मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागले असून, सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या पॅनलला बहुमत मिळविण्यास अपयश आले आहे. भाऊसाहेब हिरे पॅनलने सर्वाधिक नऊ जागा जिंकल्या. मात्र, अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सत्तेचा दहा हा जादुई आकडा कोणालाही गाठता न आल्याने सत्तास्थापनेत प्रसाद हिरे किंगमेकर ठरू शकतात.
एकूण १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या बाजार समितीवर भाजप आणि हिरे समर्थकांनी बाजी मारीत सर्वाधिक नऊ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेच्या शेतकरी पॅनलला ८ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र या तिरंगी लढतीत काँगेस-राष्ट्रवादीच्या बळीराजा पॅनलला केवळ एका जागेवर विजय मिळाला. पॅनलप्रमुख प्रसाद हिरे हे विजयी झाले आहेत.
एकूण १८ जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात होते. यात सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांचे शिवसेनचे शेतकरी पॅनल, भाजप नेते अद्वय हिरे यांचे भाऊसाहेब हिरे पॅनल आणि काँग्रेस नेते प्रसाद हिरे यांचे बळीराजा पॅनल अशी तिरंगी लढत होती. सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते या निवडणुकीत रिंगणात उतरल्याने निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची झाली. एकूण ८५ कर्मचाऱ्यांनी मतमोजणी केली. मतमोजणीसाठी एकूण १० टेबल लावण्यात आले होते. प्रारंभी हमाल मापारी गटासाठी मतमोजणी करण्यात आली. यात पहिला विजयी निकाल सेनेच्या शेतकरी पॅनलचा लागल्याने सेनेच्या गोटात एकच आनंदाची लहर पसरली. वसंत कोर हे १६० मते मिळवून विजयी झाले. सोसायटी गटात भाजपने मुसंडी मारीत ११ पैकी ७ जागी तर सेनेला ३ जागी विजय मिळाला. मात्र या गटात बळीराजा पॅनलच्या प्रसाद हिरे यांनी देखील विजय मिळवल्याने समर्थकांचा जीवात जीव आला.
ग्रामपंचायत गटासाठी फेरमतमोजणी ग्रामपंचायत गटातील निकाल जाहीर झाल्यानंतर शेतकरी पॅनलचे प्रमुख बंडूकाका बच्छाव यांच्यासह या गटातील त्यांचे उमेदवार अनिल बच्छाव तर हिरे पॅनलचे प्रभाकर शेवाळे यांनी फेरमतमोजणीची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी बलसाने यांच्याकडे केली. या गटातील भाजपचे विजयी उमेदवार पुंजाराम धुमाल यांना ४६८ मते तर अनिल बचछाव यांना ४५७ मते मिळाली होती. प्रभाकर शेवाळे यांना ४२८ मते मिळाली होती. फेरमतमोजणी केली असता निकालात कोणताही बदल झाला नाही.
हिरे बंधूची भेट लक्षवेधी काँग्रेस नेते प्रसाद हिरे मतमोजणी केंद्रावर संपूर्ण दिवसभर ठाण मांडून होते. त्यांच्या बळीराजा पॅनलमधील केवळ त्यांचा एकमेव विजय झालेला असताना देखील ग्रामपंचायत गटात उमेदवार विजयी होतील, अशी आशा त्यांना व समर्थकांना होती. मात्र एकाच जागी विजय मिळवता आला तरी आपली भूमिका महत्वाची ठरेल हे त्यांना समजल्याने ते बसूनच होते. सर्वच निकाल हाती आल्यावर हिरे पॅनलचे प्रमुख अद्वय हिरे यांचे देखील आगमन झाले. दोन्ही हिरे बंधू एकाच जागी बसून चर्चा करू लागल्याने हिरे बंधूंची ही भेट लक्षवेधी ठरून सत्ता स्थापनेत प्रसाद हिरे यांना अद्वय हिरे सोबत घेणार का? याबाबत चर्चा रंगली.
तीनही पॅनलप्रमुखांचा विजय या निवडणुकीत सोसायटी गटात सर्वसाधारण वर्गातून शेतकरी पॅनलचे प्रमुख बंडूकाका बच्छाव, हिरे पॅनलच प्रमुख अद्वय हिरे तर बळीराजा पॅनलचे प्रसाद हिरे निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे या लढतीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. या तीनही पॅनलप्रमुखांनी निवडणुकीत विजय मिळवला असून प्रतिष्ठा कायम राखली आहे.
एकूण जागा व पॅनलला मिळालेल्या जागा कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल (भाजप) - ९ शेतकरी विकास पॅनल (शिवसेना) - ८ बळीराजा पॅनल (काँग्रेस-राष्ट्रवादी) - १
विजयी उमेदवार सोसायटी गट : अव्दय हिरे (८३३), प्रकाश हिरे (७४३), बंडूकाका बच्छाव (५९९), गोरख पवार (५४९), गोविंद खैरनार (५३९), अमोल शिंदे (५२८), राजेंद्र जाधव (५१२). महिला राखीव- सुमन निकम (५९४), सोजाबाई पवार (६६०). इतर मागासवर्गीय - संजय निकम (६२३). विमुक्त जाती जमाती- राजाभाऊ खेमनार (६८५). ग्रामपंचायत गट : सर्वसाधारण- संग्राम बच्छाव (४८३), पुंजाराम धुमाळ (४६८). अनु. जाती जमाती - बबिता कासवे (४७०). आर्थिब दुर्बल - सुशील देवरे (४६८). व्यापारी गट : संजय घोडके (३६५), शेख फकिरा शेख सादीक (२९५). हमाल मापारी गट : वसंत कोर (१६०).
गट व पॅनलला मिळालेल्या जागा गट - शेतकरी - हिरे - बळीराजा सोसायटी - ३ - ७ - १ ग्रामपंचायत - २ - २ - ० व्यापारी - २ - ० - ० हमाल मापारी - १ - ० - ० एकूण जागा - ८ - ९ - १
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट