म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
नाशिक हे विकसित शहर असले तरी स्वच्छतेबाबत इंदूर भारतात प्रथम आले आहे. नाशिकला ‘नंबर वन’ करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. प्लास्टिकमुक्त भारत हे समाज बदलण्याचे आंदोलन आहे. त्याचा शुभारंभ नाशिकमधून झाला आहे. ही नव्या नाशिकची सुरुवात आहे. पंतप्रधान मोदींचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करा, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केले.
जावडेकर यांनी सकाळी जेलरोडच्या शिवाजी पुतळ्याला पुष्पहार घालून प्रभाग १८ मधील स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्त मोहिमेला प्रारंभ केला. त्यानंतर ते बोलत होते. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार बाळासाहेब सानप, भाजपचे पदाधिकारी लक्ष्मण सावजी, वसंत गिते, विजय साने, सभागृह नेते दिनकर पाटील, स्थायीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, बाजीराव भागवत, सुनील बागूल, कामगार नेते पी. एन. आडके, नगरसेवक प्रा. शरद मोरे, मीरा हाडंगे, दिनकर आढाव, उद्धव निमसे, मीना माळोदे, पंडित आवारे, रंजना बोराडे, कोमल मेहरोलिया, कन्हैय्या साळवे, विशाल संगमनेर, मंदा फड, मुकूंद आढाव, प्रकाश घुगे, सतीश मंडलेचा आदी यावेळी उपस्थित होते.
मंत्री जावडेकर म्हणाले की, मोदी सरकारची तीन वर्षे ही परिवतर्नकारी आहेत. या काळात देशात साडेतीन कोटी शौचालये बांधण्यात आली, तर एक लाख ७० हजार खेडी हगणदारीमुक्त करण्यात आली. उघड्यावर शौच करणे थांबले. ही नवीन संस्कृती आहे. शहरात प्लास्टिकची समस्या गंभीर झाली आहे. शहरांमध्ये रोज १५ हजार टन प्लास्टिक जमा होते. त्यापैकी फक्त नऊ हजार टन गोळा केले जाते. वर्षाला वीस लाख टन प्लास्टिक तसेच राहते. जनावरे तसे समुद्रातील माशांच्या पोटात ते जाते. पर्यावरणाचीही मोठी हानी होते. त्यामुळे देश प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प सरकारने सोडला आहे. त्याचा शुभारंभ नाशिकमधून झाला आहे. हे केवळ प्रशासनाचे काम नाही तर लोकसहभाग महत्वाचा आहे, असेही ते म्हणाले.
कॉँग्रेस-पाकिस्तानची अवस्था सारखीच
कॉँग्रेसची आणि पाकिस्तानची अवस्था एक सारखी असून सारख्या कुरापती काढत देशातील शांततेला गालबोट लावण्याचे काम ही मंडळी करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे कॉँग्रेस तग धरू शकणार नाही व तात्विक चर्चादेखील करू शकणार नाही. यांच्या कांगाव्याचे आमच्या सरकारवर काहीही परिणाम होणार नाहीत. कितीही आघाड्या आल्या तरीही २०१९ व २०२४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षालाच बहुमत मिळेल, असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारने केलेल्या कामांचा आढावा कार्यकर्त्यांना सागंण्यासाठी कालिदास कलामंदिरात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. सरकारने केलेल्या कामाचा अहवाल केंद्रातील मंत्री ९०० ठिकाणी देणार आहेत. यावेळी जावडेकर म्हणाले की, विरोधी पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. निवडून आल्यानंतर मोदींची महती कमी होईल असे वाटले होते परंतु ती दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये पंचायत समिती, विधानसभेच्या निवडणुका झाल्या अशा सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने विजय प्राप्त केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सहा महिन्यांनी आढावा घेणार
प्लास्टिकमुक्त अभियानासाठी पुढील सहा महिने नगरसेवक व नागरिकांनी मोहीम राबवावी. त्याचा आढावा घेण्यासाठी आपण सहा महिन्यांनी नाशिकला येणार आहोत, असे सांगून जावडेकर म्हणाले की, नाशिककर सिंगापूर किती स्वच्छ आहे, हे पाहण्यास जातात. मात्र, अशी स्वच्छता ठेवा की परदेशी लोक नाशिक पाहण्यासाठी आले पाहिजे. पुण्यात शाळा, महाविद्यालयांत प्लास्टिकमुक्तीचा प्रयोग आम्ही यशस्वी केला. नाशिकमध्येही हे व्हावे.
बस स्थानकाला ‘सरप्राइज व्हिजिट’
जावडेकर यांनी नाशिकरोड बस स्थानकाला सरप्राइज व्हिजीट दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. तेथे जावडेकरांनी दुकानदारांना डस्टबिन ठेवण्याचे तसेच प्रवाशांना स्वच्छतेचे आवाहन केले. विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, संजय दराडे, ज्ञानेश्वर भोसले, विकास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाळी ४० कर्मचाऱ्यांनी प्रभाग १८ मध्ये स्वच्छता केली. शिवाजी पुतळा, पवारवाडी, मोरे मळा, बालाजी नगर, एकता कॉलनी, वसंत विहार, रेल्वेस्टेशन येथे स्वच्छता केली.
मुक्त विद्यापीठातर्फे जावडेकर यांचा सन्मान
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर हे नाशिक येथे आले असता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी जावडेकर यांच्याशी शैक्षणिक उपक्रमांसंदर्भात चर्चा झाली. देशातील दूर शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक बदल करण्यात येत असून, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना लवकरच सर्व विद्यापीठांना पाठविण्यात येणार असल्याचे जावडेकर त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रभारी जनसंपर्क अधिकारी संतोष साबळे आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट