Jitendra.tarte@timesgroup.com
Tweet : @jitendratarteMT
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सोळावा दीक्षांत समारंभ आज होत आहे. यानिमित्ताने विद्यापीठाच्या व्हीजनला बळ देण्यासाठी आवश्यक अशा मेडिकल कॉलेजच्या गरजांपासून, तर विद्यापीठाकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षांपर्यंतच्या मुद्द्यांवर दृष्टिक्षेप टाकणारी वृत्तमालिका आजपासून...
राज्यातील प्रशासकीय रचनेत विभाग स्तरावरील प्रमुख जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या नाशिक शहराच्या पदरात स्वातंत्र्यानंतर अद्यापपर्यंत गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज पडलेले नाही. यामुळे गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजशिवाय विभागीय स्तरावरील प्रशासकीय केंद्र असणारे हे शहर राज्यात एकमेव ठरल्याची खंत आज (२० डिसेंबर) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामुळे अधोरेखीत होत आहे. काही महिन्यांपूर्वी केलेल्या या घोषणेस जागून पालकमंत्री या संदर्भातील प्रस्तावास नक्कीच प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा नाशिककरांना आहे.
आजच्या सोहळ्यास राज्यपालांच्या उपस्थितीत पालकमंत्री मेडिकल कॉलेजची गोड बातमी नाशिककरांना देतील, अशी आशा आज (२० डिसेंबर) नाशिककर ठेवून आहेत. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या स्थापनेपासून नाशिककरांनी उराशी बाळगलेली गव्हर्न्मेंट कॉलेजची आशा दीड तपामध्ये कोमेजून गेली होती. या पार्श्वभूमीवर शहरासाठी किमान एखादे गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज साकारले गेल्यास काही प्रमाणात आरोग्यसेवेला आणखी उठाव येईल, अशी रास्त अपेक्षा नाशिककर बाळगून आहेत. येथील युनिट अन् इन्फ्रास्ट्रक्चर जमेस धरल्यास येेेथे सरकारी मेडिकल कॉलेज उभारणे अशक्य नाही, असे मतही डॉ. श्याम अष्टेकर यांनी ‘मटा’ शी बोलताना व्यक्त केले. (क्रमश:)
प्रस्ताव ‘पीजी’चा अन् गरज ‘युजी’ची
नाशिक शहर आणि परिसराच्या लोकसंख्येचा आलेख बघता सुमारे २५ लाखांच्या घरात ही लोकसंख्या आहे. तर जिल्ह्याचा आलेख सुमारे ७० लाखांच्या घरात जातो. आरोग्य सेवा पुरविण्यासाठी किमात एका तरी गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजची येथे आवश्यकता आहे. असे असूनही विद्यापीठाने पुन्हा एकदा ‘पीजी’ चाच प्रस्ताव पाठवला आहे. तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार या लोकसंख्येस गरज ‘युजी गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज’ची आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट