म. टा. प्रतिनिधी, नाशिक
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाच ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळाही जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील १७ गावे आणि चार वाड्यांवरील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी १२ टँकर धावत आहेत. बागलाण, सुरगाणा, मालेगाव आणि पेठ पाठोपाठ आता त्र्यंबकेश्वर, येवला आणि चांदवड तालुक्यांतही टँकरची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला तेथेही टँकर सुरू करावे लागणार आहेत.
गतवर्षी वरूणराजाने चांगली कृपादृष्टी केली. जुलैनंतर जोरदार पाऊस झाल्याने धरणे व तत्सम जलाशये भरण्यास मदत झाली. त्यामुळे मार्चपर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फारशी पाणी टंचाई जाणवली नाही. परंतु उन्हाचा तडाखा वाढू लागल्यामुळे ग्रामीण भागात रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. बागलाण तालुक्यात पाणी टंचाईची परिस्थिती बिकट बनली आहे. या तालुक्यातील १२ गावांना सध्या आठ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. दररोज येथे टँकरच्या ३६ फेऱ्या होत आहेत. त्याखालोखाल सुरगाणा तालुक्यात तीन गावे आणि दोन वाड्यांना एका टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. इगतपुरीत दोन वाड्यांना तर मालेगाव आणि पेठ तालुक्यात प्रत्येकी एका गावाला एका टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. २० गावे आणि काही वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असून तसा प्रस्ताव संबंधित तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला आहे. बागलाण व चांदवड तालुक्यातील प्रत्येकी दोन गावांत तर येवल्यातील एका गावातून टँकरच्या मागणीचा प्रस्ताव आला आहे. परंतु या प्रस्तावांवर अद्याप निर्णय
झालेला नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट