Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जिल्ह्यात १२ टँकरद्वारे पाणीवाटप

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाच ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळाही जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील १७ गावे आणि चार वाड्यांवरील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी १२ टँकर धावत आहेत. बागलाण, सुरगाणा, मालेगाव आणि पेठ पाठोपाठ आता त्र्यंबकेश्वर, येवला आणि चांदवड तालुक्यांतही टँकरची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला तेथेही टँकर सुरू करावे लागणार आहेत.

गतवर्षी वरूणराजाने चांगली कृपादृष्टी केली. जुलैनंतर जोरदार पाऊस झाल्याने धरणे व तत्सम जलाशये भरण्यास मदत झाली. त्यामुळे मार्चपर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फारशी पाणी टंचाई जाणवली नाही. परंतु उन्हाचा तडाखा वाढू लागल्यामुळे ग्रामीण भागात रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. बागलाण तालुक्यात पाणी टंचाईची परिस्थिती बिकट बनली आहे. या तालुक्यातील १२ गावांना सध्या आठ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. दररोज येथे टँकरच्या ३६ फेऱ्या होत आहेत. त्याखालोखाल सुरगाणा तालुक्यात तीन गावे आणि दोन वाड्यांना एका टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. इगतपुरीत दोन वाड्यांना तर मालेगाव आणि पेठ तालुक्यात प्रत्येकी एका गावाला एका टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. २० गावे आणि काही वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असून तसा प्रस्ताव संबंधित तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला आहे. बागलाण व चांदवड तालुक्यातील प्रत्येकी दोन गावांत तर येवल्यातील एका गावातून टँकरच्या मागणीचा प्रस्ताव आला आहे. परंतु या प्रस्तावांवर अद्याप निर्णय

झालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कवींनी एकत्र येत ताकद वाढवावी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

जागतिकीकरणात विचार स्वातंत्र्याचा अंत झालेला आहे. विचार नामशेष करण्याचे षडयंत्र रचले जात असून, उदारमतवादाचे अवशेष शिल्लक राहणार नाही, अशी अवस्था आपण अनुभवत आहोत. अशा या विघटनाच्या प्रक्रियेत सर्व कवीकुळांनी एकत्र येऊन ताकद वाढवावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी केले.

परिवर्त परिवार, नाशिक यांच्यातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्ताने जागर समतेचा काव्य यात्रेचा समारोप, निमंत्रितांचे कविसंमेलन आणि उपक्रमशील आयोजकांचा सत्कार व कवी अरूण काळे स्मृती अजातशत्रू काव्य पुरस्काराच्या वितरण समारंभात त्या बोलत होत्या. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास कवी प्रकाश होळकर, अमोल बागूल, अविनाश गायकवाड, प्रा. गंगाधर अहिरे, करुणासागर पगारे, प्रा. जयश्री बागूल आदी उपस्थित होते. मुंबई विद्यापीठातील प्रा. सुनील अभिमान अवचार यांच्या ‘केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परिघ’ या काव्यसंग्रहाला अजातशत्रू काव्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे पाच हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे स्वरूप होते. देवेंद्र उबाळे यांनी प्रास्ताविक केले तर किशोर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रोहित गांगुर्डे यांनी मानपत्राचे वाचन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएममध्ये आठवडाभर जाणवणार खडखडाट

$
0
0

एटीएममध्ये आठवडाभर जाणवणार खडखडाट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात आणि जिल्ह्यात निर्माण झालेल्या चलन टंचाईवर तोडगा म्हणून मंगळवारी, १८ एप्रिल रोजी स्टेट बँकेला ६५ कोटींचे चलन मिळेल, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परंतु हे चलन बँकांमधील व्यवहारांसाठीच वापरण्याचे धोरण अवलंबिण्यात आल्याने एटीएममध्ये किमान आठवडाभर खडखडाट जाणवण्याची शक्यता आहे. केवळ गर्दीच्या मोजक्याच एटीएम केंद्रामध्येच नोटा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील ७० टक्के एटीएम बंद आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर स्टेट बँकेने रिझर्व्ह बँकेकडे सुमारे ३५० कोटी रुपयांची मागणी केली. परंतु रिझर्व्ह बँकेने केवळ ६५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी ही रोकड उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यापैकी ४० कोटी शहरासाठी तर २५ कोटी ग्रामीण शाखांसाठी देण्यात येणार आहेत. स्टेट बँकेकडे सद्यस्थितीत ३५ कोटी तर खासगी बँकांकडे ७० कोटी रूपये शिल्लक आहेत. रिझर्व्ह बँकेकडून नव्याने प्राप्त होणारे चलन केवळ बँकेतील व्यवहारांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचएएलची प्रवासी विमानसेवा

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशाच्या संरक्षणसिद्धतेत मानाचा तुरा रोवणाऱ्या हिंदूस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड (एचएएल) ने आता प्रवासी विमानांचे उत्पादनही सुरू केले आहे. येत्या १ मे रोजी दोन विमाने ओझर येथे दाखल होणार आहेत. याच विमानांद्वारे प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचे संकेत एचएएलचे महाव्यवस्थापक बी. व्ही. पी. शेखागिरीराव यांनी व्यक्त केला. याकरीता नाशिकहूनच सेवा सुरू करण्यासंदर्भात प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

कानपूर येथील कारखान्यात प्रायोगिक तत्वावर दोन प्रवासी विमान तयार केली आहेत. एक मे रोजी ही दोन्ही विमाने ओझर एचएएलकडे येणार आहेत. ही विमाने प्रवासीसेवा देणाऱ्या हवाई कंपन्यांना भाडेतत्वावर देण्यास आमचे प्राधान्य राहणार आहे. शिवाय एचएएलही विमानसेवा सुरू करण्याबाबत विचाराधीन आहे. याकरीता वरिष्ठांशी चर्चा करून नाशिकहून ही सेवा सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत. नाशिकहून मुंबई, पुणे ऐवजी नाशिक दिल्ली किंवा हैद्राबाद या मार्गांवर सेवा सुरू करण्याचा आमचे प्रयत्न राहणार आहेत, असे शेखागिरीराव यांनी सांगितले.

फ्लाईंग क्लब

मुंबई फ्लाईंग क्लबच्या धर्तीवर ओझर येथेही असा क्लब साकारण्याबाबत ओझर एचएएलमध्ये सोमवारी बैठक झाली. यावेळी मुंबई फ्लाईंग क्लबचे सदस्य फिरोज मसानी यांनी एचएएलच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.

आम्हाला स्वतःला सेवा सुरू करण्याबाबत काही परवानग्या मिळवाव्या लागतील. एचएएएलची स्वतःची दोन प्रवासी विमाने लवकरच धावपट्टीवर येणार आहेत. ही विमाने हवाई कंपन्यांना भाडेतत्वावर देणे किंवा स्वतः विमानसेवा सुरू करणे असे दोन पर्याय आहेत. यासाठी निमाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.

- शेशिगिरी राव, महाव्यवस्थापक, एचएएल, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘आपलं सरकार’वरील ८२ टक्के तक्रारींचे निरसन

$
0
0

‘आपलं सरकार’वरील ८२ टक्के तक्रारींचे निरसन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या आपले सरकार वेब पोर्टलवर प्राप्त १०२८ पैकी जिल्ह्यातील ८५६ तक्रारींचे जिल्हा प्रशासनाने निरसन केले आहे. ८२ टक्के तक्रारदारांनी या पोर्टलद्वारे केलेल्या तक्रारींचे निरसन झाल्याबद्दल समाधान व्यक्त केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. अजूनही १४९ तक्रारींचा निपटारा

होणे बाकी आहे.

कामे मार्गी लावताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विविध सरकारी कार्यालयांमधील सरकारी बाबूंकडून योग्य वागणूक न मिळाल्यास नागरिकांचा हिरमोड होतो. म्हणूनच सरकारने सेवा हमी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा आग्रह धरला आहे. नागरिकांना आपल्या तक्रारी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविता याव्यात यासाठी आपले सरकार वेब पोर्टलचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या वेब पोर्टलवर प्राप्त तक्रारी आणि त्याचा निपटारा याबाबतचा आढावा सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आला. मंत्रालयीन स्तरावरील अधिकारी सुदाम गवळी यांनी हा आढावा घेतला.

आतापर्यंत एक हजार २८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ८५६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. १४९ तक्रारींचा अद्याप निपटारा झालेला नाही. तर २३ तक्रारी प्राप्त होण्यास २१ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामध्ये महावितरणच्या १२, आदिवासी विकास महामंडळाशी संबंधित तीन, आदिवासी आयुक्तालय आणि वन विभागाशी संबंधित तक्रारींचा समावेश आहे.


शिक्षण समितीसाठी

५५ कोटींची तरतूद

नाशिक :महापालिकेने शिक्षण समितीच्या बजेटमध्ये तब्बल दहा कोटीची वाढ केली असून, शिक्षण समितीचे २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे बजेट हे ५५ कोटीपर्यंत पोहचले आहे. गेल्या वर्षी शिक्षण समितीच्या बजेट हे ४५ कोटी ६६ लाख एवढे होते. चालू वर्षात त्यात तब्बल दहा टक्के वाढ करण्यात आली आहे.

वृक्ष समितीसाठी ५ कोटी

नाशिक : महापालिकेच्या बजेटमध्ये वृक्ष प्राधीकरण समितीसाठी स्वंतत्र तरतूद करण्यात आली आहे. बजेटमध्ये वृक्ष प्राधिकरणासाठी ५ कोटी २८ लाखांची तरतूद असून, दोन कोटी वृक्षसंवर्धन करण्यात येणार आहे. तर दोन कोटी ८५ लाख रुपये पालिकेचे अनुदान असणार आहे.

कडलग पुरस्कार जाहीर

नाशिक : इंडियन चेंबर ऑफ अॅग्रिकल्चर ‘एम्पॉवरींग फार्मर्स’ मिशन २०२० अंतर्गत, शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना यंदाचा दौलतराव कडलग प्रेरणा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळा शुक्रवारी (दि. २१) दुपारी सव्वा बारा वाजता कालिदास कलामंदिर येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिकेसाठी १८००२७००५११ या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर बाजारावर व्याख्यान

नाशिक : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंड्रस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर आणि एल. के. पी. सिक्युरीटीज तसेच एनएसडीसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने श...शेअर बाजाराचा या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि. १८) दुपारी साडेचार वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृहात पार पडणार आहे. यावेळी अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर बोदडे मार्गदर्शन करतील.

कृतज्ञता सोहळा

नाशिक : नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लांइडतर्फे रोटरी हॉल येथे दरवर्षीप्रमाणे ऋणनिर्देश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अपर जिल्हाधिकारी दिलीपस्वामी, उद्योजक सोहनराज भंडारी, नगरसेविका हेमलता पाटील, डॉ. लकेश नहारा आदी उपस्थित होते.

वेंकय्या नायडूंचे आभार

नाशिक : नाशिकरोड गोंदिया जिल्ह्यासाठीचा ५५ कोटींचा निधी नाशिक महापालिकेच्या मुकणे पाणीपुरवठा योजनेस दिल्याबद्दल खासदार हेमंत गोडसे यांनी नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांचे आभार मानले. त्यांनी नायडूंची नवी दिल्लीत भेट घेतली. अडचणीत सापडलेल्या मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेला केंद्र व राज्य सरकारच्या ७७ कोटींच्या अनुदानामुळे जीवदान मिळाले. यात केंद्राचे ५५ कोटी तर राज्याचे २२ कोटी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी सदस्य निवडीचा वाद थंडावला

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेवर विविध दहा समितीवर सदस्य निवडीची रविवारी सभा झाल्यानंतर दिवसभर सर्व सदस्यांच्या नाराजी दूर करण्यात सर्वच पक्षांना यश आले आहे. काही समित्यावरच बहुतांश सदस्यांनी आग्रह धरल्यामुळे ही नाराजी सर्वच पक्षात होती. पण पुढील काळात संधी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे नाराजीचे सत्र थांबले. या नाराजीमुळे सभागृहात जाहीर केलेल्या नावांची यादी देण्यात आली नव्हती. सोमवारी मात्र ही यादी सार्वजनिक करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीबरोबरी एकूण ९ समितीवर सर्व सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. या सर्व समित्यात अर्थपूर्ण समजल्या जाणाऱ्या बांधकाम समितीत सर्वच दिग्गजांना स्थान देण्यात आले आहे. या सर्व

समित्यावर सर्वच पक्षाचे सदस्य असल्यामुळे कमी जास्त प्रमाण असले तरी यानिमित्ताने सर्वांना सामावून घेण्यात आले आहे.

बांधकाम समिती : अशोक टोंगारे, अश्विनी आहेर, संजय बनकर, सुरेखा दराडे, मंदाकिनी बनकर, रुपाजंली माळेकर, उदय जाधव, सिमंतिनी

कोकाटे

आरोग्य समिती : दादाजी शेजवळ, यशवंत गवळी, कलावती चव्हाण, सारिखा नेहरे, डॉ. सयाजीराव गायकवाड, ज्ञानेश्वर जगताप, यशवंत ढिकले, हरीदास लोहकरे

महिला व बालकल्याण : गणेश आहिरे, रेखा पवार, कविता धाकराव, कमल आहेर, सुनिता सानप, वैशाली खुळे, आशा पवार, सुमन बर्डे

समाजकल्याण समिती : कन्हु गायकवाड, यशवंतराव शिरसाठ, जयश्री पवार, ज्योती जाधव, रोहिणी गावित, शोभा कडाळे, सुरेश कमानकर, हिरामन खोसकर, रमेश बरफ, वनिता शिंदे, सुमन निकम

अर्थ समिती : छाया गोतरणे, दिपक शिरसाठ, सुशिला मेंगाळ, कावजी ठाकरे, रत्नाकर चुंभळे, केसरबाई आहेर, विमलबाई सोनवणे, नितीन गांगुर्डे

शिक्षण समिती : मिना मोरे, राजेंद्र सोनवणे, जगन्नाथ हिरे, नुतन आहेर, आशाबाई जगताप, सुनिता पठाडे, सिध्दार्थ वनारसे, पंडित आहेर

जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती : धनश्री आहेर, नितीन पवार, अनिता बोडके, धनराज महाले, रमेश बोरसे, अमृता पवार

कृषी समिती :लताबाई बच्छाव, बलवीरकैर निर्मल गिल, महेंद्रकुमार

काले, ज्योती वाघले, निलेश केदारे, पुष्पा गवळी, ज्योती राऊत, सुवर्णा

गांगोडे, एकनाथ गायकवाड, आशाबाई साळवे

पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती : साधना गवळी, समाधान हिरे, संगिता निकम, हेमलता गावित, शकुंतला डगळे, सुशिला मेंगाळ, कल्पना हिंदोळे, प्रतिभा सूर्यवंशी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दारू दुकाने बंद करा अन्यथा उपोषण’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

दत्तचौक व महाकाली चौकात असलेल्या देशी दारूच्या दुकानांमुळे परिसरातील नागरिकांना खूप त्रास होत असून, येथील नागरिकांनी संतापाच्या भरात दोन दिवसांपूर्वी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भातच सोमवारी (दि. १७) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित दुकानांमुळे होणाऱ्या त्रासाची चर्चा करून निवेदन दिले. हे दुकाने बंद न केल्यास बेमूदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक मुकेश शहाणे यांनी दिला आहे.

सिडकोतील दत्त चौक व महाकाल चौक येथे असलेल्या देशी दारू दुकानांमुळे या परिसरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या दुकानांच्या जवळ महाकाली व महालक्ष्मीचे मंदिर असल्याने याठिकाणी महिलांची वर्दळ जास्त असते. मात्र या दोन्ही दुकानांमधून मद्यपान करून आलेले मद्यपी या महिलांची छेडछाड करीत असतात. त्याचबरोबर या परिसरातील महिलांची किंवा मुलींची छेडछाड करून शिवीगाळ केल्याचे प्रकार होत असतात. नागरिकांनी दोन्ही दुकाने तातडीने बंद करून येथील नागरिकांचा त्रास बंद करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह शशिकांत जाधवही उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना या दोन्ही दुकानांबाबत निवेदन देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई-लखनौ एक्स्प्रेसची धूळफेक?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्य रेल्वेने नव्याने सुरू केलेली एलटीटी मुंबई-लखनौ ही गाडी म्हणजे केवळ धूळफेक असल्याची टीका रेल्वे प्रवाशांनी केली आहे. या गाडीला नुकताच हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला असला तरी ही गाडी २०१३ सालापासून स्पेशल एसी एक्स्प्रेस म्हणून लखनौसाठी दर शनिवारी मध्य रेल्वे चालवत होती. त्यामुळे रेल्वेने तीच गाडी केवळ रेक बदलून नवीन गाडी सुरू केल्याचे चित्र असल्याची रेल्वे प्रवाशांनी केली आहे.

२०१३ च्या नोव्हेंबरमध्ये राजधानीच्या धर्तीवर मध्य रेल्वेने (कल्याण-नाशिक मार्गे) नाशिककरांची मागणी म्हणून लोकमान्य ठिळक टर्मिनस मुंबई-हजरत निजामुद्दीन (दिल्ली) एक्स्प्रेस चालू केली. या गाडीचे डबे व रचना पूर्णतः राजधानीसारखी असून, फक्त राजधानी एक्स्प्रेसचा दर्जा नाही. एलटीटी मुंबई-लखनौ ही गाडी ताशी सरासरी ८० किलोमीटर वेगाने धावते. ती दर मंगळवारी सायंकाळी नाशिकहून साडेपाचला सुटते आणि केवळ पाच थांबे घेऊन दिल्लीला सकाळी साडेदहाला पोहोचते. त्याच दिवशी दुपारी परतीच्या प्रवासास रवाना होऊन शुक्रवारी पुन्हा मुंबईला पोहोचते.

ही नवीन गाडी सुरू झाली तेव्हा प्रतिसाद पाहून ती नियमित करण्याचे आश्वासन तत्कालीन खासदारांनी दिले होते. गाडी सुरू झाल्यापासून फुल्ल होऊन धावत आहे. परंतु, रेक शेअरिंग आणि उरलेल्या दिवसांसाठी याच गाडीचा रेक स्पेशल एसी

एक्स्प्रेस म्हणून २०१३ पासून लखनौ मार्गावर वापर होत आहे. आज हीच गाडी लखनौसाठी नियमित करण्यामागे उत्तर प्रदेशकरिता विशेष प्रेम म्हणून, असेही बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नव्या योजनांचा अभाव

$
0
0

मनपाचे चालू वर्षाचे बजेट १,४१० कोटींचे; जुन्या योजनांसह ई-गव्हर्नसवर भर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सन २०१८-१८ या आर्थिक वर्षाचे तब्बल १,४१० कोटींचे बजेट स्थायी समितीला सादर करण्यात आले आहे. गेल्या वर्षाचे सुधारित बजेट हे १,४०२ कोटींवर गेले असून, चालू वर्षाच्या बजेटमध्ये सहा कोटीची शिल्लक दाखविण्यात आली आहे. आर्थिक स्थितीमुळे बजेटमध्ये नव्या योजनांचा मोह टाळून आहे त्या योजना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. बजेटमध्ये वाहतूक सेल, पार्किंग, कालीदासचे नूतनीकरण, डीपीरोडच्या विकासावर भर देण्यात आला आहे. प्रशासनाने ई-गव्हर्नन्सला अधिक प्राधान्य दिले असले तरी, जुन्याच योजनांचा मारा या बजेटमध्ये करण्यात आला आहे.

पालिका निवडणुकांमुळे महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे बजेट दोन महिना उशीराने सोमवारी (दि. १७) स्थायी समितीला सादर करण्यात आले. प्रभारी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्याकडे ५ कोटी ९८ लाख रुपये शिलकीचे १४१० कोटी ७ लाखांचे अंदाजपत्रक सादर केले. गेल्या वर्षाचे बजेट हे १,३५८ कोटींचे होते. ते उत्पन्न वाढीमुळे १,४०२ कोटींपर्यत सुधारित पोहचले असून, चालू वर्षाच्या बजेटमध्ये गेल्या वर्षापेक्षा ६२ कोटींची अधिकची वाढ झाली आहे. या बजेटमध्ये १२२८ कोटींचे उत्पन्न दाखविले आहे. तर महसूली जमा १३९६ कोटी ७० लाख रुपये दाखवण्यात आले आहेत. एलबीटी धोरणात झालेला बदल आणि शासकीय अनुदानांना कात्री लागल्याने या वर्षी बजेट सादर करण्यात आले. बजेटमध्ये एलटीबी आणि शासकीय अनुदान पकडून ७७४ कोटी रुपये धरण्यात आले आहेत. केंद्र सरकारने राष्ट्रीय नदी संवर्धन योजना, अमृत व स्मार्ट सिटी योजनांमध्ये नाशिकचा समावेश झाला आहे. बजेटमध्ये स्मार्ट सिटीसाठी ५० कोटींची तरतूद केली आहे.

नगरसेवक निधीला ब्रेक

बजेटमध्ये विकासकामांसाठी केवळ १३० कोटी रुपयेच धरण्यात आले आहे. त्यामुळे नगरसेवकांना पहिल्याच वर्षी नगरसेवक निधीपासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. महापालिकेडून दरवर्षी आर्थिक स्थितीप्रमाणे ५० लाखांपेक्षा जास्त निधी हा नगरसेवक निधी म्हणून दिला जातो. परंतु, हा नगरसेवक निधी मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

विकास शुल्कावर भर

महापालिकेत घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ झाली असली तरी, त्यातून १५ ते २० कोटीच रुपये मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा भर हा नगररचना विभागाकडून मिळणाऱ्या विकास शुल्काकडेच राहणार आहे. यावर्षीच्या बजेटमध्ये ९७ कोटी रुपयांचे उत्पन्न विकास शुल्कातून अपेक्षित धरण्यात आले आहे. बांधकामांना परवानग्या देण्यास सुरुवात झाल्याने दोन वर्षांचा विकास शुल्कातून बॅकलॉग भरण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणिताच्या विद्यार्थ्यांना अंदाजपंचे मार्क्स!

$
0
0

पुणे विद्यापीठाचा गलथान कारभार पिंपळगावमध्ये उघड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बी.एससी. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत उत्तरपत्रिका न तपासताच गणिताच्या विद्यार्थ्यांना अंदाजपंचे गुणदान केल्याचा धक्कादायक प्रकार एका सजग कार्यकर्त्यामुळे पिंपळगाव बसवंत येथे उघडकीस आला आहे. चक्क भंगार खरेदीच्या गाडीवर उत्तरपत्रिकांचा गठ्ठा एका कार्यकर्त्याच्या हाती लागल्यानंतर उघडकीला आलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

पुणे विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ सायन्स (बी.एससी.) या पदवी अभ्यासक्रमांतर्गत सन २०१५ मध्ये पहिल्या वर्षाच्या पार पडलेल्या परीक्षेतील या उत्तरपत्रिका आहेत. दोन ते तीन दिवसांपूर्वी पिंपळगाव येथील व्यावसायिक व युवा सेनेचे उपशहरप्रमुख दीपक गोसावी यांना एका भंगारवाल्याच्या गाडीवर विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांचा गठ्ठा दिसून आला. त्यांनी उत्सुकतेने हा गठ्ठा बघितल्यानंतर उत्तरपत्रिकांच्या आतमध्ये त्या तपासल्याच्या कुठल्याही खुणा त्यांना आढळून आल्या नाहीत. मात्र, पहिल्या पानावरील रकान्यात लालशाईत गुणदान करण्यात आले आहे. विशेष धक्कादायक बाब म्हणजे गणित विषयाच्या या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या काही समीकरणांमध्ये खाडाखोड करण्यासाठी चक्क व्हॉईटनरचा उपयोग करण्यात आला आहे. यामुळेही या प्रकरणातील संशय वाढीला लागत असल्याचे गोसावी यांनी सांगितले. या उत्तरपत्रिका पिंपळगाव बसवंत येथील एका स्थानिक महाविद्यालयाच्याच असल्याचेही ते म्हणाले. मात्र, हे प्रकरण थेट विद्यापीठाशी निगडीत असल्याने विद्यापीठाच्या नाशिक विभागीय कार्यालयात या संदर्भात त्यांनी तक्रारही दिली आहे. विद्यापीठाने या संदर्भातील दोषींवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गोसावी यांनी केली आहे.

आमच्याकडे या प्रकरणी अद्याप तपशीलवार माहिती मिळालेली नाही. माहिती घेण्याचे काम सुरू आहे. तथापि, प्राध्यापकांना कुठल्याही उत्तरपत्रिका स्वत:जवळ बाळगण्याचे अधिकार नाहीत. त्या विद्यापीठाकडे जमा कराव्या लागतात. या प्रकरणी तथ्य आढळल्यास कारवाई करू.

- अशोक चव्हाण, परीक्षा नियंत्रक, पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांच्या’ निश्चयाला दिग्गजांचा सलाम

$
0
0



pravin.bidve@timesgroup.com
Tweet :@bidvepravinMT

नाशिक : ‘शिवडा चावल’ ही तांदळाची जात ज्या गावाने बहाल केली ते गाव म्हणजे सिन्नर तालुक्यातील शिवडे. येथील रसदार टोमॅटो वर्षानुवर्षे दुबईला निर्यात होतो. द्राक्षांचे युरोपीय देशांत चवीने सेवन केले जाते. असे हे गाव समृध्दी महामार्गाच्या विरोधातील लढ्यामुळे देशाच्या नकाशावर झळकले आहे. गावाच्या इतिहासात आमदार किंवा एखाद्या नेत्यापलीकडे गावात कुणी फिरकले नाही. परंतु, आघाडी सरकारच्या निम्मे मंत्रिमंडळासह राजकीय पक्षांमधील अनेक दिग्गजांना या गावात यावेच लागले. ‘ऐसे निश्चयाचे बळ ‍तुका म्हणे तेचि फळ’ याची प्रचिती शिवडे ग्रामस्थांनी त्यांच्या संघर्षातून दिली आहे.

चारशे उंबरे आणि सात हजार लोकवस्तीचे शिवडे गाव. वर्षात तीन पिके घेणारं. सुपिकतेला अंगाखांद्यावर खेळविणारं. या गावातील सुमारे ५५ हेक्टर जमीन समृध्दी महामार्गात जाते आहे. या प्रकल्पासाठी शिवडेतील ग्रामस्थांना त्यांची जमिन द्यावीच लागणार की सरकार विरोधात त्यांनी उभारलेला लढा यशस्वी होणार हे येणाऱ्या काळात कळेलच. परंतु, या ग्रामस्थांनी समृध्दी विरोधात पेटविलेल्या ठिणगीला आता वणव्याचे स्वरूप येऊ लागले आहे. भूमिहीन होण्याच्या आणि आपल्या पुढील पिढ्यांच्या चिंतेने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी ‘करो या मरो’ ची भूमिका स्वीकारून शेती वाचविण्यासाठी लढा उभारला आहे. जमिनींच्या मोजणीसाठी येणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला पिटाळून लावल्याने हे गाव राज्यात चर्चेत आले. गत आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी या गावात येऊन शेतकऱ्यांना बळ दिले. पाठोपाठ आता काँग्रेस, राष्ट्रवादीसह एकूण सहा राजकीय पक्षांनी राज्यात काढलेल्या संघर्षयात्रेतील दिग्गज नेत्यांनाही या गावाला टाळून पुढे जाणे शक्य झाले नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पतंगराव कदम, राजेश टोपे, राधाकृष्ण विखे पाटील, भाई जगताप, अबू आझमी, जोगेंद्र कवाडे यांसह तब्बल ६० आमदारांनी एकाचवेळी या गावात हजेरी लावली. ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून त्यांच्या संघर्षाला सलाम केला. इतकेच नव्हे तर आम्ही या लढ्यात तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही देत आश्वस्तही केले. एवढे दिग्गज नेते पहिल्यांदाच गावात पहात असल्याची प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.

शिवडेचे ग्रामस्थ ‘यू-ट्यूब’वरही

शिवडे ग्रामस्थांच्या संघर्षाची माहिती राज्यातील दिग्गज नेत्यांपर्यंत पोहोचली आहे. आपली आईच आपल्यापासून हिरावून नेण्याचा घाट घातला जात असल्याने गावातील महिलाही आक्रमक झाल्या आहेत. जीव गेला तरी चालेल पण जमिनी देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थ खुलेआम जाहीर करीत आहे. यू-ट्यूबवरही ग्रामस्थांच्या संवादाच्या व्हिडीओ क्लिप पाहावयास मिळू लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बातों से मानणार की लातों से?’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात संघर्ष यात्रेदरम्यान झालेल्या तीन शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमुळे विरोधक कर्जमाफीसाठी अधिकच आक्रमक झाले असून सरकारला आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांपाठोपाठ त्यांचे कुटुंबीयही आत्महत्या करत असल्याचे इतिहासात कधी पाहिले नाही असे सांगत, आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला दिला आहे.

संघर्ष यात्रेच्या दबावामुळेच ‘मी मुख्यमंत्री बोलतोय!’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. आता मन की नव्हे, तर शेतकऱ्यांसाठी धन की बात करा, असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे. संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा संपल्यानंतर राज्यात प्रक्षोभ उठून अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल असा इशारा देत, या परिस्थितीला सरकारच जबाबदार राहील, असा निर्वाणीचा इशारा पाटील यांनी सरकारला दिला आहे. आता ‘बातो से मानणार की लातो से’ असा सवाल विरोधकांनी सरकारला उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधीपक्षांनी काढलेल्या संघर्षयात्रेचे नाशकात आगमन झाले. यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर हल्ला चढवला. शेतकऱ्यांची सहनशील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी आम्ही सभागृहात प्रश्न उपस्थित करताच आमचे आमदार निलंबित करण्यात येउन आमची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या राज्यात कर्जमाफी मागणे हाही गुन्हा आहे काय? असा सवाल करत आम्ही सनदशीर मार्गाने लढा देत आहोत, असे विखे पाटील यांनी सांगितले. संघर्षयात्रा पूर्ण होईपर्यंत सरकारने कर्जमाफीची घोषणा केली नाही तर या रस्त्यावर उतरून संघर्ष तीव्र केला जाईल. यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सर्वस्वी सरकारच जबाबदार राहील.

कर्जमाफीचा ठराव

एक मे या महाराष्ट्र दिनी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव असा ठराव राज्य सरकारकडे पाठवून लोकशाहीच्या आयुधाचा वापर करावा, असे आवाहन विखे पाटील यांनी केले. वाढत्या कर्जामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत असतांना मुख्यमंत्री उत्तर प्रदेश पॅटर्नचा अभ्यास करतो, म्हणतात. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय!’ मधून नवीन काही बोलले नाहीत, असेही ते म्हणाले.

यूपी पॅटर्न अभ्यासण्याची दुर्दैवी वेळ

महाराष्ट्राने संपूर्ण देशाला विविध योजना दिल्या. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांनी या देशाला समतेची शिकवण दिली. त्याच महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे कर्जमाफीच्या उत्तर प्रदेश पॅटर्न अभ्यासण्याची दुर्दैवी वेळ आल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला. परंतु, आम्हाला उत्तर प्रदेश पॅटर्न मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सत्तेवर येतांना या सरकारने अनेक आश्वासने शेतकऱ्यांना दिली होती. मात्र आजवर एकाही आश्वासनाची पूर्ती करण्यात आली नाही. ७० हजार कोटींचा समृध्दी प्रकल्प सुरू करतात परंतु या राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांचे ३० हजार ५०० कोटींचे कर्ज माफ करण्यासाठी या सरकारकडे पैसे नाही. मात्र, आता कर्जमाफीशिवाय थांबणार नाही, असे तटकरे यांनी सांगितले.

सहनशिलतेचा अंत पाहू नका

राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सरकारच्या कामगिरीबाबत शेतकरी समाधानी नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांची सहनशिलता संपली असून यानंतर उदभवणाऱ्या परिस्थितीला सरकारच जबाबदार असेल असा इशारा अजित पवार यांनी दिला. शेतकऱ्यांचे कुटुंबीय आता आत्महत्या करू लागले आहेत. मात्र, सरकार ढिम्म आहे. इतिहासात असे कधी घडले नाही. शेतमालाला भाव नाही. तूरखरेदी थांबविण्यात आली आहे. व्यापाऱ्यांची तूरखरेदी केली जाते पण शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात नाही. उद्योजकांच्या पाठीशी उभे राहणार सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. मात्र, संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळ मिळाले आहे. या यात्रेचा तिसरा टप्पा रायगड येथून लवकरच सुरू होणार असून हा संघर्ष अधिक तीव्र केला जाणार असल्याचे ते म्हणाले.

बुर्ज खलिफा कोणासाठी?

दुबईतील जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत मुंबईत उभारण्याचा मानस भाजप सरकारमधील मंत्री नितीन गडकरी यांचा मानस आहे. पण या बुर्ज खलिफामध्ये कोणता सामान्य शेतकरी जाणार आहे असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी उपस्थित केला.

लढा सुरूच राहणार

खोटं बोलून सत्तेत आलेल्या सरकारने जागे व्हावे. स्वामीनाथन आयोगाची तातडीने अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतमालाला हमीभाव द्यावा ही, आमची मागणी असून हा लढा सुरूच राहणार असल्याचे जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजितदादा भडकले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भाजप सरकार विरोधातील संघर्षयात्रेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित असतांना स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादी भाजप सोबत का? असा प्रश्न विचारताच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी चांगलेच भडकले.

संघर्षयात्रेच्या निमित्ताने मंगळवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद झाली. यात नेत्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. आमची संघर्ष यात्रा भाजप सरकारविरोधी असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. त्यावर भाजपविरोधात आंदोलन करणारे काँग्रेस-राष्ट्रवादी जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्तेसाठी एकत्र कसे? लोकांनी तुमच्यावर का विश्वास ठेवावा? असा प्रश्न पत्रकारांनी केला. या प्रश्नावर अजित पवार भडकले. ही यात्रा शेतकऱ्यांसाठी आहे. सभापतीपदाचे काय घेऊन बसलात? हा स्थानिक विषय आहे, असा सांगत त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. त्यावर पत्रकारांनी पुन्हा कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे विचारताच अजितदादा अधिकच चिडले. आम्ही आमदाराकी, खासदारकी ओवाळू टाकू, तुम्ही काय शुल्लक पदांचे सांगताय? मी सांगितलेले फायनलच असते, खडे बोल पत्रकारांनाच सुनावले. दादाचा वाढलेला पारा लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मध्यस्ती करत, सारवासारव करण्याचा प्रयत्न करत हा स्थानिकस्तरावर विषय आहे, आंदोलन राज्यात सुरू असल्याची त्यांनी सांगितले. राधाकृष्ण विखे यांनी माईक हाती घेत संघर्षयात्रेशी या विषयाचा संबंध नसल्याचा खुलासा केला. या प्रकारनंतर लागलीच पत्रकार परिषद आटोपटी घेण्यात आली.

अजित पवारांचाच टीआरपी हाय!

संघर्ष यात्रेच्या निमित्ताने विश्रामगृहावर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर आले होते. अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, सनील तटकरे, पतगंराव कदम, जोगेंद्र कवाडे, अबू आझमी यांच्यासह दिग्गज नेते होते. परंतु, या सर्वांमध्ये शेतकऱ्यांचा ओढा होता तो अजित पवारांकडेच. कर्जमाफीसाठी शेतकरी पवारांचीच भेट घेऊन त्यांनाच आपल्या व्यथा सांगून कर्जमाफी कराच अशी विनवणी करत होते. पत्रकार परिषदेनंतर पवारांच्या उपस्थिती ‘कर्जमाफी झालीच पाहिजे, भाजप सरकारचा निषेध असो’ अशा घोषणा देण्यात आला. शेतकऱ्यांनी यावेळी दादाना गराडा घातला. शेतकऱ्यांच्या गराड्यामुळे संघर्षयात्रेच्या बसला नाशिकमधून निघण्यास उशीर झाला. या यात्रेतील सर्वनेत्यांमध्ये अजित पवार यांचाच टीआरपी सर्वात जास्त दिसून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारच्या प्रतीकात्मक पार्थिवाचे दहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
समृध्दी महामार्गाविरोधात एकवटलेल्या शिवडे ग्रामस्थांनी राज्यसरकारची प्रतिकात्मक तिरडी बांधून तिचे दहन केले. आमच्या काळ्या आईकडे वाकड्या नजरेने पहाल तर खबरदार असा इशाराही ग्रामस्थांनी सरकारला दिला आहे. समृध्दी महामार्गासाठी शिवडे गावातील सुमारे १०० कुटंबांची ५५ एकर जमीन जात आहे. वडिलोपार्जित जमिनी कुठल्याही परिस्थितीत देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी स्वीकारला आहे. जमिनी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी लढा उभारला असून त्याला पाठबळ देण्यासाठी संघर्ष यात्रा मंगळवारी या गावात दाखल झाली. संघर्षयात्रा गावातून बाहेर पडत असताना शेतकऱ्यांनी राज्य सरकार बद्दलचा रोष व्यक्त केला. राज्य सरकारची तिरडी बांधून तिचे प्रतिकात्मक दहन केले. ‘जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

आमच्या जमिनींकडे वाकड्या नजरेने पहाल तर सोडणार नाही, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेला दिला. मंगला चव्हाणके या तरुणीने व्यक्त केलेल्या मनोगताने उपस्थित सर्वांच्याच अंगावर शहारे उभे केले. ‘हा बरबादी महामार्ग असून काळ्या आईचा सौदा आम्ही कदापी होऊ देणार नाही’, असा इशारा यावेळी देण्यात आला. देशाला समृध्द करायचे असेल तर सर्वप्रथम शेतकऱ्याला समृध्द करावे लागेल या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची यावेळी आठवण करून देण्यात आली. ग्रामस्थांनी ठिकठिकाणी सरकारच्या विरोधातील घोषणांचे फलक लावून संताप व्यक्त केला. आम्हाला सहानूभूती तसेच आश्वासने नको तर सहकार्य हवे आहे, असे संघर्ष यात्रेतील नेत्यांना सांगण्यास ग्रामस्थ विसरले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'...तर सरकारला पळता भुई थोडी करू'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात, हे सरकारने विसरू नये. आम्हीदेखील सरकार चालविले आहे. समृध्दीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या केसालासुध्दा पोलिसांना धक्का लावू देणार नाही. दडपशाहीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न केला, तर पळता भुई थोडी करू, असा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला.

राज्याचा कानाकोपरा पिंजून काढणारी संघर्षयात्रा मंगळवारी सिन्नर तालुक्यातील शिवडे गावात पोहोचली. समृध्दी महामार्गाला शिवडे ग्रामस्थांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. आम्ही आमच्या वडीलोपार्जित जमिनी कदापी देणार नाही, अशी भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली असून त्यांना पाठबळ देण्यासाठी संघर्षयात्रा सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास या गावात आली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, की आम्ही आश्वासने द्यायला नव्हे येथील वस्तुस्थिती समजून घ्यायला आलो आहोत. नागपूर आणि मुंबईला जोडणारा सध्याचा महामार्ग दोन्ही बाजूने दोन-दोन पदरी वाढविला तरी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था होऊ शकते. जुन्या सुविधा असताना नवीन महामार्ग उभारण्याचा अट्टाहास का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या महामार्गासाठी राज्यातील तब्बल ५२ हजार एकर जमीन वापरली जाणार असून हा समृध्दी महामार्ग नव्हे तर ‘उध्वस्त महामार्ग’ असल्याची टीका पवार यांनी केली. जातपात विसरून तसेच ‘शेतकरी’ ही एकच जात मानून या महामार्गाला विरोध करण्यासाठी एकजूट कायम ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. मोजणीसाठी गावात कुणाला पाय ठेऊ देऊ नका, असे आवाहन करताना आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

महेश पाटील, मर्यादेत राहा

प्रांताधिकारी महेश पाटील अत्यंत मग्रुरीची भाषा वापरतात त्यांना कसे वागावे, महिलांशी कसे बोलावे याचे भान नाही, अशा तक्रारी संघर्षयात्रेतील नेत्यांकडे जाहीरपणे करण्यात आल्या. विखे पाटील यांनी पाटील यांचा समाचार घेतला. अधिकाऱ्यांनी आपल्या मर्यादा सांभाळाव्यात. फार मस्ती येऊ देऊ नये. आम्हाला मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही. अधिकाऱ्यांची केव्हा विकेट जाईल, हे त्यांनाही कळणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

प्रतिष्ठा पणाला लावू

समृध्दी महामार्ग जातो त्या आसपासच्या परिसरात अधिकाऱ्यांनीच जमिनी घेऊन ठेवल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांची साथ सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. सरकारने या महामार्गासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली तर आम्ही देखील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पगाराएवढेच काम करा

‘जेवढा पगार मिळतो तेवढेच काम करा’, असा खोचक टोलाही त्यांनी पोलिसांनी लगावला. खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांच्याच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना राजिनामा देण्यास भाग पाडावे. गावातून त्यांची मिरवणूक काढू. परंतु, त्यांनी तसे केले नाही तर त्यांची गाढवावरून धिंड काढायला सुध्दा मागे पुढे पाहिले जाणार नाही, असा इशाराही यावेळी विखे पाटील यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘केंद्रातर्फे मदतीसाठी पुढाकार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकमध्ये असहाय अवस्थेत वास्तव्य करणाऱ्या अभिनेत्री स्मृती बिश्वास-नारंग यांना केंद्र सरकारतर्फे आवश्यक ते सहकार्य प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार हेमंत गोडसे यांनी दिले. १९३० ते १९६० या तीन दशकांत बंगाली व हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीची त्यांच्या निवासस्थानी खासदार गोडसे यांनी भेट घेत विचारपूस केली. अभिनेत्री स्मृती बिश्वास-नारंग यांचा एकांतवास सर्वप्रथम ‘मटा’नेच प्रकाशात आणला होता.

सर्वप्रथम बंगाली चित्रपटांतून बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकीर्दीस प्रारंभ करणाऱ्या स्मृती बिश्वास-नारंग यांनी पुढे लाहोर, कोलकाता व मुंबई या ठिकाणी तब्बल ९० चित्रपट केले. ‘नेकदिल’, ‘हमसफर’, ‘अनुराग’, ‘डाका’, ‘मॉडर्न गर्ल’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही भारतीय सिनेरसिकांच्या मनावर राज्य करीत आहेत. या अभिनयाच्या साम्राज्ञीला वार्धक्यात मात्र कफल्लकपणा वाट्याला आला असून, त्यांच्यावर एकांतवासात राहण्याची दुर्दैवी वेळ आल्याचे ‘मटा’ने उजेडात आणले होते. त्यानंतर खासदार गोडसे यांनी सोमवारी त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत मदतीबाबत विचारणा केली असता त्यांनी नम्रपणे नकार दिला. त्यावर केंद्रातर्फे मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार गोडसेंनी यावेळी दिले. या भेटीप्रसंगी अभिनेत्री स्मृती बिश्वास-नारंग यांचे पुत्र राजीव नारंग उपस्थित होते.

अभिनेत्री स्मृती बिश्वास-नारंग यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे चित्रपटसृष्टीतील योगदान उल्लेखनीय आहे. त्याची दखल शासकीय पातळीवर नक्कीच घेतली जाईल. ज्येष्ठ कलाकार या नात्याने केंद्र सरकारमार्फत त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देईन.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशाकडून एक लाखाचा गुटखा जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अहमदाबाद-धुळे एसटी बसमध्ये एका प्रवाशाच्या ताब्यात प्रतिबंध असलेला सुमारे १ लाख रुपये किमतीचा हिरा गुटखा व सुगंधित तंबाखूचे चार पोते आढळून आल्याने मंगळवारी (दि. १८) साक्री पोलिसांकडून ते जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी संशयित रमेश रामचंद्र पाटील यास पोलिसांनी अटक केली आहे.

अहमदाबाद-धुळे या एसटी बसमधून (एमएच २०, बीएल ४१३१) प्रतिबंध असलेला गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती साक्री पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर साक्री शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर एसटी बसची तपासणी करण्यात आली. त्यावेळी रमेश पाटील यांच्या ताब्यात सुमारे १ लाख रुपयांचा गुटखा आढळून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मृती संगीत सभा शनिवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वर्गीय प्राध्यापक अरूण वसंत दुगल स्मृती संगीत सभेचे आयोजन शनिवारी (दि. २२) सायंकाळी ६ वाजता डॉ. कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास, गंगापूर रोड येथे करण्यात आले आहे.

या सभेत पुण्यातील विख्यात गायिका सानिया कुलकर्णी पाटणकर यांच्या शास्त्रीय व नाट्यसंगीताची प्रस्तुती होईल. सानिया कुलकर्णी पाटणकर या जयपूर, अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदूषी अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शिष्या आहेत. त्यांनी सवाई गंधर्व (पुणे), सप्तक (अहमदाबाद), पाडवा पहाट (पिंपळपार, नाशिक), तानसेन महोत्सव (ग्वाल्हेर), बाबा हरवल्लभ समारोह (जालंधर) यासारख्या भारतातील सर्व महत्त्वाच्या संगीत महोत्सवात तसेच परदेशातही आपल्या गायकीचा ठसा उमटवला आहे. त्या आकाशवाणी व दूरदर्शनच्या ‘अ’ श्रेणीच्या कलाकार असून, भारत सरकारच्या शास्त्रीय संगीतासाठीच्या कलाकार पॅनलवरदेखील नियुक्त आहेत. त्यांना तबल्यावर अविनाश पाटील तर संवादिनीवर श्रीकांत पिसे साथसंगत करतील. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यदायी कारले खातेय भाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आरोग्यादायी गुणांमुळे कारल्याला वर्षभर मागणी असते. त्यामुळे वर्षभर पिकणाऱ्या कारल्याचे उत्पादन यंदा मात्र कमी झाल्याने त्यांची आवकही घटली आहे. सध्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ शंभर ते दीडशे क्रेट्स आवक होत असल्याने त्यांना ८०० ते ९०० रुपये प्रतिक्रेट दर मिळत आहे. त्यामुळे सध्या कारले भाव खात असून, किरकोळ बाजारात १०० रुपये प्रतिकिलोंपर्यंत दर पोहोचले आहेत.

गेल्या सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदा कारल्याचे दर वाढले आहेत. बाजार समितीत विक्रीसाठी येणारे कारले १० किलोंच्या क्रेट्समध्ये आणले जातात. त्यांना ८०० ते ९०० रुपये भाव मिळत असला, तरी हा भाव होलसेलचा असल्याने किरकोळ बाजारात १०० रुपये प्रतिकिलोपेक्षा कमी दरात कारले मिळणे अवघड होत आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी कारले आणखी कडू झाले आहे.

शेतकरी वर्षभर कारल्याचे पीक घेत असतात. मात्र इतर ऋतूंप्रमाणे उन्हाळ्यात हे पीक घेणे अवघड असते. पाण्याची टंचाई, रोगांचा आणि किडींचा वाढता प्रादुर्भाव आदींमुळे पिकाचे उत्पादन घटते. नाशिक जिल्ह्यात तर सध्या केवळ वैतरणा डॅम परिसरात कारल्याचे उत्पादन होत आहे. याच भागातून कारले विक्रीसाठी बाजार समितीत येत आहेत. कारले पिकावर बुरशीजन्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादनात घट येते. प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करावी लागते. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. गेल्या काही महिन्यांपासून कारल्याला भाव मिळत नसल्यामुळे, तसेच पाणीटंचाईमुळे कारल्याची लागवड कमी झालेली आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांपर्यंत कारल्याचे दर कमी होणार नसल्याची शक्यता आहे.

कारले उत्पादनासाठी साधारणपणे एकरी ७५ हजार रुपये खर्च येतो. उन्हाळ्यात फूल आणि कळी गळतात. जोराचा वारा सुटल्यास हे प्रमाण वाढते. परिणामी उत्पादन घटते. चांगले दर मिळत असले, तरी आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होतो, असे नाही.

- दत्तू तांबे, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बच्चेमंडळींसाठी समर कॅम्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळी सुटी एन्जॉय करतानाच बच्चेमंडळीला काही नवीन शिकता यावे यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे सनशाइन समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. अकरा दिवसांचा हा कॅम्प बच्चेमंडळींच्या कल्पकतेला प्रोत्साहनपर ठरणार असून, त्यासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे.

‘मटा’तर्फे वाचकांसाठी नेहमीच काही तरी हटके देण्याचा प्रयत्न असतो. त्याचाच भाग म्हणून हा समर कॅम्प होत आहे. दहा दिवसांचे हे शिबिर असून, सहभाग घेणाऱ्यांसाठी अकराव्या दिवशी सहल काढण्यात येणार आहे. रविवार, दि. २३ एप्रिलपासून हे शिबिर सुरू होईल. शिबिरात चार ते १४ वयोगटातील मुले, मुली सहभागी होऊ शकणार आहेत. त्र्यंबक नाका येथील सेंट्रल मॉल येथे सायंकाळी पाच ते सात या वेळेत हे शिबिर होईल. त्यामध्ये बच्चेकंपनीला योगा करण्यास शिकविले जाणार आहे. याखेरीज विज्ञानाचे चमत्कार, विविध खाद्यपदार्थ बनविण्यास शिकविण्यात येणार आहे. किरकोळ स्वरूपाचे शिवणकाम, स्क्रॅप बुक, पेन स्टॅन्ड, विविध प्रकारच्या मेणबत्ती यांसारख्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. याखेरीज झुम्बा डान्स शिकण्याची आणि तो करण्याची संधी या मुलांना मिळणार आहे. या शिबिरासाठी कल्चर क्लब सदस्यांना ११०० रुपये, तर अन्य इच्छुकांना १५०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले असून, त्यामध्ये सहलीच्या खर्चाचाही अंतर्भाव आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कॉलेजरोड परिसरातील डिसूझा कॉलनीतील अल्फा स्क्वेअर इमारतीतील कार्यालयात नावनोंदणी करता येणार आहे. नावनोंदणीसाठी कल्पेश (मोबाइल- ७०४०७६२२५४) यांच्याशी किंवा ०२५३ ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.


कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड संपर्क ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images