंटी आहे. त्याचे आयुष्य किमान तीन वर्षे आहे. नियमित वापर आणि पाण्यापासून संरक्षण केल्यास ते जास्त दिवस चालतील.

रेल्वे स्टेशनवर बॉम्ब शोधणारे लॅब्रोडार जातीचे दोन श्वान दाखल झाले आहेत. पर्वणीकाळात ही संख्या पंचवीसपर्यंत नेण्यात येणार आहे. तल्लख बुद्धीमत्ता, संयम ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.

- बी. डी. इप्पर,

पोलिस निरीक्षक, आरपीएफ



महानिरीक्षकांकडून सुरक्षेचा आढावा

रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक ए. के. सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. पर्वणीकाळात तीन दिवस स्टेशन परिसरातील अधिकृत स्टँडवरील रिक्षांना मज्जाव करण्यात येणार असल्याचे समजते. सिंग यांच्यासमवेत अप्पर सुरक्षा आयुक्त चंद्रमोहन मिश्र, लोहमार्ग पोलिस दलाचे अप्पर पोलिस महासंचलक कनकरत्न, मेळा अधिकारी आणि उपअधीक्षक माधुरी कांगणे, पोलिस निरीक्षक बी. डी. इप्पर, चंद्रशेखर भाबल आदी उपस्थित होते. पथकाने नवा पादचारी पूल, सिन्नर फाटा येथील नव्या चौथ्या प्लॅटफार्ममधील सुरक्षेचाही आढावा घेतला. बंदोबस्त कोठे ठेवावा, किती ठेवावा याबाबत मार्गदर्शन केले. कुंभसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांसाठी नियोजन मार्गाची माहिती घेतली. मालधक्का येथेही तिकीट बुकींग आणि भाविकांची तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. त्याची माहिती सिंग यांनी घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीतील वल्लभपीठात फडकला धर्मध्वज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

पंचवटी कारंजा येथील इंद्रकुंड समोरील जगद्गुरू श्री महाप्रभूजी वल्भाचार्य स्थानकात श्री वल्लभ पीठाधीश्वर पु. पा.१०८ गो. श्री. रामेशकुमारजी महाराज यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आ. चि. पु. पा. गो. श्री. परेश्कुमार्जी बाबा यांचे प्रमुख उपस्थितीत होते.

श्री परेश्कुमार बाबा म्हणाले,'सिंहस्थात भाविकांनी गोदावरीतच स्नानाला यावे असे नाही. भाविकांनी एकत्र येत देशाच्या प्रगतीचा विचार मांडावा व देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावेत हेही एक पवित्र स्नानच आहे. गोदा प्रदूषित होऊ नये ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत.'

यावेळी श्री महाप्रभू वल्लभाचार्यपिठाची परंपरा आणि विविध कार्यक्रमांची

माहिती दिली.

स्थानकातील विविध कार्यक्रम

१९ ते २८ ऑगस्ट : दुपारी ३ वा. भवदीय अष्टसखा वार्ता.

२७ ऑगस्ट : सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान नि.ली.पु.आ.१००८ गो.श्री.गोपिनाठ्जी महाराज यांचा पवित्र बारस शताब्दी महोत्सव.

१ ते ३ सप्टेंबर : सकाळी ९ ते सायं. ७ दरम्यान मह्पुरुशचरण गायत्री याग.

५ सप्टेंबर : सकाळी ७ ते सायं.६ दरम्यान जन्माष्टमी महोत्सव.

६ सप्टेंबर : सकाळी ९ वा. नंद महोत्सव.

७ व ८ सप्टेंबर : ढाढीलीला.

१२ ते १६ सप्टेंबर : दररोज साय.६ वा.रास मंडळी.

१८ सप्टेंबर : दुपारी २ वा. ऋषीपंचमी व चि.गोपिनाथजी दीक्षित बाबा जन्मदिन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगासन शिल्पातून आरोग्याचा मंत्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सौंदर्यस्थळामध्ये भर टाकण्याच्या हेतूने एबीबी सर्कल हे वाहतूक बेट नव्याने विकसित करण्यात आले आहे. योगासनातील काही शिल्प येथे बसविण्यात आल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी तो आकर्षणाचा व कुतूहलाचा विषय ठरला आहे. विविध आसनातील या शिल्पमूर्ती आएसओ एफआरपी या माध्यमातून तयार करण्यात आले आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपले शरीर कसे निरोगी राहील यासाठी योगासन, प्राणायाम, सूर्य नमस्कार याचे आकर्षण अनादी काळापासून आहे. त्याचा प्रसार नजिकच्या काळात मोठ्या प्रमाणावर झाला. शाळा, कॉलेज, ज्येष्ठ नागरिक यांनी या विषयात विशेष सहभाग नोंदविला आणि शासनदरबारीही त्याची दखल घेण्यात आली. त्यामुळे योग हा विषय कंपनीतर्फे निवडण्यात आला आहे.

ऐतिहासिक परंपरा असलेल्या सिंहस्थ उत्सवात संपूर्ण भारतातून भाविक येणार आहेत. त्यांना आपले नाशिक शहर स्वच्छ, सुंदर वाटावे यासाठी रस्ते, पथदीप, वाहतूक व्यवस्था यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. वाहतूक बेटे आकर्षक असावी असाही महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यातूनच त्यांनी खासगी कंपन्यांना ही बेटे विकसित करण्यासाठी दिलेली आहेत. एबीबी कंपनीला अशाच प्रकारे महात्मा नगरचे एक

वाहतूक विकसित करण्यासाठी दिलेले असल्याने त्यांनी शहरातील सुप्रसिध्द शिल्पकार प्रसन्ना तांबट यांच्या मदतीने जुन्या वाहतूक बेटाच्या जागी नवे बेट विकसित केले

आहे.

या बेटाचा विषय योग असा त्यांनी घेतला असून त्याप्रकारची शिल्पे बनविण्यात आली आहेत. मनीष रघुवंशी व स्वानंदी वालझाडे यांनी मॉडेल बनत हे शिल्प तयार करण्यास मदत केली. स्वानंदी कित्येक तास मॉडेल बनून राहिल्याने हे शिल्प साकारल्याचे तांबट सांगतात.

त्र्यंबक रस्त्यावरील महात्मा नगर येथे स्वात‌ंत्र्यदिनी 'एबीबी'चे मुख्य सी. पी. व्यास यांच्या हस्ते नूतन एबीबी सर्कलचे उदघाटन झाले. शिल्पकार प्रसन्न तांबट यांनी हे शिल्प तीन महिन्यात उभे केले. तांबट बंधू या संस्थाचे तिसऱ्या पिढीचे ते शिल्पकार आहेत. हे काम करताना त्यांना 'एबीबी'चे सतीशकुमार, राहुल बढे, प्रशांत गणेशकर, अजय गोसावी थापा यांचे सहकार्य मिळाले.





असा आहे या शिल्पांचा अर्थ

शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या शिल्पात काही आसने दाखविण्यात आली आहेत. शिल्पाकृतीच्या मध्यभागी असलेले पुरुषाचे शिल्प सहा फूट उंचीचे असून ते वृक्षासनातील आहे. एका पायावर उभे राहून समतोल साधतोय आणि ऊर्जा मिळवली जातेय असे ते शिल्प दर्शवते. सर्कलमध्ये चार शिल्पे बसविण्यात आली असून पहिले शिल्प कृष्णासनातील आहे. हे शिल्प स्त्रीचे असून शरीरातील लवचिकता, कमनीय बांधा बघावयास मिळते. दुसरे शिल्प हे ध्यानमुद्रेतील असून ते पुरुषाचे आहे. ध्यान, एकाग्रता, निरामय जीवनाची योगमुद्रा, चिंतन, ध्यान, दीर्घश्वास याची या शिल्पातून प्रचिती येते. तिसरे शिल्प हे राजकपोतासन आहे. हे शिल्प स्त्रीचे असून बांधेसूद शरीर, लवचिकता, शरीराची स्नायू व हातापायाची विशिष्ट बैठक या आसनातून बघायला मिळते. चौथे शिल्प पुरुषाचे असून ते ओंकार मुद्रेतील आहे. मनात असणाऱ्या श्रध्देची ध्यानधारणा, नम्रता, जप, ईश्वराप्रती असणारी श्रध्दा, सृष्टीला ऊर्जा देणाऱ्या सूर्यदेवतेस नमस्कार, श्वासाचे नियंत्रण क्षणाक्षणाला मानवास आपले कार्य पार पाडताना एका उद्दिष्टाकडे घेऊन जाते याची भावमुद्रा आपल्याला आनंद देते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉर्सेलिस बंदरावर साकारणार सावरकर स्मारक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

जन्मभूमीच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी फ्रान्समधील ज्या मॉर्सेलिस बंदरावरून विनायक दामोदर सावरकर यांनी ऐतिहासिक उडी मारली ती आठवण आता स्मारक स्वरुपात साकारली जाणार आहे. अर्थात हे स्मारक फ्रान्समधील मॉर्सेलिस येथेच उभारले जाणार आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने हिरवा कंदिल दाखविला आहे.

सावरकरांचे मॉर्सेलिस येथील बंदरावर स्मारक उभारण्यात यावे, यासाठी ना‌शिकमधील सावरकरप्रेमींकडून अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. यामध्ये सावरकर मध्यवर्ती संस्था प्रयत्नशील होती. मॉर्सेलिस शहराचे महापौर जीन क्लाऊड गाऊडीन यांनी स्मारक उभारणीसांठी हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे येत्या काही काळात तेथे सावरकरांचे स्मारक उभे राहील, अशी माहिती भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले आहे.

सावरकरांनी ब्रिटीशांच्या साम्राज्याच्या विरोधात पुकारलेल्या बंडाचं प्रतिक म्हणून भारतीय इतिहासात सावरकरांची मार्सेलिस बंदरावर मारलेली उडी ओळखली जाते. त्यानंतर ते पकडले गेले असले तरी देशप्रेमासाठी केलेले धाडस म्हणून त्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. सावरकरांनी मारलेली उडी त्यावेळी देशातील अन्य तरुणांसाठी क्रांतिकारी आणि धाडसी ठरली होती. याच धाडसाच प्रतिक म्हणून मॉसेलिस येथे सावरकरांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी होती.

यातूनच काही नागरिकांनी पुढे येत सावरकर मध्यवर्ती संस्था स्थापन करून स्मारकासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू केले होते. यामध्ये संस्थेच्या वतीने गणेश वढवेकर, निलेश गायकवाड यांनी पुढाकार घेतला. केंद्रीय रसायन व खते मंत्री हंसराज अहिर यांची भेट घेऊन त्यांना याविषयी माहिती दिली. अहिर यांनीही त्वरित सहकार्य करीत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी पत्रव्यवहार केला. तसेच मॉर्सेलिसच्या महापौर जीन क्लाऊड गाऊडीन यांच्याशी तत्काळ संपर्क साधला. गाऊडीन यांनीदेखील या कामासाठी परवानगी दिल्याचे स्पष्ट केले.



शिलालेख उभारणार

सावरकर स्मारकासंदर्भात सुषमा स्वराज यांना अहिर यांच्यासह गणेश वढवेकर, निलेश गायकवाड यांनी भेटून स्मारकासंबंधी माहिती दिली. उडीचे भित्तीचित्र आणि सावरकर चारित्राची माहिती असलेला शिलालेखरुपी भव्य स्तंभ मॉसेलिसच्या बंदरावर उभारला जाणार आहे. यासाठी लागणारा निधी लोकवर्गणीतून गोळा केला जाणार आहे. मॉर्सेलिस बंदरावर स्मारक उभारण्यास फ्रान्स सरकारची लेखी परवानगी मिळण्यासाठी कराही अवधी गेला असला तरी येत्या काही काळात स्मारक नक्की उभारले जाईल, असे आश्वासन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतीपदी देविदास पिंगळे

$
0
0



उपसभापती शंकर धनवटे बिनविरोध; विरोधी सदस्यांनी फिरविली पाठ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी खासदार देविदास पिंगळे यांची तर उपसभापती शंकर धनवटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूकीत मदत करणाऱ्या शिवसेनेला उपसभापतीपद देवून पिंगळेंनी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची मर्जी राखली आहे. विशेष म्हणजे विरोधी सदस्यांनी या निवड प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी बाजार समितीच्या सभागृहात गुरूवारी सभा पार पडली. समितीच्या १८ पैकी १५ जागांवर देविदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील आपल पॅनलचे संचालक निवडून आले होते. त्यामुळे सभापती व उपसभापती निवडीची औपचारिकता उरली होती. सभापतीपदावर पिंगळे यांची निवड निश्चित होती. मात्र, उपसभापती पदासाठी कोणाला संधी मिळते

याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पिंगळे यांनी अखेर अडचणीच्या काळात बाजार समितीत त्यांच्यासोबत उभे राहिलेल्या शिवसेनेला बहाल केलेे.

धनवटे हे शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांचे समर्थक आहेत. सभापतीपदासाठी पिंगळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर उपसभापतीपदाच्या निवडणुकीतही शंकर धनवटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. समितीत स्थायी समिती सदस्य शिवाजी चुंभळे यांच्या शेतकरी विकास पॅनलचे तीन सदस्य निवडून आले आहेत. मात्र यातील संदीप पाटील वगळता चुंभळे व संपतराव सकाळे यांनी या निवडणूक प्रक्रियेकडे पाठ फिरवली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई आणि नाशिक तालुका उपनिबंधक जे. जे. मावळे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार मार्केटमध्ये पोलिसांची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

सिहंस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली अंबडलिंकरोडच्या भंगार मार्केटमध्ये अंबड पोलिसांनी तपासणी मोहीम राबविली. तपासणी मोहिमेत डॉग स्कॉडसह बाँब शोधक पथाकाचाही समावेश होता.

कुंभमेळ्याला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये या हेतूने सर्वच सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. यामध्ये पोलिस आयुक्तालयाकडून देखील विशेष सुरक्षा घेतली जात आहे. त्यातच नेमहीच वादग्रस्त असलेल्या अंबडलिंकरोड वरील भंगार मार्केटचा तपासणी दौरा पोलिस आयुक्तांच्या आदेशावरून अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिनेश बर्डीकर यांनी केला.

तपासणी मोहिमेत डॉग स्कॉड व बाँब शोधक पथकाचे अधिकारी सहभागी झाले. यावेळी पोलिसांनी भंगार दुकाने व व्यवसायिक दुकानांची तपासणी केली. तपासणी मोहिमेत संशयित वस्तू आढळल्या असता, पोलिसांनी त्यांची कसून चौकशी देखील केली. तसेच काही वाहने भंगार दुकानात लावलेली होती, त्याबाबतही सविस्तर माहिती पोलिसांनी घेतली. कुंभमेळ्यात कुठल्याच प्रकारची दहशतवादी किंवा अनुचित प्रकार होऊ नये म्हणून अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबवत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बर्डीकर 'मटा'शी बोलतांना सांगितले.

याप्रसंगी अंबड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक समीर वाघ, समाधान वाघ, सोनवणे, बैराधी,

सचिन शिंपले, दत्तू घारे, बापू देव, डी. पी. माळोदे यांसह बाँब शोधक पथकाचे पोलिस निरिक्षक जमादार आदी तपासणी मोहिमेत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ओऽऽ श्याम मोरी बय्या गहोना...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'ओ श्याम मोरी बय्या गहोना, लर तय्या करोना, हम तो नारी पराये घर की, हमरे भरोसे गोपाल रहोना..!' कृष्ण आणि यशोदेच्या प्रेमळ नात्याचे दर्शन घडविणाऱ्या या बंदिशीची अनुभूती रेखा नाडगौडा व अदिती नाडगौडा-पानसे यांनी सादर केलेल्या नृत्यातून प्रेक्षकांना मिळाली.

निमित्त होते, किर्ती कला मंदिराच्या वतीने आयोजित 'नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवा'चे. बुधवारी या तीनदिवसीय महोत्सवाचे येथे उद् घाटन करण्यात आले. गुरू पंडित शामा भाटे यांच्या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रेखा नाडगौडा, अश्विनी नाडगौडा-कळसेकर व अदिती नाडगौडा-पानसे यांनी यावेळी सादरीकरण केले. या महोत्सवाचे यंदाचे २२वे वर्ष आहे.

'थई ता थई ता थई थई ता, नीरत करत शाम सुंदर..', 'बदरिया रे बरस सावरिया के देस..', 'अपना मल ढल जाये, भक्त का मन ना ढले..', 'तेवी गती अगाध वर्णी ना जाए..', अशा सुरेख बंदिशींवर नृत्य सादर करीत कृष्णामधील माधुर्य, सौंदर्याचे दर्शन या कार्यक्रमातून प्रेक्षकांना घडले. रेखा नाडगौडा, अदिती नाडगौडा-कळसेकर व अदिती नाडगौडा-पानसे यांनी नृत्य सादर केले. कल्याणी दसककर व विनय रामदासन् (गायन), सुभाष दसककर (हार्मोनियम), ईश्वरी दसककर (सिन्थेसायजर), चारुदत्त फडके (तबला), सुनील अवचट (बासरी) यांची संगीतसाथ कार्यक्रमाला लाभली.

२१ ऑगस्टला अदिती नाडगौडा-पानसे यांच्या संकल्पनेवर आधारित युनिटी बॅलेट कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.



'मयूरभंज छाऊ डान्स'ची मोहिनी

पंडित गोपीकृष्ण महोत्सवात गुरूवारी मयुरभंज छाऊ डान्स सादर करण्यात आला. भारत देश हा वैविध्यपूर्ण आहे. विविध भाषा, धर्म, पंथ, कलांनी समृद्ध देश आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यशैली ही विविध लोकनृत्यातूनच जन्माला आली आहे. शास्त्रीय नृत्यातील नव्याने मान्यता प्राप्त झालेली 'छाऊ' ही नृत्यशैली नाशिककरांनी अनुभवली. ओडिसा, झारखंड आणि पश्चिम बंगाल येथील प्रसिद्ध 'छाऊ नृत्य' नाशिकच्या रंगमंचावर पहिल्यांदाच सादर झाले. सेराईकेला, पुरुलिया आणि मयूरभंज ह्या छाऊ नृत्याच्या तीन प्रकारांपैकी मयूरभंज ही शैली प्रस्तूत करण्यासाठी दिल्लीच्या गुरुकुल छाऊ डान्स संगम, दिल्ली चे राकेश साईबाबू आणि सहकलाकार आले होते. 'मार्शल डान्स' म्हणून प्रसिद्ध असलेला हा नृत्याविष्कार नाशिककरांसाठी वेगळा अनुभव होता. द्वितीय सत्राची सांगता अश्विनी काळसेकर यांच्या 'रुद्र' ने झाली. यात महादेवाच्या विविध छटा कीर्ति कला मंदिराच्या विद्यार्थिनींनी सादर केल्या. संकल्पना आणि नृत्यदिग्दर्शन अश्विनी काळसेकर यांचे होते.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्तांची निवड

$
0
0

गुरूमित बग्गा, अरूणा ढेरे, संजय पाटील यांची नियुक्ती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरूवारी पार पडली, यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त म्हणून उपमहापौर गुरूमित बग्गा, साहित्यिका अरूणा ढेरे व आर्किटेक्ट संजय पाटील यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली.

सारस्वत बँकेचे एकनाथ ठाकूर यांच्या मृत्युने व फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या विश्वस्तपदाची मुदत संपल्याने तीन जागा रिक्त झाल्या होत्या. त्या जागी या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. विनायक रानडे व डॉ. कुणाल गुप्ते यांना मुदतवाढ देण्यात आली. यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कार्यवाह लोकेश शेवडे, किशोर पाठक, अरविंद ओढेकर यांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय मनोगतात कर्णिक यांनी सांस्कृतिक नाशिक व लोकमाता गोदावरी या उपक्रमांबाबत पुनरूच्चार केला. हे दोन्ही उपक्रम ही प्रतिष्ठानची खासियत असणार आहे, असेही ते म्हणाले. सांस्कृतिक नाशिकसाठी समिती गठीत करण्यात आली असून, त्यात किशोर पाठक, डॉ. दिलीप धोंडगे, प्रा. अनंत येवलेकर, अरविंद ओढेकर व स्वानंद बेदरकर यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक बंगला बने न्यारा...

$
0
0

व्हर्नाक्युलर आर्किटेक्चरचा नाशकात नमुना

फणिंद्र मंडलिक

गृहनिर्माण क्षेत्राला खुणवू पहात असलेल्या नाशकात प्रथमच वेगळा प्रयोग अनुभवायला मिळतो आहे. अधिकाधिक नैसर्गिक वस्तू तसेच रिसायकल केलेल्या टाकाऊ वस्तूंपासून अगदी कमी खर्चात व्हर्नाक्युलर आर्किटेक्चर पद्धतीने इकोफ्रेंडली घराची बांधणी करण्यात आली आहे. नाशिकचे प्रयोगशील आर्किटेक्ट जयेश आपटे यांनी हा प्रकल्प साकारला आहे.

नाशिक-त्र्यंबकरोडवर वाढोली फाट्यापासून ७०० मीटर अंतरावर हा बंगला बांधण्यात आला आहे. एक हजार स्केअर फुटाचा बंगला बांधण्यासाठी अवघा ७ लाख रुपये खर्च आला आहे. याच आकाराचा साधारण बंगला बांधायचा झाल्यास २५ लाख रुपये खर्च येतो. मात्र, व्हर्नाक्युलर पध्दतीने घर बांधल्यास पैशांची मोठी बचत होते, असा दावा आपटे यांनी केला आहे. बंगळुरु येथे शिक्षण घेत असताना तेथे या पध्दतीचा आपटे यांनी अभ्यास केला. या पध्दतीची भारतात ठराविक घरे आहेत. अशा प्रकारे नाशिकमध्येही घर बांधावे अशी त्यांची इच्छा होती.

आपटे यांनी अनेक क्लायंटला ही पध्दत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही पध्दत लोकांच्या पचनी पडत नव्हती. शेवटी त्यांनी स्वतःच व्हर्नाक्युलर आर्किटेक्चर पध्दतीने घर बांधायचे ठरवले. कमीत कमी स्टील व कमीत कमी सिमेंटचा वापर करण्यात आल्याने हे घर इकोफ्रेंडली बनले आहे. घराच्या खिडक्या भंगार बाजारातून खरेदी केल्या आहेत, तर मुख्य दरवाजाही एका पडलेल्या वाड्याचा लावला आहे. याचा स्लॅब मातीचे होलो ब्लॉक वापरून टाकण्यात आला आहे. सिमेंटच्या स्लॅबपेक्षा हा स्लॅब दणकट असल्याचे आपटे यांचे म्हणणे आहे.



इकोफ्रेंडली साधनांचा वापर

घरासाठी वॉटर हार्वेस्टिंग व सोलर एनर्जीचाही वापर केला आहे. घरातील वातावरण थंड रहावे यासाठी भिंतींना प्लास्टर केलेले नाही. त्यामुळे बाहेर जरी उष्णता असली तरी आतील वातावरण थंड असते. लाकूडही जुनेच वापरल्याने खर्च कमी झाला आहे. २० गुंठ्याच्या जागेत हजार स्केअर फुटाचे घर बांधण्यात आले असून, उर्वरित जागेत जैवविविधता संकल्पनेवर आधारित सेंद्रीय पध्दतीने वृक्ष लागवड करण्यात आली आहे. रुद्राक्ष, लवंग, चिंच, वड, पिंपळ, आंबे अशी झाडे लावण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फायनान्शिअल इन्फ्रा’मध्ये नाशिक टॉपवर

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

जागतिक पातळीवर वेगाने विकसित होणारे नाशिक हे आर्थिक पायाभूत सोयी-सुविधांमध्येही (फायनान्शिअल इन्फ्रा) देशात टॉपवर असल्याची बाब समोर आली आहे. मॉर्गन स्टॅन्ले इंडियाने केलेल्या राष्ट्रीय पाहणीच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. यानिमित्ताने नाशिकच्या मानात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

मुंबई व पुण्यानंतर झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून नाशिककडे पाहिले जाते. देशाची आर्थिक तर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून नाशिक हाकेच्या अंतरावर आहे. तर, हवामान, भौगोलिकता, पाण्याची उपलब्धता, पायाभूत सोयी-सुविधांचे जाळे आदींमध्ये नाशिकचा वरचष्मा आहे. आता फायनान्शिअल इन्फ्रामध्येही नाशिकने बाजी मारली आहे. मॉर्गन स्टॅन्ले इंडिया या राष्ट्रीय आर्थिक संशोधन संस्थेने देशभरात 'इंडियाज अर्बनायझेशन- टाइड टर्निंग' या शीर्षकाखाली पाहणी केली. त्यात फायनान्शिअल इन्फ्रास्ट्रक्चर, रोजगाराच्या संधी, कन्झम्पशन इंडेक्स (वापर निर्देशांक) अशा विविध पातळ्यांवर प्रमुख शहरांचा वेध घेण्यात आला. फायनान्शिअल इन्फ्रास्ट्रक्चर या विभागात संपूर्ण भारतात नाशिक आणि वाराणसी ही दोन शहरे टॉपवर असल्याचे पाहणी अहवालात म्हटले आहे. वापर निर्देशांकात चंदिगड आणि रायपूर या शहरांनी वरचे स्थान पटकावले आहे.



नाशिक आणि बँकिंग

राज्यासह देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिकचा वाटा मोलाचा आहे. द्राक्ष, कांदा यांची निर्यात, औद्योगिक उत्पादनांची उलाढाल, भाजीपाल्याचा मुबलक पुरवठा मोठी असल्याने सहाजिकच नाशिकचा वरचष्मा आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आर्थिक संस्थांचा नेहमीच नाशिककडे ओढा राहिला आहे. म्हणूनच शहर परिसरात बँका आणि वित्तीय संस्थांचे घट्ट जाळे पसरले आहे.



नाशिक आणि बँकिंग

राष्ट्रीयकृत बँकांची संख्या-२८

सहकारी व शेड्यूल्ड बँकांची संख्या- ४२

पतसंस्था-४९६

इतर जिल्ह्यातून आलेल्या सहकारी बँका- ५०

विविध कार्यकारी सोसायट्या- १०५३

बँक शाखेलगत असलेले एटीएम- ३८९

बँक शाखेलगत नसलेले एटीएम - ४५३

नाशिकच्या विकासाचा वेग पाहता येत्या काळात वित्तीय संस्थांची संख्या नाशकात वाढणे स्वाभाविकच आहे.

- सुनील बनसोडे, जिल्हा उपनिबंधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्चस्ववादावरून महंतांमध्ये ‘महाभारत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तपोवनात गुरूवारी फरशीवाले बाबांच्या आश्रमात झालेल्या ध्वजारोहणाच्या वेळी महंतांमध्ये सुरू झालेल्या धर्मचर्चेचे रूपांतर टोकाच्या वादात झाल्याने श्रोतेही काहीवेळ अवाक् झाले. 'रामायण' आणि 'महाभारत' या ग्रंथांपैकी श्रेष्ठ कुठला, या मुद्द्यावरून साधूंमधील वर्चस्ववादाचे दर्शन घडविणारा अनपेक्षित प्रसंग आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास आणि जगदगुरू हंसदेवाचार्य यांच्यातील मतभेद अधोरेखित करून गेला.

विविध संप्रदायांचे प्रमुख संत व इतर मान्यवरांचीही या सोहळ्यासाठी उपस्थिती होती. 'निर्मोही' आणि 'निर्वाणी' या शब्दांचा अन्वयार्थ मांडताना जगद्‍गुरू हंसदेवाचार्य यांनी महाभारतातील उदाहरणांचा ऊहापोह केला. महंत ग्यानदास यांनी याच शब्दांचा अन्वयार्थ रामायणातील उदाहरणांद्वारे मांडला. सुरुवातीला असणारे वाद-विवादाचे हे वातावरण अवघ्या काही क्षणांमध्ये आणखी तप्त झाले. अन् काहीवेळ शांततेत सुरू असणारे मुद्द्यांचे खंडन मंडन थेट आदळआपट करण्यापर्यंत गेले. हंसदेवाचार्य यांचा संदर्भच चुकीचा असल्याचा मुद्दा महंत ग्यानदास यांनी मांडला. ग्यानदास यांनी रामायणातील उदाहरण मांडल्यानंतर हंसदेवाचार्य यांनी प्रतिवाद केल्यानंतर तप्त झालेल्या वातावरणामुळे श्रोतेही अवाक् झाले. पाच ते सात मिनिटांपर्यंत ही वर्चस्ववादाची चर्चा लक्ष वेधून गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>