Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सुटकेनंतर जवान चंदू उद्या धुळ्यात येणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। धुळे

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून सुटका होऊन आपल्या मायदेशी परतलेला '३७ राष्ट्रीय रायफल्स'चा जवान चंदू चव्हाण तब्बल दीड महिन्यांनंतर म्हणजेच उद्या, शनिवारी धुळ्यातील आपल्या बोरविहिर या गावी येणार आहे. आपला चंदू गावी येणार हे समजताच त्याचे कुटुंबीय आणि गावकरी यांना एखादा सण असल्यासारखे वाटत आहे. त्यांनी जवान चंदूच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. जवान चंदू ज्या मार्गाने गावात प्रवेश करेल तो मार्ग रांगोळीने सुशोभित करण्यात येणार आहे. शिवाय त्याचे औक्षणही करण्यात येणार आहे.

याबरोबर, बोरविहिर गावच्या महिला मंडळींनी जवान चंदूच्या आवडीच्या जेवणाचा खास बेत देखील आखला आहे.

भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी जवान चंदू चव्हाण नजरचुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानाच गेला होता. चंदूला भारताच्या ताब्यात देण्यास पाकिस्तानने नकार दिला होता. भारताच्या प्रयत्नांनंतर अखेर २१ जानेवारी २०१७ या दिवशी पाकिस्तानने चंदूची सुटका केली होती.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करातील वरिष्ठ अधिकारी यांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. चंदूच्या सुटकेसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणारे डॉ. सुभाष भामरे काही कारणास्तव धुळ्यात येऊ शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चंदू चव्हाण आज धुळ्यात परतणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानच्या कचाट्यातून सुखरूप परतलेला धुळ्याचा जवान चंदू चव्हाण आज, शनिवारी धुळ्यात परतत आहे. चंदू गावी येतोय असे कळताच संपूर्ण खान्देशमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

चंदूला पाकिस्तानच्या सैन्याने पकडले असे कळताच मानसिक धक्का बसून त्याची आजी लिलाबाई यांचे निधन झाले. मात्र चंदू परत येणार की नाही याविषयी खात्री नसतानाही त्याचा भाऊ, आजोबा यांनी चंदूच आजीच्या अस्थींचे विसर्जन करेल असे ठरविले होते. त्यानुसार आता उद्या, रविवारी चंदूच्या हस्ते आजींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे, असे चंदूचा भाऊ भूषण चव्हाण याने सांगितले.

भारतीय सैन्यदलाच्या प्रयत्नांमुळे ३७, राष्ट्रीय रायफल्सचा जवान चंदू सुखरूप भारतात परतला. तब्बल नऊ महिन्यांनंतर तो शुक्रवारी सायंकाळी दिल्ली येथून विमानाने भाऊ भूषणसह इंदूर येथे आणि तेथून कारने बोरविहीर गावी परतणार आहे. आज दुपारपर्यंत चंदू धुळ्यात पोहोचेल. त्यानंतर गावामध्ये त्याची मिरवणूकही काढण्यात येणार आहे.‍

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात परतताच चंदूच्या भावनांचा बांध फुटला

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। धुळे

पाकिस्तानच्या तावडीतून सहिसलामत सुटलेला '३६ राष्ट्रीय रायफल्स'चा जवान चंदू चव्हाण याने आपल्या धुळ्यातील बोरविहीर या गावी आज तब्बल नऊ महिन्यांनी परतला. बोरविहीर गावच्या भूमीत पाऊल ठेवताच चंदूच्या भावनांचा बांध फुटला आणि चंदूला अश्रू अनावर झाले. चंदूला पाहताच चंदूच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या महिलांचे डोळेही पाणावले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे देखील चंदूसोबत होते.

धुळ्यात पोहोचताच चंदूचे जंगी स्वागत करण्यात आले. मात्र धुळ्यात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम चंदूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन केले आणि त्यानंतर तो बोरविहीर या आपल्या मूळ गावी रवाना झाला. बोरविहीर गावात पोहोचताच चंदूला आपल्या दिवंगत आजीची आठवण झाली. चंदूला पाकिस्तानने ताब्यात ठेवल्याचे कळताच चंदूच्या आजीचे धक्क्याने निधन झाले होते. जो पर्यंत चंदू परतत नाही, तो पर्यंत आजीच्या अस्थींचे विसर्जन करणार नाही असे चंदूच्या भावाने म्हटले होते.

सर्जिकल स्ट्राइकनंतर २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी चंदू नजरचुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. भारताच्या प्रयत्नांनंतर अखेर २१ जानेवारी २०१७ या दिवशी पाकिस्तानने चंदूची सुटका केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा देशसेवेसाठी राहीन तत्पर

$
0
0

पाकिस्तानातून सुखरूप परतलेल्या चंदूचा विश्वास; बोरविहीर ग्रामस्थांचा जल्लोष

म. टा. वृत्तसेवा, धुळे

‘माझी पाकिस्तानातून सुटका करण्यासाठी देशातील सैन्य दलासह, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे मोठे योगदान आहे. मात्र मी देशाच्या रक्षणासाठी पुन्हा तयार आहे. लवकरच सैन्याच्या सेवेत हजर होऊन पुन्हा देशसेवेसाठी तत्पर राहील’, अशी प्रतिक्रिया चंदू चव्हाण यांनी धुळे तालुक्यातील बोरविहीर गावी त्याच्या घरी परतल्यानंतर दिली.

पाकिस्तानातून सुखरूप सुटका झालेला भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण याचे शनिवारी (दि. ११) दुपारी साडेबारा वाजता धुळे शहरातील मालेगाव रोडनजीक शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आगमन झाले. त्याच्यासोबत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे होते. डॉ. भामरे यांनी जवान चंदू चव्हाणची सुटका करून नातेवाईकांसह जिल्हावासीयांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली. चंदू गावी येणार म्हणून गावातील तरुणांसह महिला, ज्येष्ठ नागरिकांनी बोरविहीर गावाच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी केली होती. गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन चंदूला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी चंदूच्या गावी येथे डॉ. भामरे व चंदूचे औक्षण करण्यासाठी महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवान चंदू हा धुळे शहरात दाखल झल्यानंतर त्याठिकाणी भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, गोपाळ केले, अरविंद जाधव, संजय बोरसे आणि धुळे शहरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे स्वागत केले.

आपण चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांना दिलेला शब्द पाळला असून, त्याची पाकिस्तानच्या ताब्यातून सुखरूप सुटका करून घरी परत आणण्यात यश मिळवले आहे.

डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळेः रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । धुळे

दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धिंगाणा घातल्याचा प्रकार धुळ्यात घडला आहे. त्यांच्या मारहाणीत डॉक्टर रोहन मामूनकर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्यानं, त्या फूटेजच्या आधारे पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.

शत्रुघ्न शिवाजी लष्कर हा २० वर्षांचा तरुण दुचाकी अपघातात जखमी झाला होता. त्याला धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पण तो वाचू शकला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय बिथरले आणि त्यांनी या मृत्यूचं खापर डॉक्टरांवर फोडत हॉस्पिटलमध्ये धुडगूस घातला. ऑपरेशन थिएटरमध्ये तोडफोड करत त्यांनी डॉक्टरांनाही धक्काबुक्की केली. त्यात डॉ. रोहन मामूनकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.


या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन डॉक्टरांनी मारहाण करणाऱ्यांना अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, दहशत निर्माण करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे तसेच डॉक्टरांवरील हल्ला प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पोलिसांनी २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी नऊ जणांची रवानगी १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.


मारहाणीच्या घटनेनंतर स्थानिक डॉक्टरांनी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला आहे. या मारहाणीचे पडसाद राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये उमटू लागलेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरला अमानुष मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मोटारसायकल अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला म्हणूनसंतप्त झालेल्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील निवासी डॉक्टर रोहन मामुनकर यांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या नातेवाईकांनी रुग्णालयातील पलंग, खुर्च्यांसह इतर साहित्याची मोडतोडही केली असून, याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्यातील एका संशयित आरोपीने मंगळवारी पोलिस कोठडीतच आत्महत्या केल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.

चैत्राम उर्फ राजू शिवाजी लष्कर (वय २१, रा. चक्करबर्डी परिसर धुळे) हा तरुण रविवारी मोटारसायकलवरून जात असताना, मोटारसायकल घसरून गंभीर जखमी झाला. होता. त्यावेळी त्याला तत्काळ जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सिटीस्कॅननंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला न्युरोतज्ज्ञांकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र, जिल्हा रुग्णालयात न्युरोतज्ज्ञ नसल्याने जखमी तरुणाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यादरम्यान राजू लष्कर याचा मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालयात न्युरोतज्ज्ञ नसल्याच्या रागातून राजूच्या नातेवाईकांनी निवासी डॉ. रोहन मामुनकर यांना बेदम मारहाण केली. तसेच रुग्णालयातील पलंग, खुर्च्यांसह इतर साहित्याचीही तोडफोड केली.

संशयित आरोपीची कोठडीत आत्महत्या

डॉक्टरावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्यांपैकी प्रदीप वेताळ याने मंगळवारी, शहर पोलिस ठाण्यातील कोठडीतील शौचालयाच्या खिडकीला चादर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे प्रदीपचे संतप्त नातेवाईक व इतरांनीही शहर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडार समाजाचे प्रशासनाला निवेदन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात रविवारी (दि. १२) निवासी डॉक्टर रोहन म्हामूनकर यांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणाला संशयित आरोपीच्या आत्महत्येने नवीन वळण मिळाले आहे. पोलिस ठाण्यातच आत्महत्या केलेला संशयित प्रदीप वेताळ आणि चैत्राम शिवाजी लष्कर या दोघांच्या मृत्यूने वडार समाज संप्तत झाला आहे. या दोन्ही घटनांना डॉ. रोहन म्हामूनकर हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत बुधवारी (दि. १५) वडार समाजाकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

शहरातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील सर्वोपचार रुग्णालयातील अपघात विभागात रविवारी, रात्री निवासी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रोहन म्हामूनकर यांना जमावाने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात वडार समाजातील २५ जणांवर गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली होती. अटक केलेल्यांपैकी प्रदीप सदाशिव वेताळ या तरुणाने मंगळवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात पोलिस कोठडीत आत्महत्या केली. या घटनेनंतर मृत प्रदीपच्या नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यात आंदोलन केले. दरम्यान, पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या सर्व घडामोडीनंतर वडार समाजातर्फे बुधवारी (दि. १५) सकाळी दोन्ही तरुणांच्या मृत्यूला डॉ. रोहन म्हामूनकर हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यात, डॉ. म्हामूनकर हे सर्वोपचार रुग्णालयात कामावर कार्यरत असताना, दारूच्या नशेत होते. त्यांनी उपचार करण्यास नकार दिला होता. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करा, असे सांगण्यात आले. त्यामुळे तरुणावर उपचार न झाल्याने संप्तत झालेल्या नातेवाईकांनी डॉ. म्हामूनकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, हा सर्व प्रकार झाल्यानंतर प्रदीप वेताळसह सर्वांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. प्रदीप हा सुशिक्षित तरुण होता. परंतु, पोलिसांनी त्याला अटक केल्याने तो घाबरला आणि निराश होऊन त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोपही वडार समाजाने केला आहे. या प्रकरणात डॉ. म्हामूनकर दोषी असून त्यांच्यावर ३०४ व ३०२ नुसार गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

कोट

पोलिस कोठडीत आत्महत्या केलेल्या प्रदीप वेताळ या तरुणाचे बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले आहे. प्रथमदर्शनी या अहवालानुसार गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून, शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करकण्यात आली आहे.

- दिवाणसिंग वसावे, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात डॉक्टरांचा मूकमोर्चा

$
0
0

जिल्हा प्रशासनाला दिले मागण्यांचे निवेदन

म. टा. वृत्तसेवा, धुळे


धुळे शहरासह जिल्ह्यातील डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले होत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात सुरक्षारक्षक आणि विशेष बंदोबस्त कायमस्वरुपी तैनात करावा, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशने बुधवारी शहरातून मूकमोर्चा काढला. तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यात डॉक्टरांवरील हल्ल्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्या, या घटनेत विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर झालेली कारवाई रद्द करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

जिल्हा रुग्णालयाच्या तातडीच्या सेवा मूकमोर्चाच्या काळात सुरू होत्या, तर उर्वरित सुविधा बंद ठेवून पुन्हा सुरू करण्यात आल्या. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने ठोस उपाय योजना कराव्या, वैद्यकीय महाविद्यालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवावी, या घटनेत महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी ज्यांच्यावर कारवाई झाली ती रद्द करण्यात यावी, यासारख्या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

यावेळी ‘आयएमए’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, ‘महाराष्ट्र आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, डॉ. पार्थिव संघवी, डॉ. मंगेश पाटे, डॉ. निसार शेख, डॉ. विजया माळी, डॉ. सविता नाईक, डॉ. गिरीश मोदी यांच्यासह सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोस्टमनचे धरणे आंदोलन

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस येथील डाक कर्मचारी व पोस्टमन यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी आखिल भारतीय डाक कर्मचारी पोस्टमन संघटना वर्ग-४ आणि ऑल इंडिया पोस्टल एम्प्लाईज युनियन पोस्टमन व ग्रूप-डी आणि आखिल भारतीय डाक कर्मचारी संघटना वर्ग-३ यांच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन मुख्य पोस्ट ऑफिसबाहेर करण्यात आले.

यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यानुसार, आऊट सोर्सींग पोस्टल एजंट योजना करा करण्यात यावी, पोस्टमन व एमटीएसच्या जागा त्वरित भरण्यात याव्यात, नोडल वितरण व्यवस्थेबाबत संघटेशी चर्चा करून बदल करावा, नवीन भरती होईपर्यत रोजंदारी कर्मचारी लावण्यावरील निर्बंध उठविण्यात यावे, रविवार व सुटीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना कामावर बोलविणे थांबविण्यात यावे, कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळोवेळी बैठका घेवून त्यातील निर्णयाची अंमलबजावणी करावी.

यासह विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे आर.ए. पाटील, डी.एल. पाटील, डी.ए. सैंदाणे. पी.के. जोशी. ए.बी. बागूल, एस.आर. पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना जिल्हाप्रमुखाच्या गाडीची तोडफोड

$
0
0

धुळ्यातील प्रकार; तक्रार दाखल

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या महिंन्द्रा बोलेरो गाडीवर रविवारी (दि. १९) रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दगड मारून काच फोडल्याचा प्रकार घडला आहे. हे राजकीय विरोधकांनी केले असून माझ्या कामांवरून मला विचलित केले जात आहे, असा आरोप हिलाल माळी यांनी केला आहे. शिवसेना पक्षात असलेले शिवसैनिक खचून जात नाही. मात्र पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माळी यांनी बोलताना केली. याप्रकरणी माळी यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

शहरातील जुने धुळे भागात राहत असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या महिंन्द्रा बोलेरो क्रमांक (एमएच १८ एजी - ९००९) या गाडीचा मागील काच रविवारी, मध्यरात्री दोनच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी दगड मारून फोडला. काच फुटल्याच्या आवाजाने नागरिक जागे झाले असता त्यांना दुचाकीवर दोनजण जाताना दिसून आले. मात्र नेमके कोण होते ते मात्र समजू शकले नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना असे प्रकार विरोध केल्याशिवाय राहत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून विरोध जाणीवपूर्वक त्रास देत आहेत, असे हिलाल माळी म्हणाले. परंतु, हे प्रकार यापुढे पुन्हा घडले तर यावर काहीतरी उपाय शोधल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक टन फुलांनी होणार इस्कॉन मंदिरात अभिषेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पौर्णिमा बसस्टॉपजवळ असलेल्या इस्कॉन मंदिराला सहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक टन पुष्पांनी राधामदन गोपालजींच्या मूर्तींना अभिषेक घालण्यात येणार आहे. यावेळी दोन दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये ‘हरे कृष्ण’ संस्थेच्या कार्याला १९९६ साली सुरुवात झाली. या संस्थेच्या कार्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून, एक हजाराहून अधिक भक्त या संस्थेस जोडले गेले आहेत. २३ मार्च रोजी श्री श्री राधा मदनगोपालजींच्या प्राणप्रतिष्ठेला सहा वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मूर्तिला पुष्पाभिषेक करण्यात येणार असून, हा महोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. इस्कॉन मुंबईचे मंदिर अध्यक्ष श्रीमान गौरांग प्रभू या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाला सकाळी ५ वाजता मंगल आरतीपासून सुरुवात होणार असून, त्यानंतर ‘हरे कृष्ण’ महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद भागवत प्रवचन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता मूर्तिंचा पंचामृताने अभिषेक करण्यात येईल व त्यानंतर श्रीमान गौरांग प्रभूंचे प्रवचन असेल. यावर्षी १००० किलो पुष्पांच्या पाकळ्यांनी श्री श्री राधा मदनगोपालजींच्या विग्रहांचे अभिषेक करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदारांच्या अंगणात वाजणार ढोल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

येथील नगर परिषद प्रशासनाने विविध कर थकविणाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या मालमत्ता सील केल्यानंतर थकबाकीदारांच्या नावांच्या यादीचे होर्डिंग शहरातील विविध चौकात लावण्यात आले आहे. त्यामुळे थकबाकीदार नरमले असून, अनेकांनी नगरपरिषदेच्या वसुली विभागाकडे भरणा करण्यासाठी धाव घेतली आहे. दरम्यान,

काही थकबाकीदार अजूनही बाकी भरण्यास तयार नसल्याने स्थानिक प्रशासनाने आता अशांच्या घरांसमोर ढोलताशे वाजविण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच काही थकबाकीदारांचे नळ कनेक्शनही तोडण्यात आले. यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून रांगा लावून थकबाकी भरली जात आहे. शहरात घरपट्टी, पाणीपट्टी व व्यापारी संकूल तसेच प्लॉट धारकांकडे विविध प्रकारच्या करांची थकबाकी आहे. वसुलीसाठी पालिकेच्या वतीने वारंवार तगादा लावूनही थकबाकीदार दादच देत नसल्याच्या वर्षानुवर्षाचा पुर्वानुभव आहे. त्यामुळे शासननिर्देशानुसारच करवसुलीसाठी पालिकेने यावर्षी अधिक सक्तीने कार्यवाही सुरू केली आहे.

पालिका मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी अधिकारी, कर्मचारी वर्गासह प्रसंगी पोलिस बंदोबस्त सोबत घेऊन धडक वसुली सुरू केली आहे. प्रारंभी नोट‌िसा बजावून नळ कनेक्शन कट करण्यात आले. त्यानंतर मालमत्ता सील करण्यात आल्या. अखेर थकबाकीदारांच्या नावांचे होर्डिंग शहरातील मुख्य चौकात लावण्यात आले आहेत. यावरील नावे पाहताच अनेकांनी बाकी भरली. सटाणा पालिकेने अचानक व अनपेक्षितपणे हे पाऊल उचल्यामुळे थकबाकीदार चांगलेच धास्तावले असून, कर वसुलीस चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे थकबाकी वसुलीत हयगय न करता अधिकाधिक प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी अनुभवला कांदा लिलाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीस अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्रा. अलेक्स टँबॉरॉक, प्रा. मोनिका टँबॉरॉक, मॅक्सवेल टँबॉरॉक यांनी भेट दिली. त्यांनी लासलगाव येथे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्याकडून भारतातील व विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे प्रकार व लागवड, खर्च, सध्याचे बाजारभाव या संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.

बाजार समितीत प्रत्यक्ष लिलाव पद्धती व कांदा खरेदी विक्री विषायांवर शेतकरी व व्यापारी वर्गासोबत संवाद साधला. वॉशिंग्टन येथील नामवंत विद्यापीठमधील अर्थशास्त्रज्ज्ञ प्रा. अलेक्स टँबॉरॉक हे भारतीय कांद्याविषयी विशेष माहिती घेण्यासाठी आले होते. यावेळी शंतनू पाटील यांनी त्याचे स्वागत व सत्कार केला. टँबॉरॉक यांनी सांगितले की, आशियातील सर्वात मोठ्या कांद्याच्या बाजारपेठेत कांद्याची खरेदी विक्री व कांदा लागवड करणाऱ्या शेतकरी वर्गाची माह‌िती व त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या. तसेच प्रत्यक्ष कांदा लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन कांदा या पिकाची महिती मिळाली. या विषयावर अमेरिकेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​आरोग्य विभागाला अल्टिमेटम!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाढती अस्वच्छता, स्वाइन फ्लूचा फैलाव, डेंग्यू तसेच डासांचा वाढता प्रादूर्भाव आणि घंटागाड्यांची अनियमितता याबद्दल महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य विभागाला थेट जबाबदार धरले आहे. आरोग्य विभागाचे कामकाज असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवत या विभागाला कारभार सुधारण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. महापालिकेचे सफाई कर्मचारी कामच करीत नसल्याचे सांगत, कर्मचाऱ्यांचे प्रभागनिहाय फेरनियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

शहरातील आरोग्य व स्वच्छतेच्या प्रश्नावर महापौर भानसी यांनी बुधवारी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर, आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकांटेसह अधिकारी या वेळी उपस्थित होते. या बैठकीत महापौरांनी पहिल्याच दिवशी आरोग्य विभागाच्या कामकाजाचे वाभाडे काढले. शहरात अस्वच्छतेचे प्रमाण जास्त असल्याने साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच स्वाइन फ्लूचा फैलाव जोमाने होत आहे. मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांचाही प्रादूर्भाव वाढत आहे. घंटागाड्या अनियमितपणे धावत असताना आरोग्य विभागाचे यावर नियंत्रण नसल्याचा ठपका महापौरांनी ठेवला.

पालिकेतच अस्वच्छता

अस्वच्छतेबाबतच्या आरोपांना नकार देणाऱ्या डॉ. डेकाटे यांना महापौरांनी पालिकेच्या शौचालयांमध्येच आरसा दाखवला. बैठक सुरू असतानाच त्यांनी महापौर कार्यालयाबाहेर असलेल्या महिलांच्या स्वच्छतागृहात अधिकाऱ्यांना नेले. तेथील अस्वच्छतेची जाणीव आरोग्याधिकाऱ्यांना करून देत परिस्थितीची जाणीव करून दिली. तसेच या ठिकाणीच अशी अवस्था असेल शहराची स्थिती काय असेल, असा सवाल त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परखड राजकीय भाष्यकार हरपला!

$
0
0

टीम मटा, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंद तळवळकर यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने सामाजिक विचारांची बैठक असलेला परखड राजकीय भाष्यकार हरपल्याची प्र‍‌तिक्रिया नाशिकमधून उमटली. तळवळकरांचे अग्रलेख वाचणे म्हणजे स्वत: समृद्ध होत असल्याची अनुभूती मिळत असल्याचे मत नाशिककरांनी व्यक्त केले.

विलक्षण व्यक्तिमत्व

अत्यंत व्यासंगी, स्पष्टवक्ता आणि ग्रंथ दुनियेत तल्लीन असलेली व्यक्ती अशी गोविंद तळवळकर यांची ओळख होती. सर्वच क्षेत्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. एखाद्या घडामोडीचा इतिहास, निरीक्षण आणि अभ्यास हे विलक्षणच होते. जनमानसाचा वेध त्यांना घेता येत होता. मितभाषी स्वभाव आणि दिलदार असेही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू होते.
- हेमंत टकले, आमदार

प्रकाशमान संपादक

सर्वसामान्य माणसाला गोविंदराव म्हणजे कोडे वाटायचे. दिसायला गंभीर, बोलायला तोलूनमापून. कार्यालयात अभ्यागतांच्या वाट्याला फक्त नमस्कार-चमत्कार आणि मोजके दोनचार मिनिटे. त्यांच्या यशस्वी आणि उत्तुंग संपादकीय कारकिर्दीचा तो भरभक्कम पाया होता. वाचन दांडगे. त्यावर अव्याहत विचार. राजकीय-सामाजिक गुंतागुंत उकलण्यात त्यांचा हातखंडा. त्यांचे ‘संपादकीय’ म्हणजे ‘समाज प्रबोधन’ असायचे. त्यांची लेखणीच त्यांच्यावतीने बोलायची. वाचकांवर अधिराज्य गाजवायची! प्रत्यक्षात कमीत कमी दिसणारे ते प्रकाशमान संपादक होते.
- दत्ता सराफ, ज्येष्ठ पत्रकार

पत्रकारितेतील दीपस्तंभ

१९६८ ते १९९६ दरम्यान दरम्यान तळवळकरांनी अत्यंत कठीण असणारे विषय सोपे करून ते आपल्या लेखांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहचवत असत, आपल्या पत्रकारितेच्या काळात त्यांनी विविध सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर केलेले लिखाण हे पत्रकारांना निश्चित मार्गदर्शक होते. पत्रकारितेतील दीपस्तंभासमान कार्य आहे. अशा ज्ञानवंतांच्या आपल्यातून जाण्याने पत्रकार सृष्टीला मोठा धक्काच बसला आहे.
- पां. भा. करंजकर, ज्येष्ठ पत्रकार

प्रशंसनीय पत्रकारिता

गोविंदराव यांचे नाशिकशी स्नेहाचे नाते होते. साहित्यिक वि. वा. शिरवाडकरांवरील प्रेमापोटी ते नाशिकला आले. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांची पत्रकारिता प्रशंसनीय होती. त्यांच्या पत्रकारितेमुळे मटा सुखावला अन् बहरलाही. त्यांच्या जाण्याने पत्रकारितेतील आजच्या पिढीची मोठी हानी झाली आहे.
- मधुकर झेंडे, माजी अध्यक्ष, सावाना

अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व

मी पाहिलेल्या संपादकांमध्ये प्रकांड पंडितांची परंपरा गोविंदरावांच्या जाण्याने खंडीत झाली आहे. ही परंपरा त्यांच्यापर्यंत येऊन थांबली. देशांतर्गत व देशाबाहेरील विषयांवर त्यांचा किती बारकाईने अभ्यास होता हे त्यांच्या अग्रलेखांतून स्पष्ट होते. भारतीयांना स्वतःबद्दल व स्वतःच्या देशाबद्दल किती माहिती आहे हेदेखील त्यांच्या अग्रलेखांतून जनतेपुढे आले.
- देवकिसन सारडा, उद्योगपती

व्यासंगी, साक्षेपी संपादक

व्यासंगी आणि साक्षेपी संपादक म्हणून तळवलकर यांनी उभ्या महाराष्ट्रात आदरयुक्त दरारा निर्माण केला होता. विचार आणि अग्रलेखांचे चालते बोलते स्कूल तळवलकर होते. या महाराष्ट्राच्या एका पिढीची वैचारिक जडण घडण त्यांच्या अग्रलेखांवर झाली. त्यांच्या व्यासंगाला कुठल्याही क्षेत्राचा अटकाव नव्हता. १९६५ ते १९९५ या काळात ‘मटा’ची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांचे योगदान अतुलनीय राहिले. विशेष म्हणजे त्यांचे मत विचारात घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील महत्त्वाचे निर्णय, घटना घडल्या नाहीत. अफाट व्यासंगामुळे अखेरपर्यंत त्यांच्या मताचा सर्वत्र आदर झाला.
- प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, साहित्यिक

सव्यसाची संपादक

आपल्या ग्रंथसंपदेवर पोटच्या अपत्यांइतकेच प्रेम करणारा, समाजमनावर ६५ वर्षे अधिराज्य गाजविणारा सव्यसाची संपादक, लेखक, विचारवंत आणि अनेक घटनांचा साक्षीदार शांत झाला. अगदी अलिकडील मराठा आंदोलनाबाबतच नव्हे तर मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल इस्पितळात असतानाही ते सजग आणि सडेतोड होते. विचारांतील कमालीची शुध्दता, काळाचेच नव्हे तर त्या पलिकडचेही भान त्यांना होते.
- प्रमोद भार्गवे, कार्यवाह, शंकराचार्य न्यास

समाज कल्याणकारी विचारवंत
अभ्यासू पिंड, भाषेवरील पकड, अफाट व्यासंग, सुसंस्कृत पण तत्वनिष्ठ भूमिका, प्रखर सामाजिक भान यामुळे तळवलकरांनी लोकमान्य टिळकांची परखड पत्रकारितेची पालखी समर्थपणे खूप पुढे आणली. पत्रकारितेतून सामाजिक कल्याणाचा विचार सातत्याने मांडणारे गोविंद तळवलकर हे खऱ्या अर्थाने सव्यसाची पत्रकार होते. त्यांचे लेखन आणि त्यांची ग्रंथसंपदा पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या सर्वांना मार्गदर्शक आहेत.
- प्रा. कमलाकर देसले, साहित्यिक

लिखाणातून पिढी घडविली

महाराष्ट्र टाइम्सचे संपादक तब्बल २८ वर्षे काम केल्यामुळे आमची पिढी त्यांचे अग्रलेख वाचून घडली. ‘मटा’चा अग्रलेख वाचणे व त्यावर चर्चा करणे हे नेहमीच असायचे. तळवलकर यांच्या लिखाणामुळे आमची पिढी बौद्धिकदृष्ट्या संपन्न झाले. त्यांचे सखोल लिखाण राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करण्याबरोबरच समाजाला दिशा देणारे असायचे.
- प्रकाश होळकर, कवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्या दो​न सदस्यांची माकपमधून हकालपट्टी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत पक्ष निर्णयाविरोधात मतदान करणाऱ्या दोन सदस्यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हकालपट्टी केली आहे. सुरगाणा तालुक्यातील गोंदूण गटातून निवडून आलेल्या ज्योती जाधव व भावाडा गटातून निवडून आलेल्या अनिता बोडके यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. पण तीन सदस्यांपैकी दोघांनी शिवसेना व काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान केल्याने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती माकपचे जिल्हा सेक्रेटरी सुनील मालुसरे यांनी दिली.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माकप किंगमेकर ठरला होता. पण त्यानंतर दोन तासांतच माकपचे आमदार जिवा पांडू गावित यांनी दोन सदस्यांवर कारवाई करण्यास सांगितलेे. त्यानुसार बुधवारी कारवाई करण्यात आली. हकालपट्टी झाली असली तरी दोघांचेही सभासदत्व मात्र कायम राहील असे बोलले जात आहे. या निवडणुकीत माकपचे गटनेते रमेश बरफ हे तटस्थ राहिले. पक्षाचा व्हीप असूनही दोन सदस्यांनी अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवार शीतल सांगळे व उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या नयना गावित यांना मतदान केले.

शिवसेना व काँग्रेस आघाडीकडे ३३ मते होती. त्यांना एका अपक्षाने पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ ३४ झाले होते. माकपचे दोन व माकप समर्थक एका सदस्याने पाठिंबा दिल्याने ३७ हा जादुई आकडा पार केला गेला. माकप तटस्थ राहिला असता तर राष्ट्रवादी व भाजपलाच फायदा झाला असता. या पक्षांकडे ३५ संख्या होती. माकपची भूमिका कोणाच्या फायद्याची होती की त्यात राजकीय खेळी होती याबाबत संभ्रम कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​भाजपचा नामकरण अजेंडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सबका साथ, सबका विकास अशी घोषणा देत महापालिकेत सत्ता संपादन करणाऱ्या भाजपने विकासाऐवजी प्रथम नामकरणाचा अजेंडा राबविण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या मनोगत पाक्षिकाचे समन्वयक रवींद्र अमृतकर यांनी महापालिका संकुलाचे ‘पंडित दीनदयाळ संकुल’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव महापौरांना दिला आहे. महापौर निवासस्थान व राजीव गांधी भवनला एकत्रितपणे हे नाव दिले जाणार आहे. या नामकरणावरून भाजप आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत.

सध्या भाजपेयींकडून देशभरात ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देण्यात येतो आहे. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या संस्थांमध्ये प्रवेश करून त्यांच्यावर आपला शिक्का उमटविण्याचे काम या भाजपकडून सुरू आहे. खादी ग्रामोद्योग मंत्रालयाने चरख्यावरून महात्मा गांधी यांना हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदींची तसबीर लावून भाजपने मोठा वाद ओढवून घेतला होता. केंद्र व राज्यातील योजनांचेही जोमात नामकरण केले जात आहे. नाशिकमध्ये रवींद्र अमृतकर यांनी महापौर, पालकमंत्री, आमदारांना पत्र लिहून नामकरणाचा प्रस्ताव दिला आहे. दीनदयाळ उपाध्याय यांनी आपले आयुष्य समाजातील शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी उन्नतीसाठी समर्पित केले. त्यामुळे महापालिका संकुलाला त्यांचे नाव द्यावे असे पत्रात म्हटले आहे. सर्वसामान्य नाशिककर आणि बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांचा गोंधळ टाळण्यासाठी, पत्त्याची अडचण टाळण्यासाठी पुढील सूचनेचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक वाटत असल्याचे अमृतकर यांनी म्हटले आहे. राजीव गांधी भवन व रामायण बंगला या दोन्ही वास्तूंचे स्वतंत्र अस्तित्व असले तरी त्या एकाच आवारात, एकाच कुंपणात आहेत. त्यामुळे त्यांची ओळख स्वतंत्र नावाने असण्याऐवजी एकाच नावाने असावी, असे कारण देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​रामायण सर्किट’मध्ये नाशिकचा समावेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

प्रभू रामचंद्रांचा संपूर्ण देशात ज्या ज्या ठिकाणी अस्तित्वाचा इतिहास असेल, अशी ठिकाणे धार्मिकदृष्ट्या केंद्रीय पर्यटन विभागाने स्वदेश योजनेंतर्गत विकसित करण्याचे ठरवले आहे. यामुळे नाशिकमधील रामकुंड, पंचवटी, टाकेद परिसराचा विकास होऊन नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.

रामायणच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांच्या इतिहासाची ओळख सर्वांनाच झालेली आहे. भारतातील त्यांच्या वास्तव्याचा इतिहास आता रामायण सर्किटमार्फत उजळविण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्या, नंदिग्राम, श्रींग्वेरपूर, चित्रकूट तसेच बिहारमधील सीतामढी, बक्सर, दरभंगा तसेच मध्य प्रदेशमधील चित्रकूट, ओडिशामधील महेंद्रगिरी, छत्तीसगडमधील जगदलपूर, महाराष्ट्रातील नाशिक व नागपूर, तेलंगणमधील भद्रचालम, कर्नाटकमधील हम्पी, तामिळनाडूतील रामेश्वरम या ठिकाणांची निवड झाली आहे.

या सर्किटमुळे धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून अधिक भाविक-भक्त सहभागी होतील व पर्यटनाला चालना मिळेल. यासाठी नाशिक व नागपूरसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्रीय पर्यटन विभागाने मागवला आहे. हा अहवान नॅशनल स्टिरिंग कमेटीकडे सादर केला जाईल. त्या समितेचे चेअरमन पर्यटनमंत्री असणार आहेत. त्या मंजुरीनंतर केंद्रीय मंजुरी व देखरेख कमेटीकडे अहवाल सादर करून त्यास मंजुरी दिली जाईल. त्या समितीचे चेअरमन पर्यटन विभागाचे सचिव असतील.

स्वदेश योजनेच्या माध्यमातून रामकुंड, टाकेद, पंचवटी परिसराचा विकास होऊन नाशिकच्या पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालव्याचे झाले डबके

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गंगापूर धरणाचा डावा कालवा नाशिक शहराच्या पंचवटीतील फुलेनगरजवळून जातो. सध्या या कालव्यात धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आलेले नाही. तरी या कालव्यात फुलेनगरच्या जवळच्या भागात पाणी साचून राहिलेले आहे. या साचलेल्या पाण्यातच कचरा टाकण्यात येत असल्याने या पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. तसेच साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वाढू लागल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याकडे तातडीने लक्ष देत सफाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

फुलेनगरची वस्ती या कालव्याच्या दोन्ही बाजूने पसरली आहे. अत्यंत दाट असलेल्या या वस्तीतून वाहणाऱ्या डाव्या कालव्याचा दक्षिणेकडील रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. अगदी कालव्याच्यालगत झोपड्या झालेल्या आहेत. या झोपडपट्टीच्या भागातील कचरा थेट कालव्यात टाकला जात आहे. कालव्याच्या साफसफाईच्या वेळी जेसीबीच्या सहाय्याने येथील कचरा काढून बाहेरच्या बाजूला टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरी सर्वत्र कचराच कचरा दिसतच आहे. कालव्यात कचऱ्यामुळे पाणी साचून राहते. या साचलेल्या पाण्यावर शेवाळ तयार झालेले आहे. काळपट रंगाच्या या पाण्याची दुर्गंधी पसरल्यामुळे या भागातून जाताना त्रास होतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत असून, तो लवकर दूर व्हावा, याची मागणी केली जात आहे.

कचराही कालव्यातच

झोपडपट्टी भागातील कचरा गोळा करून तो घंटागाडीत टाकण्याची सुविधा येथे नाही. येथील अरुंद रस्त्याच्या ठिकाणी घंटागाडी पोहचू शकत नसल्याने साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाटही कालव्यातच केली जाते. त्यामुळे कालव्यात पाणी आणि कचरा साचून राहतो. कालव्याला आवर्तन सोडण्यात आल्यानंतर हा कचरा वाहून जातो. पुन्हा आवर्तन बंद झाल्यावर कचरा साचण्याचे प्रमाण वाढते. पेठ रोडने जाताना पूलावरून हा कालव्यात साचलेला कचरा सहज नजरेस पडतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू

$
0
0

कामटवाडे रस्त्याची समस्या सुटली

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक महापालिकेने शेवटच्या टप्प्यात शहरातील सर्वच रस्त्यांची कामे जोमाने हाती घेतली होती. यात नवीन नाशिक सिडकोतील त्रिमूर्ती चौक ते कामटवाडे पर्यंतचा रस्ता रुंदीकरणासाठी साइडपट्ट्या खोदण्यात आल्या होत्या. याबाबत ‘मटा’ने ‘साइडपट्ट्या खोदून ठेकेदार झाला गायब’ या आशयाखाली बुधवारी (दि. २२) वृत्त प्रसारित केले होते. महापालिकेतील बांधकाम विभागाची यंत्रणा तातडीने जागी होत साइडपट्ट्यांचे काम जोमाने हाती घेतले आहे.

महापालिकेने शहरातील सर्वच रस्त्यांची कामे मंजूर करत तब्बल १९२ कोटींचा निधी मंजूर केला होता. यात शहरातील अनेक रस्त्यांची कामे महापालिकेने केली होती. परंतु, काही रस्त्यांची कामे आजही सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यातच त्रिमूर्ती चौक ते कामटवाडे रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रुंदीकरणासाठी साइडपट्ट्या खोदून ठेवल्या होत्या. यात पाच महिने उलटूनही खोदलेल्या साइडपट्ट्यांचे काम ठेकेदाराने हाती घेतले नव्हते. त्याचा वाहनचालक व रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. खोदून

ठेवलेल्या साइडपट्ट्यांमुळे शाळा, कॉलेजेसचे विद्यार्थ्यांसह अनेक व्यावसायिकांना त्रास सहन करण्याची वेळ आली होती.

काम तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश

‘मटा’ने या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर महापालिकेने तात्काळ रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. ‘मटा’च्या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या बांधकाम विभागाने ठेकेदारास खोदलेल्या साइडपट्ट्यांचे काम तत्काळ मार्गी लावण्याचे आदेशही दिले असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images