म. टा. प्रतिनिधी, नाशिक
‘‘आम्ही जमिनीचा मोबदला वाढवून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आलोच नाही. त्यांनी मंत्रिमहोदयांशी चर्चा करून पर्यायी तोडगा काढावा, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, जिल्हाधिकारी आपल्याच तोऱ्यात. आमच्या जमिनी बारमाही बागायती असून, त्या कदापि देणार नाही. आमच्या प्रत्येक कुटुंबातील एक माणूस आत्महत्या करण्यास तयार आहे. आमचे मुडदे पडले तरी चालतील; पण आईला वाचविल्याशिवाय आम्ही राहणार नाही...!’’ हा निर्धार आहे शिवडे येथील शेतकऱ्यांचा. समृद्धी महामार्गासाठी एक इंचही जमीन न देण्याचा पवित्रा त्यांनी स्वीकारला असून, त्यामुळे प्रशासनाकडून मोजणीची प्रक्रिया काही दिवस थांबविली जाण्याची शक्यता आहे.
समृद्धी महामार्गासाठी इगतपुरी तालुक्यात जमिनीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता सिन्नरमध्ये सर्वेक्षण करण्यात येत असून, त्यास शिवडे येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शिवडे येथील शेतकरी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. ते जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाजवळील सभागृहात येऊन बसले. प्रांताधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसीलदार मनोज खैरनार बैठकीला उपस्थित होते. मात्र, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. सुमारे अर्ध्या तासाने तेथे पोहोचले. प्रसिद्धिमाध्यमांनाही बैठकीला जाणीवपूर्वक बसू देण्यात आले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी समृद्धी मार्ग कसा फायदेशीर आहे, याची शेतकऱ्यांना माहिती दिली. मात्र, आम्ही जमीन देणारच नाही, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी मांडली. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत जिल्हाधिकारी नव्हते. कोणत्याही परिस्थितीत मोजणी होणारच, अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याने शेतकरी संतापले. प्रशासन विरुद्ध शेतकरी असा संघर्ष रंगला. या प्रकल्पासाठी जाणाऱ्या जमिनी बागायती असून शेतकरी भूमिहीन होतील. गावातून मार्ग न्यायचाच असेल तर अलाइन्मेंट बदलावी, असा प्रस्तावही शेतकऱ्यांनी दिला. मात्र, प्रशासन आपल्या अडेलतट्टू भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर संतप्त शेतकरी सभागृहातून बाहेर पडले. मोजणीसाठी अधिकाऱ्यांना गावात प्रवेश करू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. सामुदायिक आत्महत्येचा इशारा देऊन शेतकरी बैठकीतून बाहेर पडले. त्यामुळे हा प्रश्न चिघळण्याची शक्यता बळावली आहे.
मुख्यमंत्र्यांनी हा रस्ता जिरायती क्षेत्रातून नेणार असल्याचे पूर्वीच जाहीर केले आहे. आमच्या जमिनी बागायती आहेत. पोलिसांचा वापर करून शेतकऱ्यांना दमदाटी सुरू आहे. आंदोलन केले म्हणून पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. ओझर ते आडगाव चार वेळा फिरविले. रात्रभर उपाशी ठेवले. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो.
- उल्हास वाघ, ग्रामस्थ
दोन नेत्यांच्या हव्यासापोटी हजारो कुटुंबे उद््ध्वस्त करण्याचा सरकारचा डाव आहे. तो कदापि सहन केला जाणार नाही. भलेही आम्ही गोळ्या झेलू. मातेसाठी प्राण देऊ; पण जमिनी देणार नाही.
- दिलीप हारक
सरकार आणि अधिकारी ब्रिटिशांपेक्षा वाईट वागते आहे. नुकसानभरपाई काय देणार हेदेखील सांगत नाही. नोटीस लावली जात नाही. त्यामुळे मुंबईजवळ एक मोठे आंदोलन आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय सर्वेक्षण करू नये, अशी आमची मागणी आहे.
- विश्वनाथ पाटील
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट